Thursday, December 10, 2015

दुपार


    “दुपार” कसा वाटतो हा शब्द?.असं मी बस मधल्या माझ्या शेजारणीला  विचारलं , तर तिने (स्वतःच्या ) कपाळावर( स्वतःच ) आठ्या आणल्या आणि  माझ्याकडे पाहिले. त्यामुळे मला समजले स्वनिर्मिती (आठ्या )ही अशी एक गोष्ट आहे जी आपल्या आतच असते. तिच्या उस्फुर्त निर्मिती कडे पाहून क्षणभर मला तिचा हेवा सुद्धा वाटला. वाटल की चित्रकलेच्या वर्गात “दुपार” ची चित्रनिर्मिती करण्याच्या विषय न देता हा सोपा विषय दिला असता तर? पण “आठ्यांचे “चित्र काढणे हे कपाळावर आठ्या आणण्यापेक्षा काहीसे अवघडच आहे. पण तरीही तिच्याजवळ दुपार होती आणि तिने मला तिच्या पद्धतीने दाखवली.मी तिला मनापासून धन्यवाद दिले.कारण तिच्यामुळे मी दुपार कोणकोणत्या रुपात पाहू शकते हे मला कळले.
   एरवी “दुपार “ या नैसर्गिक घटनेकडे मी शब्द म्हणून पाहत होते. कधी कधी तिच्यापासून जो त्रास होत असे त्याचे वर्णन मी शब्दात करत असे.पण त्याचे  चित्र माझ्या दृष्टीने  पाहिले नव्हते. म्हणून वहिनीने जेव्हा  चित्रविषय “दुपार” सांगितले तेव्हा माझ्यापुढे आला “टळटळीत “हा शब्द,नंतर कडकडीत,शांत,भकास,दुपारची ही  शाब्दिक विशेषणे आणि वर्णने माझ्या अनुभवांना धरून येत होती.पण ती तेवढीच पुरेशी नव्हती.अर्थात काहीशा प्रयत्नाने ती अप्रतिम अशी जमली असती.पण त्या दुपारच्या अनुभवाचे वर्णन जे मी शब्दाने उभे करू शकत होते ते मी स्वतःच्या हाताने  चित्र काढण्यासाठी  मी पाहिले नव्हते. याची स्पष्ट जाणीव मला झाली.मग हळू हळू हे ही कळले की  त्यांच्यातले रंग मी बघितले नव्हते. त्यांच्या शाब्दिक रंगाचा खेळ माझ्या आसपास होता पण त्यातले आकार आणि रंगाचे खोल स्तर तर मी अनुभवलेच नव्हते.मी दुपार या शब्दाच्या चित्राला घाबरले होते. आपण उगीच यात पडलो असे वाटायला लागले होते कोणाला विचारावे तर ते ही शक्य नव्हते.पण आशा माझा हात कधी सोडत नाही म्हणून लगेचच मनात विचार आला ,आता  पडलोच आहोत  तर जसे जमेल तसे पूर्ण प्रयत्नांशी करून बघू. एका चित्रासाठी मी माझ्या विचारांचा लंबक नाही पासून हो पर्यंत जोरजोरात फिरवत होते. शेवटी तो हातात धरून मी म्हटले स्वतःशीच “मला हे चित्र काढायचे आहे” असं म्हणतांना मला स्पष्ट जाणीव होती की ,’माझ्या बोटात अजून ती जादू नाही”चित्र काढायला मी शिकत आहे.चित्र काढण्याचे जेव्हा ठरवले तेव्हा दुपार माझ्या समोर वेगवेगळे रंग घेवून  येवू लागली.म्हणजे तिला रंग होते पण मी आज तिच्याकडे अधिक सजगतेने बघत होते.
     दुपारी बस पुलाखालून जात होती ,त्यावेळी मला कळलं की यावेळी रस्त्यावर गर्दी नसते आणि पुलाखाली काही माणसं बिनधास्त डुलकी घेत होते.. गाड्यांचे आवाज येत होते ,अंगावर धूर आणि धूळ दोन्ही उडत होते पण ते गाढ निद्रेत होते.आज आत्ता मला या सगळ्याचे एका विशिष्ट चौकटीतले चित्र दिसत होते.कुठून कसे चित्र पाहायचे, ते आपल्याला कोणत्या चौकटीत बसवायचे आहे आणि ती चौकट आपल्याला झेपणार आहे की नाही हे सुहास वहिनी जे क्लास मध्ये सांगत असते ते आताशा जरा कळू लागले होते.पण हे एवढेच पुरेसे नव्हते. त्याच्या पुढचा प्रवास मला घाम आणणार होता.असंच मला वाटत होते.
    दुपारच्या वेळी बसमधून उतरतांना फारशी घाई नसते. आम्ही सावकाशपणे गाडीतून खाली उतरत होतो.रिक्षा निवांतपणे उभ्या होत्या.काही रिक्षावाले आपापल्या रिक्षेत झोपले होते.फळ विक्रेता संध्याकाळची तयारी करत होता.तो फळं वैशिष्ट्यपूर्णरीतीने मांडत होता. त्याची बायको पाण्याची बादली आणून ठेवत होती.तिच्या अंगावर चमचमणारी डोळ्यात भरणारे रंग असणारी साडी होती. तिच्या कपाळावर सिंदूर होता. तो उन्हामुळे काळपट झाला होता आणि ओघळत होता.आजची दुपार मला हे काय दाखवत होती.माझंच मला आश्चर्य वाटत होते.
      रस्त्यावर एका घरा शेजारी असणाऱ्या झाडाच्या आडोशाला मुली सागरगोटे खेळत होत्या.वर उडणाऱ्या सागरगोट्या कडे त्यांचे आशेने बघणे आणि त्याच बरोबर हातात अचूक पकडण्याचे त्यांचे कसब मला मोहवून टाकत होते.मी मनातल्या मनात त्या खेळात भाग घेतला तर सागरगोट्या बरोबर मी ही वेगळ्याच विचारात गुंतले आणि शेवटी त्या  हाता बाहेर पडल्या .या दुपारीने मला अगदीच शहाणे करून सोडायचे ठरवले की काय?कोणाला कधी आणि कसे शहाणपण येईल हे काही आपल्या हातात नसते.ओट्यावर बायका गहू चाळत होत्या.नेहमीचे दळण असणार हे. गप्पा मारत मारत काम चालले होते.थोडे पुढे गेल्यावर केस विंचरणे आणि उवा काढण्याचे काम मन लावून चालले होते. आमच्या कॉलनीत पाण्याची लगबग चालली होती.कोणी हिरामणशी बोलत होते तर कोणी बागेला पाणी घालत होते.कोणी टाक्या भरत होते.अजून रस्त्यावर पाणी आले नव्हते.
   रिक्षाचा भोकाड पसरल्या सारखा आवाज आणि धूर दिसत होता. शाळेतील मुलं घरी आनंदाने आली होती.रिक्षेत भरपूर मोकळी जागा होती.पण मला फक्त रिक्षावाल्याचे पाय दिसत होते.लांबसडक पायाचा तळवा.घोट्यापर्यंत दिसत होते. त्याचा चेहरा मला दिसलाच नाही.अचानक मला अशा लांबसडक अनवाणी पायांची आठवण झाली.पंढरपूरला मी हे पाय पाहिले आहेत, एका दुकानदाराच्या दुकानात त्यांची फ्रेम होती. हो ते हुसेन साहेबांचे पाय होते.हुसेन साहेब पंढरपूरचे आहेत.त्या माणसाचा त्यांच्यावर पार जीव होता.

  अशी ही दुपार मला हुसेन साहेबांचा साक्षात्कार घडवणारी.मला तर मजा आली. हे मी आज म्हणते आहे कारण उद्या माझ्या समोर काय आव्हान आहे हे मला माहित नाही.

Friday, October 2, 2015

डेस्टिनेशन सेवाग्राम


  












“अपनी आवश्यकताए बढाते रहने की पागल दौड में जो लोग आज लगे है; वे निरर्थक मान रहे है की, इस तरह खुद अपने स्वत्व में, अपने सच्चे ज्ञान में वृद्धी  कर रहे है. उन सबके लिए “हम यह क्या कर बैठे”? ऐसा पुछने का समय एक दिन आए बगेर रहेगा नही. एक के बाद एक अनेक संस्कृतियां आयी और गयी, लेकिन प्रगती के बढाई के बावजूद भी मुझे बार बार पुछने का मन होता है की यह सब किसलिए ? इसका प्रयोजन क्या? डार्विन के समकालीन वालेस् ने कहा की, तरह तरह की नयी नयी खोजो के पश्चात पचास वर्ष में मानव जाती की नैतिक उंचाई एक भी इंच बढी नहीं. तोलस्तोय ने यही बात कही. इसामसीह, बुद्ध और मोहम्मद पैंगबर सभी ने एकही बात कही है.”
                                                    म. गांधी
   हे सर्व म. गांधीच्या सेवाग्राम येथील कार्यालयाच्या बाहेर बोर्डावर हिंदी आणि इंग्लिश मध्ये लिहीलेले आहे. आज आपण सर्वजण त्याच समस्येला तोंड देत आहोत. आम्हीही या पागल दौड मधून थोडं थांबू शकलो. पण या पागल दौड मधून मुळातच नसलेल्या काही व्यक्ती तिथे भेटल्या. गांधीजीनी सांगितल्याप्रमाणे ते आचरण करत आहे. बाहेरच्या धावत्या जगापासून लांब राहून स्वतःला नक्की काय करायचं आहे हे त्यांना लवकर कळल्यामुळे त्या स्थिर नजरेने आणि बापूजींच्या विचाराने जगाकडे पाहण्याचा प्रयत्न करतांना दिसतात.
  आम्ही सेवाग्राम पोहचलो तेव्हा रस्तावर आदल्या दिवशी उडालेल्या दिवाळीच्या फटाक्यांच्या खुणा आजूबाजूला दिसत होत्या. पण जसजसे बापुकूटीच्या दिशेने गेलो तसतसा शांत झालेला रस्ता अनुभवता आला. खुद्द बापूजींच्या आश्रमात गेलो तेव्हा प्रत्येकजण स्वतःची कामे शांततेने करत होता. तिथे कोरीयाहून तरुण मुलं-मुली आले होते. ते वर्षातून तीन वेळा ८-८ दिवसांची भेट देतात. तिथेच राहतात. आश्रमाच्या पद्धतीने जीवन जगतात. शिवाय गांधीजींचे विचार आजच्या काळात कसे उपयोगी आहेत याचा अभ्यास करतात आणि चर्चेद्वारे एकमेकांना सांगतात.
   आश्रमात गांधीजी जेव्हा सर्वप्रथम आले तेव्हा ते ज्या ठिकाणी राहिले ती जागा आजही तशीच सुव्यवस्थित ठेवलेली आहे. घराच्या पांढऱ्या मातीच्या भिंती, जमीन आणि लाकडी खांब हे त्याच परिसरात उपलब्ध असणाऱ्या साधनांपासून बनवलेले आहे. त्याला ‘आदिनिवास’ असे म्हटले जाते. आपण त्या ठिकाणी शांत बसू शकतो आणि आपल्या आतल्या आवाजाला साद घालू शकतो. काहीशा प्रयत्नाने तो आपल्याला नक्कीच ऐकू येईल. पण त्यासाठी प्रयत्न हवेत. कारण आजच्या गोंगाटाच्या काळात त्याला आपल्या सादेची सवयच नाही. म्हणून रोजच्या हळूहळू प्रयत्नाने तो आपल्याला निश्चितच ऐकू येवू शकतो. ‘आदिनिवास’ सारखेच ‘बा’ कुटी ही तिथ आहे. त्यांचे न्हाणीघर, त्यांनी वापरलेल्या वस्तू, गांधीजीचे ‘बा’ ला लिहिलेले पत्र ज्यात “तुझ्याशिवाय मी असूच शकत नाही” हे सांगितले आहे. तसेच त्यांनी “बा” ची केलेली सेवा याचेही वर्णन तिथे लिहिले आहे. तिसरी कुटी आहे- बापूजींचे दप्तर. तिथे पुस्तके ठेवलेली आहेत. ते वापरत त्या वस्तू- उदा.-दगडाचा पेपरवेट,-पेनपात्र इ. एका कुटीला ‘आखरी निवास’ म्हटले आहे. गांधीजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उसळलेली दंगल शांत करण्यासाठी इथून गेले ते परत आलेच नाहीत. ह्या सगळ्या कुटी मध्ये आपण बापूजींना अनुभवू शकतो. कारण आपण त्यांच्या बद्दल वाचलेलं असतं आणि एका ऐतिहासिक वस्तुत उभे असतो.
   एका साध्या माणसाने आपल्या सोप्या सहज वाटणाऱ्या पण आचरण्यास अवघड अशा विचारानी सारा देश ढवळून काढला. जगाला अचंबित केले. कोणती शक्ती होती त्यांच्याजवळ? या विचाराने आपण त्यांच्याविषयी अधिक जागृत होतो. ते फक्त राजकारणासाठीच केवळ आपला आदर्श ठरत नाहीत, तर पार स्वयंपाक घरापर्यंत ते आपल्याला आदर्शवत वाटतात. जेवतांना कोणते नियम पाळायचे हे त्यांनी सांगितलेले आहेत. ते तिथल्या जेवणघरात लिहून ठेवले आहेत. साध्या गोष्टी पण त्याचा समोरच्या माणसावर कसा परिणाम होईल याची अचूक जाण त्यांच्या जवळ होती. अत्यंत साधं जेवण, शिवाय त्या आश्रमाच्या शेतात पिकलेला भाजीपाला, धान्य यांचा योग्य वापर तिथे होतांना दिसतो. गांधीजी म्हणत की एखादी भाजी कच्ची राहिली असेल तरी ती तशीच सोडून द्या. त्यामुळे तुम्ही काही अर्ध पोटी राहणार नाही. जेवणात काय कमी आहे किंवा त्रुटी आहेत हे नंतर चिठ्ठी लिहून त्या व्यक्तीजवळ सांगा. पानावरच रागवू नका. आज घराघरातल्या सर्वांनी ही सवय अंगिकारली पाहिजे. नाहीतर आपल्याला जेवणावर टीका-टिप्पणी करण्याची कोण घाई होते. तीच तत्परता मात्र आपण कौतुक करण्यावेळी दाखवत नाही.
    आश्रमात पहाटे ४.४५ वा. प्रार्थना होते. त्या प्रार्थनेत संस्कृत श्लोका बरोबर, मुस्लीम, ख्रिश्चन या धर्मातील प्रार्थनांचाही समावेश आहे. पहाटेच्या वेळी नुकतेच उजाडायच्या वेळी सर्वत्र शांतता असतांना म्हटलेली प्रार्थना हा एक चांगला अनुभव आहे. आपण ज्या रस्त्यावरून जाणार आहोत त्या रस्त्यावर गांधीजींच्या या प्रार्थना सोबत करतात असे वाटते.
   आश्रमात  सकाळी ७ वा. नाष्टा असतो. नंतर आपण आश्रमाच्या कामात मदत करायची. शेतात, गाईचे करण्यासाठी, स्वयंपाकघरात किंवा इतर ठिकाणी मदत करायची. ते आपल्याला सांगत नाहीत. आपण होवूनच ती करायची. नंतर ११वा. जेवण १२वा. विश्रांती. नंतर परत काम. ५ वा. जेवण. संध्याकाळी ५.३०ला प्रार्थना असते. असा सर्वसाधारण दिनक्रम तिथे आहे. वेगवेगळ्या धर्म-जातीतील लोक तिथे सतत भेट देत असतात. उत्सुकतेने आपले प्रश्न तेथील कार्यकर्त्यांना विचारतात. ते ही त्यांचे समाधान करण्याचे प्रयत्न करतात. अन्यथा कोणत्या पुस्तकात याबद्दल लिहिले आहे ते सांगतात. तेथे राहणारे कार्यकर्ते हे देशाच्या विविध भागातून आलेले आहेत आणि तरुण आहेत. ”पागल दौड” मधून बाजूला झालेले आहेत.
    मालती देशमुख ह्या गेल्या १२ वर्षांपासून तिथे राहत आहेत. मालतीताई लहानपणापासूनच गांधीजीबद्दल ऐकत होती, वाचत होती. ती सुरुवातीला थोड्या दिवसासाठी आश्रमात राहियला आली आणि नंतर कायमचे इथेच राहायचे असे तिने ठरवले. अत्यंत साधा पोषाख, आश्रमातील सर्व बारीकसारीक गोष्टींकडे परिपूर्ण लक्ष आणि काम करण्यात आणि मदत करण्यात तत्परता. गांधीजीविषयीच्या गोष्टी ती जशी आपल्याला छान सांगते, तशी आश्रमातील गोठ्यातील गायींचे कौतिकही ती फार प्रेमळपणाने करते. गायीबद्दल तिचा जिव्हाळा प्रत्यक्ष पाहण्यासारखा आहे. गाईचा गोठा म्हंटले की आपण नाकावर लगेच रुमाल धरतो. पण आश्रमातील गाईंच्या गोठ्यात गो पूजनाच्या दिवशी एक छान गाण्याचा कार्यक्रम होवू शकतो. तिथे पाच पन्नास जण ऐसपैस मांड्या घालून बसू शकतात. इतका स्वच्छ तो गोठा आहे. येथील प्रत्येक कार्यकर्त्याला दरवर्षी एक काम सोपवले जाते. त्याचे वर्षाच्या शेवटी मुल्यांकन होते. यावर्षी सडा आणि गाईचे काम मालती कडे आहे.
    इथे मालतीताई बरोबरच जेनी व ललिता या आसामहून आलेल्या मुली आहेत. जेनी ९ वर्षापासून एकटी राहते तर ललिता ५ वर्षापासून . तसेच विनोद भाई पण एकटे राहतात. या सगळ्यांनीच आश्रमाचे जीवन कंटाळा न करता स्वीकारले आहे असे त्यांच्या वर्तनातून दिसते. प्रत्येकजण गांधीजींनी केलेल्या विविध प्रयोगात जाणकार आहेत. कोणी आपल्याला ‘नई तालीम’ विषयी माहिती देतात, तर कोणी गांधीजींच्या अहिंसे विषयी सांगतात. आपल्या प्रश्नांना ते त्यांच्या परीने भिडतात. या ठिकाणी आपल्याला पडणाऱ्या अनेक प्रश्नांची गुंतवळ सोडविण्यास हा परिसर नक्कीच मदत करतो. फक्त आपल्याला ‘पागल दौड’ मधून थोडेसे बाजूला सरकावे लागते. त्यामुळे आपण नकी मागे पडणार हे मात्र नक्की.
                                                           
    


Wednesday, September 16, 2015

पेरते व्हा.

                                  







  गेल्या तीन महिन्यांपासून रोज सकाळ संध्याकाळ “ पेरते  व्हा” चा गजर होत आहे. पानांच्या आडून तो सारखा ओरडत असतो म्हणून त्याला शोधत अनेक झाडांना  दुर्बिण लावली.मग दुर्बिणीपेक्षा स्वतःच्या डोळ्यावरचा विश्वास अधिक वाटला म्हणून ती बाजूला ठेवली आणि डोळे ताणून ताणून त्याला शोधलं.तर तो पानांच्या गर्दीत लपून आपलं काम करत होता.हो खरच तो “पावशा” होता.सगळ्यांना “पेरते व्हा” ची हाक देण्याचे काम पोटतिडकीने करत होता.त्याला बघून माझ्या डोळ्यात खरं तर पाणीच आलं. खूप दिवसापासून त्याला शोधत होते.आजूबाजूला चाललेल्या या गोंधळात त्याचीच हाक जणू मला वाट  दाखवत आहे  असंच वाटते . तो आहे आणि काहीतरी चांगलं पेरायला सांगत आहे हे ऐकून तर मन खुश होत होतं.वाटायचं हाच एकमेव असा आहे की ज्याला कोणत्याही अभिनिवेशा शिवाय काहीतरी चांगलं पेरायचं आहे.मन हलकं झालं, आणि त्याच बरोबर मनाला  वस्तुस्थितीची करकरीत जाणीव झाली.
    हो जून महिन्यापासून पावसाळा सुरु झाला पण पाउस काही नीट पडला नाही.रस्ताही ओला झाला नव्हता.कुंडीतली झाडे सुद्धा वरून दिलेल्या पाण्यात खुश नव्हती त्यांना रिमझिम सरीच हव्या होत्या.विहिरीतल्या पाण्यावर लावलेला सोयाबीन सुद्धा वर तोंड करून बसला होता.पण पाउस रुसलाच होता.तो भरून येत होता पण हट्टीपणे तो ढगांचा हात सोडत नव्हता. जणू खाली आल्यावर आम्ही त्याला खुशाली विचारणारच नव्हतो.त्याची ठेप ठेवणार नव्हतो.असं वाटत होतं का त्याला?की तो यावा असं आम्हांला वाटत नाही अशी आमची वागणूक होती.खरंतर सगळेचजण मनोमन सारखी त्याची आराधना करत होते पण तो कोणत्याही प्रार्थनेला फसायचं नाही असंच जणू ठरवत होता. वर्षोनुवर्षे आम्ही जे वागत आहोत त्याचं फळ तो अशारीतीने आम्हांला देणार होता.   
 पाउस असा हट्टीपणा करत होता आणि पावश्याही  हट्टीपणे “पेरते व्हा” असं सारखं सांगत होता.बी पेरण्यासारखी परिस्थिती नसतांना हा आणखी काय पेरायला सांगत असावा कोण जाणे? अर्थात सगळीकडे अनेकजण विशिष्ट चौकटीत असणारी आपली ठाम मते   आपल्या परीने पेरत  आहेत .,पण त्या सगळ्या विचारांचा सर्व सामान्य माणसाला उपयोग  होईल का? की त्रास होईल.?विरोधी मते असणारी माणसे एकमेकांच्या मतासाठी किंचितशी तरी जागा देतील का?थोडं वेगळ्या वाणाचे बी पेरून बघतील का? असा विचार कोणी करत असेल का?तो त्यांनी करावा हेच तर पावशा सांगत आहे असं मला वाटतं.एवढ्या मतमतांतरे असलेल्या समाजात तो फक्त “पेरते व्हा” ची हाक देतो आहे हेच खूप सकारात्मक आहे. असे मला वाटते.
    
    

   

Sunday, July 12, 2015

अनुभवांना स्मृती असतात पैशांना नाही .


   आपल्याला  आपल्या  शिक्षणासाठी किती पैसे लागले हे माहित नसतं,पण आपल्या  शाळेतील आणि कॉलेजमधील आठवणी आपण  आयुष्यभर काढत असतो .आई वडिलांच्या  दवाखान्यासाठी किती पैसे खर्च झाले हे आपण  काही दिवसांनी विसरून जातो ,पण आई वडिलांच्या  चैतन्यदायी आठवणी नेहमी आपल्याला  आठवत असतात,किंवा आपल्या  तान्हुल्याचा जन्म आणि त्या संबंधित आठवणीना आपण  जीवनभर उजाळा देत असतो .आपल्या  हनिमून साठी किती खर्च झाला हे आपल्या  लक्षात रहात नाही पण आपल्या  शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला एकमेकांबरोबर काढलेले ते सुंदर दिवस आठवत रहातात.पैशांना आठवणी नसतात तर अनुभवांना त्या असतात.
   चांगला –वाईट काळ,समृद्धीचा आणि गरिबीचा काळ,भविष्य सुरक्षित असण्याचा काळ आणि उद्या काय  वाढून ठेवलं आहे हे माहित नसण्याचा काळ,जीवन एखाद्या  चक्रीत बसलो आहे असं वाटण्याचा  काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो .जीवन विपुलतेने भरलेले आणि काहीच नाही असे असले तरी शेवटी काय उरते तर तेव्हा घेतलेल्या अनुभवांच्या आठवणी.काहीवेळेस खिसा पूर्ण भरलेला असतो तर काहीवेळेस पूर्ण रिकामा.काहीवेळेस पुरेसा पैसा असतो  तरी आपण  चिडचिड करतो . काहीवेळेस पुरेसा पैसा नसतो तरी आपल्या  चेहऱ्यावर स्मित असते.आज आपण  मागे वळून पहिले तर आपण  एकमेकांबरोबर बसून किती हसलो याची आठवण काढली तर आपल्या  डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू येतील आणि आपण  एकटेच बसून किती रडलो  हे आठवलं तर आपल्या  चेहऱ्यावर स्मित येईल.या सगळ्यामध्ये जीवन आपल्याला  आपला  स्वतःचा इतिहास निर्माण करण्याचा अनुभव देते आणि त्या आठवणीनी आपले जीवन भरून जाते आणि त्या नेहमी आपण  आठवू शकतो .
   प्रथम आपण  कोणाच्या मदतीशिवाय सायकल चालवायला शिकलात......,कोणाच्या मदतीने गाडी शिकलात ?
  आपल्याला प्रथम कोणी मैत्री साठी प्रथम विचारले?
आपल्या  मुलाचे पहिले रडणे,पहिलं पाउल,पहिला शब्द,पहिला पापा.....
आपल्या  पालकांनी आपल्याला  दिलेली पहिली भेट आणि आपल्या  मुलाने/मुलीने दिलेली पहिली भेट....
  आपलं  पहिलं बक्षीस, लोकांनी  पहिल्यांदा स्वीकारलं तो दिवस,आपला  स्टेज वरचा पहिला कार्यक्रम.....
ही यादी न संपणारी आहे...अनुभवांच्या आठवणी ह्या कालातीत असतात.
हे कोणी नाकारू शकत नाही की कोणत्याही गोष्टीसाठी पैसा लागतो.पण वस्तुस्थिती हीच शिल्लक राहते की त्या अनुभवासाठी किती पैसा खर्च झाला हे विसरले जाते पण तो अनुभव नाही,कधीच नाही.
   आर्थिक मंदी आली तरी त्याने काय होते?येवू द्या.पण आपल्या  जीवनाच्या गुणवत्तेत मंदी यायला नको . त्यामुळे कदाचित आपण आपल्या पालकांच्या काही इच्छा पूर्ण करू शकणार नाही .  पण काही नक्कीच पूर्ण करू शकू . आपण आपल्या   मुलाला पर्यटन स्थळी नेवू शकणार नाही पण स्थानिक बागेत नेवून त्याच्या बरोबर खेळू शकाल ना?पैशामुळे या सगळ्यांची किंमत कमी होणार आहे असं नाही किंवा तुमच्या बाळाला तुमच्या मांडीवर घेतल्याने त्याची किंमत कमी होणार नाही.मंदीच्या काळात  ,ज्ञान विकसित करा,आध्यात्मिक वृद्धी करा या सगळ्या गोष्टी काही पैशावर अवलंबून नसतात.
  काळा बरोबर आर्थिक स्थिती सुधारेल..चलनाला किंमत येईल.या सगळ्या काळात आपण  मागे वळून पहिले तर आपण  काहीच केले नाही केवळ खिन्नतेने लोळत पडलो  असं व्हायला नको.मंदी मुळे आपल्या  कडे पैसा येणार नाही,पण अनुभवांची कमी असणार नाही.जे आपल्याकडे  आहे त्याने आपण  आनंदी होणार नसू  तर आपल्या  कडे कितीही असले तरी आपण  आनंदी होवू शकणार नाही.
   मला कसं आणि काय वाटतं आहे हे माझ्याजवळ किती आहे यावर अवलंबून नाही हा जीवनाचा विचार असेल तर मस्त जगू आपण.


Friday, June 19, 2015

बा मना









    आज सगळ्यात जास्त कसली गरज आहे? आजूबाजूला चाललेल्या अनेक घटना आपल्याला सगळ्यांनाच अचंबित करत आहेत. मोठ्या संख्येने लोक हातात शस्त्र धरू लागले आहेत. कोणी कोणाचे जराही बोलणे ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नाही. अरे ला कधी एकदा कारे म्हणतो याची घाई झाली आहे. एखादा विचार का पटतो आणि एखादा का पटत नाही याची कारण मीमांसा करायला वेळ नाही.आपल्याला एखादा विचार पटत नाही मग त्या विचाराचे खंडन करण्या ऐवजी तो विचार, मत मांडणाऱ्या व्यक्तीलाच संपवणे सोपे वाटत आहे. असं काय झालं आहे आपल्याला की आपण इतके हायपर होतो आहे. का कोणाचे ऐकून सुद्धा घ्यायला तयार नाही? चर्चा सुद्धा नको आपल्याला? असं म्हणतात की आजचे युग अधिक उदारीकरणाचे आहे, आधुनिक विचाराचे आहे?मग यात दुसऱ्यांच्या विचाराला काहीच जागा नाही का? असे कसे आपण उदार, आधुनिक, मग जुनी माणसे परवडली ना? ते निदान ऐकून तर घेत होते,कोणाचा जीव घेत नव्हते. एखाद्याच्या घरा  समोर जाऊन तमाशा करण्यापेक्षा एकमेकांचे विचार समजावून घ्यायला आपण भेटू शकत नाही का? एकमत होणार नाही पण हे तर मान्य करू आपली मते भिन्न आहेत पण ती आहेत. हे स्विकारूया.काय वाटते. पण यासाठी आपल्याला गरज आहे सुंदर मनाची. खरच आपल्याला फार गरज आहे सुंदर मनाची.
   आपण एखादे ठिकाणी काम करतो आणि ते काम व्यवस्थित व्हावे म्हणून जशा आपल्याला वेगवेगळ्या कार्यशाळेला हजर राहावे लागते. त्यामुळे आपण आपल्या कामात काही बदल करतो,सहकाऱ्याला समजावून घेतो तसे हा समाज वेगवेगळ्या विचारांचा आहे,आणि तो तसा वेगळा विचार करण्याची संधी प्रत्येकाला मिळायला हवी, त्यातच समाजाचा  जिवंतपणा आहे.तो जिवंतपणा टिकवण्यासाठी आणि समाजात चैतन्य राहावे म्हणून आपले मन सुंदर असणे गरजेचे आहे असे मला वाटते. ते सुंदर होण्यासाठी आपण काही गोष्टी मुद्दाम शिकायला हव्यात. ते कसे?
२.कसे मान्य करायचे विचार.
   सुंदर मनासाठी तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात,किवा एखाद्या  व्यक्तीचे विचार,मत,भावना यातील कोणते मुद्दे तुम्हांला  मान्य होत आहे ,याचा शोध घ्यायला हवा. खरंतर हे खूप अवघड काम आहे.
    हे अवघड आहे कारण तुम्हांला सहमत असणारे मुद्दे हे खऱ्या अर्थाने मान्य असायला हवे,त्यात वरवरची/खोटी मान्यता नको. म्हणजे त्या व्यक्ती समोर हो हो म्हणायचे पण मनात मात्र  नकारात्मक विचार करायचा.एखाद्याचे  मत मान्य असणे फार अवघड आहे याचे मुख्य कारण प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकते. तुमचे बालपण, तुमच्या आजूबाजूच्या व्यक्ती,तुम्ही राहता ती जागा, शहर,गाव, तुमचे शिक्षण. प्रत्येकाची आपल्या विचारामागे काही पार्श्वभूमी असते.काही लोक मतभेद नोंदवतात तर काही लोकांचा सर्व गोष्टी मान्य करण्याचा कल असतो.
     एखाद्या विचाराशी ,एखाद्या मताशी सहमत आणि असहमत असण्याची दोन टोक असतात.
जसे काही म्हणतात...
 तुम्ही एकदम बरोबर आहात...
मला तू म्हणतो ते सर्व मान्य आहे...
मी पूर्णपणे तुझ्याशी सहमत आहे...
एकदम बरोबर..
 मला शंभर टक्के मान्य आहे     
      असे जर तुम्ही सर्वच गोष्टीशी सहमत असाल तर तिथे चर्चेला काहीच वाव नसतो. जागा नसते आणि मतांची देवाणघेवाण करता येत नाही. एकादी व्यक्ती एखादे व्याख्यान देत आहे , ते छान असेलही,पण तुमच्या सहभागाला त्यात काहीच महत्व नसेल तर तुम्ही त्यातून काहीच मिळवू शकणार नाही. तुमच्या प्रतिसादाची वक्त्याला जर गरज वाटली नाही तर त्याचा विचार तुम्ही समजावून घेऊ शकणार नाही.
    अशा वेळी अजून दुसरे टोक दिसते.
हो.पण .....
मला हे पूर्णपणे मान्य नाही....
तू त्या ठिकाणी चुकीचा आहे.....
 हे असे नाही.......
        या ठिकाणी व्यक्ती जे जे काही सांगितले आहे, त्या सर्व गोष्टी अमान्य करतो आहे. अशी व्यक्ती असहमती दर्शवून हा प्रचंड युक्तीवादी  व्यक्ती स्वतःचे श्रेष्ठत्व  प्रस्थापित करू इच्छितो. उच्चशिक्षित माणसं सुद्धा नेहमी अशा प्रकारे वागतात. कारण तसं वागण्याचं त्यांना धैर्य असतं. अशा प्रकारचे मन हे तीव्र संताप आणणारे असते आणि ते सुंदर मनापासून फार दूर असते.
    आपण  या दोन टोकांच्या मध्ये कुठेतरी असायला हवे. आपण  सगळ्या गोष्टी मान्य करू नये  आणि सगळ्या गोष्टी अमान्यही करू नये.असे मला वाटते .





  योग्य असण्याची गरज-
            या ठिकाणी आपण अहंकाराने बांधले गेलेलो असतो. युक्तिवाद हा दोन अहंकारामधील युद्ध असते. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल सहमती दर्शवतात तेव्हा तुम्हांला वाटते की तुम्ही मुद्दाच्या दुसऱ्या बाजूने विचार करत आहात. म्हणून तुम्ही स्वतःला गमावतात. जेव्हा तुम्ही असहमती दर्शवतात तेव्हा तुम्ही तुमचा अहंकार ठासून सांगतात आणि तुम्ही श्रेष्ठ असल्याचे सुचवतात. शाळेत, समाजात युक्तिवादाला आणि वादविवादावर अधिक जोर दिल्यामुळे अशा प्रकारच्या अमान्यता  अधिक मजबूत होतात,अशाच प्रकारचे वर्तन सरकारात,न्यायालयात आणि प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा दिसते. सरकारात  सुद्धा विरुद्ध पार्टी नेहमी सत्तेत असणाऱ्या पार्टीला विरोध करते.मग परिस्थिती कशीही असो. अनेक लोकांना यात मुर्खपणा दिसतो.
    जर तुम्ही विजयी युक्तिवाद करतात असे सुचवित असाल, तर तुम्ही  युक्तिवादाला जिथून सुरुवात करतात तिथेच शेवटी येतात यात तुम्ही फक्त  तुमची युक्तिवाद करण्याची क्षमता दाखवतात. जर तुम्ही युक्तिवादात हरलात तर तुम्हांला नवीन काहीतरी मुद्दे सापडण्याची शक्यता असते. नेहमी आपलेच बरोबर असणे ही महत्वाची गोष्ट नाही आणि ती निश्चितपणे सुंदर नाही.

      चर्चा  ही प्रामाणिकपणे खरी असावी, त्यात अहंकारातील भांडणापेक्षा विषयाला महत्व द्यायला हवे. 








Sunday, May 10, 2015

असाही एक रस्ता रोको.











    सकाळी/पहाटे फिरायला जाशील तेव्हा छत्री घेऊन बाहेर पड.एक सल्ला. आमच्या कॉलनी ही एक अखंड सल्लागार मंडळ आहे. इथे तुम्हांला कशावरही आणि कोणीही सल्ला देवू शकते.प्रत्येकाच्या क्षमता अप्रतिम आहेत. अर्थात त्याबद्दल परत नंतर कधीतरी.
  छत्री?उद्या पाऊस पडणार आहे का?
नाही.पण ती आवश्यक आहे.
एकतर  पावसाळ्यात सुध्दा माझी छत्री मला सापडू नये अशी मी ठेवलेली असते आणि भर उन्हाळ्यात मी ती  नी ईइ ट ठेवलेली छत्री कशी सापडणार.?पण माझं छोटंसं दुःख मी कोणाला सांगायचा प्रयत्न करत नाही.
तर छत्री का?
आमच्या घरासमोर च्या आंब्यावर कावळ्यांनी घरटी केली आहेत. काही दिवसांपूर्वीच सामुदायिक सोहळा झाल्याचे मला आठवले. कारण एका घरट्यात कावळा किंवा कावळी आपल्या घरट्यात बसली होती आणि त्यांचे बांधव अभिनंदन करण्यास मोठ्या संख्येने जमले होते. मुल जन्माला येण्याचा आनंद ते कॉलनीत प्रचंड कावकाव  करून साजरा करत होते. कदाचित ते हे माणसांकडूनच शिकले असतील. ती नाही साधा सत्यनारायण ,वाढदिवस असेल तरी मोठा भोंगा लावून गाणी ऐकवतात.
    त्या आंब्याच्या झाडावर चार पाच घरटी असतील, त्यामुळे आम्ही झाडाखालून  जात असतांना ते सगळे जण जोरजोरात ओरडायचे.नंतर आम्ही आमच्या डोक्यावर एक काडी, जाड काडी.मोठी काठी असे अनुक्रमे कावळ्यांच्या जोरा नुसार घेऊन जावू लागलो. चालतांना काठी डोक्यावर घेऊन हलवायची.म्हणजे कावळा आमच्या डोक्यापर्यंत यायचा नाही.तरी घाबरून आम्ही पळत पळत ती जागा पार करत असू. ज्या लोकांना माहित नव्हते त्यांना कावळ्यांनी टोच्या मारल्या. काहींना त्यांची चोच डोक्याला जबरदस्त लागली,त्यामुळे जखम झाली. कॉलनीतले काहीजण तर घमेले डोक्यावर घ्यायचे,काहीजण कुंचा घ्यायचे.असे आम्ही सगळेजण छत्रपती होत होतो .
   आम्ही गच्चीतून दुर्बीण घेऊन पाह्यचो कावळ्यांच्या  घरट्यात पाह्यचो  तर ते आमच्या भोवती कलकलाट करायचे.आम्हांला पाह्यचे होते की, खरच कोकिळा त्या घरट्यात अंडी घालते का?पण कावळ्यांना त्यांच्या खाजगी प्रश्नात लक्ष घातलेले आवडत नव्हते.ज्यांच्या अंगणात आंब्याचे झाड होते त्यांना तर घराबाहेर, गच्चीवर सुद्धा जाणे मुश्कील झाले होते. त्यांनी कावळ्यांना कितीही हाकलायचा प्रयत्न केला तरी ते मुळीच दाद देत नव्हते. शिवाय घरातील काही सदस्य कावळीण व तिच्या पिल्लांच्या बाजूचे होते.कॉलनीत एक शाळा आहे, त्या शाळेच्या भिंतीवर अनेकजण कोणी पाहत नाही असं बघून भात,पोळ्या ठेवत होते. त्यामुळे कावळ्यांची खाण्यापिण्याची सोय झाली आणि सगळ्या कॉलनीभर खरकटे सांडू लागले.आपल्या घराच्या स्वच्छते इतका बाहेरचा परिसर काहींना महत्वाचा वाटत नाही. तरी ग्रामपंचायतीने कचरा टाकण्याची उत्तम सोय केली आहे.पण तिथ पर्यंत जाणे लोकांना आवडत नसावे.तर कावळे-कावळीण चांगली धष्टपुष्ट झाली ,त्यांची बाळही अंड्यातून बाहेर आली .त्यामुळे तर आवाजात आणखीनच वाढ झाली.कावळ्यांनी मग त्या झाडा खालून कुत्री ,मांजरे, डुक्करे आणि माणसं जाण्यास मनाई करणे सुरु केले म्हणून ती छत्री.
  मी छत्री घेऊन गेले तर कावळ्याने छत्री वर हल्ला केला. बाळाची सुरक्षा सर्वात महत्वाची होती.पण त्यामुळे सगळीकडे त्यांची दहशत पसरली होती. शाळेची लहान मुले धावत पळत जीव मुठीत घेऊन शाळेत जात होती. आधीच ती लांबून पायी चालत येत आणि या कावळ्यामुळे अजून लांबचा रस्ता त्यांना धरावा लागत असे.

     एक दिवस कसे ते माहित नाही पण कावळ्याची पिल्ले झाडावरून खाली पडली आणि सगळा कावळा समाज रस्त्यावर येऊन उभा राहिला. मग त्या रस्त्यावरून गाड्या जाणे मुश्कील झाले. गाडीवाल्याच्या पाठी २०-२५ कावळ्यांचा समुदाय लागे, त्यामुळे तो गाडी चालवू शकत नसे. एकजण तर गाडीवरून पडला, त्याने तोंड आणि डोळे झाकून टाकले म्हणून ते कसेबसे वाचले पण त्या माणसाच्या डोक्याला जबर जखमा झाल्या.कावळे कुत्र्यांवर चोची मारू लागले.दिवसभर असं काही ना काही होतच होते.पण त्या दिवशी अचानक पावसाचे खूप भरून आले,अंधार झाला तसा कावळ्यांचा आवाज शांत झाला. मधून मधून ते रस्त्यावर आहेत याची जाणीव करून द्यायचे.पण पावसामुळे रहदारी कमी झाली होती.रात्र झाली तसे सगळ्याचेच तिथले लक्ष कमी झाले. जो तो आपल्या घरच्या चौकटीत आणि टीव्हीच्या चौकटीत नेहमीपेक्षा वेगळ्या दुनियेचा आस्वाद घेत झोपी गेला.

     सकाळी मैदानावर जाण्यासाठी बाहेर आले तर झाडाखाली दोन्ही पिल्ले मेलेली होती.ती पावसाच्या पाण्याने मेली होती की गाडीच्या धक्क्याने हे कळायला मार्ग नव्हता.बाळांचे आई वडील हताशपणे त्यांच्याकडे पाहत होते. आपल्या बाळांसाठी त्यांनी जीवाच्या परीने सगळे केले होते.पण निसर्गाच्या पुढे आणि सत्ते पुढे त्यांचे काही चालले नाही. सांत्वन करायला सगळेजण पुढे होते, त्यात चढाओढ लागली होती पण त्यासाठी ठोस कृती कोणीच करायला आले नाही. कारण सत्ता कोणाच्या हातात आहे आणि त्याचे श्रेय कोणाला मिळणार हे नक्की होत नव्हते. माणसांच्या रास्तारोको सारखाच हे ही आंदोलन त्यांना गुंडाळावे लागले.  

Monday, April 27, 2015

व्यक्त होण्याचा सुंदर मार्ग


  आपल्याला सगळ्यांनाच चित्र काढायची, गाणी म्हणायची खूप हौस असते. लहानपणी काहींची कमी अधिक प्रमाणात ती पूर्ण होते. ज्यांना घरून चांगला पाठींबा मिळतो आणि कला जोपासायची संधी मिळते त्या व्यक्ती पुढे त्या त्या कलांमध्ये नावही कमावतात.पण आपल्या सगळ्यांनाच रंग पाहिले की त्यांचे काहीतरी सुंदर करावे असे वाटते.मग मुलांच्या हातातच असे रंग,ब्रश आणि भिंती सारखा मोठा कॅनव्हास मिळाला तर? मुलं  खूप खुश होतील.असा अनुभव सोलापूर येथे  बालभवनच्या मुलांनी घेतला.
   मुलांनी एक संपूर्ण भिंत आपल्या विविध कलाकृतींनी सजवली.प्रत्येकाने आपल्या भावविश्वाला जवळचे चित्र काढले,त्याला हवा तो रंग दिला. सूर्य,डोंगर,फुले,पाने, मांजरे,उंदीर,घर,झाडे,कार्टून,असा सगळ्यांचा समावेश असलेली ती भिंत म्हणजे आम्हांला व्यक्त व्हायचे आहे ही  सांगणारी हाक आहे. मुलं जेव्हा चित्रे काढत होती तेव्हा ती सगळ्या गोष्टींचे भान विसरली होती. त्या रंगाची ,चित्रांची झाली होती. मला तर कळले की एक लहान दीड- दोन वर्षाची मुलगी तर आपले भावंड चित्र काढत आहे हे पाहून स्वतः चित्र काढायला पुढे झाली. तिच्या हातात रंग आणि ब्रश दिला तेव्हा ती मनापासून त्यात रमली. चित्र काढून एक हात दुखायला लागला तर दुसऱ्या हाताने कामाला सुरुवात केली.कोणी तिला मागून विचारले की तू काय काढतेस? तर त्या व्यक्ती कडे एक दृष्टी टाकून त्या मुलीने आपली चित्र काढायची जागा बदलली.कामात कोणताही व्यत्यय तिला  मंजूर नव्हता.
  आपण नेहमीच म्हणतो की मुलं मन लावून काही करत नाहीत पण ती जेव्हा मन लावून काम करतात तेव्हा आपणच त्यांना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडत असतो.मुलं एखाद्या गोष्टीत मग्न असतील तेव्हा आपण मोठी माणसं त्यांना म्हणतो,’चला आता उठा, दुसरं काही तरी  करा, किंवा आता झोपायची वेळ झाली किंवा आता हे करा आणि ते करा. का आपण असं वागतो?विचार करायला हवा ना? ही मुलं कसं शोधणार त्यांना काय आवडत ते? ती कशात रमतात हे त्यांचे त्यांनाच कळायला हवे ना? मग आपण तशी संधी त्यांना द्यायला हवी नाही का?
         सोलापूर येथे बालभवनने  अशी संधी मुलांना दिली.पण आपण सगळ्यांनी ठरवले तर अशी सुंदर चित्रे काढायची संधी मुलांना देवू शकतो. आपला बंगला असेल तर त्याची कंपाऊंडची भिंत असेल, सोसायटीची  भिंत असेल ,त्या त्या भागातल्या मुलांना गोळा करून त्यांचा सुट्टीचा काळ मजेत आणि सर्जनशिलतेत त्यांना घालवता येईल.आपण काढलेली चित्रे रोज बघतांना मुलांच्या मनावर आपोआपच परिसर नेटका ठेवण्याचा संस्कार होईल. काय हरकत आहे असे बालभवन सोसायटी सोसायटीत आपापल्या पातळीवर निर्माण झाली तर?माझ्या डोळ्यासमोर एक आख्ख शहरच अशा चित्रांनी रंगल्याचे दिसत आहे.मग आपोआपच कोणता रंग कोणत्या समाजाशी जोडला गेला आहे हे विसरायला होईल आणि त्या रंगाची खरी मजा घेता येईल.आपण भाषा,प्रदेश,कपडे,आणि रंगाची फार विभागणी केली आहे. ती आपली व्यक्त होण्यातल्या  उदारतेला मर्यादा आणते.पण ही मुलं रंगाचा रंग म्हणून वापर करतील. त्यात सगळेजण समान असतील आणि एकमेकांचा मान ठेवतील आदर करतील.आपले मत वेगळे आहे हे सांगण्यासाठी हातात दगड,बंदुक,घ्यावे लागत नाही हे त्यांना कळेल.चित्रासाठी ,सुंदर चित्रासाठी, कलेसाठी सगळ्या रंगाची तेवढीच गरज आहे हे त्यांना आपोआपच कळेल.कोणताही एकच रंग हे जग सुंदर करणार नाही. सगळ्यांना एकमेकांचा हात धरला तर आनंदाने फेर धरता येईल.हा विश्वास त्यांना ही चित्रे देतील.

   एखाद्या शहरात मुलांनी चित्रे काढावी म्हणून त्यांना आख्खी भिंत मिळावी या सारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही.ही भिंत सोलापूर मधील संगमेश्वर महाविद्यालयाने बालभवनच्या मुलांसाठी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचेही कौतुक आहेच. समाजातील सगळ्यांनीच मुलांसाठीच्या कामात आपापला सहभाग नोंदवला की निरोगी ,परिपक्व समाज घडण्यास फारसा उशीर लागणार नाही.मुख्य म्हणजे अशा समाजाची ,ज्यात एकमेकांना व्यक्त होण्याची संधी मिळते आणि दुसऱ्याचा मताचा आदर केला जातो अशा वातावरणाची आपण सगळेचजण  खूप वाट पहात आहोत.अर्थात असा समाज  आपल्या वागणुकीतून आणि दुसऱ्याला व्यक्त होण्यास किती संधी देतो यावर अवलंबून आहे.त्यासाठी आपल्याला सगळ्यांनाच प्रयत्न करायची गरज आहे. पण मुलांचे हे चित्र मात्र माझ्या मनात खूप आशा निर्माण करत आहे.

Friday, March 27, 2015

“आला वसंत आला “




“अग आज आता  पहाटे मी मिस्टर कोकीळ यांचा आवाज ऐकला “पहाटेच चार वाजता फोनवरच हा आवाज ऐकून माझ्या लक्षात आले की ,कालच मी दिलेल्या माहितीचा कोण कसा वापर करेल हे मला सांगता येणार नाही. वसंतातील कविता वाचनासाठी आम्ही जमलो होतो.मी सहज सांगतिले की खूप कवींनी कोकिळा  वसंतात गाते असे वर्णन केले आहे पण खरं म्हणजे कोकीळ गात असतो. कोकिळेचा आवाज हा अत्यंत कर्कश असतो.तिला गाता येत नाही. काहीजणांसाठी ही माहिती नवीन होती. त्यांनीच मला मिस्टर कोकीळ गात आहे हे आनंदाने सांगितले . त्याच वेळी माझ्या डोळ्यासमोर सुटाबुटातला आणि त्याला अनुरूप असा टाय घातलेला कोकीळ आला. तो बाजूच्या शांततेचा अदमास घेत ,कोणाची झोपमोड होणार नाही ना असा नवीन जगाचा कानोसा घेत गात आहे. भरीला त्याने काळ्या फ्रेमचा चष्मा घातला आहे हे ही दिसले.
   तर मि.कोकीळ यांचा आवाज जेव्हा मी ऐकला तेव्हाच  माझ्या मनाने  मान्य केले की ,आला वसंत आला.” एवढ्या शांततेत तुझा मधुर  आवाज वसंताची चाहूल देतो तेव्हा आपल्यालाच नवीन पालवी फुटत आहे असा भास व्हायला लागतो.खरंतर बागेतला आंबा कधीच मोहरला होता पण तुझ्या सादे शिवाय त्या मोहराच्या सुवासाला सुद्धा मी नकार देत होते.तुझी ती गोड साद ऐकून आंब्याला  आपण मोहरलो याचे सार्थक झाले असे वाटले असेल. हो तसा सार्थकतेचा श्वास सोडल्याचे मी ऐकले. पहाटेच्या अशा आपणच आपल्या बरोबर असण्याच्या वेळीच श्वास निःश्वासचा हळूवार नाद ऐकू येतो.कधी कधी आपलाही श्वास त्या बरोबर जोडला जातो आणि एका अवर्णनीय मैफिलीला सुरुवात होते. पहाटेच असे सूर जुळल्यावर मग दिवसभराच्या ओरखडे सुद्धा सुरात येतात.

 कोकीळ असा जेव्हा स्वतःच्या गळ्यातून वसंताच्या आगमनाची बातमी चहूकडे देतो आणि स्वतः बरोबर सर्व सृष्टीला नादावतो.तेव्हा आणि तेव्हाच चैतन्याची पालवी सगळीकडे फुटू लागते.वसंतातले दिवस हे चैतन्याचे दिवस आहेत. पानगळ झालेल्या शिशिरा नंतर तो येतो तेव्हा नवे जीवन घेऊन येतो. बागेतला गुलमोहर, बहावा, जकरांडा,आपल्या फुलांच्या रंगाने सृष्टीला नटवतात.आधीच ती सुंदर आहे या रंगांनी तिची शोभा अधिक वाढते.रानात पळसही आपले लालचुटूक अस्तित्व मिरवत असतो.

सृष्टी जशी कोकीळ च्या गाण्याने नादावते तसेच कवी सुद्धा या पक्षाच्या आवाजाने बहरतात. हा पक्षी वसंतातला आनंद घेवून येतो.तो झाडांच्या पालवी बरोबर आपल्याही आशा पल्लवित करतो. हा ऋतू, हे विविध रंग आणि कोकीळचा सूर आपल्या आयुष्याला एक वेगळीच गोडी देतात.आंब्याच्या मोहराचा गंध,मोगऱ्याचा सुगंध आपल्या मनाचा ठाव घेतात. साऱ्या इंद्रियांसकट हा ऋतू अनुभवावा असाच असतो. यावेळी मला कवी ए.पा.रेंदाळकर यांच्या काव्याची आठवण येते. ते म्हणतात,
 फुलास हसवित,तरूस डुलवित   
कुरवाळीत वेलिंना
वायुलहरिवर बसून आला
वसंत ऋतू आज ना?
भालदार नव पिकराजा हा
ललकारित चालला
थरारवी नीज गानरवाने
ह्या दुर्भग सृष्टिला !

  आहे की नाही या वसंतात मजा.  त्याचं नातं सृष्टीशी, सृजनाशी आहे.म्हणूनच तो चैतन्य घेऊन येतो असं मला वाटतं.ते कसं हे आपल्याला मि.कोकीळ सांगतातच ना?

Thursday, March 5, 2015

कैदी


कोण आहे? एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळत विनू ओरडला. तरी खिडकीवरची टकटक कमी झाली नाही.**** भलत्यावेळी कोण आलं? आज घरात कोणी नाही तर निवांत झोपू म्हटलं तर.
दार उघड दार .मी मी
ए मी काय ढकंबाहून आलोय का? दार उघड म्हणे.एवढ्या रात्री तू कशाला आलास? तुला काही घरदार आहे की नाही? *******
ए शिव्या देवू नकोस हं. मी पण... तुला माहित नाही मी कोण आहे ते? नाहीतर खिडकीतून बोलला नसता माझ्याशी.
कोण आहे तू? एवढा घाबरला आहे ते ? आता सामान्य माणसाने आपल्याच सावलीला घाबरण्याचे दिवस आले आहेत.

अरे लोक ध्यानीमनी ज्याचा जप करतात,ज्याला पाहण्याची इच्छा व्यक्त करतात तो आहे मी?
कोण? पैसा?****** काय फेकतो यार,पैशाने काय माणसांचा अवतार घेतला की काय?
दुसरं काही सुचत नाही का तुम्हां माणसांना ? मी विठ्ठल ,विठोबा.
तू मला काय वेडा समजतोस? त्या माणसाला स्वतःच्या कंबरेवरचे हात अठ्ठावीस युगापासून काढता येत नाही. तो एवढा लांब पळून आला? हास्यास्पद वाटतयं.
का? मी येवू शकत नाही?
माहित नाही. कारण आपलं काही तुझ्याशी कनेक्शन नाही.
म्हणजे तुझा विश्वास नाही?
तो वेगळा मुद्दा आहे बाबा,ते जावू दे तू का आलास ते सांग. मुख्य म्हणजे तू आला तसा निघून जा. माझी बायको फार कजाग आहे हं,ती तुझ्यासमोर माईक धरेल आणि तुला लगेच विचारेल ,विठोबाजी तुम्हांला गाभाऱ्या बाहेर कसं वाटतयं? तुमचे आणि रुक्मिणीचे संबंध बिघडले की काय? जा बाबा तू.मी तिच्या पत्रकारितेला पार वैतागलो आहे आणि खरं आणि जाहीरपणे न लाजता सांगायचे तर ती मला आवडते आणि मी तिला घाबरतो.कळलं? .तर तू जा.
अरे आधी दार तर उघड. मग बायकोचे कौतिक सांग.
वेडा आहेस का? माझ्या खिडकीपर्यंत आला त्याचे दोनशे रुपये दे आधी.दारात यायचे असेल तर अजून शंभर आणि दारातून घरात येवून बसायचे असेल तर सर्व मिळून पाचशे.
अरे तिथे या पैशांच्या गप्पांनी जीव घुसमटला म्हणून आलो तर इथेही तेच.
अरे विठोबा ही सर्व तुझी लेकरे आहेत.सगळीकडेसारखेच.
पण मला हे सहन होत नाही .
अरे पण सांगता येतं ना? सांग ना मग. जरा आळस झटक,ते कंबरवरचे हात काढ आणि ते पाडून तुझ्या आजूबाजूच्या चौकटी.
बोलणं फार सोप्पं आहे.
हो ना? तू स्वतःला देव समजतोस ना? मग तुला काय अशक्य आहे.अर्थात तुझं वागण तसं दगडासारखच आहे म्हणा.
ए तू काय बोलतो ते तुला समजतयं का?
हो चांगलच... तू एक कर. तुझ्यासाठी कोणी पैसे घेतलेले दिसले की गालात मार. अदृश्य होवून कर बर हे. नाहीतर ते बडवे तुला सोडायचे नाहीत.भक्तमंडळीबाहेर गेली की तू त्यांच्याच ताब्यात असतो.अभिषेक चाललाय असं सांगून तुझे हाल करायला ते कमी करणार नाहीत. मला तर कल्पना करूनच फार गंमत वाटतेय.
पुरे.दुसरंकाही तरी सांग.
मग संपूर्ण देवळालाच हादरा दे आणि तू अंगावरचे दागिने वगैरे काढून फेकून दे आणि वाळवंटात जावून बस. आता माझ्या लक्षात आलं म्हणून सांगतो ते दागिने नदीत फेकले तरी परत मिळण्याची आशा करू नको. ते परत पाण्यावर तरंगतील वगैरे .इथं लोकांना खायला प्यायला मिळत नाही आणि दागिने घालून मिरवतो. असा कसा रे तू? गरिबांचा देव म्हणे.
टीका नको.पुढे सांग.
वाळवंटात जावून बसला की आपोआप मोठा हो.एवढा मोठा की तुझ्या भोवती भिंती उभारू शकणार नाही. लोकांना लांबूनच तुझे दर्शन होईल म्हणजे तुझ्याभोवती ची ब्युरोक्रसी आपोआप नष्ट होईल.बघ पटतय का?
हं.विचार करायला हरकत नाही. पण मी बसू का?
बस की. पण काय ओशट वास येतोय रे? शी दूधट,आंबटवास येतोय तुझ्या अंगाला.
ए तुझ्या घरात आलो म्हणून वाटेल ते काय बोलतोय.
नाहीतर काय,रोज रोज दुधा-तुपाने आंघोळ करतो,त्यावर साबण नाहीतर शिकेकाई लावत जा. म्हणजे जरा चांगला वास येईल. नाही तर मुंग्या लागतील .बघ तुझ्या आजूबाजूला केवढ्या माशा आहेत.सगळीकडे घाण नुसती.
त्याला मी काय करणार?
तू कशाला काय करतोस? तुझे ते कंबरेवरचे हात काढले तरी पुरे.
अरे मी माझं दुःख तुला सांगायला आलो तर तूच मला ऐकवतो.अरे २८ युगं कोण कैदेत राहिलाआहे का? सांग.सगळेजण माझ्या पायावर डोकं टेकवून सारखं काहीतरी मागत असतात.मीच स्वतः एवढा घुसमटतोय ,मला आधी बाहेर काढा,मग बघू एकेकाकडे.पण कोण ऐकतोय*********च्यायला मला दागिने काय घालतात,टोचणारे कपडे काय घालतात? अत्तराची फवारणी काय करतात?नुस्ता वैताग ****.आजकाल तर वैताग जास्तच वाढलाय. आता पाउस आला नाही,शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या,दहशतवादी हल्ले झाले तर लोक मलाच येवून साकडे घालतात.अरे मीच सा कड्यातअडकलेला मी काय कोणाला सोडणार?अरे तुमची आंघोळीची जागा मोठी असेल बघ. माझ्याभोवती माणूस धड उभा सुद्धा राहू शकत नाही. बाहेरून हे एवढं मोठं मंदिर दिसत ना? ते म्हणजे मोठं घर आणि पोकळ वासा.तू येवून बघ किती एकामागोमाग काचा लावल्या आहेत त्या. माणसं माझ्यापर्यंत सरळ येवूच शकत नाही.पार वाकड्या वाटेने.जणू ते तुमचं भुलभुलैय्याच.******माझा घाम माझ्याशरीरातून येतो म्हणून नाहीतर तो येण्यासाठी सुद्धा पैसे घेतले असते. अरे लोक माझ्या पायाला हात लावणार ,मी गपगार उभा राहणार आणि पैसे मात्र बडव्यांचे? हा काय न्याय झाला? वरून म्हणतात त्याचा उपयोग मंदिर सुधारण्यासाठी करणार.सुधारणा म्हणजे काय तर मी अधिक जखडला जाणे होय.
अरे हे सगळं तुझ्यासुरक्षेसाठीच आहे.
सुरक्षा? आणि माझी?कोणापासून? दोन-दोन दिवसमाझ्या पायावर केवळ डोकं टेकवाव म्हणून रांगेत ताटकळणांरयापासून ? अरे माझ्या पुढे असा विचित्र चौथरा बांधलाय की कमी उंचीच्या माणसाला थोडीशी उडी मारून पायावर डोकं ठेवण्यासाठी लटकाव लागतं. त्यात माझ्या शेजारी बसलेला आणि तो पोलिस पटकन त्याचंडोकं बाजूला करून सरकवतो.हजारो मैल चालत येवून त्यांना मला नीट पाहता सुद्धा येत नाही.
पण अलिकडे तुझ्याकडे येणाऱ्यांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे. तुही तुझं शक्तिप्रदर्शन करू शकतो राजकारण्यासारखं .
तू मला चिडवतोय का? म्हणे भक्तमंडळी वाढली? अरे नवीन लग्न झालेली जोडपी म्हणे हिलस्टेशनला हनीमूनला जायचं सोडून वारीत येतात.माठ साले.आजकल वारीला जाणं ही फशन झालीआहे.नेते,पुढारी,परदेशी आणि इतर सगळे.त्यामुळे माझ्या वारकऱ्याना जास्त त्रास होतो.
तरी बरं मी येत नाही त्या घाणीत.
ए तू मनाला येईल ते बोलतोस. तोंड संभाळून बोल जरा.
ए तू माझ्या घरात बसलाय.इथेच कैद करून ठेवेन.मग कशी सगळ्यांचीच फा फा होईल ते
ठेवतर खरं.बघशीलच तू राज्यात कसा गोंधळ होईल ते. सत्तापालट होईल.
तो काय तुझ्यामुळे? अरे तू गाभाऱ्यात नाही म्हटलं तर  कोण फिरकणार त्या पंढरीत? पैसा मिळणार नाही,अनुदान मिळणार नाही.तुझा तिथं साक्षात्कार होतो म्हणून नाही जमत ही मंडळी.तू काय साक्षात्कार दाखवणार म्हणा.चल खाली सोड ते कंबरेवरचे हात.
अरे माझे कंबरे वरचे हात म्हणजे अध्यामिकदृष्ट्या पाहिलं तर भवसागर
सॉरी ,माझ्या घरात हे असं चालत नाही.तू शांत रहा,तुझ्या जीवनाचे गुढ इतर बाबा लोक सांगतात तेही गुढ पद्धतीने,होवू दे त्यांचा धंदा.तू नको पाय देवू त्यांच्या पोटावर.
तुलाएक दिवस चांगली अद्दल घडेल मग कळेल.
चल कळूच दे.आधी ते हात खाली कर आणि तुझी घुसमट कमी झाली असेल तर निघ.
अरे चहापाणी तर विचार. बाकी सोयी कुठे आहेत ते सांग.कळला ना करंगळीचा अर्थ की..
तुझ्या पंढरीत आहेत का या सोयी? एवढाले  कोटी रुपये मिळतात तुझ्या नावाने पण धड शौचालये नाहीत,हॉटेल नाहीत.जिकडे तिकडे घाण फक्त घाण. जावू दे ते. तू निघ आता. मला शांतपणे झोपू दे,पुढच्या जन्मी मी तुझं देवूळ बांधीन आणि मस्त आरामात जगीन.प्रॉमिस ..
पण तुझा विश्वास नाही ना?
तुझ्यावर नाही पण लोकांवर आहे आणि त्यांचा तुझ्यावर.मग पैशाला काय कमी? फक्त तुला तेव्हां माझा कैदी म्हणून राहावं लागेल.चल आजच्या दिवशी माझ्या घरात आल्याच्या बदल्यात पैसे न देता एवढं प्रॉमिस कर .
सॉरी.आता मीच इथून गायब होणार आहे,तुलाच काय परत कोणालाच दिसणार नाही.घुसमटून जगण्यापेक्षादर-दर की ठोकरे खाकर मरना पसंद करूंगा.
विन्याऊठ,पेपरला काय आलंय बघ, ‘बडव्यांच्या कैदेतील विठ्ठल पळालाय.
ए चल तू पण मस्त झोप काढ आणि टीव्ही लावूनको.आपण God must be crazy पाहू.च्यायला विठोबाने खरच करून दाखवलं. यार मानलं तुला.