Friday, December 18, 2020

 

दिवस उगवतांना – लोकसत्ता १६ सप्टेंबर २००६

  जाग आली तेव्हा टेबलावरचं घड्याळ बंद पडलेलं दिसलं. घड्याळाचं बरं असतं, मनात आलं की थांबायचं,पुढेही जायचं नाही आणि मागेही. मग कोणाची कितीही फजिती होवो. ते आपलं मनासारखंच वागणार! बाहेर अंगणात पक्ष्यांचा आवाज येत होता. म्हणजे नक्कीच पहाट झाली असणार. पहाटेचा नाद मनामध्ये हळूवार येतो आणि जग येते. बाहेरची हिरवी झाडं मूक नादानं जणू आपल्याला बोलावत असतात. घरात कोचीही जग नाही, म्हणून आवाज न करता पायऱ्या उतरून अंगणात आले. आजूबाजूला दिवस उजाडत असल्याच्या अस्पष्ट खुणा दिसत होत्या. रात्री पावसाची सर येऊन गेली असणार. पाण्याचे थेंब झाडांच्या पानांवर अजून झुलत आहेत. समोरच्या फाटकाच्या कमानीवर जाईचा वेळ विसावलेला. त्यावरच्या कळ्या उमलू पाहत आहेत. निरव शांततेत माझा पायरव पक्ष्यांना कळला असावा. अंगणात सकाळच्या वेळी पाणी पिणाऱ्या भारद्वाजाने मान कलती करून पाहिलं. मिटल्या चोचीने आवाज करत परत तो आपल्या कामात गर्क झाला. त्याचा जोडीदारही लगेच आला.

 हळूहळू सगळेच उठू लागले. साळुंक्या,बगळे, लहानखुरे शिंपी, धोबी,कोकिला यांचा एकत्रित आवाज यायला लागला. पहाटेच्या वेळी त्यांचा हा लहानसा आवाज शांततेचा भंग न करता येत राहतो. मीही माझ्या पावलांचा आवाज होणार नाही याची पुरेपूर काळजी घेत होते. पण वाळलेली पानं, काटक्यांवरून चालतांना आवाज होतोच.पण त्याची सवय पाखरांना झाली असावी. रात्रीतून लिंबाऱ्याने बरीच पानं खाली आणून टाकलेली होती. हा सोन्याचा पाला खराट्याने एकसारखा ढकलून एका ठिकाणी गोळा करतांना फार मजा येते. अंगणभर साचलेले हे पिवळ्या पानांचे छोटे छोटे ढीग सकाळचं सौंदर्य अधिकच खुलवतात. या कचऱ्यातच कधी कधी झाडावरून पडलेलं बगळ्याचं पिल्लू दिसतं. मग एकदम उदास वाटू लागतं. त्याची आई मात्र इतर पिल्लांची काळजी घेण्यात गढलेली असते. Life is beautiful…

मग मीही फुलझाडांच्या आल्यात पाणी सोडू लागते.जमीन ओली होतांना एक मंद सुवास येतो आणि सुगंधित सकाळची सुरुवात होते. जाई-जुई,मदनबाण,सोनचाफा,सोनटक्का,जास्वंद,मधुमालती पाण्याने तृप्त होतात. पानापानांतून आंबा,गुलमोहर शहारतात आणि खट्याळपणे मीही पाणी उडवत राहते.. आता महामार्गावरील गाड्यांचा आवाज यायला सुरुवात होते. भाजीवाले बाजारातील जागेच्या ओढीने भराभर पावलं टाकत असतात. दहीवालीचे हाकारे सुरु होतात आणि दिवस आपल्याला त्याच्या ताब्यात घेतो.





Thursday, December 10, 2020

 

जुन्या सोन आठवणी –

कवडसे ५ ऑगस्ट २००६

नगर लोकसत्ता

 १)डायरी

 डायरीतील काही पाने ...... 

  रोज संध्याकाळी मी ढगाकडे बघून म्हणायचे- ‘अरे बाबा, किती वाट पाहायला लावतोस? ये न एकदा, दे न भरभरून. तुझा तो वेड लावणारा मृद्गंध येऊ दे, अंगप्रत्यंगात मिसळू दे... जणू माझं त्याला भेटण्याचं वेड त्याला समजलं आणि तो आला. अगदी हळूहळू आणि नंतर सगळीकडेच भरून गेला. मृद्गंध लुटून झाला, पानांना लकाकी आली. रस्ते, नाले भरून गेले, तरीही थांबायचं तो नाव घेईना. येतच राहिला. मग मी त्याला म्हटलं, ‘ ए थांब ना, मला थोडं फिरून येऊ दे, तू पसरवलेलं सौदर्य डोळ्यात साठवू दे’. पण तो ऐकेना.मग त्याला अंगावर घेत मी चालू लागले. आता मला पावसाळा काही सांगायचं नसतं, काही मागायचंही नसतं.

  पावसाची आपण आत पाहतो,पण तो आला की मग मिटून का ठेवतो स्वतःला?

  ***

 सोसाट्याचा वारा वाहत होता. वाऱ्याबरोबर पानंही वेगानं पळत होती. अंधारून आलं होतं. आतल्या आत मिटून घ्यावं असं वाटत होतं. अंगाला गारवा जाणवत होता. हवाहवासा वाटणारा गारवा शब्दांना मात्र नाकारत होता. काय करावं ते कळत नव्हतं. तेवढ्यात कुठून तरी बेगम अख्तरचे सूर कानी आले. तिचा दुःखभरला आवाज माझाच होता का? आता हे तपासतच बसावं लागणार.....

आज तू आलास. अगदी नकळत.मला चाहूल लागू न देता यायचा तुझा विचार होता.पण ती कशी अशक्य गोष्ट आहे हे तुला चांगलंच माहित आहे. तू यायच्या आधी येणारा गारवा मनाला मोहित करतो आणि मन मग वाऱ्यावर भिरभिरत राहतं. पावलं जागीच नाचायला लागतात. कोणी काय म्हणेल याची चिंता कशाला? मीही आज तसंच केलं. डोळे मिटले आणि हात पसरून तुला पार आतपर्यंत नेलं.परत कधीही तू बाहेर येवू नयेस म्हणून भरपूर काळजी घेणार असं म्हणतेय,पण ते खूप अवघड आहे. माझी मीच कोरडी होत जाते आणि तू दिलेला ओलावा कसा संपतो कळतच नाही.  

 झाडाची पिवळी झालेली पानं सहज गळून पडतात. त्यांच्या वागण्यात किती सहजता असते. जीवनचा स्वीकार ते किती सहजपणे करतात. आपणही तसं वागायला हवं. झाडांकडूनच काय, निसर्गाच्या प्रत्येक घटकाकडून घेता येईल तितके गुण घ्यायला हवेत. पान पिवळं झालं म्हणजे गळणारच हे माणसांच्या बाबतीत स्वीकारता येईल? काही माणसं तर पिवळेपणात नाही तर हिरवाईतच गळतात. अशा वेळी सहजता कोठून आणायची? आणि ही गलती कशी थांबवायची?

**

आठवणी आपल्याभोवती फेर धरून नाचू लागल्या की सारखं म्हणावसं वाटतं – ‘ चला,पुढे चला. असं कोठपर्यंत त्यांना रोखून धरायचं? पण तसं नाही केलं, तर वर्तमानात त्या मला डोकावूसुद्धा देणार नाहीत. त्यांच्यासाठी कितीवेळा मी दुःखी व्हायचं कळतच नाही. काय हवं असतं त्यांना?आठवणी एका कोपऱ्यात बसून राहतील का? त्यांच्यासाठी सुरेखशी पेटी तयार करू?

 माझी स्वप्नांची ओंजळ रीतीच होत नाही. काय करू? कितीतरी वेळा मी एक एक स्वप्न बाजूला करून रिकामं करण्याचा प्रयत्न करते.पण काहीच उपयोग होत नाही. मी स्वप्नवेडी कधी झाले? की आधीपासूनच होते? ओंजळीतल्या स्वप्नांना जागं करत त्यांना वास्तव दाखवते.पण ती इतकी लबाड असतात की पुढचा रस्ता दाखवतात. मग मी तरी काय करणार?जाते त्या रस्त्याने. वाटते आता सापडेल परीस. सगळ्या वस्तू सोन्याच्या करायच्या आहेत मला.माणसातल्या माणूसपणाचं सोनं!

**

 स्प्व्नं अशी पाठीमागे लागतात. पाठलाग करतात. तेव्हा कुठे लपून बसावं कळत नाही.भान विसरून त्यांना ओंजळीत घ्यावं म्हणते,पण दारावरची नक्षीदार चौकट ते करू देत नाही. वाटतं रोज रोज या स्वप्नांचा चुराडा झाल्यानंतर तरी ते हवं तसं जगू देतील? झोपेत पडलेली स्वप्नं विसरता येतात,पण जागेपणी दिसणाऱ्या स्वप्नांचं काय? त्यांना मागे-मागे ओढून बंद करतांना दमायला होतं, थकायला होतं. कधी ती स्वप्नं वस्तुस्थितीची जाणीव करून देतात, पंखातील अपुरं बळ दाखवतात. फार स्वप्न पाहणारी माणसं वेडी होतात का?

**

लिहू म्हटलं तरी काही गोष्टी नाहीच लिहिता येत. बऱ्याच वेळा हातून निसटूनच जातं वाळूसारखं. असं का व्हावं? काल  आमच्या अंगणातल्या वठलेल्या झाडाला बारीक हिरवा लोंब फुटला. मला आश्चर्य वाटलं अन खूप आनंदही झाला.त्या झाडाला तर किती छान वाटलं असेल! त्या कोंबाला पाहून माझ्यातूनही शब्द झरू लागले.

 


Tuesday, November 10, 2020

 कृष्णा सोबती 1

एखाद्या लेखिकेपर्यंत किंवा एखाद्या पुस्तकापर्यंत आपण कसे पोहचतो ही सुद्धा एखादी घटना होऊ शकते , असे मला वाटते. बघा ना कृष्णा सोबती यांना ज्ञानपीठ मिळण्याच्या आधी मला विक्रम सहानी यांनी मला त्यांच्या लिखाणाबद्दल सांगितले होते. मी हिंदी पुस्तके वाचण्याची माझी ओढ त्यांना सांगत होते आणि ते म्हणाले की तू कृष्णा सोबती यांचे वाचलेस की नाही ? मी खूप काही वाचलेले नाही, हे मी त्यांना स्पष्ट सांगितले. त्यामुळे मला त्यांनी अनेक हिंदीतले लेखक, गुजराती लेखकांची नावे सांगितली.शिवाय मी त्यांनी सांगितलेली पुस्तके वाचते की नाही याचीही अधूनमधून ते चौकशी करत असतात.त्यामुळे माझ्या वाचनाला वेग आणि वेगळेपण येईल याची मला खात्री वाटते.
कृष्णा सोबती यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. जसे जिंदगीनामा, मित्रो मरजानी, ए लडकी,दिलोदानिश,समयसरगम, यारों के यार, सूरजमुखी अंधेरे में इत्यादी.त्यांच्या साहित्यात त्यांनी सामाजिक संदर्भ मांडले, तसेच माणसा –माणसांमधले सबंधांचेही चित्रण केले आहे.त्यां त्यांच्या विविध लेखनातून वाचकाला आशयसंपन्न तर करतातच पण त्यांनी वापरलेली भाषाशैली आणि ग्रामीण भागातील वातावरणाचा संपन्न असा अनुभव सुद्धा त्या आपल्याला देतात.
कृष्णा सोबती यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९२५मध्ये चिनाब नदीकाठी वसलेल्या गुजरात या गावात झाला. हे गुजरात आता पाकिस्तान मध्ये आहे. त्यांचे शिक्षण लाहोरला झाले. फाळणीनंतर त्या दिल्लीला आल्या.त्यांना कोणी तरी विचारलं होतं की , तुमच्या लेखनात फाळणीचं दुःख आणि धार्मिक दंगलींची खोल वेदना जाणवते.’ यावर त्या म्हणाल्या, “स्वातंत्र्य आणि फाळणीचा अनुभव जवळून घेतलेली माणसे मी पाहिली आहेत, ते एवढी वर्ष उलटली तरी अजूनही त्या दुःखद आठवणी विसरलेली नाहीत की फाळणीशी जोडलेलं देशाचं स्वातंत्र्यपर्व विसरली नाही.त्यावेळचा तिरस्कार,खूनमारामाऱ्या काही नको.आपल्या मुल्यांसोबत आपल्याला जगायचं आहे ही जाणीव मनात होती. त्याकाळात त्यांनी सिक्का बदल गया “ ही कथा लिहली. त्यावरून असे वाटते की कोणीही माणूस वैयक्तिक दुःख विसरू शकत नाही.
कृष्णा सोबती म्हणतात की “ माझ्या आजूबाजूच्या वातावरणाने माझं सृजन आणि भाषा निश्चित केली.जे मी जगले तेच मी लिहलं. मी नेहमीच असा प्रयत्न केला की माझी पात्र सदैव माणुसकी आणि निसर्ग याच्या जवळ असतील. वास्तवापासून, सत्यापासून दूर पळणार नाहीत.”
मी जेव्हा त्यांची “ए लडकी “ ही दीर्घकथा वाचली. तेव्हा मला ती खूप आवडली. कारण या कथेत सारं काही होतं. या कथेत काव्य, नाटक, आयुष्यातील सगळे रंग, गंध, एखाद्या माळेसारखे एकत्र गुंफले आहेत. ही कथा मरणाच्या भीतीबद्दल बोलत नाही तर त्याच्याशी दोन हात करण्या विषयी, त्याच्याशी लढण्याविषयी बोलते.यातील स्त्री सांगते की , “जगणं आणि आयुष्य म्हणते प्रतारणा नव्हे तर उलट या दुनियेतून निघून जाणे म्हणजे फसवणूक आहे . हे जग खूप सुंदर आहे. वारा, ऊन, ढग .पाऊस, अंधार,प्रकाश,सारंच सुदंर आहे. इथले सारेच खेळ विलक्षण आहेत. या कथेतील स्त्री जीवनातील आठवणींचा आनंद, सुख अतिशय असोशीने भोगते. या कथेचे वैशिष्ट्य म्हणजे ही कथा संवादातून सांगितली आहे,आईमुलीचा संवाद यात आहे.आई मुलीला आठवणीतील अनेक गोष्टी सांगते. पण तिला आपल्या एकट्या मुलीची काळजी आहे.म्हणून ती मुलीला विचारते,” तुझ्या एकटीच्या जगण्यात तू काय सिद्ध करणार? एकमेकांबरोबर राहतांना, जगतांना काहीतरी शिल्लक राहातं, काही वाहून जातं, एकटं असल्यावर काहीच शिल्लक राहत नाही की वाहुनही जात नाही.गरज पडली तर कोणाला हाक मारशील ?” आपल्याला आणि आपल्या आयांनाही हा प्रश्न पडतोच नाही का ?
पण यातली मुलगी म्हणते, “ मो कोणाला हाक मारणार नाही. जो मला हाक मारेन त्याला उत्तर देईन.” या एका छोट्याशा गोष्टीभोवती गोष्ट लिहलेली आहे.या कथेत खूप वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सापडतात.जसे की स्त्री-पुरुष सबंध,नाती, स्त्रीचे स्थान, तिचे हक्क, स्वातंत्र्य, बंधनं,या सर्व मुद्दांवर इथे चर्चा आहे.तीही एका जिवंत भाषेत केलेली आहे असे जाणवते.
त्यांच्या सगळ्याच लेखनाबद्दल लिहू तेवढे थोडे आहे. त्या म्हणजे फक्त एक नाव नाही तर एक ओळख आहे.त्यांनी मागील पन्नास वर्षात अनेक कथा कादंबऱ्या लिहल्या.त्यांचे एक म्हणणे मला फार आवडते, त्या म्हणतात की, धर्मग्रंथ आणि साहित्यिक कृती यात अंतर आहे . ते दोन्ही एकत्र जोडून विचार करू नये कारण साहित्य आणि कलेचे आपले नियम आणि शिस्त असते.”
त्यांना वयाच्या ९२व्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांचे साहित्य वाचून आपण समृद्ध तर होतोच. पण एखादे मूल्य जपतांना कितीही संकटे आली तरी मागे हटायचे नाही हेही आपण त्यांच्याकडून शिकतो.
Image may contain: 1 person, glasses and close-up
Sanjay Kawale, Drpriti Mangesh Kulkarni and 34 others
20 comments
Like
Comment
Share

  शेतीविषयी प्रश्नांचे सत्य समजून सांगणारे पुस्तक

शेतकरी दिल्लीला,मुंबईला मोर्च्यासाठी निघाल्यावर,त्यांनी दूध,कांदे,टमाटे रस्त्यावर फेकले की त्याची बातमी होते,मग त्यावर महाचर्चा होते.तेव्हाच कुठे जनतेच्या ध्यानी शेतकऱ्यांचे प्रश्न येतात. तोपर्यंत ते आपापल्या घरी महाजेवणे घेत असतात,देत असतात.शिवाय रस्त्यावर फेकलेले अन्नधान्य पाहिले की सगळ्यांनाच वाटत राहते की “हे अशी नासाडी करतात म्हणूनच त्यांना पुरेसे पैसे मिळत नाही,शापच हो तो एक प्रकारचा” जेव्हा खायला काहीच राहणार नाही तेव्हा शेतकऱ्यांना मिळालेल्या शापात हेही येतील.हे फक्त बातम्या पाहणाऱ्यांच्या लक्षात येत नाही. तसेच जेव्हा शेतमालाला भाव मिळतो(तो कधी मिळतो हेच मला माहित नाही.)तेव्हा जनता त्याचा भाव करते आणि पाडून किंमत मागते.शिवाय शेतकरी माजले आहेत असे एकमेकांना सांगत सुटते.हे एवढे लिहण्याचे कारण म्हणजे “पोशिंद्याचे आख्यान एक प्रश्नोपनिषद” हे रमेश जाधव यांचे पुस्तक होय. मला स्वतःला शेतकरी,त्याने पिकवलेला माल,आणि त्यासोबत येणारे अनेक प्रश्न हे समजून घेणे फार फार जरुरीचे वाटते.कारण शेतकऱ्यांचा प्रश्न आपल्या सगळ्याच प्रश्नाचे मूळ आहे.हे आपल्याला लक्षात येते.ते हे पुस्तक वाचल्यावर.
‘ शेतीचा प्रश्न हा शेतकरी आणि त्यांचे कुटुंब, कर्जमाफी यापुरता मर्यादित नाही. तो राजकीय असून आपण शहरात असो की खेड्यात, शेतकरी असो की आयटीतले कामगार,प्रत्येकाच्या जीवनाशी तो संलग्न आहे. रमेश जाधव यांनी त्यांच्या “पोशिंद्याचे आख्यान ,एक प्रश्नोपनिषद” या पुस्तकात वरील मुद्दा वाचकांना समजावून सांगितला आहे. त्या त्या प्रसंगानुसार जरी हे लेख लिहलेले असले तरी त्यातून शेती संबधित आपले गैरसमज दूर होण्यास मदत होते.ते या पुस्तकात म्हणतात की, “ बिगर शेतकरी समाजाचा शेती प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन उदासीन आणि आत्मघातकी आहे. तर राजकीय व्यवस्था या प्रश्नाला साचेबद्ध प्रतिसाद देत असते.” पोशिंद्याचे आख्यान एक प्रश्नोपनिषद” हे रमेश जाधव यांचे पुस्तक होय.
या पुस्तकात गेल्या पाच वर्षातील शेतीप्रश्नांचे परखड वास्तव मांडण्यात आले आहे.यामध्ये शेतकऱ्यांसाठीच्या दुप्पट उत्पन्न,स्वामिनाथन आयोग,दीडपट हमीभाव,कर्जमाफी,दुष्काळ,दुधाचा प्रश्न,कृषी विकास दर यांसारख्या प्रमुख मुद्दयावर प्रकर्षाने भर देण्यात आला आहे. या मुद्द्यासंदर्भात निवडणुकीपूर्वीची आश्वासने आणि निवडून आल्यानंतर सरकारची प्रत्यक्ष कृतीतील तफावत तपासून पाहण्यात आली आहे.साधना,ॲग्रोवन,बोलभिडू,राईटअँगल्स येथे प्रकाशित झालेल्या लेखांचा हा संग्रह आहे.
शासनाच्या निर्णयामुळे अनेक क्षेत्रांचे शोषण होवू शकते आज त्यात शेतकरी प्रामुख्याने दिसतो आहे.याची जाणीव शेती उत्पादनावर जगणाऱ्या प्रत्येक समाजघटकाला व्हावी, शेतीच्या गंभीर प्रश्नांचे वास्तव लक्षात यावे. यासाठी लेखक रमेश जाधव यांच्या लेखांचा हा संग्रह आहे. आपण वर्तमानपत्रात ज्या बातम्या वाचतो त्यामागील सत्य सांगण्याचे काम हे पुस्तक करते. त्यामुळे आपण सगळ्यांनीच हे पुस्तक वाचायला हवे. असे मला वाटते.
No photo description available.
Asha Sathe, Akshay Prabhakar Watve and 3 others
1 share
Like
Comment
Share

 गतकाळाची गाज – नीलिमा गुंडी

एखाद्या व्यक्तीच्या जीवनाची कहाणी म्हणजे त्या त्या काळाची,त्या समाजाची कहाणी सुद्धा असते.खूप वेळा काहीजणांकडे सांगण्यासारखे खूप असते आणि ते सांगावे असे आतून वाटल्यामुळे आत्मकथने लिहली जातात. वाचकांनाही ती आवडतात.पण महाराष्ट्रात स्त्रियांनी लिहलेल्या आत्मकथनाचा स्वतंत्र अभ्यास फारसा कोणी केलेला वाचनात आला नव्हता. “गतकाळाची गाज” या पुस्तकात तो अभ्यास ज्याला लेखिकेने तिरपा छेद असे म्हटले आहे. कारण त्यांनी स्त्रीलिखित आत्मकथनाचा विविध दृष्टिकोनातून अभ्यास केला आहे.या आत्मकथनाच्या आधारे लेखिकेने सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतराची प्रक्रिया उलगडून दाखवली आहे. साधारणपणे आत्मकथनात त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत घडामोडी येतात,पण लेखिकेने त्या घडामोडीमध्ये सामाजिक-सांस्कृतिक परिवर्तन कसे दिसते याचे चित्रण केले आहे.त्यामुळे आपण त्या आत्मकथनाकडे वेगळ्या नजरेने पाहू शकतो.ती कहाणी फक्त त्या व्यक्तीपुरती मर्यादित राहत नाही,तर त्यावेळच्या समाजाचे कंगोरे सुद्धा दिसू लागतात.कारण आत्मकथनात कुटुंब,समाज,राजकारण,अर्थकारण,शिक्षण,संस्कृती या सगळ्याच गोष्टींचा समावेश असतो.
या पुस्तकात लेखिकेने लिहलेले मनोगत सुद्धा वाचण्यासारखे आहे.त्या म्हणतात, ‘रमाबाई रानडे यांच्या ‘माझ्या आयुष्यातील काही आठवणी ( १९१० )या मराठीतल्या पहिल्या स्त्रीलिखित आत्मकथनाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने माझा हा अभ्यास सुरु झाला.’मिळून साऱ्याजणी’ वर्षभर लेखमाला सुरु झाली.सुमारे १५० वर्षाचा महाराष्ट्रातील आधुनिकतेच्या सुरुवातीपासूनचा कालखंडाचा अभ्यास यात केलेला आहे.या अभ्यासामुळे ‘आपण साऱ्याजणींशी जोडलेलो आहोत अशी भावना अनुभवता आली असे लेखिकेचे म्हणणे आहे.
हे पुस्तक लिहतांना लेखिकेने अनेक आत्मकथनांना असलेल्या विचारवंतांच्या,समीक्षकांच्या प्रस्तावना,पत्रे, भाषणे,मुलाखती आदि दस्तऐवजांचा उपयोग केला आहे.त्यामुळे या सगळ्या लेखनाला एक मूल्य प्राप्त झाले आहे.लेखिकेने लेखांचीविषयवार मांडणी केल्यामुळे वाचकाला ते समजून घेणे सोप्पे जाते.स्त्रियांचे शिक्षण ही गोष्ट आज एवढी अवघड वाट नाही. पण एकेकाळी सावित्रीबाई फुल्यांना त्यासाठी संघर्ष करावा लागला होता.शिवीगाळ ऐकावी लागली होती. काशीबाई कानिटकरांना काही काळ त्यांचे पती शिकवत.पण कसे?तर चिडचिड करीत, त्यांना ‘दगड’संबोधित. यातून स्त्री-पुरुष नात्याची गुंतागुंत आपल्या लक्षात येते. आगरकरांनी आपल्या पत्नीला बरोबरचे स्थान मिळावे म्हणून प्रयत्न केले. अशा प्रकारे स्त्रीलिखित आत्मचरित्रात सामाजिक संदर्भ आढळतात.
या पुस्तकात ‘नाते स्त्रीचे स्त्रीशी’ असा एक लेख आहे.तो विस्ताराने लिहलेला आहे.यामध्ये अनुताई वाघ, डॉ.शोभना गोखले यांच्या लिखाणाचा संदर्भ आहे. तसनीम पटेल यांच्या ‘भाळआभाळ’ मध्ये आई मुलीकरिता धावून आली असा अनुभव आहे. लेखीका या लेखाच्या शेवटी म्हणते की, ‘स्त्रीचे स्त्रीविषयक संवेदन अधिक बळकट करून कौटुंबिक आणि सामाजिक नातेसंबंदहाचे दृढ असे जाळे विणणे शक्य आणि आवश्यक आहे.
आपण पुस्तक वाचत जातो तेव्हा लक्षात येते की, यात उल्लेख केलेली काही आत्मकथने आपण वाचलेली नाही.त्यानिमित्ताने ती ही माहित होतात.स्त्रीचा राजकीय प्रवास ही आपण लेखिकेबरोबर पाहतो. ‘स्त्रीच्या नव्या वाटा,नवी आव्हाने’हे प्रकरण आपल्याला विचार करायला लावते.लेखिकेने स्त्री आत्मकथनात येणाऱ्या अनेक गोष्टींचा वेध घेतला आहे. जसे की स्त्रीची निवेदनशैली,मौखिक परंपरा,त्यांचे उपजत मानवी सहसंवेदन याचाही उल्लेख लेखिका करते.खरंतर आत्मकथनाकडे कोण कोणत्या दृष्टिकोनातून पाहता येते हे ही आपल्याला हे पुस्तक वाचून समजते. तसेच कोणतेही आत्मकथन केवळ वाचक या नात्याने वाचून पुस्तक बंद करून ठेवावे.हे यातून कळते.कारण त्या आत्मकथनाचा सामाजिक दस्तऐवज म्हणून त्यांचे मॉल आपण समजून घ्यायला हवे.हे लेखिका आपल्या लक्षात आणून देते.
या पुस्तकात “तवा चुल्यावर”या पुस्तकाच्या प्रास्ताविकात समाजशास्त्रज्ञ फ्रान्सिस यासास यांनी लिहलेला महत्वाचा विचार उद्धृत केला आहे,त्यावरून आपल्या लक्षात येते की,अशी आत्मकथने का जरुरी आहेत. ते म्हणतात, “ प्रत्यक्ष जीवन जगत असतांना स्त्रिया अनुभव घेतात,त्यावर चिंतन करतात, त्याला शब्दरूप देतात. या साऱ्याचा उपयोग करून आजच्या पुरुषप्रधान समाजात स्त्रीला लाभलेल्या कनिष्ठ स्थानात फार मोठी सुधारणा करता येईल.या सुधारणेमुळे कल्पनांच्या,ज्ञानाच्या,इतिहासाच्या,प्रत्यक्ष कृतीच्या आणि संशोधनाच्या क्षेत्रातही महत्वाची क्रांती घडवता येईल.”
इथे आपल्याला निरनिराळी आत्मकथने विविध दृष्टिकोनातून जशी समजून घेता येतात,तसेच त्यांची एकत्र यादीही उपलब्ध होते.त्या मूळ लेखनाकडे सुद्धा आपण वळतो. मला आवडले हे पुस्तक.
Image may contain: text that says "गतकाळाची गाज नीलिमा गुंडी"
Chaitali Ranbhor, Alka Jatkar and 14 others