Friday, January 30, 2026

नवजिवतीची कहाणी ( श्रावणातल्या कहाण्या )

नवजिवतीची कहाणी ऐक मानवा तुझी कहाणी, एक आटपाट नगर होतं. तिथं होता एक राजा, घरात त्याच्या नव्हता गाजावाजा, सुना त्याचा ओटा, सुना त्याचा सोफा. त्या राजाला होती राणी, सुनी झाली होती तिची वाणी. घरात किलबिलत नव्हती बालगाणी. पाहुणेराउळे त्यांना बोलवत, पण येताजाता टोमणे मारत. राजाराणी खट्टू झाले, सगळ्या जगावर रागवू लागले. नाही नाही ते उपाय करू लागले. त्यातून त्यांच्यातला संवाद हरवला. एकमेकांचे गुणदोष टोचू लागले. उणीदुणी काढू लागले. एके दिवशी काय झाले? भांडता भांडता त्यांना शेजारच्या घरातून हसण्याखिदळण्याचा आवाज आला, पावलांचा आवाज येवू लागला. गाणी ऐकू आली. काय असेल बरं शेजारी? राणीला वाटले कुतूहल भारी, राणी गेली शेजारघरी. राणीने विचारलं, “बाई बाई तुझं घर असं हसतं खेळतं कशानी झालं? त्यासाठी तू कोणतं व्रत केलं?” शेजारीण म्हणाली,“ माझं व्रत अगदी सोप्पं आहे. ते आहे नवजिवतीचं व्रत. स्त्री-पुरुष दोघंही ते करू शकतात.” राणी म्हणाली,“ बाई बाई मला व्रत सांग, उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही.” शेजारीण सांगू लागली, “तसं तर हे व्रत अगदी सोप्पं आहे, तू फक्त तुझ्या पोटी मूल येईल असा विचार करू नको. आपल्या आसपास हजारो मुलं आहेत त्यांच्याकडे मायेच्या नजरेनं बघ. त्यांचा हात तुझ्या हाती घे.” राणीच्या मनी शंका आली, “म्हणजे तुझ्या घरातली ही मुलं तुझी नाहीत ?” “ही मुलं आपलीच आहेत, त्यांना हवं आहे प्रेम, माया, आपुलकी आणि शिक्षण.” “पण. . . ” “पण नाही आणि बिण नाही. लोक काय म्हणतील हा विचार करू नको, या मुलांचा हात धरला तर आपल्या भोवती एक छान वातावरण निर्माण होईल. मुलांना आणि आपल्याला एक छान मार्ग मिळेल.” “मी तर हे व्रत करेन, कारण प्रत्येक बाईत असतेच एक आई. पण पुरुषाच्या मनात निर्माण होईल का दुसऱ्याच्या मुलाबद्दल प्रेम?” “अग प्रत्येक पुरुषातसुद्धा असते एक आई, त्याला लेबल लावण्याची नको करू घाई.” “बाई असल्याशिवाय कसं साधणार आईपण?” “अग प्रत्येक स्त्रीला बाळ होवू शकत नाही हे जसं नैसर्गिक, तसंच काहींना आई व्हायची इच्छा नसते हेही तितकंच नैसर्गिक. प्रत्येक बाईने बाळाला जन्म द्यायलाच हवा अशी सक्ती असू नाही; तसं पुरुषांना सुद्धा सापडतं आपल्या आतलं आईचं मन, तेही तितकंच आहे नैसर्गिक. म्हणून म्हणते बाळासाठी होवू नये अगतिक.” “असं कसं?” “तूच आजूबाजूला बघ बरं. कितीतरी जणी आपल्या कामावर प्रेम करतात, ते काम त्यांचं बाळच असतं. त्या कामासाठी त्या दिवसरात्र एक करतात. त्या नवनवीन संशोधन करतात. त्या स्वतःला ओळखतात. त्यांच्या कामातून समाजाचा सुद्धा विकास होतो.” राणीला हळूहळू शेजारणीचं बोलणं उमजायला लागलं - “कहाणी ऐकल्याचं एवढं फळ तर वसा घेतल्याचं काय फळ?” “तू अनेकांची आई होशील, तुझ्यातला संकुचितपणा नाहीसा होईल. समाजाकडे नव्या निकोप दृष्टीने पाहशील, तुझ्या चेहऱ्यावर आनंद पसरेल.” “हे व्रत कसं करायचं?” “स्त्री-पुरुषांनी हातात हात घेवून हा वसा घ्यावा. निकोप समाजासाठी नवजिवतीचं व्रत घ्यावं. यात कोणी मोठं नाही, कोणी छोटं नाही. जसं एखाद्या जोडप्याला मूल नसतं, तसे अनेक मुलांना आईबाबा नसतात. बाळ होणं आपल्या हातात नाही पण अनेक मुलांच्या चेहऱ्यावर हसू पसरवणे तर आपल्या हातात आहे. तुम्ही सजग व्हाल, तर समाजाचे पालक व्हाल. जिथंजिथं बाळासाठी रडणारी आई असेल तिथंतिथं तुम्ही पोहचा आणि तिचा हात तुम्ही हाती घ्या. हे व्रत सर्वांना सांगा. जशी नवजीवतीने माझ्यावर कृपा केली, माझं घर आनंदी केलं; तशी ती सर्वांवर कृपा करेल. अशी ही अनेक प्रश्नांची कहाणी एका उत्तरी सुफळ संपूर्ण!” (या सगळ्या कहाण्या पुन्हा स्त्री उवाच या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याची लिंक खाली दिली आहे. ) https://punhastreeuvach.blogspot.com/2021/08/blog-post.html

No comments:

Post a Comment