Tuesday, November 10, 2020

   #वारी 



नीरा नदीला भरपूर पाणी होते. तिथे माउलींचे स्नान होणार होते. माउलींचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. लोणंद गावी. तिथे मार्केट यार्डात आम्ही उतरणार होतो. पाउस नव्हताच. लोणंद गाव मोठे होते. आम्ही रेल्वे स्टेशन जवळच्या मार्केट यार्डात गेलो. तिथे भरपूर दिंड्या उतरल्या होत्या. कोणत्या बाजूला गेलो म्हणजे आपले ठिकाण सापडेल हे आम्हांला कळत नव्हते.मग एका सावलीच्या जागी आम्ही बसलो आणि जेवून घेतले. त्याच ठिकाणी लातूर आणि बार्शीचे दोघे –तिघेजण बसले होते. मग गप्पा सुरु झाल्या. शेती,राजकारण, मुलांची लग्न.प्रत्येकजण आपापल्या परीने त्यावर उत्तरे शोधत होता. मार्ग काढत होता.पण निराशा, कंटाळा नव्हता.कुठे –कुठे पाउस पडला, पिकांचे कोणते बेणं वापरतात यावरच्या गोष्टीत मला फार रुची वाटत होती.ते संप्रदायातील भजनं नेहमी म्हणत.आमच्या दिंडीतील माणसे इकडून तिकडे जात होती. ज्या बाजूची माणसे परत आली नाही, त्या दिशेने आपण जाऊ या. असं आम्ही ठरवलं होतं. त्यामुळे आम्हांला आमचं ठिकाण सापडले. ती एक मोठी चाळ होती.चाळीच्या मालकाने झाडून ठेवली होती. आम्ही परत ज्याला लागेल तसं झाडून घेतले. आमची घोंगडी टाकून बसलो. मग कपडे वाळत घातले. नंतर चहा झाला. याच ठिकाणी वासुदेव आणि कडक लक्ष्मी असणाऱ्या लोकांची दिंडी उतरली होती. त्यांचे काही कार्यक्रम चालू होते. ते मी बघायला गेले. आमच्या दिंडीतील माउलींची ओळख होती. त्याही त्यांच्या बरोबर वासुदेंवाची गाणी म्हणत होत्या.नाचत होत्या. आम्ही नवशिक्षितांनी त्याच्या बरोबर पाय हलवले. नंतर आम्हांला फारच उत्साह आला.भरपूर नाचलो. मग हरिपाठासाठी मुक्कामाच्या जागी आलो.

लोणंदला आम्ही डॉ. शिवदे यांच्याकडे आंघोळी साठी गेलो. ते त्यांच्या छोट्या गावात रुग्णसेवेचे काम करतात. त्यांचे संपूर्ण कुटुंबच आम्हांला भेटले. प्रत्येकाचे काही ना काही वैशिष्ट होते, त्यानुसार सगळेचजण काम करत होते. त्यांनी मला हिरव्या चाफ्याच्या बिया दिल्या. बघा वारीत आपल्याला हवं ते मिळतं फक्त इच्छा चांगली पाहिजे. आम्ही मुक्कामाच्या जागी आलो तेव्हा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तीन लहान मुलं भजन म्हणण्यासाठी आली होती. अनेक वर्षे ही मुले येत आहेत. त्यांनी सगळ्यांना डोलायला आणि टाळ्या वाजवायला लावले. नंतर जेवण करून आम्ही तरडगावी जाण्यास निघालो. ते गाव जवळ होते आणि गावाच्या रस्त्यावर उभे रिंगण होते. त्यामुळे माउलींच्या पालखीसोबत आम्ही जायचे ठरवले.मध्ये मध्ये पाउस होता.आम्ही दिंडीचे नंबर रस्त्यावर उभे राहून पाहत होतो. सगळेजण शिस्त पाळत होते. प्रत्येकजण चार-पाचची रांग करून चालत होते. आम्ही आमच्या दिंडीत शिरलो.भजनांचा अवीट गोडवा होता. पालखी बरोबर झपाझप चालत होतो. रिंगणाची जागा आली, कितीतरी जण आधीच येवून बसले होते.दोन्ही बाजूला टाळकरी उभे राहिले.आम्ही त्यांच्या मागे उभे होतो. प्रत्येकाला माउलींचा घोडा काय करेल याची उत्सुकता होती.एक माउली पालखी रस्त्यावर रांगोळी काढत होती. खाली वाकून , इतकी पटपट त्या रांगोळी काढत होत्या,त्याचं मग्न होणं आम्ही बघत राहिलो.चोपदार त्याचा घोडा घेऊन परिस्थिती पाहून गेला आणि नंतर आला माउलींचा घोडा.वाऱ्याच्या वेगाने त्याने आपले मार्गक्रमण केले.आम्ही त्याचे येणेजाणे पाहत राहिलो. माउलींचा गजर आसमंतात झाला ,जणू सगळ्यांनी त्या घोड्यावर बसलेले ज्ञानेश्वर महाराज पाहिले.आणि आम्ही सगळेच धन्य झालो. याच साठी केला होता अट्टाहास.

  #वारी 


ज्ञानेश्वर माउलींचा पुढचा मुक्काम वाल्हे गावी होता.पण आमची दिंडी वाल्हेच्या पुढे निरा यागावी थांबणार होती.आज मी खूप आत्मविश्वासाने चालत होते. अनुभवाचा आत्मविश्वास होता तो. आता चालण्याची, आंघोळीची आणि कसलीच काळजी नाही. हरिनामाचा गजर करत आणि ऐकत आमची पाउलं पडत होती.कोणी शांतपणे म्हणत , तर कोणाचा आवाज तालासुरात येई. कोणाचा जीव काकुळतीला येत असे. भाव मात्र सगळीकडेच होता, कानाला आणि मनाला जाणवत होता. त्यांची तळमळ कळत होती आणि माझी? ती होती का? आहे का? एकीकडे असे प्रश्न पडत होते तर एकीकडे डोळ्यांना सारखा पाझर फुटत होता. अभंग म्हणतांना, नाम घेतांना सारखं भरून येत होतं. तो महोलाचा परिणाम की ?मी सोप्प उत्तर शोधलं . वाहत जायचं.संतमंडळींना ऐकायचं, पाहायचं आणि पाउलं पंढरीच्या दिशेने मजेत टाकायची.इथेना सर्वांना विठ्ठलाच्या भेटीची आस होती,पण म्हणून कसही करून तिथे पोहचायचे असा भाव मात्र कोणामध्येच आढळला नाही. प्रत्येक पाउलाला संतांना साक्षी ठेवत वारकरी अभंग म्हणत चालायचे. संताचा भाव मनात उतरवित. आम्हीही त्यात सहज मिसळून जात असू.

वाल्हेला माउलींची पालखी थांबली.वाल्ह्याला म्हणजे त्या रस्त्याने जातांना वाल्मिकी नावाचा डोंगर आहे. आमच्या बरोबर चालणारी माणसं त्याबद्दल बोलत होती.तिथे वाल्मिकी ऋषीची समाधी आहे असं म्हणतात.वाल्हे गाव लहानसं आहे. तिथे माउली मुक्काम करतात. ज्या ठिकाणी माउलींचा मुक्काम असतो त्या ठिकाणची जागा फुलांनी सुशोभित केलेली असते.गावात उत्सवाचे वातावरण असते. लोक नटूनथटून माउलींच्या दर्शनाला येतात.दर्शन झाल्याचे एक वेगळे समाधान घेवून लोक आपापल्या घरी जातात. पालखीची व्यवस्था गावातील लोक करतात तसेच संस्थान सुद्धा या गावांना काही पैसे देते.आम्ही वाल्ह्यातील गर्दी अनुभवत पुढे चालू लागलो.थोडा थोडा पाउस येत होता.पण तो फारसा भिजवत नव्हता. त्यामुळे त्याची काही अडचण वाटली नाही. जी मंडळी पुढे येणार होती ती टाळ वाजवत चालू लागली. त्यावेळी मला बार्शीच्या काही वारकरी महिला भेटल्या. त्याही काही वर्षांपासून वारीला येत आहेत.म्हणाल्या,’ मुलाचे लग्न झाले, आणि मी मोकळी झाले.किती दिवस संसार करायचा.आता बास म्हटलं.एवढं म्हणून त्या लगेच गवळण म्हणायला लागल्या,’ आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले ‘ पुढचे मला आता आठवत नाही. त्यांना नीरेपासून एक फाटा निघतो तेथिल त्यांच्या पाव्हण्याकडे जायचे होते.पटपट चालत होत्या आणि मलाही चालवत होत्या.माझ्याजवळची पिशवी बघून त्यातील एकजण मला म्हणाली, ओझं टाकून द्यायला आलीस ना? मग हे ओझं कशासाठी ?मी काहीच म्हटले नाही. त्यांचे हात रिकामे होते. त्यांच्या पाठीवर काहीच नव्हते.मी माझ्या बाटलीतील पाणी प्यायले .’ अग सगळीकडे चांगलंच पाणी असतं,भरवसा ठेवायचा.मी हो म्हटलं. ऐकायचं ठरवलं होतं ना?आम्ही गप्पा मारत निरेला पोहचलो. मध्ये वाटेत जांभळ खाल्ली.छान होती. तोंड कोरडं पडत नव्हतं.जांभळ्या जीभा घेवून आम्ही मुक्कामाचे ठिकाण शोधून काढले. मोठं पटांगण असणारी शाळा होती.शाळेला गेट होते.गेटच्या बाहेर भरपूर झाडी आणि शेती होती. आमची बाकी सोय तिथे असणार होती. शाळेने त्यांची toilets बंद करून ठेवली होती.आम्ही तिथेही लवकरच पोहचलो.मग जेवलो आणि झाडाखाली पडून राहिलो. पाणी आणायला गेले तेव्हा काही घरामध्ये मी विचारले की तुमच्याकडचे toilet वापरले तर चालेल का? खरं तर मला जायचे नव्हते पण असं विचारण्याचे धाडस मी करू शकते का हे मला पाहयचे होते. एक दोन घरात विचारतांना मला खूप संकोच वाटत होता.पण मी स्वतः वर मात केले आणि बिनधास्त विचारले.स्वतःच स्वतःशी केलेली गंमत .

   #वारी 


ज्ञानोबा माउली तुकाराम , तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माउली तुकाराम, असे भजन कानावर पडले आणि आम्ही त्या दिंडी बरोबर चालू लागलो. भजन म्हणत म्हणत आपण किती चाललो हे खरेच कळत नाही. आजूबाजूला चालणारी माणसे आपापल्या तालात आणि नादात चालत असतात. कोणीही कोणाच्याही सुरात सूर मिसळू शकत होता.आपण त्यांच्या बरोबर म्हणू लागलो आणि त्यांना ते कळले तर आपल्याकडे हसून बघत आणि परत म्हणायला सुरुवात करत. कधी भजन थांबले तर विचारत कुठले ?कुठून दिंडीत आले वगैरे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद , सुख आपल्या शरीरावर कधी पसरत जातो हे खरेच आपापल्याला कळत नाही.दोन तास सलग चालल्या नंतर आम्ही एका बस stop वर नाष्ट्या साठी थांबलो. तेव्हा दुरून बघतांना तर आमचंच आम्हांला आश्चर्य वाटत होते की , इतक्या लोकांमध्ये कोणताही धक्का न लागता आपण चालत होतो? त्यावेळी आम्हांला वसईच्या कोळीणी एकसारख्या साड्या नेसून जात असतांना दिसल्या. प्रत्येकीच्या केसात एक एक फुल होते.मस्त पैकी भजन करत त्या चालल्या होत्या. नंतर इस्कान टेम्पल च्या काही महिला एकसारख्या साड्या नेसून जात होत्या. सगळ्या वारकऱ्यांचा ड्रेस पांढरा पायजमा आणि कुडता आणि टोपी , हातात टाळ आणि मुखात संताचे अभंग.

खरंतर इतकी माणसे आणि त्यावर कोणत्याही मनुष्य प्राण्याचे नियंत्रण नाही तेव्हा गोंधळ, भांडणे,काही विकृत गोष्टी होणं हे अगदी आजच्या काळाचा विचार करता सहज आहे, ते घडणे वाईटच आहे.पण तिथे असं काही आढळलं नाही.कोणी तुम्हांला मुद्दाम धक्का देत आहे,हात लावत आहे. खरच असं काही झालं नाही.ही माणसं ही आपण नेहमी रहातो त्या समाजातूनच आली होती.पण ती पांडूरंगा शिवाय काहीच पहात नव्हती. मग तुम्हांला वाटेल की देवाला जात आहे म्हणजे वातावरण एकदम गंभीर असेल ,तर तसेही नाही. आनंदात हसून , एकमेकांच्या चुका पदरात घेऊन ते अभंग म्हणत. मस्त सूर लावत, लागला नाही तर मागचा सूर पकडून पुढे म्हणे.दुपारची माउलींची विश्रांती झाली की मग गवळणी सुरु होत. तेव्हा तर उत्साह ओसंडून जात असे. त्यांच्या डोक्यावरच्या पिशव्यांसह ते नाचत, गात.कमालीची उर्जा त्यांच्याकडे होती.हळूहळू ती आपल्यात कधी येत असे कळत नव्हते.पण खूप मजा आली.
आम्ही जेजुरीला १२.३० पर्यंत पोहचलो.जेजुरी एकदम स्वच्छ होते.आमच्या मुक्कामाकडे जात असतांनाच मोबाईल toilet दिसले.जवळच पाण्याचे tanckerउभे होते. स्वच्छतेसाठी दोन माणसं होती. हुश्श! झालं मला. आम्ही मुक्कामाच्या जागी गेलो तर कोणीच आलेले नव्हते. मग आम्ही जेजुरी सर करायचे ठरवले. मजेत गेलो.भंडारा सगळीकडे होता. आमच्या सारखे भरपूर उत्साही लोक होते. तिथेही नाच गाणे चालूच होते.पण हुल्लडबाजी नव्हती.आम्ही गडावर जात असतांना काही लोकांना विचारले, किती पायऱ्या आहेत हो? तर आम्हांला उत्तर मिळायचे नऊ लाख.फार मजा वाटायची हे उत्तर ऐकून. हजार सुद्धा पायऱ्या नाहीत एवढं मला माहित होतं.तर या नऊ लाख पायऱ्याचे उत्तर संध्याकाळी झालेल्या भारुडात मिळाले.नऊ लाख पायऱ्या ह्या नवविधा भक्तीच्या नऊ पायऱ्या आहेत.मला पूर्ण भारुड आठवत नाही.त्यातल्या काही ओळी
इच्छा मुळीच बोलू नका
पडाल नरकाच्या दारी
मल्हारीची वारी माझ्या
मल्हारीची वारी
बांध बुधली ज्ञान दिवटी
उजळल्या महाद्वारी
मल्हारीची वारी माझ्या
मल्हारीची वारी
सोन्याची जेजुरी
त्याची नवलाख पायरी.
हे एकनाथांचे भारुड आहे. आम्ही गडावर गेलो तेव्हाही लोक हे म्हणत होते. बाया बापे मस्त नाचत होते.प्रसाद मिळत होता, भंडारा लावत होते.आनंद आणि उत्साह याशिवाय मला तरी काही दिसत नव्हते.मला सारखं वाटत होतं मी आले खूप छान झाले , नाहीतर हा एवढा आनंद माझ्या वाटेला आलाच नसता. कोणी कोणाला काही देत नव्हते , कोणी कोणाकडे काही मागत नव्हते.पण हात टाळ्या वाजवत होते, पाय जागच्या जागी हलत होते, चेहऱ्यावर एक न संपणार स्मित होते. आम्ही खंडेरायाला भेटून दुसऱ्या बाजूने खाली उतरलो. तिथे एक दुकान होते, शाळेतील मुलगी बसली होती. तिला विचारले,अहिल्यादेवी विद्यामंदिर कुठे आहे ग?ती तिचीच शाळा होती. लगेच खाणाखुणा सांगून तिने रस्ता सांगितला.लहान मुलं वारकरी बघून समोर यायची आणि त्यांना ‘जय हरी म्हणायची. असं म्हणण्यात त्यांना गंमत वाटायची आणि ती त्यांच्या चेहऱ्यावर दिसायची.नवीन माणसाची आपण बोलतोय यातही त्यांना काही वेगळे वाटत असेल.आम्ही शाळेत पोहचलो तर आमच्या सहकारी माउली येत होत्या.आम्ही आमचा डबा खाल्ला .मग कपडे धुवायला पाणी आहे का? बघितले.ते मिळाले . लगेच कपडे धुवून टाकले.एवढं चालून आल्यावर आपण घरी काही करणार नाही,पण तिथे सगळेजण सगळी कामं करत होती.जोडीदार बरोबर आलेले पुरुष सुद्धा स्वतःचे कपडे स्वतः धूत होते.माझं आपलं एक निरीक्षण.
जेजुरीचा खंडोबाच्या अस्तित्वासहित जाणवणारा माहोल वेगळा वाटतो. खरतर तो असंख्य माणसे बरोबर असल्याने वाटत असणार. मी गडावरही जाऊन आले म्हणून माझ्या बरोबरीच्या माउलींनी कौतुक केले. खाऊ दिला.त्या गेली वीस वर्षे वारी करत होत्या.मला म्हणाल्या ‘ पाय दुखले नाही ना? मी नाही म्हटले. तर त्यांनी आनंदाने म्हटले , अग दुखणारच नाहीत. माउली काळजी घेतात आपली.’ मी ही हसून होकार दिला.मग अभंग, भारुडे यांच्या गप्पा झाल्या.कोण? किती मुलं? मिस्टर काय करतात? हे मी कोणाला विचारलं नाही आणि मलाही कोणी विचारलं नाही. सगळं महत्त्व फक्त आणि फक्त पांडुरंग भेटीचं. त्याच्याशी फक्त नातं, आणि ते ही माहेरचं. मग कशाला हव्यात बाकीच्या उपाध्या ?
Chaitali Ranbhor, Darshan Tonape and 43 others
26 comments
Like
Comment
Share

#वारी  


नंतर आमच्या बरोबर एक डॉक्टर होते त्यांच्या बरोबर जाऊन ग्रामपंचायत मध्ये गेलो आणि शाळेचे toilet उघडण्याची विनंती केली. ती मान्य झाली. त्यामुळे सगळ्यांची सोय झाली.पण खुपजण शेतातच जात होते.निरा गाव मोठे होते. तेथे माउलींची अंघोळ असते.नदीला भरपूर पाणी होते.

संध्याकाळी प्रवचन होते.त्यांनी ज्ञानेश्वरीतील १८ व्या अध्यायातील ९१७ व्या ओवीवर प्रवचन केले.ओवी अशी होती,
तया सर्वात्मका ईश्वरा !
स्वकर्म कुसुमांची वेळा !
पूजा केली होय अपारा !
तोषालागी!
त्यांनी अगदी सोप्प्या भाषेत , व्यवहारातील उदाहरणे देत प्रवचन केले.त्या म्हणाल्या तुटलेली कर्म चालत नाही. म्हणजे माझ्यावर पडलं म्हणून ते काम केलं तर त्याचे फुल होत नाही. ते फुल टवटवीतच हवे. स्वकर्म म्हणून आनंदाने करावे. त्यांनी लोककथेतील विठ्ठल आणि रुक्मिणी यांची कथा सांगितली. नवीन लग्न झालेल्या रुक्मिणीचे लाजणे सांगितले. त्यावेळी त्यांनी एक लोकगीत म्हटले, त्यातील काही ओळी
‘झाली अंघोळ वाजली घंगाळाची कडी ,
रुक्मिबाई नेवून देई , विठ्ठलाला धोतराची घडी
हे गाणं ऐकून मला नवीन लग्न झालेल्या जोडप्याची मजा आठवली. एकमेकांच्या सहवासासाठी आसुसलेले. पण घरभर एवढी मंडळी की बोलायला सुद्धा मोकळेपणा मिळत नाही.मग त्यासाठी काहीकाही युक्त्या शोधून काढल्या जात.त्यात ऐनवेळी लहान मुले नाहीतर घरातील मोठी माणसं खोडा घालतात आणि त्या दोघांची फजिती होते.हे सगळीकडेच घडते असे नाही.पण लोकगीतात देवाला आपल्या घरातले एक मानून त्याला आपल्या सारख्याच भावना ,अडचणी येतात याचे एक विलक्षण सादरीकरण असते. ते ऐकतांना फार मजा येते. म्हणून मग मला वाटते की लोकगीतातल्या स्त्रिया देवाशी माणसासारखे वडील,भाऊ, नवरा, सखा ,अशी नाती जोडतात. त्यांना त्याची भीती वाटत नाही. गंमत आहे ना ही.मी या गोष्टींकडे असे कधीच पाहिले नव्हते.
प्रवचन झाल्यावर जेवण झाले , मला वाटते त्यादिवशी लापशी होती. स्वयंपाक छानच होता. भूक लागत होती , त्यामुळे अन्न गोड लागत होते.दुसऱ्या दिवशी उशिरा निघालो तरी चालणार होते.तरीही सगळेजण लवकरच उठले ,मी ही अंघोळ वगैरे करून शांत बसले. थोड्यावेळाने पेंढारकर काकांनी आम्हांला मुद्रा शास्त्राची ओळख करून दिली. खूप जणांना त्याचा उपयोग झाला होता. मलाही खोकल्यासाठी त्याचा उपयोग झाला. म्हणजे खोकला आला नाही फारसा.
नीरेहून थोडं उशिरा निघालो, लोणंदला जायचे होते. शाळेच्या बाहेर पडलो , थोड्या अंतरावरच विठ्ठलाचे मंदिर होते. छान ,स्वच्छ मंदिर होते. आमच्या दिंडीतील काही माउली तिथे अभंग म्हणत होत्या. एक डंके म्हणून माउली होत्या , त्यांनी भारुड म्हटले.विठ्ठलाला फोन लावला, त्याच्यावर रुसल्या ,पायांची अशी सुंदर हालचाल केली की नाचण्याचा मोह आपल्यालाही व्हावा.हसत खेळत विठ्ठलाचे नाव कसे घ्यायचे ते शिकवले.आमच्या बरोबर एक कोकीळ म्हणून जोडपं होतं. दोघेही टाळ वाजविण्यात आणि अभंग म्हणण्यात वाकबगार होते.दोघेही नाचत होते, उड्या मारत होते.एकमेकांना सांभाळून घेत मंडळी पांडूरंगाचे नाव घेत होती ,त्याच्याशी भांडत होते. इथे एक भजन म्हटले होते त्यात एक ओळ होती ,’ ह्यांच्या घरी सोनंनाणं , आमच्या घरी संतजन ‘, कोणी म्हणू नका काही आम्ही माणसात नाही’. माझ्या एवढंच लक्षात राहिलं.हे सगळं झाल्यावर आम्ही सगळेच नमस्कार करून निघालो. मी विठ्ठलाला तिथेच सांगून टाकलं की,’ मी तुझे इथेच दर्शन घेते, पंढरपूरला रांगेत मी उभी राहणार नाही.’ तू वाटेत भेटत रहा., तुला ओळखायला शिकव.

   #वारी 


किती दिवस आपण चालत आहोत, आज किती तारीख आहे याचा काहीच पत्ता मला नव्हता. याशिवाय दुसरे जग कुठे असेल का ? हाही विचार माझ्या मनात येत नव्हता. इथे सारखं काहीतरी घडत होतं.माझ्या डोळ्यांचे भिरभिरे झाले होते. इकडे पाहू की तिकडे असे मला होत असे.कारण सगळंच नवीन होतं माझ्यासाठी.माझ्या बरोबर चालणाऱ्या माउलीच्या पायात जाड असे चांदीचे तोडे होते.तिला चालतांना ते टोचत असावे , कारण ते गोल नव्हते, दन्डगोल होते. त्यामुळे तिला जखमाही झाल्या होत्या. मग तिने त्याला फडके बांधले आणि चालू लागली. मुखात ज्ञानोबा माउली तुकाराम चा जप होता.मस्त हसत होती. मला कळले नाही ती का हस्ते आहे. तर तिच्या मैत्रिणीने सांगितले की ती गाण्यांची चाल या जपाला लावते आहे. मलाही मजा वाटली.कोणत्याही साधना शिवाय गंमत करण्यात आणि ती घेण्यात या माउली कशा वाकबगार आहेत.हे ही मला कळले.

आम्ही सगळेजण माउलीचे गोल रिंगण जिथे होणार आहे तिकडे चाललो होतो. सदाशिवनगर येथे ते होते. तिथे गेलो तर गाव पूर्ण सजले होते. पताका सगळीकडे लागल्या होत्या.ठिकठिकाणी उंचावर माध्यमांची माणसे आपले कॅमेरे घेवून बसले होते.वारकरी मात्र गोल रिंगण करून जमिनीवर मस्त बसले होते. आम्हीही जागा धरून बसलो.कोणालाही पुढे उभे राहू द्यायचे नाही , हे प्रत्येकाने ठरवले होते. गोलाकार करून सगळेजण बसलो होतो. त्या मधल्या गोलात काही लोक ज्यांनी वारीत टाळ विकत घेतले होते, ज्यांचा तंबोरा नवीन होता, ज्यांनी चिपळ्या विकत घेतल्या होत्या अशी माणसे ज्या रिंगणात माउलींचा घोडा येणार तिथे ते त्या वादयाची सेवा देत होते. स्त्री पुरुष आपलं आपलं काम करत होते. एवढ्या गर्दीत मी कशी टाळ वाजवत गोल फिरू याची लाज, भीती स्त्रिया बाळगत नव्हत्या.मला त्यांचे हे धाडस जे इतर ठिकाणी सहज आढळत नाही त्याचे फार कौतुक वाटत होते. इथे सगळेच माउलीची लेकरं होती. त्यामुळे आम्ही सगळेचजण लहान होतो.एकमेकांकडून शिकत होतो.
माझ्या शेजारी श्रीगोंद्याच्या माउली बसल्या होत्या. त्यांच्या तोंडात शेख महमदचा अभंग होता.मला तो पूर्ण आठवत नाही. त्या म्हणत होत्या.
“ शेख महमंद अविंध,
ह्रदयी त्याच्या गोविंद “
अजून बरेच काही त्या म्हणत होत्या. आणि मला परत परत कळत होते की पुस्तकी ज्ञानाशिवाय माझ्याजवळ काही नाही. अजून थोड्या दिवसाने तेही उरणार नाही. या साध्यासुध्या माणसांनी मला सहजता शिकवली. अजून एक गोष्ट मी यांच्याकडून मला नीट समजली.ती म्हणजे आपण नामदेव, ज्ञानेश्वर,चोखामेळा, कबीर, तुकाराम, नरसी मेहता, शेख महमंद, यांच्या सारख्या विशालह्रदयी माणसांचे वंशज आहोत. खरी सांस्कृतिकता यांनी आपल्याला त्यांच्या जीवनातून शिकवली आहे.
या सगळ्या अंभंगांच्या गर्दीत सगळ्यांचे लक्ष माउलींच्या पालखीकडे होते. “आल्या का माउली, आल्या का माउली” असे सगळेजण एकमेकांना विचारत होते. मानाचा नगारखाना आला, तो वाजला.आणि लोकांनी ओळखले माउली थोड्याच वेळात येतील. माउली माउलीचा गजर चालू झाला. प्रत्येकजण भारावलेल्या अवस्थेत होता. मला त्यांचा भारावलेला आवाज ऐकून असे वाटत होते की हे सगळेजण मनाने माउलींची किती वाट पाहत आहे.त्या पालखीत माउली आहेतच.एक चोपदार सगळे रिंगण फिरून गेला. नंतर त्याने माउलींच्या घोड्याच्या कानात काहीतरी सांगितले.आणि माउलींचा घोडा पुढे आला आणि त्याने वेग पकडला. हजारो माणसे रिंगण करून बसली होती. सगळेजण माउली माउली म्हणत होते. जणू त्या घोड्यावर माउली त्यांना दिसत होते. घोड्याने तीन फेऱ्या मारल्या आणि तो थांबला. त्या रिंगणातली माती अनेकांनी आपल्या कपाळी लावली.तो अनुभव त्यांच्यासाठी थरारक होता.मी लोकांच्या या भावना पाहून हेलावून गेले होते. इतके समर्पण ? कसे ?कळत नाही.ज्याची उत्तरे तेही देऊ शकत नाही.
रिंगण संपल्यावर वारकरी त्या मैदानावर विविध खेळ खेळतात.त्यात आपण सुद्धा सहभागी होऊ शकतो. कोण कोणत्या दिंडीचे, कोणाला काय येते हे प्रश्न कोणालाही पडले नाही. कोणतेही गटतट तिथे नव्हते. ठिकठिकाणी असे खेळ सुरु झाले. सगळे पारंपारिक खेळ होते. त्यात थोडी अंग मेहनत होती. मुख्य म्हणजे कोणता ठेका कधी वाजणार आहे याचा सराव नव्हता तरी सगळेजण आपले वाद्य मग ते टाळ असो की चिपळ्या सुरात वाजवत होते.सगळ्या खेळात स्त्री पुरुष होते. समजा फुगडी खेळायची झाली , तर माउली माउली म्हणत एक स्त्री उठे मग तिकडून पुरुष उठे. आधी फक्त माउली माउली म्हणत एक हात धरायचा,मग गोल फिरायचे, मग दुसरा हात आणि हळू हळू फुगडीला वेग यायचा. इकडे बघणारे माउली माउली म्हणत जोर धरायचे.दुसरा खेळ होता टाळ वाजवत वाजवत खाली वाकत वाकत जायचे , मग वर याचे. होडी करायची, बैल जुंपायचे.हे खेळ नेहमी बघितलेले नव्हते मी.वारीमध्ये जितकं स्वतःचे लहानपण मी अनुभवलं तितकं मी कधी अनुभवलं नव्हतं. मनात कोणतीच तक्रार उमटत नव्हती, किंबहुना तेवढा अवसरच नव्हता.
असं भरपूर खेळ खेळत आणि अभंग म्हणत आम्ही पुढच्या मुक्कामाला गेलो. आता पंढरी जवळ आली होती. असं म्हणतात की तोंडल्याबोंडल्याला तुकारामांना पांढरी दिसली आणि ते धावत सुटले.आम्हीही ते धावले म्हणून धावलो.पण मला तर वाटते वारकऱ्यांना खरच पंढरी दिसत असेल.त्यामुळे त्यांच्या पायात अधिक बळ येत असावे. सगळ्यांचे लक्ष आता त्या विठूराया कडे होते पण मुखात त्याच्या भक्तांची नावे होती.
तुका म्हणे धावा ,पुढे पंढरी विसावा”
असे विसाव्याचे ठिकाणाकडे आम्ही मार्गक्रमण करत होतो. माळशिरस, वेळापूर, भेंडीशेगाव आणि वाखरीचे गोल रिंगण बघून आम्ही पंढरपूरच्या दिशेने चालत होतो.भेंडीशेगावहून अगदी पहाटे चार वाजता आम्ही निघालो.रस्त्यावर अनेकजण आपली सेवा देत चालले होते. बाहेर सतत जाग होती, आतल्या जागेला हाकारे घालत होतो.ती एवढ्या तेवढ्या कष्टाने मिळेल का? हे कोणालाच माहित नसावे.आपण आपला प्रयत्न करायचा.कोणाला किती पळावे लागेल माहित नाही.कारण इथे कोणीच पुढे मागे नाही. कोणी हुशार नाही.आपणच आपला अभ्यास निवडायचा आणि तो पूर्ण करायचा. या सगळ्यांच्या अभ्यासाच्या /साधनेची मी थोडीशी चुणूक अनुभवली. आळंदी ते पंढरपूर जणू एक गाव झाले असे मला वाटत होते.पहाटे निघालेलो आम्ही सकाळी आठ वाजता पंढरपूरला देवळाच्या समोर जावून उभे राहिलो. वारकऱ्याचे बघून आम्हीही आमचे कान पकडले आणि उठ्याबशाकाढल्या. एवढ्या गर्दीत सगळ्यांसमोर उठबशा काढतांना फारच मजा आली. आता आपल्याकडे कोणी बघेल या लाजेची भिंत मी केव्हाच पार केली होती.आजूबाजूला स्वच्छ दिसत होते. “लोक काय म्हणतील” ही भीती गळून पडली. वारी असं बरंच काही माझ्या मनात साठवत होती आणि मी ही साठवून घेत होते कारण माझी झोळी तशीही रिकामीच होती.
ज्या विठ्ठलाच्या मूर्तीला अनेक संताचे हात लागले ज्यांनी त्यांचे मस्तक ज्या पायावर टेकवले त्या पायांना स्पर्श करणे हा एक वेगळा अनुभव आहे. त्यावेळी आपण आजच्या काळात नसतो , या वारकऱ्यांच्या सहवासाने त्यांच्यासारखेच होऊन जातो आणि स्वतः कडे नव्याने बघण्याची खरी आतली वारी सुरु होते. तिथे मात्र जाम दुखापत होईल.असे वाटते.पण आता खरच थांबते.

    #वारी १०  

  ( हे सगळे वारी विषयीचे लेख जुलै २०१९ मध्ये माझ्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध झाले होते. नंतर ते लोकमतच्या सखी पुरवणीत सुद्धा प्रसिद्ध झाले होते.)


तरडगाव तसं फारसं लांब नव्हतं. पण एकालाएक लागून अनेक पालख्या होत्या.रिंगण बघून झाल्यावर अनेकजण गोल करून बसले आणि भजने म्हणायला लागले.काहीजण लोकगीतं म्हणत होते त्यात त्यांचा ज्ञाना, तुका सहज येवून जात होते आणि मनीचे गुज उकलण्याचा मार्ग सांगत होते. आम्ही पण एका गटात बसलो ,माउली गवळणी म्हणायला लागल्या होत्या.एकामागून एक गाणी न बघता कोणी म्हणायला लागले की आपला शहरी खत्रूड प्रश्न लगेच समोर येतोच ना ? तसा मी विचारला, डोक्याला कितीही टपल्या मारल्या तरी ते सुधारत नाही. म्हणून मी विचारले , “माउली तुम्ही रोज भजनाला जातात का ?” हे विचारल्यावर त्यांचा नवरा म्हणाला,मग काय हो त्या तर आमच्या भजनातल्या मेन गायिका आहेत.” त्या एकदम लाजल्याच.नवऱ्याने परक्या बाईसमोर खुलेपणे कौतुक केले म्हटल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहत राहावा असाच होता.त्या पहिली दुसरी शिकलेल्या होत्या पण वाचता येत होते.ओव्या, अभंग सहजपणे मुखात येत होत्या. तरीही माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह त्यांनी वाचले, माउली रोज म्हटले की येतं आपोआप” मी ही मान हलवली. कारण मला रोज म्हणणे आणि ऐकणे जमणार का ?याबद्दल शंका होती. बीड जिल्ह्यातल्या छोट्या गावातून मंडळी आली होती.त्यांच्या पाहुण्यांनी मागच्या वर्षी चहाची गाडी लावली होती.यावर्षी रसाचे गुऱ्हाळ आहे.सगळीकडे रस्त्याने मोठ्या आवाजात जाहिराती ऐकू येतात तरीही टाळ –चिपळ्याचा आवाज आपले लक्ष वेधून घेतो. त्यांच्या दृष्टीने तो देव नसतोच तर त्यांच्या अंगणात रोज येणारा त्यांचा सखा,मित्र असतो. त्यामुळे ते सगळेच त्याच्याशी शिळोप्याच्या गप्पा सहज मारू शकतात. मी मात्र फक्त अन फक्त त्यांच्याकडे कुतुहलाने बघू शकते.तेवढेच तर येत असते मला.

तरडगावी पोहचलो.गाव खूपच लहान होते. जवळजवळ सगळ्याच दिंड्या तिथे थांबल्या होत्या. माणसाला माणूस लागून चालत होता. आम्ही ज्या शाळेत उतरलो होतो तिथल्या फळ्यावर आमच्या स्वागतासाठी मुलांनी फुले काढली होती,शब्दांचे गुच्छ तर होतेच होते.पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा होत्या.नंतर थोड्यावेळाने शाळेतील मुलं आपल्या वर्गात कोण पाहुणे उतरले आहेत हे बघायला आली. त्यांनी आमच्याशी गप्पा मारल्या.सगळ्यांना माउली म्हणायची गंमत ते घेत होते आणि त्यांच्या लहानग्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत होते.
तरड गाव स्वच्छ होते. सगळ्यांसाठी पाणी आणि मोबाईल toiletची सोय केलेली होती. रात्री कोणीही रस्त्यावर विधी साठी बसायचे नाही याच्या सूचना दिल्या जात होत्या.शक्यतो सगळ्यागोष्टीत नियोजन आणण्याचा प्रयत्न चालू होता. त्यामुळे दिंड्या ज्याठिकाणी उतरल्या होत्या तिथे मोबाईल toilet उभारली होती,पाण्याचे tanker होते. सांडपाणी झाडांना जाईल याची व्यवस्था काहीजण करत होते. कोणत्याही गावात गेल्यानंतर ही व्यवस्था पाहिली की मला हुश्श व्हायचे. चला आजचा दिवस पार पडणार. पण माझ्या बरोबरच्या माउली होत्या,त्यांनी मला पुरते वठणीवर आणायचे असंच ठरवत असायच्या.इथे बरोबर नाही तिकडे जाऊ करत खूप तंगडायला लावायच्या.रोज दुसरीच कोणीतरी माउली माझ्या पाळतीवर असायची.मला या सगळ्याची गंमत वाटत होती.मला काही कळत नाही हे त्यांनी परस्पर ठरवून टाकले होते, त्यामुळे माझी जबाबदारी त्यांनी घेतली होती.मी ही मनात म्हणत होते ,”लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा” त्यादिवशी कोणाचेच फोन लागत नव्हते.नेटवर्क जाम झाले होते.प्रत्येकजण फोन घेवून एकमेकांना विचारत होता.शेवटी सगळ्यांनी पांडूरंगावर सगळे सोपवले आणि पुढील कार्यक्रमाला लागले. इथे कोणासाठी काही थांबत नाही याचा आपण प्रत्यक्ष अनुभव घेतो.
मी त्या दिवशी टाळ हातात घेवून बघितले.तसा माझा आणि सुराचा काही संबध नाही पण प्रयत्न करायला हरकत नाही. एका माउलीच्या लक्षात आले, तिने मला टाळ कसे धरायचे हे दाखवून कुठे ठोका मारायचा हे समजून दिले.सतत मोकळ्या हाताने फिरायची सवय असल्याने मला टाळ हातात नकोसे झाले.मी थोड्यावेळ वाजवले आणि परत केले.
रात्री अगदी दाराच्याजवळ मी पथारी टाकली. लाईट कधी आणि कोणी बंद केला हे कळले नाही.सकाळी आवरून पुढे पाउले पडायला लागली.फलटणच्या रस्त्यावर आम्ही चालत होतो. तिथल्या कृषी संशोधन केंद्राबद्दल खूप ऐकून होते. तिथल्या रस्त्यावरच्या बोर्डावर बऱ्याच गोष्टी वाचायला मिळाल्या. तिथली नवीन प्रयोग करणारी मराठी शाळा ,तिथली मॅक्सीन (बर्नसन )मावशी तिचे मराठी प्रेम हे सगळेच आठवले.मी जेव्हा तिला भेटले होते तेव्हा मी काही गोष्टी इंग्लिश मध्ये त्यांना सांगायला गेले तेव्हा त्या म्हणाल्या , अग मराठीत बोल कळते मला. माझ्या रंगावर जाऊ नको.” मराठीचे इतके प्रेम आहे तिला की त्यासाठी कार्यशाळा घेत असे.
फलटणच्या कॉलेजात आम्ही राहिलो. तिथून आम्ही संध्याकाळच्या आरतीला गेलो.पालखी जिथे उतरणार असते तिथे महिला फुगडी खेळतात, गाठोडे करतात , फेर धरून नाचतात. फार मजा येते. आमच्या समोर एका ८० वर्षाच्या माउलीने गाठोडे केले आणि त्या इतक्या भावूक होऊन गात होत्या की विचारू नका. त्यांचा तो उत्साह आम्हांला अधिक खेळण्यास प्रेरणा देत असला तरी आम्हांला त्यांची काळजीही वाटत होती.
या आरतीच्या वेळी हरवलेली माणसे, वस्तू याविषयी माहिती दिली जाते. एवढा मोठा जनसागर असतो पण चोपदाराने काठी वर केल्याबरोबर तिथे शांतता पसरते. शिस्तीचे अनोखे दर्शन आपल्याला होत असते.मुळात एवढी अनोळखी माणसे आजूबाजूला असुनही आपल्याला भीती वाटत नाही. मी फक्त हसत होते.खेळत होते, नाचत होते बस.
दुसऱ्या दिवशी फलटणचे प्रसिद्ध राममंदिर पाहिले. त्यामंदिराची रचना लाकडाची असून त्याची सुंदरता डोळ्यात भरते. जवळच तिथला राजवाडा आहे. यावेळी आम्ही माउलीच्या पालखीसोबत चालायचे ठरवले.त्यानिमित्ताने वारकरी कोणती भजने म्हणतात, एकमेकांच्या साथीने कसे गातात हे बघायला मिळाले. यावेळी या दिंडीत स्त्रिया सुद्धा रांगेत उभ्या राहून भजन म्हणत होत्या.अनेकजण अनेक वर्षांपासून येत आहेत.
आम्ही पहाटे जेव्हा पालखीच्या ठिकाणी काय कार्यक्रम होतात ते बघायला गेलो.तेव्हा असे वाटले की ,ही माणसे झोपलीच नाहीत की काय ? कारण प्रत्येकजण आवरून ओळीत बसले होते.सकाळचे अभंग म्हणत होते.पालखीच्या मागे जे वारकरी टाळ वाजवत असत ते सगळे गोल उभे होते. त्यांच्या सुरात सूर मिसळून बाकी सगळेजण गात होते. ते सगळे संपले आणि आरती झाली.त्यावेळी जे खाली बसले नाही त्यांना शिक्षा म्हणून उठबशा काढायला सांगत होते.कारण बसल्यावर सगळ्यांना पुढे काय चालू आहे हे दिसत असे पण लोक जर असे मध्ये उभे राहिले तर गोंधळ होईल आणि शिस्त मोडेन.सगळ्यांना मुठ मुठ मुरमुरे प्रसाद म्हणून मिळाले.पालखीच्या मागे कोण कुठे उभे राहील यालाही एक शिस्त होती.पालखीच्या पुढे तुलस डोक्यावर घेतलेल्या स्त्रिया, वीणा घेतलेले वारकरी,नंतर पालखी आणि मग टाळ वाजवणारे वारकरी.माझ्या सांगण्यात ,लिहण्यात चूक असू शकते.
रस्त्याने खूपसारी दुकाने होती.त्यात एक मुख्य दुकान असायचे ते इस्त्रीवाला आणि मोबाईल चार्ज करून देणारा. android मोबाईल चार्ज करायचे वीस रुपये आणि साधा मोबाईलचे १० रुपये. मला हे दुकान बघून फार गंमत वाटली.तो माणूस मस्त घोंगडीवर पहुडला होता.त्याच्या उजव्या हाताला २०-२५ बटणाचा एक मोठा बोर्ड होता. त्याला वेगवेगळ्या पिना खोचलेल्या होत्या. ज्यांनी मोबाईल चार्ज करायला लावले होते ते तिथेच घोळका करून बसले होते. तोच पान सुपारी , तंबाखू विकत होता.
दोन हाताने दोन व्यवसाय,
म्हणूनच मी खातोय दुधावरची साय,
मला सांभाळीते पांडुरंग माय
अशा काही ओळी तो म्हणत होता. सगळ्यांचा रंग एक होत चालला होता.
Darshan Tonape, Drpriti Mangesh Kulkarni and 23 others
13 comments
Like
Comment
Share

Wednesday, August 7, 2019

 वारी १

  


     भोवंडून टाकणारी गर्दी कापत मी अनेकांच्या मागे चालले होते.सगळेजण देवळाकडे  निघाले होते. मी ही त्यांच्यामागे गेले. ज्ञानेश्वरांच्या समाधीकडे आम्ही धावत होतो. माउलींचा गजर होत होता. लोक असतील तिथून हात जोडत होते. एकमेकांना  सांभाळत, तर कधी धडपडत आम्ही पुढे सरकत होतो.माझ्यासाठी हे सगळेच नवीन होते. कोणीही ओळखीचे माझ्या बरोबर नव्हते. त्यामुळे माझी अधिकच मजा होती. विचारांचे कोणतेही ओझे बाळगायचे नाही. चूक कि बरोबर मला माहित नाही.पण एवढ्या लोकांना कोणती प्रेरणा  वारी करायला लावते याचे मला कोडे होते आणि ते मला समजून घ्यायचे होते.कोणाचाही सल्ला मी मानला नाही.त्यामुळे माझ्या मित्र मैत्रिणी म्हणायला लागल्या की बाई ग आनंदाचे निधान शोधता शोधता तुझे निधन व्हायचे .कोणाचे तोंड थोडेच धरता येते.पण
टाळी देण्यासाठी मात्र हात धरता येतो.मी ही हसून टाळी दिली आणि माझ्या शोधाला सुरुवात केली.
  पाठीवर एक पिशवी  घेवून मी आळंदीला येवून पोहचले.आळंदी ते पुणे असा पायी प्रवास करून बघायचा.मग पुढचे पुढे बघू.सकाळी लवकर उठून मी इतरांच्या मदतीने तयारीला लागले. इंद्रायणीला पाणी सोडलेले होते ,मस्त पाण्यात आंघोळ केली, तरी शेजारीण म्हणाली, चल पाण्यात लई खेळू नकोस, लवकर निघायला हवं.तिचं ऐकून मी ही शाळकरी पोरी सारखी निघाले.कारण एवढ्या माणसांत अंघोळ करण्याचे तंत्र तिनेच मला शिकवले होते.मला कुठे काय येत होते. अंघोळीच्या वेळी  ती अभंग म्हणत होती, माउलीला आळवत होती. सारखं तोंडात गाणं होतं. तिचा आनंद सगळीकडे भरून राहिलेला होता.कोण कुठून आले याची आम्ही काहीही चौकशी केली नाही. आधी कळसाला नमस्कार करायचा होता. माउलींच्या आजोबांच्या घरी जायचे होते.सगळी रीत तिला माहिती होती.मी फक्त अनुकरण करत होते.
    पालखीच्या सोबतीने आम्ही पुण्याच्या दिशेला निघालो. सगळं शिस्तीत चालू होते. गर्दी होती पण ती आपल्या मस्तीत होती.तिला फक्त माउली दिसत होती.आणि मला या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद.नक्की काय मिळणार मला याचा मला काही तासातच विसर पडला होता.मी तिथे होते फक्त बास. दुसरे काहीही नाही.माझं नाव, गाव,काम काहीही माझ्या बरोबर नव्हते. कोणाला त्याच्याशी घेणेही नव्हते. चला सुरुवात तर छान झाली. पाऊले मार्गी लागली म्हणायची.