#वाचावं जनाचं लिहावं मनाचं
मेळा –दासू वैद्य
दासू वैद्य आपल्याला कवी म्हणून अधिक माहिती आहेत. त्यांचे ‘तूर्तास’, ‘तत्पूर्वी’ हे काव्य संग्रह तर कं कवितेचा हा बालगीतसंग्रह रसिकांनी नावाजले आहेत. त्यांचे कवीमन आपण यातून अनुभवतो.अगदी हाच अनुभव आपण त्यांच्या ‘मेळा’या ललित लेखांचा संग्रह वाचतांना सुद्धा घेतो.हे लेख त्यांनी वर्तमानपत्रातील सदरासाठी लिहलेले होते.
या सर्व लेखामध्ये आत्ताच्या परिस्थितीचे चित्रण हमखास येते. या संग्रहात दोन पत्रे आहेत, एक पत्र लेखक पेरूमल मुरुगन यांना उद्देशून लिहिलेले आणि दुसरे नाटककार विजय तेंडुलकर यांना उद्देशून लिहलेले आहे. ती दोन्ही पत्रे एकमेकांशी सबंधित नाही पण आहे पण.त्यातूनही आजचा काळ ते उभे करतात.त्याचे प्रश्न मांडतात.आजच्या सामाजिक राजकीय परिस्थितीचे भान त्यातून दिसते.वाचकाला जाणवते. कारण आपल्या आजूबाजूला जे दिसते, ते जगणं,तो भवताल संवेदनशीलतेने आणि वास्तवाचे भान देत ते लिहतात. त्यामुळे वाचक कायम त्या लेखाशी जोडला जातो. त्यांचा प्रत्येक लेख आपल्याला वेगळ्या दृष्टीकोनातून बघायला शिकवतो.त्यामुळे आजूबाजूच्या परिस्थती आपल्याला नीट समजत आहे असा विश्वास आपल्याला वाटतो.
या संग्रहात कधी व्यक्तिगत तर कधी सार्वत्रिक अनुभवावर दासू वैद्य यांनी लिहले आहे.कधी कधी त्यांची भूमिका तत्वचिंतकाची वाटते.त्यांची सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि त्यांचा व्यासंग याचा प्रत्यय आपल्याला प्रत्येक लेखात येतो. म्हणूनच आपले गाव,रस्ते, शहर,मोटेवरच्या गाण्यांपासून ते जात्यावरच्या ओवीपर्यंतची नोंद ते घेतात. तसेच मशिदीतली बांग,मंदिरातील काकड आरती,गावातील गावगप्पा हे सगळं त्यांच्या लेखात सहज येतं आणि वाचक म्हणून आपण ते आपल्या आजूबाजूला शोधत राहतो किंवा आपण ते कधी अनुभवलं असेल तर ते आठवत राहतं.आपल्या डोळ्यासमोर त्या त्या वेळेचं चित्र उभं राहतं.मग पुस्तक वाचायला अधिकच मजा येते.
त्यांच्या अनेक लेखांमध्ये ग्रामीण जनतेच्या जगण्याच्या धडपडीचे चित्र येते. ते वाचतांना आपल्याला वाटत असते किंवा आपणच आपल्याला प्रश्न विचारत राहतो की, खरंच आपण आधुनिकेते कडे जात आहोत का? नक्की कुठून कुठे आपण जात आहोत ?जाणार आहोत ?आपणच आपला मुखवटा फाडत आहोत असेही वाटत राहते.स्वतःला विचार करायला लावणारे, प्रश्न विचारणारे लेख यात आहे.आपण त्याची उत्तरे मिळतात का याचा शोध घेत राहतो असे मला वाटते.
No comments:
Post a Comment