सगळे जगच ग्राहक केंद्री झालेलं आहे. कारण हे जागतिकीकरण,उदारीकरण आणि खाजगीकरणाचे युग आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा विचार हा बाजारकेंद्री करण्याची सवय प्रत्येकाला लागली आहे. आपल्याकडे ग्राहक कसा आकर्षित होईल, त्यासाठी आपल्याला काय करावे लागले याचा विचार सतत अनेक क्षेत्रात केला जातो. असाच विचार साहित्याच्या क्षेत्रातही होतो असे लेखकाला वाटते. लेखक नारायण कुळकर्णी कवठेकर यांनी आपल्या “ऱ्हस्व आणि दीर्घ “ पुस्तकात साहित्याशी सबंधित अनेक विषयांवर लेखन केले आहे. या पुस्तकातले लेख दर पंधरवड्याला प्रसिद्ध झालेले आहेत. असे २६ लेख या पुस्तकात आहेत. लेखक म्हणतात की हे लेख लिहतांना “साहित्य-साहित्यिक, साहित्य क्षेत्र या क्षेत्रातील पर्यावरण आणि वातावरणनिर्मिती आणि निर्मितीप्रक्रिया,य क्षेत्रातील काही दिलासादायक व सुखावहवृत्ती आणि खटकणाऱ्या अपप्रवृत्ती यांचा परामर्श घ्यावा असे ठरवले होते.
मला अत्यंत आवडलेला लेख म्हणजे “आपुलाचि संवाद तुकोबाशी” हा होय. या लेखात लेखक तुकोबाला भेटतो आणि त्यांच्या भेटीत जे बोलणं झालं ते वाचकाला सांगतो. त्यातून वाचक जागा होईल असे लेखकाला वाटत्ते. एका ठिकाणी तुकाराम लेखकाला म्हणतात , ‘ अरे, आजकालच्या कवितेत नसलेला अर्थ शोधून काढणारे प्राध्यापक तुम्ही ... आणि मला विचारता की तुकारामा, तू संत असून काठी हाणतो? अरे मुढा मी कोणाचं डोकं फोडत नाही. ही काठी शब्दांची, विवेकाची, ज्ञानाची, विचारांची ...जिच्यामुळे डोक्याला झिणझिण्या येऊन जाग येईल.’ ज्या तुकोबांनी जातिभेद, पंथभेद असल्या भिंती मोडून काढल्या, त्यांच्यावर आपलाच केवळ मालकी हक्क आहे अशांना जणू लेखकाने तुकाराम समजून घेण्यास सांगितले आहे असे वाटते. विवेकाने, विचाराने वागण्यास सांगितले आहे. या लेखात आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांची दखल लेखकाने घेतली आहे. जात हे वास्तव आहे असे अनेकजण म्हणतात आणि त्यासाठी ते तुकारामाच्या ‘ बरं झालं देवा कुणबी ठेलो, नाही तर दंभे असतो मेलो ..’ या अभंगाचा दाखला देतात. त्यावेळी यालोकांना जाग करण्यासाठी म्हटलं आहे , ;नाश केला शब्द ज्ञान ...’ म्हणजे हा अभंग जातीविषयीच्या नाही, तर अहंकाराविषयीचा आहे. हा अहंकार वर्णाचा असतो, ज्ञानाचा असतो , संपत्तीचा असतो ... त्यातून दंभ निर्माण होतो ..शब्दाच्या मागंपुढं एक इतिहास असतो रे बाबा ..एक चरित्र असतं....विचारव्यूह असतो ...’ लेखकाने याठिकाणी आधुनिक विचार म्हणजे काय याची जाणीव आपल्याला करून दिली आहे.मनापासून हा लेख वाचला आणि तो आपल्याशी जोडून घेतला तर आपण जागं झाल्याशिवाय राहत नाही.
लेखक अजून एका गोष्टीविषयी आपल्याला जागृत करतो. ते जागृत करणे भाषेविषयी आहे. त्यांच्या “उर्दू ..मराठी ...भाषेचे दिवे” यामध्ये ते आपल्याशी भाषेविषयी बोलतात. कोणतीही भाषा ही एखाद्या धर्माची नसते .आपल्याकडे असा समज आहे की, उर्दू ही मुसलमानांची भाषा आहे. भाषा कोणाच्या मालकीची नसते हे आपण लक्षात घ्यायला हवे. उर्दू भाषेत आपण नेहमी राष्ट्र, राष्ट्रीय जीवन,सामाजिक एकता याबाबतीत वाचत असतो,किंबहुना तो या भाषेचा स्वभाव आहे.लेखक म्हणतो की उर्दूच्या भाषिक संस्कार आणि प्रभावाचे सूक्ष्म परिणाम मराठी कवितेवरही दिसतात.एवढेच नाहीतर उर्दू कविता समृद्ध करणाऱ्यामध्ये हिंदोस्तानी कवींचे योगदान मोठे आहे. यासाठी उर्दूमध्ये कविता लिहणाऱ्याची नावंच लेखकाने दिली आहेत. उर्दू ही सगळ्यांची भाषा आहे, ज्यांना त्यातून व्यक्त व्हावे वाटते त्यांनी त्यात व्यक्त जरूर व्हावे.हेच खरे.
या पुस्तकातला प्रत्येक लेख आपल्याला वेगळी दृष्टी देतो. त्यामुळे हे लेख कधीही आणि कोणत्याही पानापासून वाचले तरी त्याचा ताजेपणा आपल्याला बांधून ठेवतो.मस्त पुस्तक आहे हे.
37Suchita Ghorpade, Darshan Tonape and 35 others
No comments:
Post a Comment