Saturday, December 20, 2014

आपलं जीवन


    निर्मात्याने स्त्री आणि पुरुषाला हेतुपूर्वक थोडेसे अपूर्ण बनवले असावे ,त्यामुळे ते एकमेकांना स्वीकारतील आणि पूर्ण करतील.असं मला वाटते.आताही विचार करतांना मला असेही वाटते आहे की,अनेक शतकांपासून पती आणि पत्नी अशा परिभाषेत त्यांना अडकवले गेले आहे,ज्यातून खूप संकुचित अर्थ ध्वनित होतो.त्यामुळे नात्याची व्याप्ती कमी होते. समजा आपल्या  शब्दकोशातून पती-पत्नी हे शब्द काढून टाकले  आणि त्या जागी “जीवनभराचे मित्र” हे शब्द टाकले तर ?.आपण आपापल्या भूमिका जशा कधी आईची ,वडिलांची ,तर कधी छोट्या मुलाची ,शिक्षकाची ,सल्लागाराची भूमिका करत असतोच ना.,आणि अर्थात आपण    पती –पत्नी सुद्धा असतोच. .ह्या नात्याची व्याप्ती जर वाढवली  आणि ती वाढविण्यास मोकळीक दिली तर ?
    वैवाहिक नात्याची प्रतिष्ठा ही यातच असेल ,जेव्हा आपण आपल्या  जोडीदाराला केवळ शरीर न मानता एक पूर्ण,स्वतंत्र्य व्यक्ती मानली. एकमेकांची विचार करण्याच्या पद्धतीचे निरीक्षण केले ,वैयक्तिक मुल्यांवर ,दृष्टीकोनांवर ,श्रद्धावर चर्चा केली , आणि एकमेकांच्या भावनाविषयी संवेदनशील झालो ,सुसंगत भावना विकसित केल्या ,आणि एकमेकांबरोबर शांततेने बसून अध्यात्मिक बैठक विकसित केली .व्यक्तीच्या पूर्णतेचा आदर केला  आणि त्या व्यक्तीच्या गौण बाजू,त्याचे शरीर याचा विचार न करता त्या संपूर्ण व्यक्तीला जोडून घेतले तर नक्कीच सकारात्मक सुंदर नातं निर्माण होईल.
   हे सगळे जे दहा वर्षात करायचे आहे ते सगळे एका वर्षात करण्याचा प्रयत्न करून चालणार नाही ,तसेच जे एका वर्षात करायचे आहे ते एका महिन्यात करण्याचा प्रयत्न करून चालणार नाही .खुपजण  या गोष्टी सुरुवातीला काही महिन्यात करतात आणि नंतरच्या जीवनात ह्या गोष्टी सोडून दिल्या जातात.ते मेलेल्या नात्या बरोबर रहातात.जर रोपटे लहान असतानाच मेले तर झाडाचे काय होईल.म्हणून या गोष्टी हळूहळू करायला हव्या  आणि अधिक काळ टिकतील.
     जीवनात आणि चांगल्या नात्यात भूतकाळ हा अप्रासंगिक असतो.वर्तमान हा इमारत उभी करतो. भविष्य काळ हा खूप महत्वाचा असतो,ज्यात तुम्ही दोघं प्रवास करणार आहात.दैनदिन क्षुल्लक गोष्टीवर चर्चा केली तर तुम्ही प्रेमात पडाल. भविष्यावर बोला,स्वप्नांवर बोला,महत्वकांक्षे वर बोला. एकेमेकांच्या वाढीत वस्तुनिष्ठ पणे आणि आतून सहभागी व्हा.हा प्रेम वाढण्याचा मार्ग आहे.
   वैश्विक संकल्पना अशी आहे की लग्नानंतर दोन जीव एकमेकात मिसळून जातात आणि त्यांचा एक जीव होतो.याचा परिणाम असा असतो की स्त्री ला लग्नाच्या नांवाखाली  नेहमी पुरुषाची सावली बनून रहावे लागते. त्यांना त्याग करावा  लागतो  मग त्या व्यक्ती  निराश होतात ,स्वतः वर द्या करतात.  अशी  स्थिती  ही “तुझे”जीवन आणि “माझे”जीवन असे वेगवेगळे असते तेव्हा अधिक होतांना दिसते.” अर्थात काही ठिकाणी नात्यात तशी सकारात्मकता येणं काही कारणांमुळे फार अवघड होवून बसते.पण   “आपले जीवन” हे त्या अवकाशाला छेद्णारी गोष्ट आहे ज्याला लग्न म्हणतात. वैवाहिक जीवनातला आनंद हा दोघे “आपल्या” अवकाशाशी कसे संबधित आहेत आणि तो अवकाश जाणाऱ्या वर्षाबरोबर कसा वृद्धींगत  होतो यावर अवलंबून असतो.नाहीतर तो त्याचे जीवन जगेल आणि ती त्याचे जीवन जगेल.वस्तुस्थिती अशी असेल की ती तिच्या उत्तम “आपल्या” अवकाशात असेल जेव्हा तो ही त्याच्या  स्वतःच्या अवकाशात जाईल. यातून हा विश्वास मिळेल की तुम्ही एकमेकांच्या अवकाशाचा आदर करतात. तसेच एकमेकांच्या आवडी-निवडी,प्राथमिकता यांचा तुम्ही आदर करतात ,सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रेमाच्या नावाखाली तुमची घुसमट होणार नाही.
   विवाहाचा खरा अर्थ असा होतो की ज्या जीवनात तुम्ही दोघं गुंतले आहात त्याची गुणवत्ता वाढवणे होय.विवाह जीवनभर सातत्याने राहू शकेल,आणि दोघां साठी चांगल्या शक्यता निर्माण करेल.

  चांगला विवाहाचे नीट संगोपन करावे लागते, तो विकसित करावा लागतो.वैवाहिक नातेसंबंध हे सुंदररीतीने गुंफणे ही एक कला आहे,म्हणून आपण  कलाकार होवू या.

Tuesday, November 25, 2014

वाट पहाणे


    वाट पहाणे आणि च्या साठी वाट  पहाणे यामध्ये सूक्ष्म फरक आहे,जसा शांततापूर्ण प्रगती आणि तणावपूर्ण यश यात जसा फरक आहे.
    शेतकरी नांगरणी करतो आणि बीज पेरतो  ...नंतर त्याला थांबावं लागतं..तिथे त्याची पेरण्याची  जबाबदारी संपते. आता जर त्याला  वाट पहाण्याची कला माहित असेल  तर तो शांततेने वाट बघेल.त्याऐवजी जर तो” आता  मोड कधी येतील काय माहित? या विचाराने  वाट पहात  राहील तर तो अस्वस्थ होईल आणि त्याच्यावर ताण येईल. त्याचे मन सतत म्हणत राहील –“असे का घडले नाही?अजून का घडले नाही.अखेरीस मोड आलेच तरी त्याने त्याची शांतता त्या यशासाठी खर्च केलेली असते. बिघाड होवून गेलेला असतो.
       जर आपण  लिफ्टचे बटण दाबले तर आपल्याला ती येण्याची  वाट पहावी लागेल. आपण शांत राहू .पण ”ची वाट पहाणे” आपल्याला जमिनीवर ठेवेल पण आपले  डोळे सारखे  वर आणि खाली करतील ,आपण पन्नास वेळा त्याची बटण दाबत राहू,बरोबरच्या व्यक्तीला आपली कृती कशी बरोबर आहे हे पटवत राहू,मागच्या वेळी असं केल्याने लिप्ट कशी पटकन आली हे ही जोडीला सांगत राहू ...आपल्याला  वाटेल जर तिचा वेग वाढवता आला  तर ती आपल्यापर्यंत  लवकर येईल.तसेच आपण वेटरला ऑर्डर दिल्यांनतर आपल्याला काही वेळ  थांबावं लागते.हे आपल्यालातल्या काही जणांना माहित नसते. त्यांना वाटते की वेटरने  ते हॉटेलात शिरल्या बरोबर त्यांचे मन वाचावे  आणि पटकन त्यांना हवे ते आणून द्यावे . ..वेटर “ची वाट बघणे” याचा त्यांना संतापजनक अनुभव येतो
  .आपल्याला हवा तसा निर्णय आपण घेतो  ....आपल्याला  जशी कृती करायची तशी करत आहोत .तर मग ..आता थांबा...त्या “च्या वाट पहाणे” यासाठी नाही तर फक्त थांबा....यात आपल्याला  शांततेची किल्ली सापडेल,”ची वाट पहाणे” सुद्धा आपल्याला  यश देईल,पण ते यश  तणाव सुद्धा देईल.जर  यशासाठी शांततेचा मार्ग आहे तर मग तणावाचा मार्ग कशाला घ्यायचा? नाही का?
     अध्यात्मिक प्रगती करण्यासाठी एक आवश्यक गुण लागतो आणि तो म्हणजे आपली भूमिका करायची आणि थांबण्याची क्षमता होय.अनेक लोक अध्यात्मिक अनुभवासाठी  लोक रडत असतात,त्यांच्या हातून शांतता निसटून जाते,आणि खरं तर ते त्यांच्या “ची वाट पहाणे” या  दृष्टिकोनामुळे दुःखी असतात. “ची वाट पहाणे” मुळे अनुभवा ऐवजी  आपण आपल्या  विरूद्धच उभे राहतो , खर तर आपल्याला  “ज्या  अनुभवाचा”साक्षीदार व्हायचे असते.तो  अनुभव हा नुसता  थांबण्याचा साक्षीदार आहे.

  “ची वाट पहाणे “ सोडून देवू या  म्हणजे आपण  तणावपूर्ण  यशही आपोआप येणार नाही. आपले  काम/भूमिका आणि आपली कार हे सर्व  थांबा आणि हे शिकून घ्या या मंत्राने केले तर आपल्या प्रगतीचा मार्ग हा शांततेचा असेल. अर्थात हे सर्वच मला एका काकडीच्या बी ने शिकवलं.

Saturday, November 15, 2014

सूर्योदय आणि सूर्यास्त


  एका लहान मुलीला चित्रं काढण्याचे अतोनात वेड होते.तिला चित्रं काढण्यासाठी कोणतीही जागा चालत असे किंवा कुठे,कधी,केव्हाही हातात येणाऱ्या कोणत्याही साधनाने ती चित्रं काढत असे आणि स्वतः काढलेल्या त्या रेषांकडे ,आकृत्यांकडे मग्न होवून बघत  बसे.जर तिची तंद्री कोणी मोडली तर बाईसाहेब मोठ्याने भोकाड पसरत असत.लहान होती तोपर्यंत सगळ्यांनाच तिचं हे चित्रकार असणं फार आवडत होते. कारण त्यामुळे त्यांना तिच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तरे द्यावी लागत नसत . पण जसजशी ती मोठी होवू लागली,शाळेत जावू लागली तसतशा तिच्याकडच्या अपेक्षा वाढल्या. तिचं असं तंद्रीत बसणं खटकायला लागलं. विशेषतः तिच्या पालकांना तिच्यात  वेडेपणाच्या छटा दिसायला लागल्या.म्हणून त्यांनी तिला कोंडून ठेवलं.तिच्याजवळ कोणतीही अशी वस्तू राहणार नाही,ज्यापासून ती चित्रं काढेल.याची त्यांनी नीट काळजी घेतली.मुलीला खूप राग आला.आदळआपट आरडाओरड ,किंचाळणे,दारावर धाड धाड आवाज करणे. हे सगळं करून ती थकली.शेवटी नीट वागण्याचा म्हणजे घरातली,शाळेतली सगळी कामं नीट करण्याचा वायदा झाला.( पण चित्र काढणार नाही’ हे मात्र तिने कबूल केले नाही.)तरीही कोणीच दार उघडले नाही.मनात संताप होताच.लहानच होती.चित्र न काढू देण्याच्या अनेक उपायांनी ती सतत ग्रासलेली होती. रागारागाने ती सगळीकडे थुंकली,शु केली आणि त्यातच काहीतरी गिरगटाला लागली,मनातलं अपार दुःख ती अशी व्यक्ती करायला लागली आणि हळूहळू शांत झाली. पहिल्या १-२ तासानंतर आवाज नाही.म्हणून संध्याकाळी पालकांनी दार उघडून पाहिलं तर पोर शांत होऊन  पडली होती. तिने तिच्या डोळ्यात कोणतीही ओळख नव्हती. ते घाबरले .आई रडायला लागली.मुलीची सूर्योदयाची,सूर्यास्ताची चित्रं गोळा करून दाखवली पण तिच्या डोळ्यात ओळखच नव्हती.सूर्याच्या प्रखर प्रतिष्ठेच्या आगीने तिला एवढे तप्त केले की तिच्यातली ती जळून खाक झाली.
  सूर्योदय आणि सूर्यास्त बघतांना ही गोष्ट मला नेहमी आठवते. त्या पोरीच्या डोळ्यांनी कितीतरी वेळा मी तो पाह्यचा प्रयत्न करते.अद्भुत वाटते.खरतर आपल्यातल्या खूपजणांना हिलस्टेशनला किंवा एखाद्या पर्यटनस्थळी जावून सूर्यास्त बघण्याची हौस असते. रोज आपल्या गावात होणारा  सूर्योदय,सूर्यास्त पाहण्याचे अप्रूप वाटत नाही.मला मात्र त्याचे नेहमीच अप्रूप आहे.आपण जर सूर्योदय आणि सूर्यास्त रोज पाहत असलो तर त्याच्या वेळा ऋतू प्रमाणे  बदलत जातात हे लगेच कळते.त्याचे  दक्षिणायन,उतरायण कधी सुरु झाले हे लगेच कळते आणि त्यातली गंमत अनुभवता येते.मग कॅलेंडर ,पंचांग बघण्याची जरूर भासत नाही. शिवाय सूर्योदयाच्या वेळा शांत असतात.त्या एक अख्खा दिवस तो तुमच्या स्वप्नासह तुमच्या ओटीत टाकतो,ते ही त्याच्या तेजसाहित.हा विचारच मला फार आकर्षित करतो. दिवसाची उमेद बाळगावी असा वाटणारा हा विचार असतो.कधी कधी तर सकाळी मी खिडकी उघडून त्याला बघते तेव्हा म्हणते सुद्धा,अरे बरं झालं तू वेळेत आलास ते.नाहीतर आज तुझ्याकडे मला बघायला वेळ झाला नसता. मग त्याची सोबत घेवून सकाळच्या कामांना छान सुरुवात करते. मला माहित आहे,’आज’ या दिवसांत तो जेवढा छान आणि  सुखावह वाटतो आहे तो पुढे कधीतरी वाटणार नाही. पण म्हणून ‘आज’ ला झाकोळून कसं चालेल.?

     सूर्यास्ताचे सुद्धा गणित आपण रोज तो बघत असू तर आपल्याला कळते.ऋतू प्रमाणे झालेला बदल लगेच लक्षात येतो.मग सूर्यास्ताच्या आधी दोन-पाच मिनिटे आधी जावून उभे राहता येते. आपल्या घरातूनच तो दिसत असेल तर मात्र सहज डोकावता डोकावता ही त्या वेळा आपल्याला साजऱ्या करता येतात. सूर्य स्वतःचा तेजस्वी साज हळूहळू काढून घेतो आणि ढगात लुप्त होतो किंवा डोंगराआड जातो किंवा समुद्रात बुडतो.तेव्हा तो पसरवत असलेल्या रंगछटा आपल्याला मोहून टाकतात. सहजपणे सभोवताली आपण पाहतो तेव्हा रंगाची मंद उधळण दिसते.खूप प्रसन्न,शांत,निवांत वाटते. एक प्रसन्न हास्य आपल्या चेहऱ्यावर विलसत राहते.कितीतरी वेळ तो गेला त्या जागेकडे आपण पाहत राहतो.जणू तो परत पटकन “भो”करणार आहे. एकमात्र खरं रोज रोज सूर्यास्त पाहयची सवय लागली तर आपण त्यात खूप अडकून जातो. मला जर कधी गच्चीवर जायला उशीर झाला तर मी सरळ म्हणतेच,’अरे हे काय थांबायचं ना थोडे,मी येतच होते. एक माणूसपण त्याला देवून टाकते आणि त्याने पसरवलेल्या मनोहारी छटावर लुब्ध होते. त्याच वेळी आकाशात एखादा पक्षांचा थवा जेव्हा त्याच्या समोरून जातो तेव्हा वाटते,अरे चित्रकार काढतात ती चित्रं त्यांनी खरोखरीच अनुभवलेली असतात.तुम्हांला आठवत असतील अशी अनेक चित्रं,ज्यात संध्याप्रकाशात तळ्याचं,समुद्राचं पाणी चमचमते आहे किंवा प्रत्यक्ष आणि पाण्यात बुडणारा सूर्य,सूर्यास्त होतांना सुर्याजवळून जाणारा लहान पक्ष्यांचा थवा,संधीप्रकाशात तळ्याशी बसलेली तरुणी,,चिंताक्रांत म्हातारा,खेळणारी मुलं,आणि आपली छोटी मैत्रीण जी प्रतिष्ठेच्या दाहाने आपली निर्मितीच मूक करून बसली.खरतर तिचे हे मौन सुटावे म्हणूनच मी सूर्योदय आणि सूर्यास्त पाहते.वाटते ती माझ्याबरोबरच आहे हे सगळं चित्र पाहत आणि भरेल कधीतरी ती रंग तिच्या स्वप्नांमध्ये.   

Sunday, October 19, 2014

कभी अलविदा ना कहना


   सीमा आणि अतार्किक यांचं काल जोरदार भांडण झालं .सगळ्या कॉलनीने ते ऐकलं.पण रात्रीची वेळ असल्याने सगळ्याच बायकांना शांत बसावं लागलं.फोन करूनही उपयोग नव्हता.कारण सीमा बाई फोनवर खेकसायला कमी करणार नाही.शिवाय म्हणतील तुम्हांला एवढा दम निघत नाही का? उद्या दुपारी मी शिपाया बरोबर निरोप पाठवून बोलवून घेतले असतेच ना? खर आहे तिचं.तिने आम्हांला बोलावून सगळं सांगितलं असतं.कारण भांडण रात्री झालं होतं आणि तिच्याकडे रात्रीच्या वेळी शिपाई नसतो नाहीतर तिचं काम शिपाईच करतो. आम्ही आमच्या शिपाया पासून सगळं लपवायला पाहतो तर हिचं आपलं तिसरच.
   सकाळी पाहिलं तर बाईसाहेब व्यवस्थित आवरून फुलं तोडत होत्या आणि चक्क गाणं गुणगुणत होत्या. हटकलं असतं तर म्हटलं असतं माझ्या नावातच सीमा आहे,मी सगळं मर्यादा सांभाळून करते,काय लढाई करायची असेल ती सीमेवरून करते आणि लगेच समेवर येते.तिची समेवर येण्याचे गुपित जाणून घेण्यासाठी आम्ही दुपारी आपापला नाश्ता घेवून तिच्याकडे जमलो तेव्हा मादाम फार जुन्या काळात गेल्या.आणि कहाणीची सुरुवात करत म्हणाल्या.आटपाट नगर होतं आणि तिथे

  सीमा आणि अतार्किक यांच लग्न नुकतेच ठरलं होतं दोघं मिळून फिरायला वगैरे जात,आणि भरपूर गप्पा मारत.शिवाय इतरांपेक्षा आपलं कसं वेगळं आहे आणि कसे युनिक जोडीदार आहोत आपण हे ही त्यांचं खूप चाले.आठवड्यातून एकदा भेट होत असे त्यामुळे सांगण्यासारखं ही भरपूर असे.एकमेकांचे आई-वडिल,भाऊ-बहीण ,मित्र-मैत्रिणी असं भरपूर गबाळ गोळा करून ते त्यात रमत.स्वतः बद्दल ही ते थोडं बोलत नाही असं नाही.त्यात आवडता सिनेमा,नट-नट्या,आधुनिक आहोत असं दाखविण्यासाठी जे बोलावं लागतं ते सगळं ते बोलत.त्यामुळे भेटीचा शेवट होई तेव्हा विरहाच्या विचाराने त्यांना दुःख होई.मग ते हिंदी सिनेमाच्या गाण्याने “कभी अलविदा ना कहना “ असं म्हणत कसा बसा निरोप घेत असत.
  तिला कालच्या तिच्या भांडणापर्यंत आणण्यासाठी एकजण म्हणाली,म्हणजे आता तुम्ही एकमेकांना अलविदा म्हणणार तर.जणू ती त्यांच्या अलविदा म्हणण्याची वाटच पाहत होती.ती तरी बिचारी काय करणार,रोज तिच्या नवऱ्याकडून ऐकून घ्यावे लागे,सीमा वहिनी बघ,कशा नेहमी हसतमुख असतात ते.सीमानेच अलविदा म्हटलं म्हणजे आपोआपच ती कॉलनी सोडेल आणि ही मग नवऱ्याच्या टोमण्यातून मोकळी होईल.
पण सीमेबाहेर जाईल ती सीमा कसली आणि तार्किकतेने बोलेल तो अतार्किक कसला? सीमा यावर म्हणाली नाही ग बाई,आता कसलं आम्ही अलविदा म्हणतो आहे?
  का ग पोरी मध्ये जीव अडकला आहे का?की नवराच सोडवत नाही.आमच्या प्रश्नाने ती गंभीर होईल आणि रडत रडत काही सांगेन असं वाटलं.पण ती सीमेच्या बाहेर येईच ना.
  ती म्हणाली अग मी अलविदा म्हणायचं तर मला एक घर पाहिजे,नोकरी पाहिजे,घरात चीड चीड करायला माणूस पाहिजे.आणि त्याला सुद्धा स्वयंपाक यायला पाहिजे,बाई ठेवली तरी तिच्यावर चिडता येत नाही,शिवाय उरलेल्या स्वयंपाकाची विल्हेवाट लावायला एक माणूस घरात हजर पाहिजे.म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं की,कभी अलविदा ना कहना.आम्ही जगाला अलविदा म्हणू तेव्हाच एकमेकांना अलविदा म्हणू.
  अग अलविदाची गोष्ट नको सांगू.तुझं भांडणाबद्दल सांग,त्याचे कारण सांग.
काही नाही ग ,नेहमीचच.
म्हणजे?तू कशाला नाही म्हटलं का?
  हो.
कशाला?
अलविदा ना कहना “हे गाणं कोणी म्हटलं आहे हे ओळखायला मी नकार दिला.

  आम्ही सगळ्यांनी डोक्यावर हात मारत आणि आमचेच दात आमच्यावर खात आणि आमच्या नाश्तातला थोडा भाग सीमाला खाऊ घालून आम्ही सीमाला अलविदा म्हटलं.

Tuesday, September 23, 2014

रांगोळीची रेघ


  अस्तिवाच्या लढाया सतत आपण देत असतोच,अगदी जन्मापासूनच. हो आपण रडतो,हसतो,वाट्टेल तसे चाळे  करतो ते आपलं अस्तित्व जाणवावं म्हणूनच असेल. काही काही वेळेस तर एखादी व्यक्ती त्या जागी नसते पण तिच्या अस्तित्वाच्या खुणा असतात. सामान्य माणूस त्याच्या नातेवाईकांच्या आठवणीतून का होईना अस्तित्वात राहतो. तर कलाकार त्यांच्या कलेतून आपल्याला जाणवतात. त्यांची एक एक रेषा,शिल्प,शब्द त्यांची ओळख आपल्याला देत असतात. ती रेघ,ते शब्द त्यातील विचार आपण ओळखले नाही तर कलाकाराला ते आवडत नाही,किंवा तो फार थोडा वेळ असे म्हणत असतो की, ते मी माझ्या आनंदासाठी करतो आहे.पण जेव्हा एखादी कला प्रदर्शित होते तेव्हा ती लोकांची आणि लोक कलाकारा बरोबरच स्वतःचेही अस्तित्व त्यात शोधतात,मजा येते. जेव्हा कलाकार आणि आस्वाद घेणारे जेव्हा एकाच नाण्याच्या पण दोन बाजू असतात तेव्हा दोघांनाही एक एकच बाजू दिसते. काहीवेळेस स्वतःला अनभिज्ञ अशा बाजूचा शोध घेता येतो.ती समजून घेता येते. तिचा अनुभव घेता येतो. पण हे सर्व केव्हा जेव्हा स्वतःचे अस्तित्व विसरून आपण काही बघायला जातो तेव्हा. नाही मला अस्तित्वावर लिहायचं नाही किंवा कोणत्या ख्यातनाम कलाकाराबद्दल लिहायचं नाही. पण ज्या दिवशी तो प्रसंग अनुभवला त्या दिवसापासून माझ्या मनात सतत येत आहे की कोणी काढली असेल ती रांगोळीची रेघ,जी इतकी सुंदर आणि नाजूक आहे.
    माढ्याला विठ्ठलाचे/पांडुरंगाचे एक छोटसं मंदिर आहे. असं आम्ही ऐकलं होतं.सोलापूर पासून पंढरपूर जवळ आहे,आणि पंढरपुरात सगळ्यांची विठू माउली आहे. त्या देवळातील प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असला तरी ह्र्दयस्पर्शी असा असतो. प्रत्येकाला त्याचं कोडं सोडवावं वाटतं आणि बहुतेकजण ते सोडविण्यासाठी तेथे जातात.या विठोबाला नमस्कार करून तुम्ही बाहेर आलात,तुमच्या गावी गेलात की तुम्हांला कोणीतरी नक्की सांगेल,काहीवेळेस  गुप्त आवाजात सांगेल की,असं म्हणतात माढयाचा विठोबा हा खरा आहे.ज्यांना या खऱ्या खोट्यात फारसा रस नसतो ते शांत बसतात आणि ज्यांना असतो ते पुरावा मागतात,चर्चा करतात. आपल्याकडे खूप ठिकाणी असे आढळते. तळघरातला देव खरा किंवा सगळ्यात जुना आणि सर्वाना सहज दिसेल अशी देवाची मूर्ती खोटी.मग परकीय आक्रमण,त्यातून वाचण्यासाठी लोकांनी केलेली धडपड असा सगळा इतिहास आपण पुन्हा पुन्हा बोलतो,ऐकतो. काहीवेळेस मजा येते.काहीवेळेस हसू येते. काहीवेळेस कशाचाच अंदाज येत नाही. तरीही आपण त्यात गुंतत जातो.मनाला काय थोडसं काहीतरी थ्रिलिंग हवंच असतं. शिवाय सत्यही समजून घ्यायचं असतं. त्याच्या शोधात मी खी खरच माढ्याला जावून धडकले. लोकांना विचारत विचारत मंदिराजवळ पोहचलो. कारण गावाच्या बाहेर, गावात देवळाकडे जाण्याचा मार्ग अशा सूचना लिहलेल्या नव्हत्या. तशा लिहण्याचे काही कारणही नव्हते. कारण  देवा जवळ  कोणतीही बाजारपेठ नव्हती. शिवाय सरकारला देवळापासून तसा कोणताही प्रत्यक्ष फायदा नव्हता. त्यांच्या आध्यात्मिक फायद्याबद्दल मी काय बोलणार? तो त्यांनाच माहित. गल्ली-त्यापेक्षा बोळकांड्यातून रस्ता काढत देवळाजवळ पोहचले.स्वच्छ,सुंदर आवार आणि तितकच सुंदर, स्वच्छ देऊळ .शांत विठोबा,भक्तांची ये-जा ही शांतच.एकदम प्रसन्न वाटावे असं हे देऊळ पाहून खूप समाधान वाटले.
   खरतर देऊळ लहानच होते. दगडी भिंतींनी बांधलेले नेटके.विठोबाचे सहज दर्शन होईल इतकं सुव्यवस्थित. विठोबाची मूर्ती मात्र खूप जुनी वाटत नव्हती. खरतर हे सर्व नवेच आहे असं वाटावे इतके सगळे चकचकीत होते. खरतर पंढरपूरचा विठोबा पाहिल्यामुळे या मूर्तीचा नवेपणा अधिक जाणवला असेल. पण मूर्तीची स्थापना मात्र खूप जुनी आहे. असे तिथे कोरलेले होते. विठोबा नवा-जुना,खरा-खोटा याच्या नादात आजूबाजूला लक्ष गेले नव्हते.पण मूर्तीचे दर्शन झाल्यावर लक्षात आले की,देवळात कोणतीही अस्वच्छता नाही.शिवाय देवळात आणि देवळाच्या बाहेर एक सुंदर रांगोळी काढली आहे.

  ती रांगोळी पहिली आणि वाटलं,जाणून घ्यावं त्या व्यक्तीला.कारण ती रांगोळी फार मनापासून काढलेली दिसत होती. त्यातील रेषा कलाकाराच्या संवेदनशीलतेच्या होत्या. शिवाय रांगोळी काढणाऱ्या त्या व्यक्तीला स्वतःचे अस्तित्व फक्त त्या रांगोळी पुरतेच आहे असं दाखवायचे होते. मला त्या रांगोळीने काहीतरी नवीन समजल्या सारखे वाटले. वाटलं आपण किती धावपळ करतो आपल्या एखाद्या रेषेसाठी,शब्दासाठी,आपलं अस्तित्व जाणवून देण्यासाठी शहरं हवी आहेत,जाणकार हवे आहेत. कोणाची सूक्ष्म टीका आपल्याला दुःखी करते. तर कोणाचे स्वीकारल्याचे सौम्य हसू जगण्यालायक बनवते. किती लाचार आणि दिनदुबळे होत आहोत आपण.आपलं अस्तित्व इतरांनी मान्य करावं म्हणून किती झटणार आहोत. या रांगोळीच्या रेघे इतकी बेफिकिरी का नाही आपल्यात. त्या व्यक्तीला वाटलेच नसेल का कोणी आपल्याला छान म्हणावे? काय असेल तिच्या मनात. मला खूप अस्वस्थ वाटले. अजून एक गोष्ट त्या रेघेत मला जाणवली,अप्रतिम निष्ठा.आपलं काम चोख,प्रामाणिकपणे आणि तितकेच निष्ठेने करण्याचे बळ त्या रेघेत होते. समोरच्या विठोबाचे अस्तित्व जणू त्या व्यक्तीला रोज जाणवत असावे किंवा कोणी सांगावे तो सखा रोज त्या रांगोळीसाठी तिच्याकडे हट्ट धरत असावा. ते त्यांचे गुपितही असेल.हसू येते मला माझ्या विचित्र मनाचे. बघा ना कोणी नाही तर विठोबासाठी ,तो येत असेल म्हणूनच त्या व्यक्तीने निष्ठेने ती रांगोळीची रेघ काढली असं म्हणून बसले. म्हणजे स्वतःच्या स्वीकृती साठी दुसऱ्याचे अस्तित्व हवेच हा दांभिकांचा कायदा मी विसरतच नाही. बाहेरच्या जगाचा माणसावर किती परिणाम होत असतो. अंतर्मनाला कशाला हवे आहेत हे उपचार,ते या बाह्य उपचारापासून स्वतंत्र्य ,मुक्त असू शकत नाही.? निश्चित असणार. हो ती रांगोळीची रेघ मला हाच विश्वास जणू देत होती. कारण रांगोळी काढणाऱ्या व्यक्तीचं सगळं मन त्या रेघेतून व्यक्त होत होतं. मला ते जाणवत होतं. नित्य जाणवत राहील.तेव्हापासून मला मात्र एक छंद जडलाय. रांगोळीची रेघ बघण्याचा. ती नुसती बारीक,नाजूक असून चालत नाहीतर स्वतंत्र आणि मुक्त आहे का हे बघण्याचा.   

Friday, September 19, 2014

जीवनात ही घडी -


सकाळी सकाळीच घराची बेल वाजली,पाहते तर त्रिपाठी बाईचा शिपाई दारात हजर ,हा? या वेळेला? म्हणजे बाईचा गाण्याचा कार्यक्रम ठरलेला दिसतो.बाईने गाणं गायचं ठरलं की,लगेच कार्यक्रम होतो.इतकी तिची सगळीकडे वट आहे. तिच्या कार्यक्रमाचे बोलावणे नसावे या आशेने मी शिपायाला म्हटलं.
"साहब तो ऑफिस में है ,कुछ काम था क्या?"
आता त्रिपाठी बाईचा शिपाई म्हटलं की हिंदीच बोलायला पाहिजे असं थोडंच आहे,पण असं होतं खरं.ती सुद्धा अमरावतीची आहे,पण हिंदी फाडत असते. तिचा शिपाई धुळ्याचा आहे.तरी आम्ही त्याच्याशी बोलतांना हिंदी फाडतो.
  त्याने लगेच सही साठी कागद पुढे केला.अशा प्रकारचा कागद घेवून आमच्या वर्गात मुरली काका यायचे.पण त्या कागदात सुट्टीची चांगली बातमी असायची.त्या कागदांची आम्ही आतुरतेने वाट पाहायचो,म्हणूनच नशीब अजूनही असे त्रिपाठी बाईचे आमंत्रण पाठवून आमचा डाव आमच्यावर उलटवत आहे असे वाटते.
  तुमच्या बाईसाहेब पार्टी देत आहेत का? 
   मी तो कागद हातात धरून उसना उत्साह आणून विचारले.तर शिपायाने फक्त वाचण्याची खुण केली.त्रिपाठी बाईंची त्याला बिचाऱ्याला कडक शिकवणी आहे,म्हणूनच तो इतर काही बोलत नाही.नाहीतर आमचे शिपाई,आमच्या घरात काय झालं आणि काय नाही याची सगळी उजळणी करतात.आम्ही शिस्तीच्या नाहीत,शिवाय त्रिपाठी बाईच्या मते नोकर माणसाला घरच्यासारखे वागवायचे म्हणजे अगदीच बेशिस्त .मी शिस्तीत कागद वाचला.आज क्लबमध्ये बाईचा गाण्याचा कार्यक्रम होता.त्यासाठी आग्रहाचे आमंत्रण होते.मनात हरे राम म्हटले आणि जनात व्वा फारच छान असं म्हटलं.लगेच शिपायाने सही करा,अशी खुण केली.मी मुकाट्याने सही केली,आणि त्या शिस्तीच्या पुतळ्याला खुण करून निरोप दिला.
  खरं तर मला गाण्यातलं काहीच कळत नाही.आता कोण गातोय असं कोणी विचारलं तर,मी गायक,गायिका असं उत्तर देते.गाणारी व्यक्ती स्त्री-पुरुष एवढच मला कळतं.काही गाणी आणि त्याचे गायक,गायिका पाठ झाल्यामुळे/केल्यामुळे तेवढे मी बिनदिक्कत सांगते.आताशा त्यांची संख्या काहीशी वाढल्याने काहींना मी गाण्यातली दर्दी आहे असं वाटतं.आपल्या बद्दल कोणाला काय वाटावं यासाठी आपल्याला कोणाचं मन थोडच धरता येतं? तशा या आमच्या त्रिपाठी बाईचे मन आणि गळा मी धरू शकत नाही.त्या महिन्यातून दोन तरी त्यांचे कार्यक्रम ठेवतात.सुरवातीला आम्हांला नवीन गावात बरी फुकटात करमणूक होते असं वाटायचं.पण नंतर मालिका पुढे न गेल्याने साचलेपण येतं ना तसं झालं.मग आम्ही न जाण्यासाठी  नवीन नवीन कारणं शोधायला  लागलो.पण त्रिपाठी बाईची  पण साहेबाने अचानक तपासणी साठी ऑफिसमध्ये यावे तशी अचानक निमंत्रणे यायला लागली.त्यामुळे पंचाईत व्हायला लागली.आमचा म्हणजे बायकांचा तिथे चहा –नाष्टा व्हायचा,पण घरी आल्यावर नवरा-मुलांसाठी करत बसावं लागायचं.म्हणून आम्हांला वाईट वाटायचे.आमच्यातल्या  एकीने त्यांना तसं सुचवलं की आम्ही थोडी वर्गणी काढून देतो,आमच्या घरी नाष्टा पाठवावा.तर तिला राग आला.तिने आम्हांला अरसिक ठरवलं.पण काही असलं तरी आम्हांला तिच्या कार्यक्रमाला जावंच लागत होतं कारण ती आमच्यातली सगळ्यात मोठी साहेबीन होती.
   आज त्रिपाठी बेगम साहिबाने जुनी गाणी म्हटली ,तिच्या मते ती शमशाद बेगमची गाणी होती.मी शमशाद बेगमची खूप प्रसिद्ध असलेलीच गाणी ऐकली होती.माझ्यातल्या अज्ञाना मुळे मी काहीच म्हटले नाही.शमशाद नाहीतर त्रिपाठी बेगम गाते आहे ना झालं तर मग.शेवटी बाईने तिचं आवडीचे गाणं गायला घेतलं .जीवनात ही घडी अशीच राहू दे.ती या गाण्यावर का एवढी फिदा आहे माहित नाही.पण तिच्या प्रत्येक मैफिलाचा शेवट ती याच गाण्याने करते.म्हणून कदाचित मैफलीची घडी तिच्या आयुष्यात वारंवार येत असावी आणि तिच्या मुळे आमच्या आयुष्यातही येते.यामुळे माझी चिडचिड झाली ती वेगळीच.
  तिने नेहमी प्रमाणे जाणकाराला  विचारतात तसं मला विचारलं ,काय दुसऱ्या जगात नेवून आणलं की नाही.?मी ही सज्ञान असल्या सारखी मान डोलावली.मला तिथून पटकन निघून जायचे होते.पण बाई काही सोडेना.त्या जीवनात ही घडी गुणगुणत माझ्या जवळ आल्या आणि ओळ पूर्ण करून बोलायला लागणार तेवढ्यात मी म्हटलं,अशा जीवनाच्या घड्या कशाला घालतात,चांगलं मोकळं सोडून द्या ते.बाईंनी माझ्याकडे अज्ञान बालका सारखं पाहिलं आणि म्हटलं,” मला आवडत तसं.”
  मला कपड्यांच्या घड्या सुद्धा आवडत नाही,शिवाय तेच तेच क्षण परत परत येण्यात काय मजा,शिवाय परत परत तीच घडी आल्याने पहिल्यांदा आयुष्यात आलेल्या घडीची किंमत कळत नाही.अजून एक जीवनाची ही घडी आपल्या म्हणण्यावर थोडीच चालते,ती पुढे जातच राहते.सतत पुढे आपल्या वेगाने जात राहणे ही नैसर्गिक घटना आहे.ती आपण थांबवू शकत नाही.शिवाय सारखं बरोबर राहून प्रेमाचा वसंत भांडण्यात आहे हे आपोआपच त्या घडीला कळतं.
  माझ्या या तात्विक बैठकीने बाई माझा नाद सोडतील असं मला वाटलं आणि म्हणूनच केवळ मी मनात येईल ते मी बोलत गेले.तर बाईंना त्यात माझा समंजसपणा  दिसला आणि जीवनाची घडी समजून घेण्यासाठी मला विशेष निमंत्रित केलं.मी ही मग हे राम मनात म्हटलं आणि जरूर  हे जनात म्हटलं आणि एक दिवसाचा नवरा आणि मुलं यांचाही दुपारचा नाष्टा माझ्या पदरात पाडून घेतला.जीवनाची ही घडी म्हणजे त्यांचा शिपाई आमच्या घरच्यासाठी पदार्थ करतो आहे ही  अशीच राहिली तरी चालेल असं मनात म्हणत मी बाईंचा निरोप घेतला

Thursday, September 11, 2014

चला चांगल्याचा आवाज करू या


  एक तरुणी  दैनिकामध्ये उमेदवारी करत होती.तिचे तीन महिन्याचे कठोर प्रशिक्षण संपल्यावर तिला  फिल्ड वर जाऊन एक छापण्यायोग्य स्टोरी आणायला सांगितली होती.सहा तास उन्हात फिरून प्रंचड मेहनत घेवून ती  आपल्याला काहीच करता आले नाही या भावनेने ऑफिस मध्ये पोहचली . ती शहरातल्या एका चौकातून आली होती, तेथे तिने  बघितले की दोन बस विरुद्ध दिशेने रस्त्यावर येत आहेत आणि आता त्या  एकमेकांवर आदळतीलआणि  अपघात होईल..पण या तरुण पत्रकाराने प्रसंगवधान राखले आणि ती  जिथे दोन रस्ते मिळतात तिथे पळत गेली  आणि जोमदारपणे दोन्ही हात पसरवले आणि थांबा असं जोरात किंचाळली.त्यामुळे बस थांबल्या. .अनेक प्रवाशांनी तिचे  हात हातात घेतले कारण तिने  त्यांचा जीव वाचवला होता,अनेक स्त्रियांनी तिच्या  हाताचे चुंबन सुद्धा घेतले आणि तिला  धन्यवाद म्हटले.तिची  ही धाडसी स्टोरी तिने तिच्या संपादकाला  सांगितली ,ते ऐकून  संपादक तिला  म्हणाला,” तू या स्टोरीची  नाट्यात्मकशीर्षक सांगायची सोनेरी संधी चुकवलीस “  
     आपण वाईट जगात राहत नाही .हे खरं आहे की वाईट गोष्टींचीच बातमी होते.जगात वाईट गोष्टींचा फार आवाज होतो,आपण अधिकाधिक असा रस्ता बनवण्याची गरज आहे की,ज्यामुळे चांगल्याचा आवाज होण्याची सुरवात होईल. आता आपण अजिबात अबोल राहयचे नाही.सिगरेट पिणे,दारू पिणे,चुईंगम चघळणे आणि इतर सवयी ज्या अपायकारक आहेत त्यांच्या जाहिराती आपण भरपूर केल्या,पण जगाचे ब्रेनवॉश करण्यासाठी कोणत्या चांगले उपक्रम उपलब्ध आहेत?
    कर चुकविण्याऱ्यांची पहिल्या पानावर ठळक अक्षरात बातमी येते,त्याऐवजी कर भरणाऱ्याची बातमी का येत नाही.खुनी लोकांचे फोटो येतात,त्याऐवजी जीव वाचविणाऱ्याचे फोटो का नाही छापत ?प्रत्येक दिवशी सैनिकाची गोष्ट का नाही सांगत?
  आपण जगभर फिरायला हवे  आणि आपल्याला  माहित असलेल्या चांगल्या लोकांबद्दल बोलायला हवे..आपल्या  मित्रांना आपल्या  पालकांचे सद्गुण सांगायला हवेत . क्लब मध्ये,कट्टयावर,देवळात,मित्रमंडळीत  सांगायला हवे की,,तुम्हांला तुमच्या मुलांविषयी किती अभिमान वाटतो ते? आपल्या  शिक्षकाचे गुण जे आपल्याला  आवडतात ते सांगुयात . आपल्या  भोवतीचे सामान्य लोक त्यांच्या रोजच्या आयुष्यात ज्या असामान्य गोष्टी करतात त्याबद्दल गॉसिप करुयात .आपल्या  सासरच्या लोकांना लिहा की तुमच्या मुला-मुली सारखा जोडीदार मिळाल्याने मला कसं छान  वाटते.किंवा त्याबाबतीत मी भाग्यवान आहे.तुम्ही ज्या काही चांगल्या गोष्टी पाहत आहात त्याबाबतीत  ओरडा,किंचाळा ,लिहा,बोला,तुतारी फुंका, आणि आवाज करा,

  आपलं जग हे चांगल्याचं जग आहे असा प्रभाव सगळ्यां मिळून टाकूया आणि  जगाला प्रभावित करू या.

Friday, August 29, 2014

जीवनातला वेषांतर केलेला शिक्षक "अनुभव"


   जीवनात समोर येणाऱ्या अनुभवांच्या एक पाउल अलिकडेच आपली परिपक्वता असते.आपल्यात परिपक्वता यावी हाच अनुभवांचा  खरा हेतू असतो.पण प्रत्येक अनुभवाबरोबर आपली समज वाढत जाते आणि त्या बरोबर आपल्या समोरील आव्हानेही वाढतात.अशा प्रकारे आपल्या जीवनाची वाढ ही नागमोडी वळणे घेत होत असते.
  तुम्ही किती ज्ञानी आहात,तुम्ही किती जीवन पाहिलं आहे,किवा तुम्ही जे करतात त्यात किती उत्तम आहात,एवढेच नाही तर तुम्ही जीवनाचा ज्ञानकोश आहात हे फार महत्वाचे नाही...कारण असं असलं तरी जीवनातल्या कोणत्यातरी कोपऱ्यावर मंदी,पडणे,कोसळणे हिंडत असते.जीवन नेहमी आपला प्रवाह,ताल बिघडविण्याचा प्रयत्न  करत असते.
    पण नेहमी आपली झालेली  वाढ लक्षात ठेवा, दहावीत नापास होण्याचे अपयश हे आठवीत पास झाल्यापेक्षा अधिक आहे.माउंट एव्हरेस्ट चढण्याची एक संधी हुकली तर स्थानिक डोंगरावर चढणे सुद्धा कमी दर्जाचे समजले जाते.जेवढी उच्च परिपक्वता तेवढी अधिक आव्हाने.जीवन व्यक्तीला असेच मोल्ड /साच्यात बसवत तयार करत असते.
  जीवन हा असा प्रवास नाही जो दोन पाऊले पुढे आणि एक पाऊल मागे येते. असे तेव्हाच होते जेव्हा माणूस जाणीवेशिवाय जगत असतो,आणि त्याच्या अनुभवातून तो काहीच शिकत नाही.माणसाची जाणीवच त्याला प्रत्येक अनुभवातून शिकण्याचे प्रशिक्षण देते,जरी तो स्प्रिग च्या कापडावर खाली वर होत असला तरी तो प्रत्येक पडण्यानंतर परत उठतो आणि परत पडतो आणि उठतो..पण प्रत्येक पडण्यानंतर अधिक वर उठतो. नंतरच्या प्रत्येक वरच्या पाउलागणिक त्याची परिपक्वता आणि त्याच्या आव्हानांची पातळी या दोन्हीत वाढ होते.
   आपल्या  यशाचे कारण काय?”चांगला निर्णय” ,चांगला निर्णय घ्यायला आपल्याला  का शक्य झालं?जीवनातल्या अनुभवांमुळे “तुम्ही जीवनातल्या अनुभवांकडून कसा लाभ करून घेतला? “वाईट निर्णय” घेवून.मी या अनुभवांना स्प्रिंगवरच्या कपड्यावरचे अनुभव समजते.
जीवनातल्या स्प्रिंगच्या कपड्यावरचे अनुभवावर,मी प्रत्येक अनुभवागणिक वाढत गेले..प्रत्येक अनुभव मला काय हवे ते देत गेला किंवा त्याने मला काय नको याची जाणीव करून दिली.

  नंतरच्या वेळेला आपल्याला  मिळालेले अपयश हे आपल्याला   अस्वस्थ करते पण आपण हे लक्षात ठेवायला हवे की  ,जीवनाने आपल्याला  दिलेला अनुभव हा वेषांतर केलेला शिक्षक आहे.,आपल्यातील  परिपक्वता वाढवण्यास मदत करण्यासाठी तो येतो.आपल्याला झालेली जाणीव  त्या अनुभवातून आपली परिपक्वताच वाढविण्यासच  फक्त मदत करत नाही तर अधिक उच्च आव्हाना साठी तयार होण्यास सांगते..आपल्या सारख्या मर्त्य लोकांना पडणे आणि उभे रहाणे  हा आशीर्वाद आहे कारण त्यामुळे आपल्या प्रत्येक उभे रहाण्यातून थोडे वर जात असतो.  

Monday, August 25, 2014

मार्गदर्शन करण्यापेक्षा आदर करणे अधिक गरजेचे आहे.



   मालकी दाखविण्याचे शिकण्याआधी तिला  शेअर करण्यास सांगितले होते. जेव्हा ती पाच वर्षाची होती तेव्हा तिला तिच्या दोन वर्षाच्या भावासाठी त्याग करण्यास सांगितले होते.ती स्वतःच लहान होती,पण तिचे पालक तिच्याकडून जबाबदार बहिणीच्या भूमिकेची  अपेक्षा करत होते. तीस वर्षा नंतर तिला तिचे कुटुंब होते तसेच तिच्या भावाचेही होते.तरी ती स्वतःला भावाच्या बाबतीत जबाबदार समजत होती. तरी ती त्याला उपदेश करत असे,जेव्हा त्याच्या लग्नात काही तरंग उमटायचे तेव्हा ती त्यांच्या मध्ये पडायची,भावाच्या बायकोला मुलाला कसं खायला घालायचं हे सांगायची,मुलांना कसं वाढवायचं हे सांगायची.ती अजून सुद्धा त्याग करायची,पण तिला परत काय मिळत होते? बेपर्वाईच्या  वागणुकी बरोबर तिला मिळत होते हृदयविकार,झोपेविना रात्री आणि भरपूर अश्रू .का? खरं तर  तिचा भाऊ स्वतःचे निर्णय घेण्या इतका मोठा आहे.जरी त्याचे काही निर्णय चुकीचे होते तरी त्याला असे वाटत होते की त्याला अशा चुका करण्याचा हक्क आहे,त्याला वाटायचे की या चुकण्यातूनच तो शिकणार आहे. तिच्या वहिनीला तिची म्हणजे ताईची /नणंदेची  कुटुंबातील ढवळाढवळ आवडत नव्हती. तिचा असा विश्वास होता की तिला तिच्या मुलांना स्वतःच्या मताने वाढविण्याचे स्वातंत्र्य आहे आणि कोणी केवळ वयाने मोठे आहे म्हणून उपदेश करत असतील तर ती त्यांचा तिरस्कार करेल.
   पहिला शब्द बोलण्यापासून,पहिला शब्द लिहता येण्यापासून आणि पाहिलं पाउल टाकण्यापासून ...त्याच्या वडिलांचा त्यात महत्वाचा सहभाग होता.मुलासाठी त्याचे वडिल नेहमीच सुपरमन होते,तेच त्याचे हिरो होते आणि त्यांच्याशीच तो स्पर्धा करू इच्छित होता. मुलाला करीयर समुपदेशन सुद्धा वडीलच करत होते.मुलाला त्यांच्या घराण्यातील पहिला उद्योजक व्हायचं होतं आणि तिथेही त्याचे वडीलच त्याला मार्गदर्शन करते होते. आज मुलगा प्रसिद्ध उद्योजक आहे.आजही वडिल तो रात्री घरी आली की कामावर काय झाले हे विचारतात आणि सूचना करतात ,पण यामुळे मुलाला त्यांचे भय वाटते.त्याला असे वाटते की वडिलांनी त्याला अधिक अवकाश दिला पाहिजे. वडिल काहीसे निराश झाले आहेत कारण त्यांना मुलाकडून हवं तसं लक्ष दिलं जात नाही असे वाटते. त्यांना वाटते की,मुलाला आता त्यांची गरज नाही.याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर झाला आहे,ते लवकर म्हातारे व्हायला लागले आहेत.
तुम्ही एखाद्याची नेहमी बहिण असतात,पण तुम्ही कायम बहिणीची भूमिका करू शकत नाही.तुम्ही कायमच प्रेमळ पालक असतात,पण कायम तीच भूमिका घेतली पाहिजे असं नाही.एका बिंदू नंतर कोणीही तुमचा पवित्र दृष्टीकोन स्वीकारू शकत नाही.
     तीन वर्षाचे मुल एका विशिष्ट सन्मानाची अपेक्षा करते आणि त्याला त्याच प्रकारच्या आदराची गरज असते. तीन वर्षाच्या मुलीला हवे असणारे कपडे घालू दिले नाही तर तिला वाटते की तिचा कोणी आदर करत नाही.दहा वर्षाचे मुल स्वतः मेनूकार्ड वाचून ऑर्डर देवू इच्छितो.तिच त्याला आदर देण्याची कल्पना असते. टीनएजर म्हणून तिला तिच्या मैत्रिणीची निवड करायची असते,आणि पालकांनी तशी करू देणे म्हणजे तिचा आदर करणे होय. त्याने तुमच्या बरोबर काही वर्षे काम केले ,त्याला स्वतःला काही निर्णय घ्यायचे आहेत आणि तुम्ही त्याच्या निर्णयावर खूष आहात ,ही कृतीच त्याच्यासाठी आदर दाखविण्याची आहे.प्रत्येक वयाला आणि जीवनाच्या प्रत्येक घडीला आदर जोडलेला असतो आणि  तुम्ही तो दाखविण्याची गरज असते.
     एखाद्याला मार्गदर्शन करण्याचा,विशेषतः कोणी न मागता सुद्धा मार्गदर्शन करण्याचा हेतू जरी चांगला असला,तरी त्या व्यक्तीला तिचा आदर केला जात नाही असं वाटण्याची शक्यता असते. आपला आदर करावा याची गरज ही मार्गदर्शन करावे यापेक्षा अधिक असते.

   इतरांचा आपण आदर करत आहोत....ही  तुमची निवड  असू द्या..ते तुमचे मार्गदर्शन घेतील.......ती त्यांची निवड असू द्या.

Wednesday, August 20, 2014

श्रेष्ठ कमी आणि क्षुल्लक अनेक


    इटालियन अर्थतज्ञ विल्फ्रेडो  पर्तो ( vilfredo pareto ) यांनी १८९७ मध्ये ८०/२० चे तत्व शोधून काढले.,जे आज paretoचे नियम म्हणून वापरले जाते. त्याने असे शोधले की ८० टक्के काम हे २० टक्के इनपुट दिल्याने होते.२० टक्के कारणांमुळे ८० टक्के फळ मिळते,आणि ८० टक्के परिणाम हे २० टक्केच्या परिश्रमामुळे मिळतात. जोसफ  जुरान यांनी २०% ना “महत्वाचे पण संख्येने कमी ” आणि ८०% ना “ खूप पण क्षुल्लक /सामान्य पण संख्येने जास्त” असे संबोधले आहे.सर आयझक पिटमन ,ज्यांनी शॉर्टहान्ड चा शोध लावला त्यांनी असे शोधले की आपल्या २/३ संभाषणात नेहमी वापरले जाणारे शब्द फक्त ७०० आहेत. त्यांच्या असे लक्षात आले की आपल्या ८०% बोलण्यात नेहमी हेच शब्द यतात.
    विद्यार्थी त्यांचा ८०% अभ्यास हा २०%तासिकांमध्ये पूर्ण करतात.परीक्षेतील प्रश्नपत्रिका ह्या २०% अभ्यास क्रमावर  आधारित असतात.२०% ग्राहक  व्यवसायातील ८०% नफा,वाढ आणि समाधान देतात.२०% उत्पादन आणि सेवा ह्या ८०% टर्नओव्हर करतात.२०%कामगार ८०% उत्पादन तयार करतात. २०% च्या मतांमुळे समाजाची  व्याख्या केली जाते.लोकसंख्येतील २०% च्या उत्पादनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची व्याख्या केली जाते. जर तुमच्या विक्री व्यवस्थेत २० लोक असतील आणि त्यातील चारजण खूप मस्त काम करणारे असतील,आणि सहाजण हे मध्यमप्रतीचे असतील आणि दहाजण हे फक्त असतील.तर अशावेळी विक्री व्यवस्थापक बाकीच्या लोकांना अधिक उत्पादनक्षम बनविण्याची चूक करेल,जेव्हा उत्तम काम करणाऱ्याकडे लक्ष न देता तो त्यांना गृहित धरेल.जर तुमची विक्री वाढवायची असेल तर त्या उत्तम लोकांकडे लक्ष देणे आणि न काम करणाऱ्यां कडे दुर्लक्ष करणे गरजेचे आहे. उत्तम लोकांकडे अधिक लक्ष देणे आणि त्यांना अधिक बळकट करण्यावर भर दिला पाहिजे.
  ८०/२० हे कमी लोकांकडून अधिक प्राप्त करण्याचे रहस्य आहे. सरासरी मेहनत वाढविण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा  अपवादात्मक उत्पादकता साजरी करायला सुरुवात करा. अनेकां कडून पुरेसे चांगले कामाची अपेक्षा करण्यापेक्षा थोड्यांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा करून उत्तम मिळवणे सोपे आहे.
  सगळीकडे वाया जाण्याचे प्रमाण मोठे आहे.तुमच्या जीवनातले ४/५ पैकी फार थोडे तुम्हांला परत मिळते.कारण २०% पेक्षा ८०% वर आपण अधिक भर देतो. तुमच्या  विचारात परिवर्तन आणा.तुमचा दृष्टीकोन दुरुस्त करा. तुमचे स्त्रोत हे अनउत्पादक “क्षुल्लक पण अधिक”यांच्यापासून ते उत्पादक “श्रेष्ठ पण कमी” यांच्यामध्ये परत विभागित करा. ८०% बाबत काय घडते आहे हे दाखवणे म्हणजे परिणामकता नाही तर त्या २०% चे तुम्ही कसं नियोजन करतात,त्यांच्यावर नियंत्रण कसं करतात आणि त्यांचा उपयोग कसा करतात हे महत्वाचे आहे.तुमच्या आयुष्यातील २०% वेळ हा तुम्ही काय आहात आणि काय असणार आहात हे सांगण्यात जातो.

  त्या २०%वर  लक्ष केंद्रित करा म्हणजे तुमच्या आयुष्यातील ८०% भागाची आपोआप काळजी घेतली जाईल.

Thursday, August 14, 2014

तुमचे महत्व

.तुमच्याकडे असणाऱ्या वस्तूंपेक्षा तुम्ही स्वतः जास्त महत्वाचे आहात.

   पती त्याच्या पत्नीला तिच्या वाढदिवसा निमित्ताने एक कार भेट देतो. तो प्रथम तिच्या हातात गाडीच्या किल्ला देतो,नंतर एक पाउच ज्यात आवश्यक कागदपत्र असतात,जसे ड्रायव्हिंग लायसन असते,आणि हे सगळे दिल्यांनतर तो तिला मिठीत घेतो.नंतर तिला लॉंग ड्राईव्हला जायला सांगतो आणि त्याच बरोबर मुलांची काळजी घ्यायला सांगतो.ती त्याला कीस करून आभार मानते आणि कार घेवून ती जाते.एखाद्या किलोमीटर जात नाही तर कशाला तरी जाऊन धडकते. ती सुरक्षित असते पण गाडीला पोचा पडतो.तिला सारखे अपराधी वाटत असते की,ती आता त्याला काय सांगायचे?तो हे सगळं कसं घेईल? विचार आणि भावना ह्या माठेफिरुसारख्या धावत असतात.पोलिस अपघाताच्या जागी लगेच येतात.” आम्ही तुमचे लायसन बघू शकतो का? असं म्हणत ते लायसन मागतात.तिचे हात थरथरत असतात,ती त्या पाऊच पर्यंत जाते जे तिच्या नवऱ्याने तिला दिले होते.तिच्या गालावरून अश्रू ओघळत असतात,ती पाऊच मधून जेव्हा लायसन बाहेर काढत असते तेव्हा तिला त्या पाऊच मध्ये एक नवऱ्याच्या हस्ताक्षरातील चिठ्ठी सापडते.त्यात लिहलेले असते,”प्रिये,जर कधी अपघात झाला तर लक्षात ठेव, मी तुझ्यावर प्रेम करतो कार वर नाही. माझे तुझ्यावर प्रेम आहे.”
   आशीर्वाद तेच देतात जे समजतात की ते माणसांवर प्रेम करतात वस्तूंवर नाही,आणि आवडत्या वस्तूंना आणि उपयोगी माणसांना आशीर्वाद दिले जात नाही.
   कारवरचा एखादा ओरखडा आपले ब्लड प्रेशर वर नेतो ...पण आपल्याला असे वाटत नाही की आपलं मनच आपल्या हृदयावर ओरखडे मारत आहे. मला असा माणूस माहित आहे ज्याने  त्याला आवडणारी वस्तू  हेतुपूर्वक जमिनीवर फेकली  आणि नंतर म्हटले की,” अठरा वर्षापासून ही वस्तू मला ताण देत आहे.मी सारखा विचार करायचो की, –जर ही वस्तू  पडली तर,जर ती मोडली तर....म्हणून मग मला  वाटले  की ,कोण बॉस आहे हे दाखवून देण्याची  आता वेळ आली आहे आणि त्यामुळे मनाला शांतता तरी मिळेल.” 
मला असाही  एक माणूस माहित आहे ज्याने त्याच्या  मर्सिडीज बेन्जचा अपघातात पार चक्काचूर झाला म्हणून पार्टी ठेवली होती.तो म्हणाला,जरी माझी कार पूर्ण खराब झाली तरी मला त्याचे काही विशेष वाटत नाही,कारण गाडीत कोणीच नव्हते. आता मी एकदम व्यवस्थित असल्याने दुसरी कार घेवू शकतो,पण जर कार नीट राहिली असती आणि मीच गेलो असतो तर ---ती गोष्ट योग्य झाली नसती.
      आपलं जीवन ६०रु.च्या कारने सुरु होतं,जेव्हा ती मोडते तेव्हा आपण भोकाड पसरतो .नंतर आपण २००० रु. रिमोट कंट्रोल कार घेण्या इतके मोठे होतो,आणि जेव्हा ती कार खराब होते तेव्हा आपण रडतो.नंतर आपल्याला २०,००० रुपयाची बँटरीवर चालणारी कार भेट मिळते. जेव्हा ती काम करायचे थांबते,तेव्हा आपण निराश होतो.नंतर ४ लाखाची कार येते,मग २२लाखाची सुव ,नंतर ८६ लाखाची लक्झरी सदन....आणि प्रत्येक वेळेला मशीन बरोबर काहीतरी होते,कधी ओरखडा,कधी पोचा.आपल्या तणावाचा आणि चिंताचा पारा वर चढत च जातो.या सगळ्यात हेच दिसते की आपल्या खेळण्या बरोबर आपण मोठे होत नाही.आपण कशासाठी रडत आहोत ते फक्त बदलते,पण आपले रडणे तसेच रहाते.आता आपले रडणे   अति आधुनिक झाले आहे. त्याला अनेक नवीन नावं मिळाली आहेत,जसे की,राग,निराशा,नैराश्य,ताण,संताप इत्यादी.
   खेळणी ही आपल्या मनोरंजना साठी असतात.त्यांचा एकच हेतू असतो की ती आपल्या उपयोगी पडावीत .अगदी तुमचे बीच वरील घरापासून ते तुमच्या suv पर्यंत ...प्रत्येक गोष्ट ही तुमचे जीवन आरामदायी होण्यासाठी असते.तुम्ही तुमच्या जवळच्या वस्तू पेक्षा मोठे असतात.तुमच्या मालकीच्या वस्तू पेक्षा तुम्ही अधिक मौल्यवान असतात.तुमच्याकडे असणाऱ्या किंवा येणाऱ्या वस्तू पेक्षा तुम्ही अधिक महत्वाचे असतात.

    खेळण हे खेळण असतं.खेळणी विकत घ्या,अधिकधीक खेळणी विकत घ्या.पण त्यांना त्याची योग्य जागा द्या.ती फक्त तुमच्या उपयोगासाठी,तुमच्या आरामासाठी आणि तुमच्या मनोरंजना साठी तिथे आहेत.तुमचे मौल्यवान अश्रू त्यासाठी वाया घालवू नका,जरी ते खेळण कितीही महत्वाचे असेल तरी.सगळ्यात महत्वाचे तर तुम्ही आहात.   

Wednesday, August 13, 2014

नातेसंबंध


   आपण जर आपल्या   जीवनात  आनंदी आहोत म्हणजे  त्याचा  अर्थ असा होत नाही की आपल्या  जीवनात जे काही चालले आहे ते बरोबर आहे,योग्य आहे.तर त्याचा अर्थ असा होतो की,जी नाती आपल्याला  महत्वाची वाटतात ती छान चालली आहेत. तसेच आपण आनंदी  नसलो  तर त्याचा  अर्थ असा होत नाही की आपल्या  जीवनात जे काही घडतं आहे ते चुकीचे आहे म्हणून आपण  दुःखी आहोत ,तर आपल्याला जी  नाती  महत्वाची वाटतात ती बिघडलेली आहेत.
   नाती ही बी सारखी असतात. त्यांचे नीट संगोपन करावे लागते आणि वाढवावे लागते.अपेक्षा ह्या रानगवता सारख्या असतात त्या त्यांच्या त्या वाढतात.जेव्हा नातेसंबंध दृढ करण्यासाठी पुरेशी गुंतवणूक केलेली असते तेव्हा नाती सांभाळता येतात. जेव्हा नातेसंबंधा कडे दुर्लक्ष केले जाते,तेव्हा अपेक्षा इतक्या वाढतात की नात्यांची मुळे हलायला लागतात. वाढत्या अपेक्षा ह्या नाती खराब करतात ही आपली समस्या आहे.
   आपण या गोष्टीचा विचार बँकेच्या बचत खात्याचे रूपक घेवून करू या. शिल्लक टाकलेल्या रकमेतीलच पैसे आपण काढू शकतो,पण आपण जेवढी शिल्लक टाकली आहे तितकीच रक्कम आपण काढू शकतो. नातेसंबंधातही तसेच आहे,आपलं नातं तेवढच तयार होईल जेवढी शिल्लक आपण त्यात टाकली आहे.
    नात्यांमध्ये जेव्हा भरपूर भावना गुंतलेल्या असतात तेव्हा चुका समजून घेतल्या जातात,माफही केल्या जातात, अपूर्ण संवाद असेल तरी अर्थ समजून घेतला जातो,आणि तुम्ही कृतीत कमी पडत असाल तरी तुमचा हेतू स्वीकारला जातो. नाती तेव्हाच चांगली राहतात जेव्हा तुम्ही त्या बद्दल चांगला विचार करतात. तुम्ही चांगला विचार करतात कारण तुम्ही नातेसंबंध दृढ करण्यासाठी भावनांची शिल्लक टाकलेली असते.
  काहीवेळेस नाती ही गृहित धरली जातात,कायम स्वरुपाची नाती ही गृहित धरली जातात आणि त्यांचे संगोपन करण्यासाठी काहीही केले जात नाही. अपेक्षा सातत्याने वाढत राहतात,पण नातं टिकवण्यासाठी जी गुंतवणूक गरजेची असते ती केली जात नाही. राखून ठेवलेल्या भावना काढून घेतल्या जातात. अशा परिस्थितीत तुमचा प्रत्येक शब्द अपमानास्पद समजला जातो, तुमची प्रत्येक कृती तपासली जाते,शाब्दिक मारामारी आणि आपटणारी दारे ही नियमित घडणारी गोष्ट होते. तुमची कोणतीही कृती स्वीकारली जात नाही आणि तुमच्या हेतूचा आदर केला जात नाही. अशी नाती म्हणजे खाणीत चालण्यासारख्या असते,जी कधीही धूर सोडते आणि कितीही वेळा धूर सोडते.
     यावरचे उत्तर अगदी साध्यातले साधे आहे.शिल्लक,अधिक शिल्लक आणि खूप अधिक शिल्लक. कोणतेही कार्यशील नाते हे सतत काही तरी मागत असते,पण त्यात आपण नेहमी पुरेशी शिल्लक टाकत असतो.ज्यात तुम्ही तुमचा वेळ त्याच्या वाढीसाठी गुंतवतात.नातेसंबंदहाचे संगोपन  हे गुणवत्तापूर्ण वेळेच्या  गुंतवणूकीने केल्याने होते. ऐकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी वेळ द्या. जेव्हा शक्य असेल तेव्हा समजून घेण्यासाठी संवाद साधा. तुमचे प्रेम हे व्यक्त करा आणि ते दाखवा.देण्याचा प्रयत्न करा,पण घेतांना ही आकर्षकपणे घ्या.जेव्हा तुम्ही इतरांचे प्रेम स्वीकारतात तेव्हा तो त्यांच्याबद्दल आदर दाखवण्याचा एक मार्ग असतो,ती मोठी शिल्लक आहे. शिलकी मागे शिल्लक टाकत रहा आणि तुमचे नाते जपा आणि अशा पद्धतीने तुमचा जीवनातला आनंद मिळवा.

   पौराणिक कथेत असं सांगतलं जातं की देवालासुद्धा  नातेसंबंधात समस्या असते. इथे तुम्हांला देवाच्या एक पाउल पुढे जाण्याची संधी आहे.

Thursday, August 7, 2014

शिखर चढायचे ना

शिखर चढायचे ना 
    जेव्हा आपण  वाहन चालविण्याची निवड करतो  , तेव्हा आपल्याला  ट्राफिक जाम स्वीकारला पाहिजे. जेव्हा आपण  आरोग्याबद्दल सतर्क राहण्याची निवड करतो , तेव्हा आपल्याला  जिभेचे चोचले सोडून दिले पाहिजे. अधिक उत्पन्ना बरोबरीने उत्पन्न करही येतोच.
   जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीची निवड केली की त्याबरोबर त्या गोष्टीचे स्वाभाविक अशा  सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी ही येतात.मुर्खा सारखे दुसरीकडे कशाला शोधायचे,आता हेच बघा ना प्रत्येक गुलाबाला काटे हे असतातच.जेव्हा तुम्ही नाण्याची एक बाजू निवडतात, तेव्हा तुम्हांला दुसरी बाजूही निवडावीच लागते.संकटाशिवाय चे सुखकारक जीवनाबद्दल विचारू नका.महात्मांनी सुद्धा संकटाशिवायचे सुखकारक आयुष्य स्वीकारले नाही.असे जीवन कधीच नसते.
   महत्वकांक्षा जेवढी मोठी तेवढ्या मोठ्या अडचणी येतील.पण तुम्ही  फक्त चालायचे ठरवले तर  तुमच्या अडचणी कमी होतील .जेव्हा तुम्ही माराथोन मध्ये धावाण्याचे ठरवतात  तेव्हा साहजिकपणे  तुम्हांला अधिक अडचणींशी सामना करावा लागतो. जेव्हा तुम्हांला केवळ जगायचे असते,तेव्हा तुम्हांला फार कमी अडचणींना तोंड द्यावे लागते. जेव्हा तुम्हांला तुमच्या क्षमतेनुसार विशिष्ट योग्यतेने जीवन जगायचे असते तेव्हा तुम्हांला अधिक मोठ्या अडचणीं सोडवाव्या लागतात. जेव्हा काठीची एक बाजू तुम्ही वर उचलतात तेव्हा तुम्ही  काठीचे दुसरे टोकही आपोआपच उचलत असतात.  शिखरावर जाण्याचा कोणताही मार्ग सोपा नाही आणि जे गेले आहेत त्यांनीही ते सोपे केले नाही.शेवटी इतिहास वाचणारे आणि इतिहास रचणारे यांच्यात फरक असतोच.
   बायबलच्या अभ्यास गटात ते मालची (malachi)३.३ वाचत होते,” तो चांदी शुद्ध करणारा मनुष्य म्हणून बसला होता.” म्हणजे त्याच्यात देवाचे कोणते गुण आणि स्वभाव असणार आहे?त्या आठवड्यात एका महिलेची भेट ठरली होती ,तिला त्याला रौप्यकार म्हणून पहायचे होते.जेव्हा तिने त्याला काम करतांना पहिले तेव्हा त्याने  चांदीचा तुकडा आगीवर ठेवला आणि त्याला गरम करत ठेवले. त्याने तिला समजावले की चांदीचा तुकडा तोपर्यंत आगीच्या बरोबर मध्यभागी ठेवायचा,जोपर्यंत त्याच्यातील अशुद्धता जळून जात नाही.ती म्हणाली असं असेल तर त्याला सगळा वेळ त्या आगी समोर बसून रहावं लागेल. तो म्हणाला हे खरं आहे पण त्याला केवळ आगी समोर नुसतं बसून रहावं लागत नाही तर त्याला त्या चांदीच्या तुकड्यावर सतत नजरही ठेवावी लागते.जर चांदी थोड्यावेळ जास्त जर त्या आगीत राहिली तर ती नाहीशी होईल.तिचा नाश होईल.मग त्या महिलेने विचारले,” मग तुला कसे कळते की चांदी पूर्ण शुद्ध झाली आहे ते?” तो हसला आणि म्हणाला,”ते तर खूप सोपे आहे,....जेव्हा मी त्यात माझी प्रतिमा पाहतो.”
    जर तुम्हांला जीवनाची उष्णता जाणवत असेल,तेव्हा लक्षात ठेवा   देवाची तुमच्यावर नजर आहे आणि तो बघतोय त्याची प्रतिमा त्याला तुमच्यात कधी दिसते ते.प्रत्येक व्यक्ती मध्ये एक प्रेषित झोपलेला असतो.देव माणूस होतो ,म्हणून माणूस परत देव होवू शकतो.जीवन ही काही अशी भट्टी नाही जी तुम्हांला जाळते ,तर जीवन ही अशी भट्टी आहे जी तुम्हांला चमकणाऱ्या चांदीत बदलवते.

   

Wednesday, August 6, 2014

आज

आज “ ही आपल्याला मिळालेली मौल्यवान भेट
   एखादी  वस्तू कोणी आपल्याला दिली आणि त्या  मागचे हृद्य आपल्याला  ओळखता आले  तर ती वस्तू एक आठवणीत राहिल अशी  भेट ठरते.मग ती एखादी साधी वस्तू का असेना? पण वस्तू देण्यामागच्या भावना आपल्याला समजल्या नाही तर  ती निव्वळ एक वस्तू राहते.
   बालपणात मिळालेले एखादे पेन ही आपल्यासाठी महत्वाची  भेट ठरते जेव्हा आपण त्यामागचे ह्र्दय समजून घेतो.मग आपण  म्हणतो की,  हे पेन मला माझ्या बालपणातच मिळालेली भेट  आहे.”तेव्हा आपण आपल्या  पालकांचे आपल्या  संगोपनातले  हृद्य समजून घेत असतो. जेव्हा   आपले  शिक्षक आपल्याला  ज्ञान देत असतात तेव्हा  त्यामागचे हृद्य समजून घेतले तर शिक्षण हे सुद्धा भेट ठरते. आपले  रहाणीमान ही सुद्धा एक भेट ठरते जेव्हा आपण    त्यामागील  कामगाराचे आपल्या  वाढीमधील कष्ट  समजून घेतो . आपल्या संस्थेची वाढ ही सुद्धा एक भेट असते जेव्हा आपण  आपल्या बरोबर  काम करणाऱ्या सहकाऱ्याचे   प्रयत्ना जाणतो.
   आपल्याला मिळालेली भेट ही केवळ वस्तू  नसते तर, एक दृष्टीकोन असतो ,ज्याने त्या वस्तू मागच्या  हृदयाकडे बघता येते.
    या दृष्टीने विचार केला तर “आज” ही  एक शाश्वत भेट आहे.विशेषतः ज्यावेळी   भेट वस्तूंसाठी अनेक स्त्रोत उपलब्ध असतांना,” आज” ही  अशी मौल्यवान भेट आहे जी केवळ आपल्याला  एका नैसर्गिक शक्ती  कडूनच मिळते किंवा तीच शक्ती तुम्हांला सांगते की तुम्ही “काल”  जिवंत होता. काल झोपलेला प्रत्येकजण आज सकाळी उठतोच असं नाही.वस्तुस्थिती अशी असते की काही शक्ती विचार करतात की,तुम्ही अजून एक “आज” साठी महत्वाचे आहात.आपल्याला मिळालेल्या त्या मौल्यवान २४ तासांच्या मागील निसर्गाचे  हृद्य ओळखा. भेटवस्तूचा दुरुपयोग करणे म्हणजे ती भेट देणाऱ्याशी गैरवर्तन करण्यासारखे आहे हे लक्षात घ्या.“आज” ही निर्मिकाने दिलेली  देणगी आहे हे माहित करून घ्या.जेव्हा आपण  एखाया भेटवस्तूचे मूल्य समजून घेतो ,तेव्हाच त्या भेटीचे मूल्य आपल्याला  जाणवते . “आज”चे मूल्य  समजून घेवून तो अधिक मौल्यवान करू या.
   आज आपण  आपल्या  जीवनातल्या  एक दिवसाचा व्यापार केला  तर त्यासाठी आपल्याला  परत काय मिळेल?. म्हणून आपला  आज शक्य तितका  अधिक उत्पादनक्षम  करा.” आज” हा आपल्या  उर्वरित आयुष्याचा पहिला दिवस आहे.म्हणून आपल्या  भूतकाळावर रेघ मारा,विश्वास ठेवा की काल हा कालच संपला, आणि आपल्या  वेगाने  भविष्याचे बटन दाबा. आज आपण  भूतकाळातील दोषांची काळजी करायची नाही ,त्याचा आपल्या  भविष्यातील अनिश्चिते वर  काही परिणाम होणार नाही,तर तो “आज”तो दिवस आहे,ती एक संधी आहे,आणि आयुष्याचा एक भाग आहे.म्हणून आपल्या  “आज” ची काळजी घेतली तर  मग आपल्या  जीवनाची काळजी आपोआपच घेतली जाईल.हो ना?

      बुद्ध म्हणतो,” चला उठा आणि आभार माना, ते यासाठी जर तुम्ही आज जास्त  शिकला नाही,तर  तुम्ही थोडेसे तरी  काही शिकला असाल  आणि जर तुम्ही थोडेही शिकू शकला नसाल,पण  तुम्ही आजारी झाला नाहीत आणि जर  आजारी झालात  पण तुम्ही मेला नाहीत,म्हणून  चला तर या सगळ्यासाठी आभार माना, आणि कृतज्ञ रहा.