Showing posts with label फोडणी. Show all posts
Showing posts with label फोडणी. Show all posts

Sunday, October 19, 2014

कभी अलविदा ना कहना


   सीमा आणि अतार्किक यांचं काल जोरदार भांडण झालं .सगळ्या कॉलनीने ते ऐकलं.पण रात्रीची वेळ असल्याने सगळ्याच बायकांना शांत बसावं लागलं.फोन करूनही उपयोग नव्हता.कारण सीमा बाई फोनवर खेकसायला कमी करणार नाही.शिवाय म्हणतील तुम्हांला एवढा दम निघत नाही का? उद्या दुपारी मी शिपाया बरोबर निरोप पाठवून बोलवून घेतले असतेच ना? खर आहे तिचं.तिने आम्हांला बोलावून सगळं सांगितलं असतं.कारण भांडण रात्री झालं होतं आणि तिच्याकडे रात्रीच्या वेळी शिपाई नसतो नाहीतर तिचं काम शिपाईच करतो. आम्ही आमच्या शिपाया पासून सगळं लपवायला पाहतो तर हिचं आपलं तिसरच.
   सकाळी पाहिलं तर बाईसाहेब व्यवस्थित आवरून फुलं तोडत होत्या आणि चक्क गाणं गुणगुणत होत्या. हटकलं असतं तर म्हटलं असतं माझ्या नावातच सीमा आहे,मी सगळं मर्यादा सांभाळून करते,काय लढाई करायची असेल ती सीमेवरून करते आणि लगेच समेवर येते.तिची समेवर येण्याचे गुपित जाणून घेण्यासाठी आम्ही दुपारी आपापला नाश्ता घेवून तिच्याकडे जमलो तेव्हा मादाम फार जुन्या काळात गेल्या.आणि कहाणीची सुरुवात करत म्हणाल्या.आटपाट नगर होतं आणि तिथे

  सीमा आणि अतार्किक यांच लग्न नुकतेच ठरलं होतं दोघं मिळून फिरायला वगैरे जात,आणि भरपूर गप्पा मारत.शिवाय इतरांपेक्षा आपलं कसं वेगळं आहे आणि कसे युनिक जोडीदार आहोत आपण हे ही त्यांचं खूप चाले.आठवड्यातून एकदा भेट होत असे त्यामुळे सांगण्यासारखं ही भरपूर असे.एकमेकांचे आई-वडिल,भाऊ-बहीण ,मित्र-मैत्रिणी असं भरपूर गबाळ गोळा करून ते त्यात रमत.स्वतः बद्दल ही ते थोडं बोलत नाही असं नाही.त्यात आवडता सिनेमा,नट-नट्या,आधुनिक आहोत असं दाखविण्यासाठी जे बोलावं लागतं ते सगळं ते बोलत.त्यामुळे भेटीचा शेवट होई तेव्हा विरहाच्या विचाराने त्यांना दुःख होई.मग ते हिंदी सिनेमाच्या गाण्याने “कभी अलविदा ना कहना “ असं म्हणत कसा बसा निरोप घेत असत.
  तिला कालच्या तिच्या भांडणापर्यंत आणण्यासाठी एकजण म्हणाली,म्हणजे आता तुम्ही एकमेकांना अलविदा म्हणणार तर.जणू ती त्यांच्या अलविदा म्हणण्याची वाटच पाहत होती.ती तरी बिचारी काय करणार,रोज तिच्या नवऱ्याकडून ऐकून घ्यावे लागे,सीमा वहिनी बघ,कशा नेहमी हसतमुख असतात ते.सीमानेच अलविदा म्हटलं म्हणजे आपोआपच ती कॉलनी सोडेल आणि ही मग नवऱ्याच्या टोमण्यातून मोकळी होईल.
पण सीमेबाहेर जाईल ती सीमा कसली आणि तार्किकतेने बोलेल तो अतार्किक कसला? सीमा यावर म्हणाली नाही ग बाई,आता कसलं आम्ही अलविदा म्हणतो आहे?
  का ग पोरी मध्ये जीव अडकला आहे का?की नवराच सोडवत नाही.आमच्या प्रश्नाने ती गंभीर होईल आणि रडत रडत काही सांगेन असं वाटलं.पण ती सीमेच्या बाहेर येईच ना.
  ती म्हणाली अग मी अलविदा म्हणायचं तर मला एक घर पाहिजे,नोकरी पाहिजे,घरात चीड चीड करायला माणूस पाहिजे.आणि त्याला सुद्धा स्वयंपाक यायला पाहिजे,बाई ठेवली तरी तिच्यावर चिडता येत नाही,शिवाय उरलेल्या स्वयंपाकाची विल्हेवाट लावायला एक माणूस घरात हजर पाहिजे.म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं की,कभी अलविदा ना कहना.आम्ही जगाला अलविदा म्हणू तेव्हाच एकमेकांना अलविदा म्हणू.
  अग अलविदाची गोष्ट नको सांगू.तुझं भांडणाबद्दल सांग,त्याचे कारण सांग.
काही नाही ग ,नेहमीचच.
म्हणजे?तू कशाला नाही म्हटलं का?
  हो.
कशाला?
अलविदा ना कहना “हे गाणं कोणी म्हटलं आहे हे ओळखायला मी नकार दिला.

  आम्ही सगळ्यांनी डोक्यावर हात मारत आणि आमचेच दात आमच्यावर खात आणि आमच्या नाश्तातला थोडा भाग सीमाला खाऊ घालून आम्ही सीमाला अलविदा म्हटलं.

Friday, September 19, 2014

जीवनात ही घडी -


सकाळी सकाळीच घराची बेल वाजली,पाहते तर त्रिपाठी बाईचा शिपाई दारात हजर ,हा? या वेळेला? म्हणजे बाईचा गाण्याचा कार्यक्रम ठरलेला दिसतो.बाईने गाणं गायचं ठरलं की,लगेच कार्यक्रम होतो.इतकी तिची सगळीकडे वट आहे. तिच्या कार्यक्रमाचे बोलावणे नसावे या आशेने मी शिपायाला म्हटलं.
"साहब तो ऑफिस में है ,कुछ काम था क्या?"
आता त्रिपाठी बाईचा शिपाई म्हटलं की हिंदीच बोलायला पाहिजे असं थोडंच आहे,पण असं होतं खरं.ती सुद्धा अमरावतीची आहे,पण हिंदी फाडत असते. तिचा शिपाई धुळ्याचा आहे.तरी आम्ही त्याच्याशी बोलतांना हिंदी फाडतो.
  त्याने लगेच सही साठी कागद पुढे केला.अशा प्रकारचा कागद घेवून आमच्या वर्गात मुरली काका यायचे.पण त्या कागदात सुट्टीची चांगली बातमी असायची.त्या कागदांची आम्ही आतुरतेने वाट पाहायचो,म्हणूनच नशीब अजूनही असे त्रिपाठी बाईचे आमंत्रण पाठवून आमचा डाव आमच्यावर उलटवत आहे असे वाटते.
  तुमच्या बाईसाहेब पार्टी देत आहेत का? 
   मी तो कागद हातात धरून उसना उत्साह आणून विचारले.तर शिपायाने फक्त वाचण्याची खुण केली.त्रिपाठी बाईंची त्याला बिचाऱ्याला कडक शिकवणी आहे,म्हणूनच तो इतर काही बोलत नाही.नाहीतर आमचे शिपाई,आमच्या घरात काय झालं आणि काय नाही याची सगळी उजळणी करतात.आम्ही शिस्तीच्या नाहीत,शिवाय त्रिपाठी बाईच्या मते नोकर माणसाला घरच्यासारखे वागवायचे म्हणजे अगदीच बेशिस्त .मी शिस्तीत कागद वाचला.आज क्लबमध्ये बाईचा गाण्याचा कार्यक्रम होता.त्यासाठी आग्रहाचे आमंत्रण होते.मनात हरे राम म्हटले आणि जनात व्वा फारच छान असं म्हटलं.लगेच शिपायाने सही करा,अशी खुण केली.मी मुकाट्याने सही केली,आणि त्या शिस्तीच्या पुतळ्याला खुण करून निरोप दिला.
  खरं तर मला गाण्यातलं काहीच कळत नाही.आता कोण गातोय असं कोणी विचारलं तर,मी गायक,गायिका असं उत्तर देते.गाणारी व्यक्ती स्त्री-पुरुष एवढच मला कळतं.काही गाणी आणि त्याचे गायक,गायिका पाठ झाल्यामुळे/केल्यामुळे तेवढे मी बिनदिक्कत सांगते.आताशा त्यांची संख्या काहीशी वाढल्याने काहींना मी गाण्यातली दर्दी आहे असं वाटतं.आपल्या बद्दल कोणाला काय वाटावं यासाठी आपल्याला कोणाचं मन थोडच धरता येतं? तशा या आमच्या त्रिपाठी बाईचे मन आणि गळा मी धरू शकत नाही.त्या महिन्यातून दोन तरी त्यांचे कार्यक्रम ठेवतात.सुरवातीला आम्हांला नवीन गावात बरी फुकटात करमणूक होते असं वाटायचं.पण नंतर मालिका पुढे न गेल्याने साचलेपण येतं ना तसं झालं.मग आम्ही न जाण्यासाठी  नवीन नवीन कारणं शोधायला  लागलो.पण त्रिपाठी बाईची  पण साहेबाने अचानक तपासणी साठी ऑफिसमध्ये यावे तशी अचानक निमंत्रणे यायला लागली.त्यामुळे पंचाईत व्हायला लागली.आमचा म्हणजे बायकांचा तिथे चहा –नाष्टा व्हायचा,पण घरी आल्यावर नवरा-मुलांसाठी करत बसावं लागायचं.म्हणून आम्हांला वाईट वाटायचे.आमच्यातल्या  एकीने त्यांना तसं सुचवलं की आम्ही थोडी वर्गणी काढून देतो,आमच्या घरी नाष्टा पाठवावा.तर तिला राग आला.तिने आम्हांला अरसिक ठरवलं.पण काही असलं तरी आम्हांला तिच्या कार्यक्रमाला जावंच लागत होतं कारण ती आमच्यातली सगळ्यात मोठी साहेबीन होती.
   आज त्रिपाठी बेगम साहिबाने जुनी गाणी म्हटली ,तिच्या मते ती शमशाद बेगमची गाणी होती.मी शमशाद बेगमची खूप प्रसिद्ध असलेलीच गाणी ऐकली होती.माझ्यातल्या अज्ञाना मुळे मी काहीच म्हटले नाही.शमशाद नाहीतर त्रिपाठी बेगम गाते आहे ना झालं तर मग.शेवटी बाईने तिचं आवडीचे गाणं गायला घेतलं .जीवनात ही घडी अशीच राहू दे.ती या गाण्यावर का एवढी फिदा आहे माहित नाही.पण तिच्या प्रत्येक मैफिलाचा शेवट ती याच गाण्याने करते.म्हणून कदाचित मैफलीची घडी तिच्या आयुष्यात वारंवार येत असावी आणि तिच्या मुळे आमच्या आयुष्यातही येते.यामुळे माझी चिडचिड झाली ती वेगळीच.
  तिने नेहमी प्रमाणे जाणकाराला  विचारतात तसं मला विचारलं ,काय दुसऱ्या जगात नेवून आणलं की नाही.?मी ही सज्ञान असल्या सारखी मान डोलावली.मला तिथून पटकन निघून जायचे होते.पण बाई काही सोडेना.त्या जीवनात ही घडी गुणगुणत माझ्या जवळ आल्या आणि ओळ पूर्ण करून बोलायला लागणार तेवढ्यात मी म्हटलं,अशा जीवनाच्या घड्या कशाला घालतात,चांगलं मोकळं सोडून द्या ते.बाईंनी माझ्याकडे अज्ञान बालका सारखं पाहिलं आणि म्हटलं,” मला आवडत तसं.”
  मला कपड्यांच्या घड्या सुद्धा आवडत नाही,शिवाय तेच तेच क्षण परत परत येण्यात काय मजा,शिवाय परत परत तीच घडी आल्याने पहिल्यांदा आयुष्यात आलेल्या घडीची किंमत कळत नाही.अजून एक जीवनाची ही घडी आपल्या म्हणण्यावर थोडीच चालते,ती पुढे जातच राहते.सतत पुढे आपल्या वेगाने जात राहणे ही नैसर्गिक घटना आहे.ती आपण थांबवू शकत नाही.शिवाय सारखं बरोबर राहून प्रेमाचा वसंत भांडण्यात आहे हे आपोआपच त्या घडीला कळतं.
  माझ्या या तात्विक बैठकीने बाई माझा नाद सोडतील असं मला वाटलं आणि म्हणूनच केवळ मी मनात येईल ते मी बोलत गेले.तर बाईंना त्यात माझा समंजसपणा  दिसला आणि जीवनाची घडी समजून घेण्यासाठी मला विशेष निमंत्रित केलं.मी ही मग हे राम मनात म्हटलं आणि जरूर  हे जनात म्हटलं आणि एक दिवसाचा नवरा आणि मुलं यांचाही दुपारचा नाष्टा माझ्या पदरात पाडून घेतला.जीवनाची ही घडी म्हणजे त्यांचा शिपाई आमच्या घरच्यासाठी पदार्थ करतो आहे ही  अशीच राहिली तरी चालेल असं मनात म्हणत मी बाईंचा निरोप घेतला