Thursday, March 10, 2016

शोध

  ज्या काळात ,ज्या समाजात , ज्या वर्गात, ज्या कुटुंबात आपला जन्म होतो त्यातून जगण्याकरता बरेच काही  मिळते. पण ते पुरेसे नसते. विशेषतः  सामाजिक आणि वैयक्तिक संक्रमण काळात त्याचा अपुरेपणा जास्त जास्त जाणवू लागतो. तो  जाणवल्यावर जी अस्वस्थता निर्माण होते  ती वाढता वाढता कधी ती तुमच्या आयुष्याला मुळापासून हादरा देते, अशावेळी तुम्हांला  चौकटीबाहेरचा आधार शोधावा लागतो. तो आधार कधी एखादी व्यक्ती असते, एखादी विचारप्रणाली असते किंवा एखादे पुस्तक असते. मग आपण त्या पुस्तकाला आपल्या मिठीत घेतो, आपलेसे करतो, सामावून घेतो. त्यातून मिळालेल्या नवीन उर्जेने प्रेरित होवून दुसऱ्या पुस्तकाचा शोध घेतो.
  अवघ्या विश्वाविषयी --- त्यातल्या सगळ्या बऱ्यावाईटा सकट ---आजही मला लहान मुलासारखी निरागस कुतूहलाची भावना टिकवून धरता आली आहे. त्यामुळे उत्सुकतेने आपोआपच वाचन होते.
     या वाचन आणि लेखनाने मला काय दिले याचा मी विचार करते तेव्हा लक्षात आले की, मी स्वतःच अंशाअंशाने स्वतःला मुक्त करायला शिकते आहे. अंतर्विरोधाशी मुकाबला करीत हे साधता आले तर पाहायचे.माझ्या मनात त्याबद्दल काय आहे याविषयी आज मी लिहित आहे.
      मी विवाहित स्त्रीवादी आहे.म्हणजे नेमके काय?तर दोन दिशांमध्ये माझी ओढाताण होते. एका बाजूला परंपरागत मुल्ये,संकेत,रीतीरिवाज ,आणि दुसऱ्या बाजूला स्त्रीवादी विचारप्रणालीशी असलेली माझी बांधिलकी- विश्वास म्हणू हवे तर.मला रीतीरिवाजांत एक प्रकारची सुरक्षितता ,स्वस्थता जाणवते.पण या रीतीरिवाजांनीच स्त्रीला दुय्यम नागरिकत्व दिले, ही गोष्ट आवडत नाही. मला पुरुषाशी असलेले दिर्घकालीन ,दृढ नाते आवडते,पण तिला कुणी ‘अर्धांगी’ म्हटले, की मला  आवडत नाही.पूर्ण पुरुष असतो, मग पूर्ण स्त्री का नाही?मला कुटुंब, कुटुंबातील विविध नात्यांनी आपल्याजवळ आलेली माणसे हवीशी वाटतात.इथे मला माझ्या स्त्री वादी  विचारांनी खूप मदत केली. माझी आई,बहीण,आत्या, मावशी काकू  आणि माझ्या सासवा, नणंदा ,जावा यांच्या कडे मी व्यक्ती म्हणून पाहायला शिकले.कोणाच्याही वागण्याचे विश्लेषण करतांना त्यांच्या आतल्या अंतर्विरोधाचा मी विचार करू लागले.आणि त्यातून मी त्यांना किती समजून घेऊ शकले ते माहित नाही पण मला स्वतःला समजून घेण्याच्या प्रक्रियेत मी अधिक सजग झाले.मग मात्र मला स्त्री वादा पेक्षा मानवतेची कल्पना अधिक व्यापक आहे, हे पटले.पण तरीही  माझ्या मनात प्रश्न येतो की,या जाणीवा बऱ्याच आधी झाल्या असत्या, तर त्यामुळे चित्र फार बदलले असते का? हे अंतर्विरोध नाहीसे झाले असते का? मला तसे वाटत नाही. कारण तो स्त्री जाणीवेचाच एक शाश्वत भाग आहे.मला वाटते आपल्याला मुळे ( रुट्स )हवी असतातच.पण त्या मुळांनीच जर करकचून बांधले ,तर म्हणजे A married feminist wants roots,but doesn’t want to feel rooted”. पण त्यातील अमुक बंधने नकोत, या भावनेतून तर विविध प्रकारचे अंतर्विरोध तयार होतात.

  तरीही प्रश्न राहतोच,मग याला मार्ग कोणता? मार्ग एकच. गुंता सोडवत राहायचे,आपले कुटुंबाशी, व्यवसायाशी, समाजाशी असलेले नाते शोधत राहायचे. समांतरपणे  शरीराशी- आणि फक्त स्वतःशी असलेले नातेही. कारण ते अधिक महत्वाचे. तो शोध लागत राहिला, तर मग फार ओढाताण होणार नाही. फार तुटल्यासारखेही वाटणार नाही. हा शोध घेणे सोपे नाही. त्यामुळे सापडलेले मार्ग नि:शंकपणे चोखाळणे हे ही सोपे नाही.हे ठाऊक असले, तरी थांबायचे नाही.मला वाटते शोधातूनच आपले दुभंगलेपण,गोंधळलेपण कमी होत जाईल. विरोधातून विकास साधत जाईल.जीवनाच्या या वाहत्या प्रवाहात आपणही अखंडपणे बदलत राहावे आणि अखेर कुठेतरी आपल्या ‘स्थायी’पणाला भिडावे. तसे कधीतरी घडेल या विचारानेच मी फार सुखावते, थरारून जाते.

Wednesday, February 3, 2016

. खरं स्वातंत्र्य


     “ स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायला तिला सांगा ‘असं मिलिंद  त्याच्या  डॉक्टरला सांगत होता.असं म्हणतांना तो सानिया  कडे बघत होता.नंतर तो  तिला म्हणाला की, “प्रेमाने  तुझी आरोग्याची काळजी घेण्यास  सांगणे हा माझा हक्कच आहे.” हे ऐकून पहिल्यांदा तिला बरे वाटले आणि नंतर तो तिला डॉमिनेट करत आहे असे तिला वाटले.जेव्हा ती अलेन ला त्याचे जेवण वेळेवर घ्यायला सांगा,असं डॉक्टरांना सांगायला सांगते तेव्हा तो तिचे हे त म्हणणे तो मान्य करतो.पण याऐवजी जर ती म्हटली की,’माझे वडील एवढे काम करायचे पण ते तुझ्या सारखे नव्हते.ते वेळेवर जेवायचे ,तू का वेळेवर जेवत नाही? तर मग अलेनचा  चेहरा हा सगळ्या शहरात लांबोडा होतो.त्याला वाईट वाटते.
   आपण आपल्यावर लागलेली लेबलं स्वीकारू शकत नाही,हाताळू शकत नाही.त्या शिक्कां बरोबर आपला  अहंही गुंतलेला असतो.ते आपल्या  मनाच्या जवळ जातात.लेबल लावून  जे बोलले जाते ते फारसं चांगलं नसतं.म्हणून तर आपण लहान मुलांना लेबल लावू नका असं सांगत असतो.
  जर आपण आपल्या जोडीदाराला हे सांगितलं,” हिरव्या पालेभाज्या तुझ्यासाठी चांगल्या आहेत” तर तो त्या घेईल. त्या ऐवजी जर आपण  म्हणालो की,” पूर्ण शाकाहारी असल्या कारणाने मी तुला सुचविते तू पालेभाज्या खायला सुरुवात करावी” तर तो तुमच्याशी वाद घालेल.लेबल “शाकाहारी” अडचण उभी करते.
   जर आपण  म्हटलं,” क्षमा कर ज्यांना ,ज्यांनी दुखावले आहे त्यांच्यावरही प्रेम कर”तुमचे हे म्हणणे तो मनावर घेईल.पण जर आपण त्याला  सांगितलं,” खरी धार्मिक  म्हणून मी तुला  विनंती करते  की, त्या व्यक्तीला  क्षमा कर आणि शत्रूवर सुद्धा प्रेम कर” तर मग तुम्ही त्याचा लगेच शत्रू व्हाल. “धार्मिक  “ या लेबल मुळे समस्या निर्माण होईल.
   आपण आपल्या पत्नीला /जोडीदारणीला म्हणालात की ” आपली विमानतळ सुद्धा व्यवस्थित व्हायला हवीत” ती हे  म्हणणे मान्य करेल.पण जर तुम्ही तिला सांगितलं की,” सिंगापूरला राहतो आहे म्हणून  मला माहित आहे की विमानतळ किती व्यवस्थित असू शकतात ते.मला असे वाटते की आपलेही विमानतळ हे तसेच व्हायला हवे होते” आणि अशावेळी तुम्हांला देशा बाहेरचे समजले जाते.
    हा मानवी स्वभाव आहे.माणूस जेव्हा लेबलांना धैर्याने सामोरे जातो तेव्हा ,त्याच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही.पण जेव्हा तो बचावात्मक पवित्रा घेतो तो स्वतःला सिद्ध करत राहतो. लेबल आपल्याला आपल्यात काही कमी आहे अशा भावनेचे दुःख देतात.
        आपल्याला  लेबलची काय गरज असते? एखादी विशिष्ट जागे मुळे/पदामुळे आपला  गौरव होती की आपल्या  मुळे त्या पदाचा गौरव होतो?खुर्चीला आपली  गरज आहे की आपल्याला  खुर्चीची गरज आहे?जर विशिष्ट लेबल मुळे आपण  ओळखले जाणार असू  तर त्या शिवाय आपण  काहीच करू शकणार नाही.जो लेबलच्या सहाय्याने जगतो त्याचे नातेसंबंध हे खोलवर नसतात.जर आपण  त्या लेबलला काही मूल्य दिलं तर आपल्याला  लेबलची गरज भासणार नाही.मग ती एक चांगल्या नातेसंबंधाची सुरुवात होईल.
    एक माणूस गुरु कडे आला,आणि म्हणाला,गुरुजी मला तुमचा शिष्य करून घ्या”त्यांनी विचारले,तू कोण आहेस? त्याने त्याचे नाव सांगितले,ते म्हणाले,”अरे हे तर तुझे नाव आहे,”मग त्याने सांगितले की मी व्यावसायिक आहे” तो तर तुझा उद्योग आहे,गुरुजी म्हणाले.ते सोडून तू कोण आहेस ते सांग ?तो म्हणाला,” मी पुरुष आहे” ते तर तुझं लिंग आहे” ते सोडून तू कोण आहेस ते सांग? तो म्हणाला,” गुरुजी मला माहित नाही मी कोण आहे ते? यावर गुरुजी म्हणाले,हे योग्य आहे,आता खरी सुरुवात होवू शकेल.जेव्हा तुम्ही तुमची सगळी लेबल टाकून देतात आणि तुमचे तुम्ही असतात तेव्हा शोध घेण्यास सुरुवात करू शकतात.तुमचे व्यवसायाचा उपयोग एखादा पुजाऱ्याकडे होवू शकतो.
  स्वतःला आणि इतरांना सुद्धा त्याचे लेबल टाकून देण्यास मदत करायला हवी.आपण आपले .असणे  पुरेसे असतो.हिच  प्रत्येक गोष्टीची सुरुवात आहे.जेव्हा आपण आपले  पुरेसे असतो  तेव्हा त्याला स्वातंत्र्य म्हणतात,खरं स्वातंत्र्य.