शेतीविषयी प्रश्नांचे सत्य समजून सांगणारे पुस्तक
शेतकरी दिल्लीला,मुंबईला मोर्च्यासाठी निघाल्यावर,त्यांनी दूध,कांदे,टमाटे रस्त्यावर फेकले की त्याची बातमी होते,मग त्यावर महाचर्चा होते.तेव्हाच कुठे जनतेच्या ध्यानी शेतकऱ्यांचे प्रश्न येतात. तोपर्यंत ते आपापल्या घरी महाजेवणे घेत असतात,देत असतात.शिवाय रस्त्यावर फेकलेले अन्नधान्य पाहिले की सगळ्यांनाच वाटत राहते की “हे अशी नासाडी करतात म्हणूनच त्यांना पुरेसे पैसे मिळत नाही,शापच हो तो एक प्रकारचा” जेव्हा खायला काहीच राहणार नाही तेव्हा शेतकऱ्यांना मिळालेल्या शापात हेही येतील.हे फक्त बातम्या पाहणाऱ्यांच्या लक्षात येत नाही. तसेच जेव्हा शेतमालाला भाव मिळतो(तो कधी मिळतो हेच मला माहित नाही.)तेव्हा जनता त्याचा भाव करते आणि पाडून किंमत मागते.शिवाय शेतकरी माजले आहेत असे एकमेकांना सांगत सुटते.हे एवढे लिहण्याचे कारण म्हणजे “पोशिंद्याचे आख्यान एक प्रश्नोपनिषद” हे रमेश जाधव यांचे पुस्तक होय. मला स्वतःला शेतकरी,त्याने पिकवलेला माल,आणि त्यासोबत येणारे अनेक प्रश्न हे समजून घेणे फार फार जरुरीचे वाटते.कारण शेतकऱ्यांचा प्रश्न आपल्या सगळ्याच प्रश्नाचे मूळ आहे.हे आपल्याला लक्षात येते.ते हे पुस्तक वाचल्यावर.
‘ शेतीचा प्रश्न हा शेतकरी आणि त्यांचे कुटुंब, कर्जमाफी यापुरता मर्यादित नाही. तो राजकीय असून आपण शहरात असो की खेड्यात, शेतकरी असो की आयटीतले कामगार,प्रत्येकाच्या जीवनाशी तो संलग्न आहे. रमेश जाधव यांनी त्यांच्या “पोशिंद्याचे आख्यान ,एक प्रश्नोपनिषद” या पुस्तकात वरील मुद्दा वाचकांना समजावून सांगितला आहे. त्या त्या प्रसंगानुसार जरी हे लेख लिहलेले असले तरी त्यातून शेती संबधित आपले गैरसमज दूर होण्यास मदत होते.ते या पुस्तकात म्हणतात की, “ बिगर शेतकरी समाजाचा शेती प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन उदासीन आणि आत्मघातकी आहे. तर राजकीय व्यवस्था या प्रश्नाला साचेबद्ध प्रतिसाद देत असते.” पोशिंद्याचे आख्यान एक प्रश्नोपनिषद” हे रमेश जाधव यांचे पुस्तक होय.
या पुस्तकात गेल्या पाच वर्षातील शेतीप्रश्नांचे परखड वास्तव मांडण्यात आले आहे.यामध्ये शेतकऱ्यांसाठीच्या दुप्पट उत्पन्न,स्वामिनाथन आयोग,दीडपट हमीभाव,कर्जमाफी,दुष्काळ,दुधाचा प्रश्न,कृषी विकास दर यांसारख्या प्रमुख मुद्दयावर प्रकर्षाने भर देण्यात आला आहे. या मुद्द्यासंदर्भात निवडणुकीपूर्वीची आश्वासने आणि निवडून आल्यानंतर सरकारची प्रत्यक्ष कृतीतील तफावत तपासून पाहण्यात आली आहे.साधना,ॲग्रोवन,बोलभिडू,राईटअँगल्स येथे प्रकाशित झालेल्या लेखांचा हा संग्रह आहे.
शासनाच्या निर्णयामुळे अनेक क्षेत्रांचे शोषण होवू शकते आज त्यात शेतकरी प्रामुख्याने दिसतो आहे.याची जाणीव शेती उत्पादनावर जगणाऱ्या प्रत्येक समाजघटकाला व्हावी, शेतीच्या गंभीर प्रश्नांचे वास्तव लक्षात यावे. यासाठी लेखक रमेश जाधव यांच्या लेखांचा हा संग्रह आहे. आपण वर्तमानपत्रात ज्या बातम्या वाचतो त्यामागील सत्य सांगण्याचे काम हे पुस्तक करते. त्यामुळे आपण सगळ्यांनीच हे पुस्तक वाचायला हवे. असे मला वाटते.
No comments:
Post a Comment