Sunday, February 21, 2021

 

Travels Through south Indians kitchens

 Nao Saito

  Published by Tara Books

     आपल्याच स्वयंपाकघराकडे नाविन्याने बघायचे असेल तर Nao Saito ने लिहलेले Travels Through South Indian Kitchens” वाचायला हवे. मी ते पुस्तक हातात घेतलं तेव्हा त्यातील रेखांकने पाहूनच खुश झाले होते.या पुस्तकाचा सगळ्यात मोठा आणि चांगला गुण कोणता तर त्याचा ‘साधेपणा’होय. यातच लेखिकेने जो आनंद आपल्याला दाखवला आहे तो सुद्धा खूप छान आहे.

   खरं तर सुरुवातीला भारतीय स्वयंपाक घराविषयी दुसरं कोणी आम्हांला कसं सांगू शकेल?हा कुचकट विचार आपल्या मनात येऊ शकतो.तो जरा बाजूला सारून पुस्तकाकडे लक्ष दिलं की आपल्याच स्वयंपाक घरातल्या कितीतरी जागा ती आपल्याला दाखवते, ज्यांचा वापर अतिशय नजाकतीने करतो.

    Nao (नाओ) ही जपानी आर्किटेक्ट आणि डिझायनर आहे.  ती तारा बुक्सच्या  टोकियो मध्ये झालेल्या वर्कशॉप मध्ये सहभागी झाली होती. नंतर चेन्नई इथे असेल्या तारा बुकच्या प्रकाशनगृहात निवासासाठी तिला आमंत्रित केलं होतं.जेव्हा ती इथं आली तेव्हा तिने ठरवलं की लोकांना त्यांच्या स्वयंपाक घरात जाऊन भेटायचं.त्यांचा शोध त्यांच्या स्वयंपाक घरातून घ्यायचा.कारण स्वयंपाक घरं ही प्रवाही होतात कारण त्यात राहणारी माणसं त्याला तशी ठेवतात.तिने तिच्या प्रवासाची सुरुवात ऑफिस मधल्या सहकाऱ्यांच्या स्वयंपाकघरापासून केली आणि नंतर त्यांच्या मित्रांच्या घरी,मग मित्रांच्या मित्रांकडे सुद्धा गेली. 

   Nao Saito ने अतिशय सुंदर साधे आणि सोप्पी रेखाटने केली आहेत.त्यात स्वयंपाक घरातली भांडी,नारळ,भाज्या, झेंडूची फुलं आहेत.विळी (arivalmannai ),पाटा-वरवंटा( Ammi) यांचीही रेखाटने आहेत.ती त्याबद्दल जे सांगते त्यामुळे आपलं स्वयंपाक घराकडे नीट लक्ष जातं. ती आर्किटेक्ट असल्याने तिने ज्या ज्या स्वयंपाक घरांना भेटी दिल्या त्यांचा  फ्लोअर प्लान काढला आहे.कधी कधी तिला स्वयंपाक घरातले सिंक सहज हात पोहचेल असे लावलेले नाही हे ही दिसते.त्याचीही ती नोंद घेते.

    तिने जवळ जवळ २२ स्वयंपाकघरांना भेटी दिल्या. सुरुवातीला तिच्या स्वतःच्या इथल्या स्वयंपाक घरातली शेगडी पेटवतांना काय मजा झाली हे ही ती सांगते, “मी  गॅस चालू केला पण शेगडी पेटलीच नाही.” तिच्यासाठी लायटर ही संकल्पना नवीन होती/अनोळखी होती.या पुस्तकाची कल्पना या तिच्या  स्वयंपाक घरात असणाऱ्या विविध प्रकारचे मसाले आणि कडधान्य यामुळे तिच्या मनात आली. तिने पारंपारिक स्वयंपाक घरांना भेटी दिल्या, तसेच फक्त मुली वापरत असणारे,अविवाहित मुलगे वापरत असणारे स्वयंपाक घरांना सुद्धा तिने भेट दिली.चेट्टीनाड स्वयंपाक घर,शाळेचे स्वयंपाक घर,त्सुनामी मुळे बाधित झालेल्यांची,वीज नसलेली स्वयंपाक घरेही तिने अनुभवली.या सगळ्या दक्षिण भारतीय स्वयंपाक घरातली विविधता बघून तिला खूप आश्चर्य वाटले.

   आपण आपल्या स्वयंपाक घराकडे ज्या दृष्टीने बघतो त्या दृष्टीने ती बघत नाही. तिला आपलं स्वयंपाक घर कसं बाहेर ओट्या पर्यंत विस्तारत जातं हे बघतांना अनुभवतांना फार छान वाटतं.आपण घराच्या बाहेर काही वाळायला ठेवतो,समोरच्या नळा वरून कोणी पाणी आणतं,शेजारी आज काय भाजी केली हे सहज विचारतात.याला ती विस्तारणे म्हणते.एखाद्या परक्या माणसांकडून ही दृष्टी घेतांना मला आपण अजून उदार व्हायला हवं हे पटलं.तिने सहजपणे एक आपल्यात आणि तिच्या साकव उभं केलं.तरीही ती या पुस्तकात कुठेही दिसत नाही.तिने अनेक पदार्थ चाखून पाहिले आणि ते कसे करायचे हे सुद्धा सांगितले.तसेच आधुनिक स्वयंपाक घरात कसे शोर्ट कट असतात आणि तरीही पदार्थ कसा चांगला होतो हे ही ती सांगते.या सगळ्या वर्णनात काही घरात पुरुष सुद्धा स्वयंपाक करतांना आढळतात आणि ते सहजरित्या आपल्या स्वयंपाक घरात वावरतात याचेही वर्णन ती करते.

  फक्त या पुस्तकात एकच गोष्ट मला फार गंमतीची वाटली,लेखिका ज्यांच्या बद्दल लिहते आहे त्यांच्या नावाचे फक्त आद्याक्षर ती घेते.जसे की निर्मला नाव असेल तर ती ‘नी’ म्हणते.हे सुरुवातीला आपल्याला डाचतं.पण तिच्या दृष्टीने ती त्यांचा खाजगीपण जपत असते.आपल्याला एखाद्याचे नाव घेवून लिहण्याची सर्रास सवय असते.

  लेखिकेने फक्त तामिळनाडू मधल्या स्वयंपाक घराबद्दल लिहले आहे. पण तिने वेगवेगळ्या जाती-धर्मातील लोकांच्या स्वयंपाक घरांना भेटी दिल्या.खरंतर एखाद्याच्या स्वयंपाक घरापर्यंत पोहचणे ही खूप अवघड गोष्ट आहे. पण तिने अनेकांशी स्वतःहून मैत्री केली आणि ती काही पदार्थ करायला शिकली.काहीवेळेस तिला घरची आठवण येत असे अशावेळी ती तिच्या जपानच्या घरातले आणि आपल्या इथल्या स्वयंपाक घरातले साम्य बघत असे. स्वयंपाक घरात नेहमी काही शिजवले जातेच असं नाही पण एकमेंकाशी घट्ट नातं निर्माण करणारी ती छान जागा आहे असे तिला वाटते.ती जागा तुमची तुम्हीच निर्माण करू शकतात असे ती म्हणते.

   या पुस्तकात दिलेले पदार्थ हे नेहमीचे असले तरी त्यामागची गोष्ट फार सुंदर आहे.प्रत्येकाचे मोजमाप करण्याची पद्धत ती सांगते.भाजी चिरण्याची पद्धतीचे वर्णन करते.एखाद्या नवीन ठिकाणी जाऊन एखाद्या साध्या विषयाचा अभ्यास करतांना कितीतरी गोष्टी विचारात घ्याव्या लागतात आणि त्या कश्या घ्यायच्या हे यापुस्तकातून आपल्याला नक्की कळते. आपण हाताने कसे खातो,शिक्षिका तिच्या वर्गातल्या लहान मुलांना भरवते,सणाच्या दिवशी लोक एकमेकांना मदत करत कसे पदार्थ करतात,हे सगळं ती अचंबित होऊन बघते. आपलीही दृष्टी  तिच्या नजरेने  या सगळ्याकडे बघतांना बदलत जाते. आता कोणाच्या घरी गेलो की त्या घराचे वेगळेपण आपण सहज टिपू शकू हे नक्की.  

 


Friday, February 19, 2021

 

ओढ गावाकडची – १३ एप्रिल-२००७ लोकसत्ता

‘गावाकडची ओढ’ असं कुणी म्हटलं की फार हसू यायचं, वाटायचं उगीच मनाचे चाळे  आहेत, बाकी काही नाही.पण नंतर त्याच अवस्थेचा मलाही अनुभव येवू लागला.म्हणजे अगदी रुढार्थाने नाही म्हणता येणार.कारण बऱ्याच जणांना आपलं बालपण ज्या गावात गेलं किंवा पूर्वज ज्या गावात राहत होते, त्या गावाची विलक्षण ओढ वाटतं. तसं काही माझ्या बाबतीत होत नव्हतं.

     एखाद्या गावात आपण किती दिवस राहतो, याला माझ्या दृष्टीने फारसे महत्व नाही. तिथं आपण राहतो, दैनंदिन जीवनात समरसून जातो आणि तिथलेच होऊन जातो.तिथं अनुभवलेली सकाळ, सुपर, संध्याकाळ,दिवस-रात्रीतील कोणतीही वेळ..आता मी नसतांना तिथं काय चालू असेल? गावात प्रवेश करतांना प्रथम ज्या झाडांवर दृष्टी गेली ती झाडं माझ्याशिवाय कशी जगत असतील? अशा नॉस्टलॉजिक मूडमध्ये परत त्या गावी जावं असं फार वाटतं.ती वेळ, ते क्षण परत हवेहवेसे वाटतात.

  गावात जाणाऱ्या वळणावळणाच्या वाटा,जंगलात दूरवर जाणाऱ्या लहानखुऱ्या लाल पाऊलवाट,उन्हाळ्यात पानांचा होणारा करकर आवाज,पानगळीचे वृक्ष,फुललेला पळस,लांबवरून पाणी घेवून येणाऱ्या बायका,अंगावर धडकं नाही म्हणून लपून बसणाऱ्या तरुण पोरी...या सगळ्यांसाठी मी तिथं जायलाच हवं का? याचं कारण जाहीरपणे सांगता येणार आहे? खरं तर मनालाही ते समजावून सांगता याचं नाही.

    एखाद्या गावात अनेक गोष्टीची कमतरता असते. बरेचजण त्याची लांबलचक यादीही करतात. पाणी चांगलं नाही,शिक्षणाच्या सोयी नाहीत वगैरे वगैरे...पण गाव म्हटलं की असं होणारच. त्यात दुःख करण्यासारखं, उदास वाटण्यासारखं काय आहे? त्याशिवायही माणसांना त्या गावात राहता येतंच की!

   निश्चिंत असं एखादं गाव आपलं असतं,असं मला मनापासून अजिबात पटत नाही.वेगवेगळ्या गावात फिरतांना ती गावं मला माझीच वाटतात.मग माझं गाव कोणतं?कशाची ओढ?प्रत्येक गावात मला ती थोडी थोडी सापडते आणि ते गाव मला माझंच वाटतं.

    काय मिळवत असतो आपण एखाद्याला त्याचं गाव विचारून, जे तो मागे ठेवून आलेला असतो. त्याला त्या गावच्या सर्वच आठवणी हव्या वाटत असतील का? कितीतरी नकोशा वाटणाऱ्या आठवणीही त्या गावाशी जोडल्या गेल्या असतील. ते संदर्भ पुसण्यासाठी कितीतरी पल्ला ती व्यक्ती शरीराने आणि मनानेही पार करते. तरीही आपल्याला त्याच्या पार्श्वभूमीवरचं गाव मात्र हवं असतं. असं का होतं? काय असतं तिथं त्याचं?

     त्या व्यक्तीने जोडलेल्या छोट्या छोट्या गावांनी,त्यातील छोट्या छोट्या प्रसंगांनी,त्यांनं त्यःच्म जीवन समृद्ध केलेलं असतं. त्याची कृतज्ञतापूर्वक जाणीव ठेवून व्यक्ती  पुढची पाउलं टाकते. आपण मात्र त्या व्यक्तीला चौकटीत बांधायला पाहतो.ती या गावातून , राज्यातून आली म्हणजे ही ही वैशिष्ट्ये तिच्याकडे असणारच असं आपल्याला वाटतं.म्हणून वाटतं आपण आपल्यासारखं असण्याची ओढ असली की एखाद्या गावाने असा काय फरक पडणार आहे?

  ...शिक्षण,नोकरी बदलीच्या निमित्ताने कितीतरी गावं पाहिली.आधीचं गाव सोडतांना मन उदास व्हायचं,पण नव्या गावाची ओढही लागलेली असायची.नव्या गावात रुळेपर्यंत, माणसं ओळखीची होईपर्यंत जुनं गाव आठवत राहतं. नंतर हळूहळू नवं गावच आपलं होऊन जातं.










 

 

गौरीचं झाड -४ मार्च २००७,लोकसत्ता

 ‘मावशी, दोन दिवस  आला नाहीत? बरं नव्हतं का? मी आमच्याकडे काम करणाऱ्या बाईंना विचारलं. त्यांचा चेहरा आधीच खूप सुकला होता. मनामध्ये चिंतेचे ढग कधीचेच जमा झाले होते. फक्त कोणी हात लावायचा अवकाश, लगेच ते बरसायला लागले.

‘काय झालं? नीट सांगा बरं, रडू नका’

माझी केविलवाणी धडपड.

‘माझ्या भाच्चीनं औषध घेल्म आणि ती गेली’ मावशी रडतच म्हणाल्या.

‘गेली’ अहो, दोन महिन्यांपूर्वीच तर लग्न झालं ना तिचं,मग? माझ्या या प्रश्नाला आणि त्यानंतर त्यांच्या येणाऱ्या उत्तराला खरंतर काहीच अर्थ नव्हता.आम्ही या आदिवासी भागात राह्यला आल्यापासून अशा ‘औष’ घेऊन आत्महत्या करण्याचे प्रकार खूप ऐकले होते. तरुण मुला-मुलींचा  त्यात अधिक भरणा होता. खरंतर ही सर्व आदिवासी मंडळी दवाखाना,औषधाचं दुकान यापासून शंभर हात दूरच राहण्याचा प्रयत्न करणारी.मग ते हे ‘मरायचं औषध कुठून मिळवतात?चौकशी केली तर कळलं.ते औषध म्हणजे एक प्रकारचं झाड असतं. त्याचं नाव ‘गौरीचं झाड!’

‘गौरीचं झाड’ हे लांब जंगलात वाढतं. पावसाळ्याच्या मध्यावर त्याची रोपं फोफावतात.गणपतीबरोबर गौरी आल्या की गावातील आदिवासी मंडळी वाजतगाजत जंगलात जातात आणि गौरीचं झाड मुळासकट घेवून येतात. त्याला कळ्याही आलेल्या असतात. या झाडाला केशरी रंगाची तजेलदार फुलं येतात. हे झाड घरी आणून पितळी भांड्यात,नाहीतर मातीच्या मडक्यात ठेवायचं.त्याला विविध प्रकारे सजवायचं. पानाफुलांची तोरणं बांधायची, रूढीनुसार पूजा करायची, तांदळ्याच्या पिठीचे गोड पदार्थ करून नैवेद्य दाखवायचा. असं सगळं या झाडाचं कौतुक करून त्याची ‘गौरी’म्हणून पूजा केली जाते. म्हणून ते ‘गौरीचं झाड’. दुसऱ्या दिवशी रात्री अंगणात वाद्यांच्या तालावर नाच करायचा आणि सकाळी ते झाड आपापल्या शेतात, नाहीतर घराच्या मागे आशीर्वादासाठी लावून द्यायचं.

   या झाडामुळे जितका आनंद मिळतो तितकंच दुःखही!....गौइक्य झाडाची मूळं विषारी असतात. जगणं नकोसं झालं, तर जंगलात जाऊन गौरीचं झाड शोधायचं आणि आपल्या आयुष्याला तिलांजली द्यायची. इथे हे सर्रास चालतं.नंतर जंगलाच्या वाटेवर पडलेला मृतदेह कोणीतरी पाहतं.मृतदेहावर गावकरी अंत्यसंस्कार करतात.पोलिसांकडे तक्रार नाही की पंचनामा नाही. या आत्महत्येची नोंद कुठेही होत नाही. तो केवळ एक अपघात असतो. कारण या विषारी औषधाची कुठे नोंदच नसते. वयाने मोठ्या असणाऱ्या मुलाशी लग्न लावून दिले म्हणून,वेगळी झोपडी नाही म्हणून, दुसराच यार आवडला म्हणून, सावकाराचे कर्ज फेडता आले नाही म्हणून.... अशा कितीतरी कार्न्न्णाई ही तरुण मुलंमुली,प्रौढ माणसं आत्महत्या करतात. एकत्र इतकं कष्टाचं जीवन ते जगत असतात की,आपण त्यांच्या दुःखाची कल्पनाच करू शकत नाही. कितीतरी पाड्यांवर वीज,पाणी,वाहन, गिरणी यांची काहीच सोय नसते. सावकारापासून वाचवलेल्या तांदळाची दोन्ही वेळेला ‘आमली’ करायची आणि खायची.पुन्हा गरज लागली की त्यातच सावकारापुढे हात पसरायचा.त्यःची कर्जफेड करतच जगायचं. तेही अशक्य झालं की जीव संपवायचा.विदर्भ,मराठवाड्यातले शेतकरी आत्महत्या करू लागल्यावर त्यांच्या प्रश्नांकडे सरकार लक्ष द्यायला लागलं.आदिवासीच्या मरण्याची आणि त्यांच्या जिवंतपणीच्या  मरणासन्न जगण्याची दखल कोण आणि कधी घेणार?तोपर्यंत ‘गौरीचं झाड’ जवळ करण्यावाचून त्यांना पर्याय नाही. 

   


 

 

अवघाचि संसार -१३ ऑक्टोबर २००६

पहाट रोजच होते,पण प्रत्येक वेळी नवीन नवीन गोष्टी दाखवून देते. आजही भल्या पहाटे उघ्ले.तोंडावर गार पाण्याचा हबका मारला. बरं वाटलं. लक्षात आलं की, आज बाहेर नेहमीच्या आवाजांबरोबरच दुसराच एक मंजुळ आवाज येतो आहे. कोणाच बरं आहा आवाज? पक्ष्यांचा? छे, घनतेचा वाटतो आहे. बैलाच्या गळ्यात अडकवलेल्या घनतेचा मंजुळ आवाज होता तो. खरं तर आमचं घर गावाबाहेर,महामार्गाच्या शेजारी. त्यामुळे गावात सहजपणे ऐकू येणारे आवाज कधीमधीच ऐकू येतात. घाई घाईने पायऱ्या उतरून अंगणात आले, तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक बैलगाड्या एकामागोमाग उभ्या होत्या. ऊसतोडणी मजूर मोठ्या संख्येने कारखान्याकडे निघाले होते. रस्त्यात एक एक दिवस विसावा घेत आणि बैलांना विसावा देत ही मंडळी गाव सोडून चालली होती. महामार्ग खरोखरच जिवंत झाला होता. प्रत्येक बैलगाडीत तीन-चारजण होते. काहींमध्ये नवरा-बायको,मुलं असं सगळं कुटुंबच होतं. एवढ्याशा छोट्या गाडीत त्यांच्यासह त्यांचा संसार मावत होता.माझ्यासाठी हे जरा नवलाचच होतं. एक हंडा,पातेलं, ताट कं परात,बाज, सायकल, गोधडी. बास. एवढंच सामान त्यांच्याजवळ होतं. ज्या ठिकाणी थांबायचं, तिथं तीन दगडांची चूल करून ते स्वयंपाक करतात. बायका चूल पेटवतात. तोपर्यंत पुरुष पाणी आणायला धावतात. हे त्यांचं नेहमीचं ठिकाण असावं. कारण कोणालाही न विचारता ते पाण्याच्या टाकीजवळ गेले आणि त्यांनी पाणी भरून आणलं. ज्या गाडीबरोबर फक्त पुरुषच होते, ते स्वतःच भाकरी टाकत होते. छान,मोठ-मोठ्या गोलाकार भाकरी. आमच्या घरापर्यंत भाकरी भाजल्याचा खरपूस वास येत होता. मूलं हुंदडत होती. शाळा,अभ्यास या कटकटीतून सुटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. आता पुढचे काही महिने आई-वडीलांसमवेत मजुरीच्या कामातच जाणार. तरीपण त्यांनी शिक्षण घ्यायलाच हवं, असं मनात वाटत होतं.मी त्यांचे रोजचे व्यवहार बघत होते. त्यांच्या हालचालीतली सहजता, मुलांचा रस्त्यावरचा वावर निर्भयपणे होत होता. अज्ञानात सुख असतं का?

‘वहिनी, माणसं पाणी भरत्यात बघा’ दुधवाला म्हणाला. ‘तुम्ही नळ झाकून टाका म्हणजे येणार नाहीत कोणी...’ त्याने सल्ला दिला.

‘भरू द्यात,टाकी खाली होणार नाही एवढ्याने....’मला पाणी, चोरी,भांडी,लबाडी यातलं काहीच दिसत नव्हतं. फक्त पलीकडच्या रस्त्यावरचा निखळ संसार दिसत होता.अनेक अडचणीतून चालणारा.....

 


 

बगळ्याचं घर -२३ सप्टेंबर २००६

 ग्रीष्मात येणाऱ्या मोगऱ्याच्या सुगंधाने माणूस कितीही उल्हासित झाला, तरी त्याला वर्षा ऋतूत येणाऱ्या मृद्गंधाची ओढ असतेच नाही का? यात काही चाकोरीबद्धता आहे, असे आपल्याला कधीच वाटत नाही किंवा मुद्दामहून त्यातील सौंदर्य शोधण्याचा आपण प्रयत्न करतो असेही नाही. कशाचीही तुलना न करता आपण तो मृद्गंध स्वतःत  सामावून घेत असतो. या वर्षी मात्र मी या दोन्ही सुगंधाबरोबर एका दुर्गंधीची वाट पाहत होते. ग्रीष्म संपण्यापूर्वी बगळे परत आपापल्या झाडांकडे परत यायला लागतात. वर्षभर तलावाकाठी,शेतात राहणारे बगळे पावसापासून सरंक्षण  मिळावे म्हणून दाट झाडांच्या छायेत परत येतांना दिसतात. बारीक बारीक काटक्या जमवून पसरट टोपलीसारखे घरटं बनविण्याचं त्यांचं काम सुरु होतं. हिरव्या पाना-पानांमध्ये पांढऱ्या शुभ्र बगळ्यांची हालचाल दिसायला लागते. साळूक्यांना वर्षभर वापरलेलं ते झाड सोडून द्यावं लागतं. त्या भरपूर आरडाओरडा करतात.पण बगळे ढिम्म. अजिबातच हलत नाहीत. दिवसागणिक बगळ्यांचा कलकलाट वाढत जातो.त्यांचा विणीचा हंगाम सुरु झालेला असतो. न उडता येणारी काही लहान पिल्लही दिसतात. म्हणजे आधीच क्ध्त्री ते अंडी घालत असावेत. कधी कधी मारामारीत एखादं अंडं खाली पडतं, तर कधी बगळ्याचं पिल्लू. एकदा पडलं की जिवंत राहत नाही. पहाटे माणसांना जाग येनाय्च्या आधी हे बगळे खाली उतरून भरपूर नाष्टा करतांना दिसतात. दिवसभर झाडावर बसूनही काहीबाही खात असावेत. कारण सगळं अंगण ते रात्रीतून पांढरं करून टाकतात. त्याची खूप घाण येते. मनून आजूबाजूचे लोक त्यांना जोरजोरात हाकलून लावण्याचा प्रयत्न करतात. कोणी फटाके वाजवतात. बगळे क्षणभर उडून जातात आणि परत झाडावर येऊन बसतात.कधी कधी पाथरवटाची पोरं एखादा बला खाली पाडतात आणि भाजून खातात.पण हे क्वचितच. मुसळधार पाउस पडत असतो. सोसाट्याचा वारा वाहत असतो. अशा वेळी झाड तुटून पडेल की काय, याची भीती वाटते.पण बगळे ते झाड सोडून जातांना दिसत नाहीत. बांधलेल्या घरट्याला पानांच्या आड ते घट्ट पकडून बसतात. ओलेचिंब होतात, तरीही माणसांनी बांधलेल्या घराच्या आडोशाला ते येत नाहीत. नवल वाटतं ते त्यांच्या चिवटपणाचं... हळूहळू पाऊस ओसरतो. वाराही हळुवारपणे यायला लागतो. बगळ्यांची पिल्लं केवढी झाली हे मात्र आपल्याला समजत नाही.पण ती नक्कीच वाढली असणार. कारण कलकलाट वाढलेला असतो. शिकाऊ उमेदवार आजूबाजूला दिसतात. झाडाच्या खाली कुत्री जमायला लागतात. त्यावरून वर पिल्लं आहेत हे कळतं.पाऊस थांबल्यावर बगळे आपल्या रस्त्याने परत जायला निघतात. शेतात पेरणी सुरु झालेली असते. काही झाडांना मोहर आलेला असतो.पिवळ्या चोची आता त्यावर तुटून पडतील.नाही तर तलावातील मासे खातील. माहित नाही.पण ते जातात. मागे उरतात फक्त त्यांनी बांधलेली रिकामी घरटी. 




 


ही सगळी चित्रं काढतांना मनात सावित्री बाई होत्या.सतत मनात ही ओळ मी म्हणत होते, "माझी माय सावित्री" याच्या पुढच्या वेळी मला सुचत नव्हत्या.पण त्यांना आठवत मी ही सगळी चित्रं काढली .मनाच्या आत सतत शिकण्याचा ध्यास आम्ही स्त्रियांनी त्यांच्याकडूनच घ्यायला हवा.कितीही वाईट परिस्थिती आली तरी आपण शिकत राह्यला हवं.पुस्तकांच्या सहवासात राहायला हवं.

Wednesday, February 17, 2021

 #वाचावेजनाचेलिहावेमनाचे २५  

 - भ यंकरसुं दरम राठी भाषा – ददि.पुंडे

भयंकर सुंदर मराठी भाषा -द.दि.पुंडे

      हे पुस्तक वाचल्यापासून यातील काही गोष्टी अजिबात पाठ सोडत नाही. अगदी हलक्याफुलक्या शैलीत लेखक आपल्याला मराठी भाषेतले वैभव दाखवतो.त्याच बरोबर आपल्या चुका गंमतीच्या स्वरुपात दाखवून डोळे उघडतो.त्यातला एक उतारा तर मला फार आवडतो.

  “रामायणा आहे नं, त्याची गोष्टा.इश्वाकू नावाचे कुला म्हणजे फॅमिली असते.तिच्या दशरथा नावाचा राजा होऊन गेला. त्याला तीन राण्या अन चार पुत्रा होते. त्यांची नावे नं रामा,लक्ष्मणा,भरता आणि शत्रुघ्ना अशी होती. जनक नावाचा राजा होता.......”

 हे वाचलं तेव्हा मला फार मजा वाटली आणि त्याच बरोबर हे ही लक्षात आलं की,आज अनेक घरात मराठीतले अकारान्त शब्द आकारान्त उच्चारले जावू लागले  आहेत.त्यावरच हा लेख लिहलेला आहे. बघा ना आज आपल्या सगळ्यांच्या घरात सकाळी अनेकजण योगा करतात.अशा अनेक गंमतीजंमती दाखवत लेखक आपल्याला जागं करत आहे.आपण मराठी भाषेबद्दलचे प्रेम अगदी गळा काढून,झेंडे नाचवून व्यक्त करत असतो.पण बोलतांना आणि लिहतांना, आपल्या काही चुका होतात त्या दुरुस्त करायला हव्या हे मात्र आपल्या लक्षात येत नाही.

   या पुस्तकात ४१ लेख आहेत. त्यांची शिर्षकं पाहिली तरी आपल्याला त्यातली गंमत कळते.उदा. उच्चार मन साहीना, “च.म.ठे.के.सा.न.”, दोन काके-दोन चुलता. लेखांच्या नावावरूनच पुस्तक वाचावं असं वाटतं.कारण भाषा ही गंभीर गोष्ट आहे पण ती गंमत –गोष्ट देखील असते.हे आपल्याला पुस्तक वाचतांना जाणवते. लेखक एका लेखात सांगतो  की,प्रत्येक शब्दाचे एक अर्थ क्षेत्र असते.उदा.घोडा,अश्व,तुरंग,हय ही सगळे शब्द घोड्याला समानार्थी आहेत पण त्यांचा उपयोग करतांना मात्र लक्षपूर्वक करावा लागतो.घोड नवरी म्हणतांना, त्या घोडच्या जागी अश्व वापरून चालणार नाही.लेखक अशा अनेक गोष्टी सहजपणे आपल्या लक्षात आणून देतो,त्यामुळे पुस्तक वाचतांना मजा येते.  मराठी भाषेबरोबरच ती बोलणाऱ्या महाराष्ट्र-समाजाच्याही अनेक तऱ्हेवाईक सवयी,लकबी आणि कथा कहाण्या आपण या पुस्तकात वाचू शकतो.मग आपल्याला कळते की मराठी भाषा ही किती भयंकर सुंदर भाषा आहे की सुंदर आणि गोड आहे.

  लेखकाने आपल्या समाजातल्या लग्नपत्रिकांचे स्वरूप कसे बदलत गेले आहे आणि त्यानुसार आपला सामाजिक इतिहास कसा समजून घेवू शकतो हे ही खूप छान लिहले आहे.याशिवाय एकाक्षरी कोश करणारे प्रा.गोरे यांच्याबद्दल त्यांनी लिहले आहे.यातील अनेक गोष्टी माहीत नसतात आपल्याला. आपण विचार करतो की,असे एकाक्षरी शब्द किती असणार?पण जवळ जवळ ६९ पाने एकाक्षरी शब्दांनी व्यापली आहेत.जसे एका शब्दाला अनेक अर्थ असतात तसेच एकाक्षरी शब्दाला सुद्धा अनेक अर्थ आहे. उदा. ‘न’ या अक्षराचे दहा प्रकारचे अर्थ या कोशात दिले आहे.खरं तर आपले कोश म्हणजे आपली भाषा विकसित करण्याचे एक माध्यम आहे.पण आपण त्यांच्याकडे अजिबात लक्ष देत नाही.तसेच आपल्या इथं प्रत्येक नात्याला एक शब्द आहे.त्याबद्दलही आपण किती समृद्ध आहोत हे आपण रोज अनुभवत असतो तरी आपल्या लक्षात येत नाही.

    भाषा ही संवादासाठी असते,एकमेकातले सबंध सौजन्याचे व्हावेत म्हणून तिचा जन्म झाला आहे.पण आपण भाषेवरून एकमेकांशी मारामाऱ्या करतो. राजकारणी प्रश्नाची दिशाभूल करण्यासाठी भाषेला आणि आपल्याला सुद्धा वेठीला धरतात आणि त्यासाठी भाषेचा चुकीचा वापर करतात. आपण आपली भाषा सुधारण्यासाठी काय करतो हे बघणं आणि त्यानुसार स्वतः स्वतःसाठी कृती करणं महत्वाचं आहे.कारण तुम्ही मराठी बोललं पाहिजे असं म्हणतांना आपली मुलं कुठल्या शाळेत जातात आणि ती घरात आईला वडिलांना काय हाक मारतात हे ही डोळे आणि कान उघडे ठेवून बघायला आणि ऐकायला हवं.

   हे पुस्तक वाचतांना मला स्वतःला अनेक गोष्टी समजल्या. बोलतांना आपण काय चुका करतो, त्या चुका आहे हे ही आपल्याला कळत नाही.जसे की ‘चप्पल घाल पायात आणि निघ’ आपण चपलेत पाय घालतो खरं तर.पण बोलतांना असे बोलतो.

         पुस्तकात समाविष्ट केलेल्या प्रत्येक सदराविषयी काहीतरी सांगावं असं मला वाटत होतं.पण तुमची वाचण्याची गंमत निघून जाईल आणि मी काय काय तुम्हांला सांगावं असं म्हणत असतांना सगळंच सांगून बसेन.त्यामुळे भाषेच्या अनेक गंमतीजंमती वाचण्यासाठी पुस्तक मुळातूनच वाचायला हवं.

     या पुस्तकातले सर्व लेख ‘भाषा-वेध’ या सदरामध्ये प्रकाशित झालेले आहेत.  २००२ मध्ये लोकसत्तामध्ये हे सदर प्रकाशित होत असे. त्यावेळी हे लेख सलग वाचले नव्हते.पण पुस्तकामुळे ते नीट सलग वाचता आले आणि त्यातला अर्थ नीट समजून घेता आला.