Tuesday, September 23, 2014

रांगोळीची रेघ


  अस्तिवाच्या लढाया सतत आपण देत असतोच,अगदी जन्मापासूनच. हो आपण रडतो,हसतो,वाट्टेल तसे चाळे  करतो ते आपलं अस्तित्व जाणवावं म्हणूनच असेल. काही काही वेळेस तर एखादी व्यक्ती त्या जागी नसते पण तिच्या अस्तित्वाच्या खुणा असतात. सामान्य माणूस त्याच्या नातेवाईकांच्या आठवणीतून का होईना अस्तित्वात राहतो. तर कलाकार त्यांच्या कलेतून आपल्याला जाणवतात. त्यांची एक एक रेषा,शिल्प,शब्द त्यांची ओळख आपल्याला देत असतात. ती रेघ,ते शब्द त्यातील विचार आपण ओळखले नाही तर कलाकाराला ते आवडत नाही,किंवा तो फार थोडा वेळ असे म्हणत असतो की, ते मी माझ्या आनंदासाठी करतो आहे.पण जेव्हा एखादी कला प्रदर्शित होते तेव्हा ती लोकांची आणि लोक कलाकारा बरोबरच स्वतःचेही अस्तित्व त्यात शोधतात,मजा येते. जेव्हा कलाकार आणि आस्वाद घेणारे जेव्हा एकाच नाण्याच्या पण दोन बाजू असतात तेव्हा दोघांनाही एक एकच बाजू दिसते. काहीवेळेस स्वतःला अनभिज्ञ अशा बाजूचा शोध घेता येतो.ती समजून घेता येते. तिचा अनुभव घेता येतो. पण हे सर्व केव्हा जेव्हा स्वतःचे अस्तित्व विसरून आपण काही बघायला जातो तेव्हा. नाही मला अस्तित्वावर लिहायचं नाही किंवा कोणत्या ख्यातनाम कलाकाराबद्दल लिहायचं नाही. पण ज्या दिवशी तो प्रसंग अनुभवला त्या दिवसापासून माझ्या मनात सतत येत आहे की कोणी काढली असेल ती रांगोळीची रेघ,जी इतकी सुंदर आणि नाजूक आहे.
    माढ्याला विठ्ठलाचे/पांडुरंगाचे एक छोटसं मंदिर आहे. असं आम्ही ऐकलं होतं.सोलापूर पासून पंढरपूर जवळ आहे,आणि पंढरपुरात सगळ्यांची विठू माउली आहे. त्या देवळातील प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असला तरी ह्र्दयस्पर्शी असा असतो. प्रत्येकाला त्याचं कोडं सोडवावं वाटतं आणि बहुतेकजण ते सोडविण्यासाठी तेथे जातात.या विठोबाला नमस्कार करून तुम्ही बाहेर आलात,तुमच्या गावी गेलात की तुम्हांला कोणीतरी नक्की सांगेल,काहीवेळेस  गुप्त आवाजात सांगेल की,असं म्हणतात माढयाचा विठोबा हा खरा आहे.ज्यांना या खऱ्या खोट्यात फारसा रस नसतो ते शांत बसतात आणि ज्यांना असतो ते पुरावा मागतात,चर्चा करतात. आपल्याकडे खूप ठिकाणी असे आढळते. तळघरातला देव खरा किंवा सगळ्यात जुना आणि सर्वाना सहज दिसेल अशी देवाची मूर्ती खोटी.मग परकीय आक्रमण,त्यातून वाचण्यासाठी लोकांनी केलेली धडपड असा सगळा इतिहास आपण पुन्हा पुन्हा बोलतो,ऐकतो. काहीवेळेस मजा येते.काहीवेळेस हसू येते. काहीवेळेस कशाचाच अंदाज येत नाही. तरीही आपण त्यात गुंतत जातो.मनाला काय थोडसं काहीतरी थ्रिलिंग हवंच असतं. शिवाय सत्यही समजून घ्यायचं असतं. त्याच्या शोधात मी खी खरच माढ्याला जावून धडकले. लोकांना विचारत विचारत मंदिराजवळ पोहचलो. कारण गावाच्या बाहेर, गावात देवळाकडे जाण्याचा मार्ग अशा सूचना लिहलेल्या नव्हत्या. तशा लिहण्याचे काही कारणही नव्हते. कारण  देवा जवळ  कोणतीही बाजारपेठ नव्हती. शिवाय सरकारला देवळापासून तसा कोणताही प्रत्यक्ष फायदा नव्हता. त्यांच्या आध्यात्मिक फायद्याबद्दल मी काय बोलणार? तो त्यांनाच माहित. गल्ली-त्यापेक्षा बोळकांड्यातून रस्ता काढत देवळाजवळ पोहचले.स्वच्छ,सुंदर आवार आणि तितकच सुंदर, स्वच्छ देऊळ .शांत विठोबा,भक्तांची ये-जा ही शांतच.एकदम प्रसन्न वाटावे असं हे देऊळ पाहून खूप समाधान वाटले.
   खरतर देऊळ लहानच होते. दगडी भिंतींनी बांधलेले नेटके.विठोबाचे सहज दर्शन होईल इतकं सुव्यवस्थित. विठोबाची मूर्ती मात्र खूप जुनी वाटत नव्हती. खरतर हे सर्व नवेच आहे असं वाटावे इतके सगळे चकचकीत होते. खरतर पंढरपूरचा विठोबा पाहिल्यामुळे या मूर्तीचा नवेपणा अधिक जाणवला असेल. पण मूर्तीची स्थापना मात्र खूप जुनी आहे. असे तिथे कोरलेले होते. विठोबा नवा-जुना,खरा-खोटा याच्या नादात आजूबाजूला लक्ष गेले नव्हते.पण मूर्तीचे दर्शन झाल्यावर लक्षात आले की,देवळात कोणतीही अस्वच्छता नाही.शिवाय देवळात आणि देवळाच्या बाहेर एक सुंदर रांगोळी काढली आहे.

  ती रांगोळी पहिली आणि वाटलं,जाणून घ्यावं त्या व्यक्तीला.कारण ती रांगोळी फार मनापासून काढलेली दिसत होती. त्यातील रेषा कलाकाराच्या संवेदनशीलतेच्या होत्या. शिवाय रांगोळी काढणाऱ्या त्या व्यक्तीला स्वतःचे अस्तित्व फक्त त्या रांगोळी पुरतेच आहे असं दाखवायचे होते. मला त्या रांगोळीने काहीतरी नवीन समजल्या सारखे वाटले. वाटलं आपण किती धावपळ करतो आपल्या एखाद्या रेषेसाठी,शब्दासाठी,आपलं अस्तित्व जाणवून देण्यासाठी शहरं हवी आहेत,जाणकार हवे आहेत. कोणाची सूक्ष्म टीका आपल्याला दुःखी करते. तर कोणाचे स्वीकारल्याचे सौम्य हसू जगण्यालायक बनवते. किती लाचार आणि दिनदुबळे होत आहोत आपण.आपलं अस्तित्व इतरांनी मान्य करावं म्हणून किती झटणार आहोत. या रांगोळीच्या रेघे इतकी बेफिकिरी का नाही आपल्यात. त्या व्यक्तीला वाटलेच नसेल का कोणी आपल्याला छान म्हणावे? काय असेल तिच्या मनात. मला खूप अस्वस्थ वाटले. अजून एक गोष्ट त्या रेघेत मला जाणवली,अप्रतिम निष्ठा.आपलं काम चोख,प्रामाणिकपणे आणि तितकेच निष्ठेने करण्याचे बळ त्या रेघेत होते. समोरच्या विठोबाचे अस्तित्व जणू त्या व्यक्तीला रोज जाणवत असावे किंवा कोणी सांगावे तो सखा रोज त्या रांगोळीसाठी तिच्याकडे हट्ट धरत असावा. ते त्यांचे गुपितही असेल.हसू येते मला माझ्या विचित्र मनाचे. बघा ना कोणी नाही तर विठोबासाठी ,तो येत असेल म्हणूनच त्या व्यक्तीने निष्ठेने ती रांगोळीची रेघ काढली असं म्हणून बसले. म्हणजे स्वतःच्या स्वीकृती साठी दुसऱ्याचे अस्तित्व हवेच हा दांभिकांचा कायदा मी विसरतच नाही. बाहेरच्या जगाचा माणसावर किती परिणाम होत असतो. अंतर्मनाला कशाला हवे आहेत हे उपचार,ते या बाह्य उपचारापासून स्वतंत्र्य ,मुक्त असू शकत नाही.? निश्चित असणार. हो ती रांगोळीची रेघ मला हाच विश्वास जणू देत होती. कारण रांगोळी काढणाऱ्या व्यक्तीचं सगळं मन त्या रेघेतून व्यक्त होत होतं. मला ते जाणवत होतं. नित्य जाणवत राहील.तेव्हापासून मला मात्र एक छंद जडलाय. रांगोळीची रेघ बघण्याचा. ती नुसती बारीक,नाजूक असून चालत नाहीतर स्वतंत्र आणि मुक्त आहे का हे बघण्याचा.   

No comments:

Post a Comment