Showing posts with label मनगुज. Show all posts
Showing posts with label मनगुज. Show all posts

Wednesday, January 3, 2018

चेहरा

चेहरा
  तुमच्या चेहऱ्यावरून तुमचे मन वाचता येते. चेहऱ्यावरून लोक भविष्य सांगतात. त्यांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. तिचा चेहराच पडला.असं आपण सारखं येता-जाता चेहऱ्यावरून बोलत असतो आणि स्वतःच्या चेहऱ्यावर हात फिरवत असतो. ज्याला दाढी असते तो दाढी कुरवाळतो, ज्याला  मिशी असते तो मिशी सारखी करतो. ज्याला दोन्ही नसेल तो स्वतःच्या गालावरून हात फिरवतो. स्त्रिया घाम पुसतात, स्वतःच्या गालावरून हात फिरवतात, कानातलं नीट करण्याच्या बहाण्याने गालावरून हात फिरवतात. स्वतःचा चेहरा नीट ठेवण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करत असतो.
     राजकारण्यांविषयी इथे काही बोलायला नको खरं तर. पण मला हे पटलंय की आपल्या संपूर्ण जीवनात राजकारण असतंच.  आज आपण सत्ताकारणाला राजकारण म्हणतो. पण तसं काही नाही. राज्यात, देशात चाललेल्या प्रत्येक घटनेला,प्रसंगाला, त्यामागच्या कारणांना राजकारण म्हणतात. ते सकारात्मक पद्धतीने कसं होईल हे सुद्धा एक प्रकारे राजकारणच असतं . विषयांतर झाले खरे. पण राजकारणी सुद्धा आपला चेहरा लपवतात किंवा त्यांच्या पक्षाचा जो अजेंडा असतो तोच त्यांचा चेहरा असतो.
     असं हे सगळं चेहरापुराण सांगायचं कारण म्हणजे माझं होस्टेल. मी आठवण म्हणून माझ्या होस्टेल मध्ये गेले आणि मला आमच्या गंमतीजंमती आठवल्या. आम्ही सगळ्याजणी नोकरी करणाऱ्या होतो. आमच्या पैकी बऱ्याचजणींना सकाळी दहा वाजता ऑफिस गाठायचं असायचं . त्यामुळे आमची धावपळ व्हायची . त्यात काही अशा मुली होत्या की त्यांना सकाळी सकाळी विशिष्ट मुलीचाच चेहरा पहायचा असायचा. म्हणजे त्यांचा दिवस चांगला जाईल असा त्यांना विश्वास होता. त्यामुळे त्या रूम मधून बाहेर पडतांना टॉवेल घेवून बाहेर पडायच्या.आपल्याला हवा तो चेहरा समोरून येतोय असं दिसलं की त्या त्या चेहऱ्याकडे बघून हसायच्या आणि मगच पुढचं आवरायला घ्यायच्या. काहीजणी तर तो चेहरा ज्या रूम मध्ये राहतो  तिथलं दार ठोठवायच्या .तीच मुलगी दार उघडायला आली तर बरं नाहीतर पंचाईत व्हायची. अशा खूप गंमतीजंमती होस्टेल मध्ये चालायच्या .
     आमच्या बरोबर जरा प्रौढ बाई राहत होत्या. त्यांना संजय दत्त फारच आवडायचा.त्यामुळे त्यांनी संजय दत्तचे मोठं पोस्टर लावून ठेवले होते.त्यामुळे उठल्यावर संजयचा  हसरा चेहरा त्यांना दिसायचा. मग त्या खुश होत असत. त्यांनी त्यांचा प्रश्न असा सविनय सोडवला होता. त्यांना अंघोळीला मात्र वेळ लागत असे. त्यांनी बाथरूम अडवून ठेवू नये व लवकर बाहेर यावे म्हणून आम्ही , ज्यांना घाई आहे अशा तिथेच गप्पा मारत बसायचो.त्यात मुद्दाम संजय दत्तचा उल्लेख करायचो. मग कधी त्याची गाणी लागली आहेत, सिनेमा लागला आहे, अशा चाटा मारत असायचो. आतली कडी उघडण्याचा आवाज यायला लागला की पटकन पळून जायचो. त्या बाई टीव्ही रूम मध्ये जावून बघायच्या की खरच गाणी लागली आहेत की नाही तोपर्यंत आम्ही बाथरूम गाठत असू. आम्ही त्यांची अशी गंमत करत असू पण त्यांनी आमच्यावर खूप माया केली. आम्ही कामावरून जर कधी उशिरा आलो तर त्या आमचे वाळलेले कपडे गोळा करून आण्याच्या, त्यांच्या व्यवस्थित घडी करून ठेवायच्या.आम्ही thank you म्हटलं तर त्या म्हणायच्या, ‘ एक संजय दत्तचा सिनेमा दाखव म्हणजे झालं.’असं म्हणतांना त्या खूप गोड हसायच्या.त्यावेळी त्यांचा चेहरा पाहत रहावा इतका देखणा दिसायचा.अशावेळी मला बोरकरांच्या कवितेची ओळ आठवायची,”  देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे की सावळे या मोल नाही फारसे’आम्ही त्यांच्या पेक्षा वीस वीस वर्षाने लहान होतो.त्यांचं दुःख त्या कधी बोलून दाखवत नसत.पण कळत असे त्यांचे एकाकीपण.हे  एकाकीपण त्यांना परिस्थितीमुळे आलं होतं की , त्यांना कोणी बळजबरीने स्वीकारायला लावलं होतं,की त्यांनी आपणहून स्वीकारलं होतं कोण जाने. संजय दत्त मागचा हा त्यांचा चेहरा असा कधी कधी आम्हांला दिसत असे.
    होस्टेल मधील ज्या मुलींना सकाळी सकाळी विशिष्ट चेहराच पाह्याचा असायचा , त्या जर आम्हांला कधी भेटल्या तर आम्ही त्यांना म्हणायचो,
“ मेरे चेहरे पे क्या जादू है”
किंवा
“चेहरा क्या देखते हो ,दिल में उतर कर देखो ना’
    आमच्या अशा टवाळीने त्या अधिकच चिडायच्या.मग आमचा चेहरा कधीच दिसणार नाही याची काळजी त्या घ्यायच्या.

     आज मी पाहिलं तर होस्टेलचा चेहरा-मोहरा पार बदलला आहे. पूर्वी आठ वाजे पर्यंत बाहेर राह्यची परवानगी होती.नर्सेसना त्यांच्या दवाखान्यातून शिफ्ट चे पत्र आणावं लागत असे.पण आता बहुतांशी मुली बीपीओ ट काम करतात.आय टि क्षेत्र विस्तारत आहे.त्यामुळे होस्टेल रात्री सुद्धा जागंच असतं .नवीन येणाऱ्या मुली आता होस्टेलचा मूळ शांत आणि सुरक्षेचा चेहरा बदलतील. तो अधिक वेगाचा आणि आधुनिक होईल.अर्थात असा वरवरचा कितीही बदल झाला ,नवीन रंग रंगोटी झाली, सुरक्षेची विविध साधन आली तरी आपण आतून अधिक मजबूत आणि उदार होत आहोत का? आम्ही सुरक्षेच्या नावाखाली चिखलात स्वतः ला रोवत नाही ना? हे ही पाह्यला हवं. मग आमचा स्वतःचा आणि रक्षकांचा चेहरा लक्षात येईल. असं वाटतं . 

Wednesday, October 4, 2017

मौन

मौन
     मौन म्हणजे शांत बसणे , न बोलणे, गप्प राहणे.एवढाच अर्थ मला माहित होता. घरच्या घरी मौन ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते होत नसे.प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया दिली नाही तर जणू माझं अभिव्यक्त स्वातंत्र धोक्यात येईल असेच मला वाटत असे.
   मौन पाळणारी फारशी माणसं मला माहित नव्हती.काही माणसं जेवतांना बोलत नाहीत ,पण ते खाणाखुणा करून जाम त्रास देतात. त्यांच्या बरोबर जेवायला बसल्यावर आपल्याला त्यांच्याकडेच सारखं बघावं लागतं.मौन म्हटल्यावर मला गांधीजींच मौन आठवलं. ते त्या काळात कोणाशीही बोलत नसत. मी वर्धाला त्यांच्या आश्रमात गेले होते तेव्हा तिथे जेवणाच्या खोलीत एक पाटी लावलेली होती.त्यावर लिहलेलं होतं,जेवणा बद्दल काही सांगायचे असेल तर नंतर एक चिठ्ठी लिहून द्यावी. प्रत्यक्ष कोणालाही काही सांगू नये.म्हणजे स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला वाईट वाटणार नाही.म्हणजे शांत बसून समोर आलेलं अन्न शांतपणे  खाणं  आलं .तेव्हापासून मला मौनाचे जास्तच आकर्षण वाटू लागले.आपणही एकदा मौन पाळले पाहिजे असे वाटत होते पण ते कसे साध्य होणार हे माहित नव्हते.
     आपल्याला गांधीजी आणि विनोबा भावे यांचेच मौन माहिती आहे. इतर हजारोंच्या संख्येने असणारे बाबा लोक दुसऱ्याला मौन पाळायला सांगतात. स्वतः मात्र काहीही फेकत असतात. गांधीजी आणि विनोबाजी ही  खऱ्या अर्थाने महान माणसे.मला त्यांच्या सारखे कठोर मौनात  रहाणे कसं जमणार? शिवाय घरातील माझी माणसे? येणारी जाणारी, पत्ता विचारणारी? विक्रेते यांना मी मौनात आहे हे कसं कळणार?पण तरीही मला मौन पाळायचे होते. म्हणून मी विपश्यनेचा मार्ग निवडला. दहा दिवस तिथे रहायचे आणि मौनात रहायचे.
     मी ज्या दिवशी त्या शिबिराला गेले तेव्हा तिथे सांगितले की , मौन म्हणजे बोलणे तर बंदच ,पण त्याच बरोबर खाणाखूणा ,स्मित , डोळ्यांची उघडझाप हे काहीच करायचे नाही. फक्त श्वासावर लक्ष ठेवायचे.तिथे आलेल्या सगळ्याजणी माझ्या सारख्या नवीन होत्या. त्या त्यांच्या मैत्रिणींबरोबर आलेल्या होत्या. मी एकटीच गेले होते. मला त्यांच्या जवळ जावून बोलावेसे वाटायचे.मग मी विचार करायचे की , आता बोलणं गरजेचे आहे का?या सगळ्याजणी मला इथे भेटल्या नसत्या तर मी काही त्यांना शोधून काढले नसते.तर आता शांत रहायचे.बाहेर आणि आत काय चालू आहे हे फक्त बघायचे. पहिल्या दिवशी मला त्रास झाला.शब्द पार ओठापर्यंत येऊन पोहचायचे आणि मग त्यांना कळायचे की , बाहेर येण्याची गरज नाही.
   मग माझ्या लक्षात आले की, काहीवेळेस म्हणजे बहुतांशी वेळा मी उगीचच बोलत असते तेवढे बोलण्याची गरज नाही.बघा मौन होते त्यामुळे माझी निरीक्षण शक्ती वाढली.मला इतर लोक कसे बोलतात हे ही आठवले.लोकांचे चेहरे मी वाचू लागले.
    आपल्या अवतीभवती लोक सतत बोलत असतात. प्रत्येकाची बोलण्याची तऱ्हा वेगळी असते.कोणी इतके घाईत बोलतात   की, शब्दांचे पाय एकमेकांत अडकून ते एकमेकांवर आदळतात.समोरच्याला फक्त एक आवाज येतो बस.तर काहीजण एक शब्द आत्ता तर दुसरा शब्द एक की.मी. अंतर चालून झाल्यावर. मध्ये एक मोठी शांतता.तर काहीलोक माझ्याशी बोलत आहेत की समोरच्या सोफ्याशी मला कळत नाही.मग मी सोफ्यावर जावून बसले तर ते खुर्चीकडे पाहतात. ही माणसे कधीही डोळ्यात डोळे घालून बोलत नाही.काही लोक तर निष्कारण आपण खूप महत्वाचे आणि समाजाचे भले करणारे बोलत आहोत असे तावातावाने कपाळावर आठ्या पाडून बोलतात. काहींना फक्त सूत्र सांगायची सवय असते.आपण बाकी गणित सोडवत बसायचे.
    दहा दिवस मौनात रहाण्याचा मला खूप फायदा झाला.मी लोकांचे बोलणे अधिक लक्षपूर्वक ऐकू लागले.त्यावेळी मला जाणीव झाली की आपण खूप वेळा निरर्थक बोलत असतो.सोलापूरला आमच्या शेजारी होते,ते बोलत असतांना प्रत्येक दोन तीन शब्दा नंतर ,’काय आलं का लक्षात ? असं विचारायचे.माझ्या मुलाचे शिक्षक होते ते नेहमी ‘साधारणतः ‘ असे म्हणायचे.मुलगा लहान होता त्यालाही तशीच सवय लागली होती.काहीजण तर अरे व्वा! असं म्हणून आपल्याला गोंधळून टाकतात.
    मौनाने मला शहाणं करण्याचे व्रतच घेतले.आपल्यातलं क्षुद्रत्व समजण्यास मदत केली.आजूबाजूला शब्दांचे डोंगर उभे करणारी माझ्या सारखी सामान्य माणसे तरहोतीच पण  नेते मंडळी मोठ्या प्रमाणावर होती.खरच ह्या शब्दांचा प्रत्यक्ष कचरा झाला असता तर ?म्हणजे कागद, भाजीपाला,इतर प्लास्टिक,इतर नको असलेल्या वस्तू,ज्या आपण कचरा कुंडीत फेकतो तसा कचरा. जो जागा व्यापतो.अशी जागा शब्दाने व्यापली असती तर  आपल्याला रहायला जागाच राहिली नसती.आपण विनाकारण घरात, बस मध्ये, रस्त्यावर मधोमध गाड्या उभ्या करून,व्यासपीठावर,शब्द फेकत असतो.ते कितीतरी वेळा उपद्रवी,दुबळे आणि निष्क्रिय असतात.पण आपल्याला वाटते की आपल्या हालचालींनी त्यांना जिवंत करू.मग आपण जोरजोरात हालचाली करतो. नाहीतर त्या शब्दांवर जोर देतो आणि बोलत सुटतो.
   आपण ऐतिहासिक वास्तू पाहायला जातो तेव्हा तर बोलण्याचा अगदी कळस करतो. त्या वास्तूचा अनुभव न घेता आपली छाप त्यावर मारायला बघतो.तिथे बोलून गोंधळ माजवतो.खरं तर असं आणि इतकं बोलणाऱ्याला काही शिक्षा करायला हवी.म्हणजे न बोलण्याची वगैरे.
  मौनात असलं की निसर्गातील भाषा कळायला लागते.फुलणाऱ्या फुलात, हिरव्यागार वनराईत भाषेचे सौंदर्य लपल्याची जाणीव होते.ते आपल्या रंगाने,  गंधाने एकमेकांशी बोलतात.वारे  ही आपल्याशी बोलत असते.निसर्गाकडे  शब्द नाहीत पण आपण शांत असलो की आपल्याला कळते त्याला काय म्हणायचे आहे ते.पण तेवढा अवसर आपण स्वतः ला देत नाही आणि इतरांच्या अवकाशवरही आपण गोंधळ घालतो.
सण ,उत्सवाच्या वेळी तर विचारायलाच नको.मोठ मोठ्या आवाजात बोलणे, गाणी वाजवणे.त्याबद्दल कोणी चुकून काही म्हटले तर आमची अस्मिता लगेच दुखावते. काय असते ही अस्मिता? ती फक्त सण , उत्सव आणि त्या समाजातील थोर व्यक्तींच्या जन्म , मृत्यूदिनीच का असते? आपण रस्तावर आलो म्हणजे आपण काहीतरी करतो आहोत हे इतरांना सांगण्यासाठी आपण असे करतो का?आतून आपण सुधारत आहोत का?खरच आपल्याला अस्मिता आहे? एखादा सण, उत्सव,आपण डॉल्बीच्या कर्कश आवाजात जेव्हा साजरा करतो तेव्हा मात्र आपली माणसं काय म्हणत आहे हे ही जसं आपल्याला कळत नाही तसंच आपलं मन नक्की काय बोलत आहे हे ही ऐकू येत नाही.थोडं तरी शांत व्हा आणि दुसरं काय म्हणत आहे हे ऐका तरी .ही माझी विनंती आहे.’आवश्यक असेल तरच बोला.’आपण एकमेकांना समजून घेऊ या.


Thursday, March 10, 2016

शोध

  ज्या काळात ,ज्या समाजात , ज्या वर्गात, ज्या कुटुंबात आपला जन्म होतो त्यातून जगण्याकरता बरेच काही  मिळते. पण ते पुरेसे नसते. विशेषतः  सामाजिक आणि वैयक्तिक संक्रमण काळात त्याचा अपुरेपणा जास्त जास्त जाणवू लागतो. तो  जाणवल्यावर जी अस्वस्थता निर्माण होते  ती वाढता वाढता कधी ती तुमच्या आयुष्याला मुळापासून हादरा देते, अशावेळी तुम्हांला  चौकटीबाहेरचा आधार शोधावा लागतो. तो आधार कधी एखादी व्यक्ती असते, एखादी विचारप्रणाली असते किंवा एखादे पुस्तक असते. मग आपण त्या पुस्तकाला आपल्या मिठीत घेतो, आपलेसे करतो, सामावून घेतो. त्यातून मिळालेल्या नवीन उर्जेने प्रेरित होवून दुसऱ्या पुस्तकाचा शोध घेतो.
  अवघ्या विश्वाविषयी --- त्यातल्या सगळ्या बऱ्यावाईटा सकट ---आजही मला लहान मुलासारखी निरागस कुतूहलाची भावना टिकवून धरता आली आहे. त्यामुळे उत्सुकतेने आपोआपच वाचन होते.
     या वाचन आणि लेखनाने मला काय दिले याचा मी विचार करते तेव्हा लक्षात आले की, मी स्वतःच अंशाअंशाने स्वतःला मुक्त करायला शिकते आहे. अंतर्विरोधाशी मुकाबला करीत हे साधता आले तर पाहायचे.माझ्या मनात त्याबद्दल काय आहे याविषयी आज मी लिहित आहे.
      मी विवाहित स्त्रीवादी आहे.म्हणजे नेमके काय?तर दोन दिशांमध्ये माझी ओढाताण होते. एका बाजूला परंपरागत मुल्ये,संकेत,रीतीरिवाज ,आणि दुसऱ्या बाजूला स्त्रीवादी विचारप्रणालीशी असलेली माझी बांधिलकी- विश्वास म्हणू हवे तर.मला रीतीरिवाजांत एक प्रकारची सुरक्षितता ,स्वस्थता जाणवते.पण या रीतीरिवाजांनीच स्त्रीला दुय्यम नागरिकत्व दिले, ही गोष्ट आवडत नाही. मला पुरुषाशी असलेले दिर्घकालीन ,दृढ नाते आवडते,पण तिला कुणी ‘अर्धांगी’ म्हटले, की मला  आवडत नाही.पूर्ण पुरुष असतो, मग पूर्ण स्त्री का नाही?मला कुटुंब, कुटुंबातील विविध नात्यांनी आपल्याजवळ आलेली माणसे हवीशी वाटतात.इथे मला माझ्या स्त्री वादी  विचारांनी खूप मदत केली. माझी आई,बहीण,आत्या, मावशी काकू  आणि माझ्या सासवा, नणंदा ,जावा यांच्या कडे मी व्यक्ती म्हणून पाहायला शिकले.कोणाच्याही वागण्याचे विश्लेषण करतांना त्यांच्या आतल्या अंतर्विरोधाचा मी विचार करू लागले.आणि त्यातून मी त्यांना किती समजून घेऊ शकले ते माहित नाही पण मला स्वतःला समजून घेण्याच्या प्रक्रियेत मी अधिक सजग झाले.मग मात्र मला स्त्री वादा पेक्षा मानवतेची कल्पना अधिक व्यापक आहे, हे पटले.पण तरीही  माझ्या मनात प्रश्न येतो की,या जाणीवा बऱ्याच आधी झाल्या असत्या, तर त्यामुळे चित्र फार बदलले असते का? हे अंतर्विरोध नाहीसे झाले असते का? मला तसे वाटत नाही. कारण तो स्त्री जाणीवेचाच एक शाश्वत भाग आहे.मला वाटते आपल्याला मुळे ( रुट्स )हवी असतातच.पण त्या मुळांनीच जर करकचून बांधले ,तर म्हणजे A married feminist wants roots,but doesn’t want to feel rooted”. पण त्यातील अमुक बंधने नकोत, या भावनेतून तर विविध प्रकारचे अंतर्विरोध तयार होतात.

  तरीही प्रश्न राहतोच,मग याला मार्ग कोणता? मार्ग एकच. गुंता सोडवत राहायचे,आपले कुटुंबाशी, व्यवसायाशी, समाजाशी असलेले नाते शोधत राहायचे. समांतरपणे  शरीराशी- आणि फक्त स्वतःशी असलेले नातेही. कारण ते अधिक महत्वाचे. तो शोध लागत राहिला, तर मग फार ओढाताण होणार नाही. फार तुटल्यासारखेही वाटणार नाही. हा शोध घेणे सोपे नाही. त्यामुळे सापडलेले मार्ग नि:शंकपणे चोखाळणे हे ही सोपे नाही.हे ठाऊक असले, तरी थांबायचे नाही.मला वाटते शोधातूनच आपले दुभंगलेपण,गोंधळलेपण कमी होत जाईल. विरोधातून विकास साधत जाईल.जीवनाच्या या वाहत्या प्रवाहात आपणही अखंडपणे बदलत राहावे आणि अखेर कुठेतरी आपल्या ‘स्थायी’पणाला भिडावे. तसे कधीतरी घडेल या विचारानेच मी फार सुखावते, थरारून जाते.

Wednesday, February 3, 2016

. खरं स्वातंत्र्य


     “ स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायला तिला सांगा ‘असं मिलिंद  त्याच्या  डॉक्टरला सांगत होता.असं म्हणतांना तो सानिया  कडे बघत होता.नंतर तो  तिला म्हणाला की, “प्रेमाने  तुझी आरोग्याची काळजी घेण्यास  सांगणे हा माझा हक्कच आहे.” हे ऐकून पहिल्यांदा तिला बरे वाटले आणि नंतर तो तिला डॉमिनेट करत आहे असे तिला वाटले.जेव्हा ती अलेन ला त्याचे जेवण वेळेवर घ्यायला सांगा,असं डॉक्टरांना सांगायला सांगते तेव्हा तो तिचे हे त म्हणणे तो मान्य करतो.पण याऐवजी जर ती म्हटली की,’माझे वडील एवढे काम करायचे पण ते तुझ्या सारखे नव्हते.ते वेळेवर जेवायचे ,तू का वेळेवर जेवत नाही? तर मग अलेनचा  चेहरा हा सगळ्या शहरात लांबोडा होतो.त्याला वाईट वाटते.
   आपण आपल्यावर लागलेली लेबलं स्वीकारू शकत नाही,हाताळू शकत नाही.त्या शिक्कां बरोबर आपला  अहंही गुंतलेला असतो.ते आपल्या  मनाच्या जवळ जातात.लेबल लावून  जे बोलले जाते ते फारसं चांगलं नसतं.म्हणून तर आपण लहान मुलांना लेबल लावू नका असं सांगत असतो.
  जर आपण आपल्या जोडीदाराला हे सांगितलं,” हिरव्या पालेभाज्या तुझ्यासाठी चांगल्या आहेत” तर तो त्या घेईल. त्या ऐवजी जर आपण  म्हणालो की,” पूर्ण शाकाहारी असल्या कारणाने मी तुला सुचविते तू पालेभाज्या खायला सुरुवात करावी” तर तो तुमच्याशी वाद घालेल.लेबल “शाकाहारी” अडचण उभी करते.
   जर आपण  म्हटलं,” क्षमा कर ज्यांना ,ज्यांनी दुखावले आहे त्यांच्यावरही प्रेम कर”तुमचे हे म्हणणे तो मनावर घेईल.पण जर आपण त्याला  सांगितलं,” खरी धार्मिक  म्हणून मी तुला  विनंती करते  की, त्या व्यक्तीला  क्षमा कर आणि शत्रूवर सुद्धा प्रेम कर” तर मग तुम्ही त्याचा लगेच शत्रू व्हाल. “धार्मिक  “ या लेबल मुळे समस्या निर्माण होईल.
   आपण आपल्या पत्नीला /जोडीदारणीला म्हणालात की ” आपली विमानतळ सुद्धा व्यवस्थित व्हायला हवीत” ती हे  म्हणणे मान्य करेल.पण जर तुम्ही तिला सांगितलं की,” सिंगापूरला राहतो आहे म्हणून  मला माहित आहे की विमानतळ किती व्यवस्थित असू शकतात ते.मला असे वाटते की आपलेही विमानतळ हे तसेच व्हायला हवे होते” आणि अशावेळी तुम्हांला देशा बाहेरचे समजले जाते.
    हा मानवी स्वभाव आहे.माणूस जेव्हा लेबलांना धैर्याने सामोरे जातो तेव्हा ,त्याच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही.पण जेव्हा तो बचावात्मक पवित्रा घेतो तो स्वतःला सिद्ध करत राहतो. लेबल आपल्याला आपल्यात काही कमी आहे अशा भावनेचे दुःख देतात.
        आपल्याला  लेबलची काय गरज असते? एखादी विशिष्ट जागे मुळे/पदामुळे आपला  गौरव होती की आपल्या  मुळे त्या पदाचा गौरव होतो?खुर्चीला आपली  गरज आहे की आपल्याला  खुर्चीची गरज आहे?जर विशिष्ट लेबल मुळे आपण  ओळखले जाणार असू  तर त्या शिवाय आपण  काहीच करू शकणार नाही.जो लेबलच्या सहाय्याने जगतो त्याचे नातेसंबंध हे खोलवर नसतात.जर आपण  त्या लेबलला काही मूल्य दिलं तर आपल्याला  लेबलची गरज भासणार नाही.मग ती एक चांगल्या नातेसंबंधाची सुरुवात होईल.
    एक माणूस गुरु कडे आला,आणि म्हणाला,गुरुजी मला तुमचा शिष्य करून घ्या”त्यांनी विचारले,तू कोण आहेस? त्याने त्याचे नाव सांगितले,ते म्हणाले,”अरे हे तर तुझे नाव आहे,”मग त्याने सांगितले की मी व्यावसायिक आहे” तो तर तुझा उद्योग आहे,गुरुजी म्हणाले.ते सोडून तू कोण आहेस ते सांग ?तो म्हणाला,” मी पुरुष आहे” ते तर तुझं लिंग आहे” ते सोडून तू कोण आहेस ते सांग? तो म्हणाला,” गुरुजी मला माहित नाही मी कोण आहे ते? यावर गुरुजी म्हणाले,हे योग्य आहे,आता खरी सुरुवात होवू शकेल.जेव्हा तुम्ही तुमची सगळी लेबल टाकून देतात आणि तुमचे तुम्ही असतात तेव्हा शोध घेण्यास सुरुवात करू शकतात.तुमचे व्यवसायाचा उपयोग एखादा पुजाऱ्याकडे होवू शकतो.
  स्वतःला आणि इतरांना सुद्धा त्याचे लेबल टाकून देण्यास मदत करायला हवी.आपण आपले .असणे  पुरेसे असतो.हिच  प्रत्येक गोष्टीची सुरुवात आहे.जेव्हा आपण आपले  पुरेसे असतो  तेव्हा त्याला स्वातंत्र्य म्हणतात,खरं स्वातंत्र्य.


Thursday, December 10, 2015

दुपार


    “दुपार” कसा वाटतो हा शब्द?.असं मी बस मधल्या माझ्या शेजारणीला  विचारलं , तर तिने (स्वतःच्या ) कपाळावर( स्वतःच ) आठ्या आणल्या आणि  माझ्याकडे पाहिले. त्यामुळे मला समजले स्वनिर्मिती (आठ्या )ही अशी एक गोष्ट आहे जी आपल्या आतच असते. तिच्या उस्फुर्त निर्मिती कडे पाहून क्षणभर मला तिचा हेवा सुद्धा वाटला. वाटल की चित्रकलेच्या वर्गात “दुपार” ची चित्रनिर्मिती करण्याच्या विषय न देता हा सोपा विषय दिला असता तर? पण “आठ्यांचे “चित्र काढणे हे कपाळावर आठ्या आणण्यापेक्षा काहीसे अवघडच आहे. पण तरीही तिच्याजवळ दुपार होती आणि तिने मला तिच्या पद्धतीने दाखवली.मी तिला मनापासून धन्यवाद दिले.कारण तिच्यामुळे मी दुपार कोणकोणत्या रुपात पाहू शकते हे मला कळले.
   एरवी “दुपार “ या नैसर्गिक घटनेकडे मी शब्द म्हणून पाहत होते. कधी कधी तिच्यापासून जो त्रास होत असे त्याचे वर्णन मी शब्दात करत असे.पण त्याचे  चित्र माझ्या दृष्टीने  पाहिले नव्हते. म्हणून वहिनीने जेव्हा  चित्रविषय “दुपार” सांगितले तेव्हा माझ्यापुढे आला “टळटळीत “हा शब्द,नंतर कडकडीत,शांत,भकास,दुपारची ही  शाब्दिक विशेषणे आणि वर्णने माझ्या अनुभवांना धरून येत होती.पण ती तेवढीच पुरेशी नव्हती.अर्थात काहीशा प्रयत्नाने ती अप्रतिम अशी जमली असती.पण त्या दुपारच्या अनुभवाचे वर्णन जे मी शब्दाने उभे करू शकत होते ते मी स्वतःच्या हाताने  चित्र काढण्यासाठी  मी पाहिले नव्हते. याची स्पष्ट जाणीव मला झाली.मग हळू हळू हे ही कळले की  त्यांच्यातले रंग मी बघितले नव्हते. त्यांच्या शाब्दिक रंगाचा खेळ माझ्या आसपास होता पण त्यातले आकार आणि रंगाचे खोल स्तर तर मी अनुभवलेच नव्हते.मी दुपार या शब्दाच्या चित्राला घाबरले होते. आपण उगीच यात पडलो असे वाटायला लागले होते कोणाला विचारावे तर ते ही शक्य नव्हते.पण आशा माझा हात कधी सोडत नाही म्हणून लगेचच मनात विचार आला ,आता  पडलोच आहोत  तर जसे जमेल तसे पूर्ण प्रयत्नांशी करून बघू. एका चित्रासाठी मी माझ्या विचारांचा लंबक नाही पासून हो पर्यंत जोरजोरात फिरवत होते. शेवटी तो हातात धरून मी म्हटले स्वतःशीच “मला हे चित्र काढायचे आहे” असं म्हणतांना मला स्पष्ट जाणीव होती की ,’माझ्या बोटात अजून ती जादू नाही”चित्र काढायला मी शिकत आहे.चित्र काढण्याचे जेव्हा ठरवले तेव्हा दुपार माझ्या समोर वेगवेगळे रंग घेवून  येवू लागली.म्हणजे तिला रंग होते पण मी आज तिच्याकडे अधिक सजगतेने बघत होते.
     दुपारी बस पुलाखालून जात होती ,त्यावेळी मला कळलं की यावेळी रस्त्यावर गर्दी नसते आणि पुलाखाली काही माणसं बिनधास्त डुलकी घेत होते.. गाड्यांचे आवाज येत होते ,अंगावर धूर आणि धूळ दोन्ही उडत होते पण ते गाढ निद्रेत होते.आज आत्ता मला या सगळ्याचे एका विशिष्ट चौकटीतले चित्र दिसत होते.कुठून कसे चित्र पाहायचे, ते आपल्याला कोणत्या चौकटीत बसवायचे आहे आणि ती चौकट आपल्याला झेपणार आहे की नाही हे सुहास वहिनी जे क्लास मध्ये सांगत असते ते आताशा जरा कळू लागले होते.पण हे एवढेच पुरेसे नव्हते. त्याच्या पुढचा प्रवास मला घाम आणणार होता.असंच मला वाटत होते.
    दुपारच्या वेळी बसमधून उतरतांना फारशी घाई नसते. आम्ही सावकाशपणे गाडीतून खाली उतरत होतो.रिक्षा निवांतपणे उभ्या होत्या.काही रिक्षावाले आपापल्या रिक्षेत झोपले होते.फळ विक्रेता संध्याकाळची तयारी करत होता.तो फळं वैशिष्ट्यपूर्णरीतीने मांडत होता. त्याची बायको पाण्याची बादली आणून ठेवत होती.तिच्या अंगावर चमचमणारी डोळ्यात भरणारे रंग असणारी साडी होती. तिच्या कपाळावर सिंदूर होता. तो उन्हामुळे काळपट झाला होता आणि ओघळत होता.आजची दुपार मला हे काय दाखवत होती.माझंच मला आश्चर्य वाटत होते.
      रस्त्यावर एका घरा शेजारी असणाऱ्या झाडाच्या आडोशाला मुली सागरगोटे खेळत होत्या.वर उडणाऱ्या सागरगोट्या कडे त्यांचे आशेने बघणे आणि त्याच बरोबर हातात अचूक पकडण्याचे त्यांचे कसब मला मोहवून टाकत होते.मी मनातल्या मनात त्या खेळात भाग घेतला तर सागरगोट्या बरोबर मी ही वेगळ्याच विचारात गुंतले आणि शेवटी त्या  हाता बाहेर पडल्या .या दुपारीने मला अगदीच शहाणे करून सोडायचे ठरवले की काय?कोणाला कधी आणि कसे शहाणपण येईल हे काही आपल्या हातात नसते.ओट्यावर बायका गहू चाळत होत्या.नेहमीचे दळण असणार हे. गप्पा मारत मारत काम चालले होते.थोडे पुढे गेल्यावर केस विंचरणे आणि उवा काढण्याचे काम मन लावून चालले होते. आमच्या कॉलनीत पाण्याची लगबग चालली होती.कोणी हिरामणशी बोलत होते तर कोणी बागेला पाणी घालत होते.कोणी टाक्या भरत होते.अजून रस्त्यावर पाणी आले नव्हते.
   रिक्षाचा भोकाड पसरल्या सारखा आवाज आणि धूर दिसत होता. शाळेतील मुलं घरी आनंदाने आली होती.रिक्षेत भरपूर मोकळी जागा होती.पण मला फक्त रिक्षावाल्याचे पाय दिसत होते.लांबसडक पायाचा तळवा.घोट्यापर्यंत दिसत होते. त्याचा चेहरा मला दिसलाच नाही.अचानक मला अशा लांबसडक अनवाणी पायांची आठवण झाली.पंढरपूरला मी हे पाय पाहिले आहेत, एका दुकानदाराच्या दुकानात त्यांची फ्रेम होती. हो ते हुसेन साहेबांचे पाय होते.हुसेन साहेब पंढरपूरचे आहेत.त्या माणसाचा त्यांच्यावर पार जीव होता.

  अशी ही दुपार मला हुसेन साहेबांचा साक्षात्कार घडवणारी.मला तर मजा आली. हे मी आज म्हणते आहे कारण उद्या माझ्या समोर काय आव्हान आहे हे मला माहित नाही.

Wednesday, September 16, 2015

पेरते व्हा.

                                  







  गेल्या तीन महिन्यांपासून रोज सकाळ संध्याकाळ “ पेरते  व्हा” चा गजर होत आहे. पानांच्या आडून तो सारखा ओरडत असतो म्हणून त्याला शोधत अनेक झाडांना  दुर्बिण लावली.मग दुर्बिणीपेक्षा स्वतःच्या डोळ्यावरचा विश्वास अधिक वाटला म्हणून ती बाजूला ठेवली आणि डोळे ताणून ताणून त्याला शोधलं.तर तो पानांच्या गर्दीत लपून आपलं काम करत होता.हो खरच तो “पावशा” होता.सगळ्यांना “पेरते व्हा” ची हाक देण्याचे काम पोटतिडकीने करत होता.त्याला बघून माझ्या डोळ्यात खरं तर पाणीच आलं. खूप दिवसापासून त्याला शोधत होते.आजूबाजूला चाललेल्या या गोंधळात त्याचीच हाक जणू मला वाट  दाखवत आहे  असंच वाटते . तो आहे आणि काहीतरी चांगलं पेरायला सांगत आहे हे ऐकून तर मन खुश होत होतं.वाटायचं हाच एकमेव असा आहे की ज्याला कोणत्याही अभिनिवेशा शिवाय काहीतरी चांगलं पेरायचं आहे.मन हलकं झालं, आणि त्याच बरोबर मनाला  वस्तुस्थितीची करकरीत जाणीव झाली.
    हो जून महिन्यापासून पावसाळा सुरु झाला पण पाउस काही नीट पडला नाही.रस्ताही ओला झाला नव्हता.कुंडीतली झाडे सुद्धा वरून दिलेल्या पाण्यात खुश नव्हती त्यांना रिमझिम सरीच हव्या होत्या.विहिरीतल्या पाण्यावर लावलेला सोयाबीन सुद्धा वर तोंड करून बसला होता.पण पाउस रुसलाच होता.तो भरून येत होता पण हट्टीपणे तो ढगांचा हात सोडत नव्हता. जणू खाली आल्यावर आम्ही त्याला खुशाली विचारणारच नव्हतो.त्याची ठेप ठेवणार नव्हतो.असं वाटत होतं का त्याला?की तो यावा असं आम्हांला वाटत नाही अशी आमची वागणूक होती.खरंतर सगळेचजण मनोमन सारखी त्याची आराधना करत होते पण तो कोणत्याही प्रार्थनेला फसायचं नाही असंच जणू ठरवत होता. वर्षोनुवर्षे आम्ही जे वागत आहोत त्याचं फळ तो अशारीतीने आम्हांला देणार होता.   
 पाउस असा हट्टीपणा करत होता आणि पावश्याही  हट्टीपणे “पेरते व्हा” असं सारखं सांगत होता.बी पेरण्यासारखी परिस्थिती नसतांना हा आणखी काय पेरायला सांगत असावा कोण जाणे? अर्थात सगळीकडे अनेकजण विशिष्ट चौकटीत असणारी आपली ठाम मते   आपल्या परीने पेरत  आहेत .,पण त्या सगळ्या विचारांचा सर्व सामान्य माणसाला उपयोग  होईल का? की त्रास होईल.?विरोधी मते असणारी माणसे एकमेकांच्या मतासाठी किंचितशी तरी जागा देतील का?थोडं वेगळ्या वाणाचे बी पेरून बघतील का? असा विचार कोणी करत असेल का?तो त्यांनी करावा हेच तर पावशा सांगत आहे असं मला वाटतं.एवढ्या मतमतांतरे असलेल्या समाजात तो फक्त “पेरते व्हा” ची हाक देतो आहे हेच खूप सकारात्मक आहे. असे मला वाटते.
    
    

   

Sunday, July 12, 2015

अनुभवांना स्मृती असतात पैशांना नाही .


   आपल्याला  आपल्या  शिक्षणासाठी किती पैसे लागले हे माहित नसतं,पण आपल्या  शाळेतील आणि कॉलेजमधील आठवणी आपण  आयुष्यभर काढत असतो .आई वडिलांच्या  दवाखान्यासाठी किती पैसे खर्च झाले हे आपण  काही दिवसांनी विसरून जातो ,पण आई वडिलांच्या  चैतन्यदायी आठवणी नेहमी आपल्याला  आठवत असतात,किंवा आपल्या  तान्हुल्याचा जन्म आणि त्या संबंधित आठवणीना आपण  जीवनभर उजाळा देत असतो .आपल्या  हनिमून साठी किती खर्च झाला हे आपल्या  लक्षात रहात नाही पण आपल्या  शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला एकमेकांबरोबर काढलेले ते सुंदर दिवस आठवत रहातात.पैशांना आठवणी नसतात तर अनुभवांना त्या असतात.
   चांगला –वाईट काळ,समृद्धीचा आणि गरिबीचा काळ,भविष्य सुरक्षित असण्याचा काळ आणि उद्या काय  वाढून ठेवलं आहे हे माहित नसण्याचा काळ,जीवन एखाद्या  चक्रीत बसलो आहे असं वाटण्याचा  काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो .जीवन विपुलतेने भरलेले आणि काहीच नाही असे असले तरी शेवटी काय उरते तर तेव्हा घेतलेल्या अनुभवांच्या आठवणी.काहीवेळेस खिसा पूर्ण भरलेला असतो तर काहीवेळेस पूर्ण रिकामा.काहीवेळेस पुरेसा पैसा असतो  तरी आपण  चिडचिड करतो . काहीवेळेस पुरेसा पैसा नसतो तरी आपल्या  चेहऱ्यावर स्मित असते.आज आपण  मागे वळून पहिले तर आपण  एकमेकांबरोबर बसून किती हसलो याची आठवण काढली तर आपल्या  डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू येतील आणि आपण  एकटेच बसून किती रडलो  हे आठवलं तर आपल्या  चेहऱ्यावर स्मित येईल.या सगळ्यामध्ये जीवन आपल्याला  आपला  स्वतःचा इतिहास निर्माण करण्याचा अनुभव देते आणि त्या आठवणीनी आपले जीवन भरून जाते आणि त्या नेहमी आपण  आठवू शकतो .
   प्रथम आपण  कोणाच्या मदतीशिवाय सायकल चालवायला शिकलात......,कोणाच्या मदतीने गाडी शिकलात ?
  आपल्याला प्रथम कोणी मैत्री साठी प्रथम विचारले?
आपल्या  मुलाचे पहिले रडणे,पहिलं पाउल,पहिला शब्द,पहिला पापा.....
आपल्या  पालकांनी आपल्याला  दिलेली पहिली भेट आणि आपल्या  मुलाने/मुलीने दिलेली पहिली भेट....
  आपलं  पहिलं बक्षीस, लोकांनी  पहिल्यांदा स्वीकारलं तो दिवस,आपला  स्टेज वरचा पहिला कार्यक्रम.....
ही यादी न संपणारी आहे...अनुभवांच्या आठवणी ह्या कालातीत असतात.
हे कोणी नाकारू शकत नाही की कोणत्याही गोष्टीसाठी पैसा लागतो.पण वस्तुस्थिती हीच शिल्लक राहते की त्या अनुभवासाठी किती पैसा खर्च झाला हे विसरले जाते पण तो अनुभव नाही,कधीच नाही.
   आर्थिक मंदी आली तरी त्याने काय होते?येवू द्या.पण आपल्या  जीवनाच्या गुणवत्तेत मंदी यायला नको . त्यामुळे कदाचित आपण आपल्या पालकांच्या काही इच्छा पूर्ण करू शकणार नाही .  पण काही नक्कीच पूर्ण करू शकू . आपण आपल्या   मुलाला पर्यटन स्थळी नेवू शकणार नाही पण स्थानिक बागेत नेवून त्याच्या बरोबर खेळू शकाल ना?पैशामुळे या सगळ्यांची किंमत कमी होणार आहे असं नाही किंवा तुमच्या बाळाला तुमच्या मांडीवर घेतल्याने त्याची किंमत कमी होणार नाही.मंदीच्या काळात  ,ज्ञान विकसित करा,आध्यात्मिक वृद्धी करा या सगळ्या गोष्टी काही पैशावर अवलंबून नसतात.
  काळा बरोबर आर्थिक स्थिती सुधारेल..चलनाला किंमत येईल.या सगळ्या काळात आपण  मागे वळून पहिले तर आपण  काहीच केले नाही केवळ खिन्नतेने लोळत पडलो  असं व्हायला नको.मंदी मुळे आपल्या  कडे पैसा येणार नाही,पण अनुभवांची कमी असणार नाही.जे आपल्याकडे  आहे त्याने आपण  आनंदी होणार नसू  तर आपल्या  कडे कितीही असले तरी आपण  आनंदी होवू शकणार नाही.
   मला कसं आणि काय वाटतं आहे हे माझ्याजवळ किती आहे यावर अवलंबून नाही हा जीवनाचा विचार असेल तर मस्त जगू आपण.


Sunday, May 10, 2015

असाही एक रस्ता रोको.











    सकाळी/पहाटे फिरायला जाशील तेव्हा छत्री घेऊन बाहेर पड.एक सल्ला. आमच्या कॉलनी ही एक अखंड सल्लागार मंडळ आहे. इथे तुम्हांला कशावरही आणि कोणीही सल्ला देवू शकते.प्रत्येकाच्या क्षमता अप्रतिम आहेत. अर्थात त्याबद्दल परत नंतर कधीतरी.
  छत्री?उद्या पाऊस पडणार आहे का?
नाही.पण ती आवश्यक आहे.
एकतर  पावसाळ्यात सुध्दा माझी छत्री मला सापडू नये अशी मी ठेवलेली असते आणि भर उन्हाळ्यात मी ती  नी ईइ ट ठेवलेली छत्री कशी सापडणार.?पण माझं छोटंसं दुःख मी कोणाला सांगायचा प्रयत्न करत नाही.
तर छत्री का?
आमच्या घरासमोर च्या आंब्यावर कावळ्यांनी घरटी केली आहेत. काही दिवसांपूर्वीच सामुदायिक सोहळा झाल्याचे मला आठवले. कारण एका घरट्यात कावळा किंवा कावळी आपल्या घरट्यात बसली होती आणि त्यांचे बांधव अभिनंदन करण्यास मोठ्या संख्येने जमले होते. मुल जन्माला येण्याचा आनंद ते कॉलनीत प्रचंड कावकाव  करून साजरा करत होते. कदाचित ते हे माणसांकडूनच शिकले असतील. ती नाही साधा सत्यनारायण ,वाढदिवस असेल तरी मोठा भोंगा लावून गाणी ऐकवतात.
    त्या आंब्याच्या झाडावर चार पाच घरटी असतील, त्यामुळे आम्ही झाडाखालून  जात असतांना ते सगळे जण जोरजोरात ओरडायचे.नंतर आम्ही आमच्या डोक्यावर एक काडी, जाड काडी.मोठी काठी असे अनुक्रमे कावळ्यांच्या जोरा नुसार घेऊन जावू लागलो. चालतांना काठी डोक्यावर घेऊन हलवायची.म्हणजे कावळा आमच्या डोक्यापर्यंत यायचा नाही.तरी घाबरून आम्ही पळत पळत ती जागा पार करत असू. ज्या लोकांना माहित नव्हते त्यांना कावळ्यांनी टोच्या मारल्या. काहींना त्यांची चोच डोक्याला जबरदस्त लागली,त्यामुळे जखम झाली. कॉलनीतले काहीजण तर घमेले डोक्यावर घ्यायचे,काहीजण कुंचा घ्यायचे.असे आम्ही सगळेजण छत्रपती होत होतो .
   आम्ही गच्चीतून दुर्बीण घेऊन पाह्यचो कावळ्यांच्या  घरट्यात पाह्यचो  तर ते आमच्या भोवती कलकलाट करायचे.आम्हांला पाह्यचे होते की, खरच कोकिळा त्या घरट्यात अंडी घालते का?पण कावळ्यांना त्यांच्या खाजगी प्रश्नात लक्ष घातलेले आवडत नव्हते.ज्यांच्या अंगणात आंब्याचे झाड होते त्यांना तर घराबाहेर, गच्चीवर सुद्धा जाणे मुश्कील झाले होते. त्यांनी कावळ्यांना कितीही हाकलायचा प्रयत्न केला तरी ते मुळीच दाद देत नव्हते. शिवाय घरातील काही सदस्य कावळीण व तिच्या पिल्लांच्या बाजूचे होते.कॉलनीत एक शाळा आहे, त्या शाळेच्या भिंतीवर अनेकजण कोणी पाहत नाही असं बघून भात,पोळ्या ठेवत होते. त्यामुळे कावळ्यांची खाण्यापिण्याची सोय झाली आणि सगळ्या कॉलनीभर खरकटे सांडू लागले.आपल्या घराच्या स्वच्छते इतका बाहेरचा परिसर काहींना महत्वाचा वाटत नाही. तरी ग्रामपंचायतीने कचरा टाकण्याची उत्तम सोय केली आहे.पण तिथ पर्यंत जाणे लोकांना आवडत नसावे.तर कावळे-कावळीण चांगली धष्टपुष्ट झाली ,त्यांची बाळही अंड्यातून बाहेर आली .त्यामुळे तर आवाजात आणखीनच वाढ झाली.कावळ्यांनी मग त्या झाडा खालून कुत्री ,मांजरे, डुक्करे आणि माणसं जाण्यास मनाई करणे सुरु केले म्हणून ती छत्री.
  मी छत्री घेऊन गेले तर कावळ्याने छत्री वर हल्ला केला. बाळाची सुरक्षा सर्वात महत्वाची होती.पण त्यामुळे सगळीकडे त्यांची दहशत पसरली होती. शाळेची लहान मुले धावत पळत जीव मुठीत घेऊन शाळेत जात होती. आधीच ती लांबून पायी चालत येत आणि या कावळ्यामुळे अजून लांबचा रस्ता त्यांना धरावा लागत असे.

     एक दिवस कसे ते माहित नाही पण कावळ्याची पिल्ले झाडावरून खाली पडली आणि सगळा कावळा समाज रस्त्यावर येऊन उभा राहिला. मग त्या रस्त्यावरून गाड्या जाणे मुश्कील झाले. गाडीवाल्याच्या पाठी २०-२५ कावळ्यांचा समुदाय लागे, त्यामुळे तो गाडी चालवू शकत नसे. एकजण तर गाडीवरून पडला, त्याने तोंड आणि डोळे झाकून टाकले म्हणून ते कसेबसे वाचले पण त्या माणसाच्या डोक्याला जबर जखमा झाल्या.कावळे कुत्र्यांवर चोची मारू लागले.दिवसभर असं काही ना काही होतच होते.पण त्या दिवशी अचानक पावसाचे खूप भरून आले,अंधार झाला तसा कावळ्यांचा आवाज शांत झाला. मधून मधून ते रस्त्यावर आहेत याची जाणीव करून द्यायचे.पण पावसामुळे रहदारी कमी झाली होती.रात्र झाली तसे सगळ्याचेच तिथले लक्ष कमी झाले. जो तो आपल्या घरच्या चौकटीत आणि टीव्हीच्या चौकटीत नेहमीपेक्षा वेगळ्या दुनियेचा आस्वाद घेत झोपी गेला.

     सकाळी मैदानावर जाण्यासाठी बाहेर आले तर झाडाखाली दोन्ही पिल्ले मेलेली होती.ती पावसाच्या पाण्याने मेली होती की गाडीच्या धक्क्याने हे कळायला मार्ग नव्हता.बाळांचे आई वडील हताशपणे त्यांच्याकडे पाहत होते. आपल्या बाळांसाठी त्यांनी जीवाच्या परीने सगळे केले होते.पण निसर्गाच्या पुढे आणि सत्ते पुढे त्यांचे काही चालले नाही. सांत्वन करायला सगळेजण पुढे होते, त्यात चढाओढ लागली होती पण त्यासाठी ठोस कृती कोणीच करायला आले नाही. कारण सत्ता कोणाच्या हातात आहे आणि त्याचे श्रेय कोणाला मिळणार हे नक्की होत नव्हते. माणसांच्या रास्तारोको सारखाच हे ही आंदोलन त्यांना गुंडाळावे लागले.  

Monday, April 27, 2015

व्यक्त होण्याचा सुंदर मार्ग


  आपल्याला सगळ्यांनाच चित्र काढायची, गाणी म्हणायची खूप हौस असते. लहानपणी काहींची कमी अधिक प्रमाणात ती पूर्ण होते. ज्यांना घरून चांगला पाठींबा मिळतो आणि कला जोपासायची संधी मिळते त्या व्यक्ती पुढे त्या त्या कलांमध्ये नावही कमावतात.पण आपल्या सगळ्यांनाच रंग पाहिले की त्यांचे काहीतरी सुंदर करावे असे वाटते.मग मुलांच्या हातातच असे रंग,ब्रश आणि भिंती सारखा मोठा कॅनव्हास मिळाला तर? मुलं  खूप खुश होतील.असा अनुभव सोलापूर येथे  बालभवनच्या मुलांनी घेतला.
   मुलांनी एक संपूर्ण भिंत आपल्या विविध कलाकृतींनी सजवली.प्रत्येकाने आपल्या भावविश्वाला जवळचे चित्र काढले,त्याला हवा तो रंग दिला. सूर्य,डोंगर,फुले,पाने, मांजरे,उंदीर,घर,झाडे,कार्टून,असा सगळ्यांचा समावेश असलेली ती भिंत म्हणजे आम्हांला व्यक्त व्हायचे आहे ही  सांगणारी हाक आहे. मुलं जेव्हा चित्रे काढत होती तेव्हा ती सगळ्या गोष्टींचे भान विसरली होती. त्या रंगाची ,चित्रांची झाली होती. मला तर कळले की एक लहान दीड- दोन वर्षाची मुलगी तर आपले भावंड चित्र काढत आहे हे पाहून स्वतः चित्र काढायला पुढे झाली. तिच्या हातात रंग आणि ब्रश दिला तेव्हा ती मनापासून त्यात रमली. चित्र काढून एक हात दुखायला लागला तर दुसऱ्या हाताने कामाला सुरुवात केली.कोणी तिला मागून विचारले की तू काय काढतेस? तर त्या व्यक्ती कडे एक दृष्टी टाकून त्या मुलीने आपली चित्र काढायची जागा बदलली.कामात कोणताही व्यत्यय तिला  मंजूर नव्हता.
  आपण नेहमीच म्हणतो की मुलं मन लावून काही करत नाहीत पण ती जेव्हा मन लावून काम करतात तेव्हा आपणच त्यांना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडत असतो.मुलं एखाद्या गोष्टीत मग्न असतील तेव्हा आपण मोठी माणसं त्यांना म्हणतो,’चला आता उठा, दुसरं काही तरी  करा, किंवा आता झोपायची वेळ झाली किंवा आता हे करा आणि ते करा. का आपण असं वागतो?विचार करायला हवा ना? ही मुलं कसं शोधणार त्यांना काय आवडत ते? ती कशात रमतात हे त्यांचे त्यांनाच कळायला हवे ना? मग आपण तशी संधी त्यांना द्यायला हवी नाही का?
         सोलापूर येथे बालभवनने  अशी संधी मुलांना दिली.पण आपण सगळ्यांनी ठरवले तर अशी सुंदर चित्रे काढायची संधी मुलांना देवू शकतो. आपला बंगला असेल तर त्याची कंपाऊंडची भिंत असेल, सोसायटीची  भिंत असेल ,त्या त्या भागातल्या मुलांना गोळा करून त्यांचा सुट्टीचा काळ मजेत आणि सर्जनशिलतेत त्यांना घालवता येईल.आपण काढलेली चित्रे रोज बघतांना मुलांच्या मनावर आपोआपच परिसर नेटका ठेवण्याचा संस्कार होईल. काय हरकत आहे असे बालभवन सोसायटी सोसायटीत आपापल्या पातळीवर निर्माण झाली तर?माझ्या डोळ्यासमोर एक आख्ख शहरच अशा चित्रांनी रंगल्याचे दिसत आहे.मग आपोआपच कोणता रंग कोणत्या समाजाशी जोडला गेला आहे हे विसरायला होईल आणि त्या रंगाची खरी मजा घेता येईल.आपण भाषा,प्रदेश,कपडे,आणि रंगाची फार विभागणी केली आहे. ती आपली व्यक्त होण्यातल्या  उदारतेला मर्यादा आणते.पण ही मुलं रंगाचा रंग म्हणून वापर करतील. त्यात सगळेजण समान असतील आणि एकमेकांचा मान ठेवतील आदर करतील.आपले मत वेगळे आहे हे सांगण्यासाठी हातात दगड,बंदुक,घ्यावे लागत नाही हे त्यांना कळेल.चित्रासाठी ,सुंदर चित्रासाठी, कलेसाठी सगळ्या रंगाची तेवढीच गरज आहे हे त्यांना आपोआपच कळेल.कोणताही एकच रंग हे जग सुंदर करणार नाही. सगळ्यांना एकमेकांचा हात धरला तर आनंदाने फेर धरता येईल.हा विश्वास त्यांना ही चित्रे देतील.

   एखाद्या शहरात मुलांनी चित्रे काढावी म्हणून त्यांना आख्खी भिंत मिळावी या सारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही.ही भिंत सोलापूर मधील संगमेश्वर महाविद्यालयाने बालभवनच्या मुलांसाठी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचेही कौतुक आहेच. समाजातील सगळ्यांनीच मुलांसाठीच्या कामात आपापला सहभाग नोंदवला की निरोगी ,परिपक्व समाज घडण्यास फारसा उशीर लागणार नाही.मुख्य म्हणजे अशा समाजाची ,ज्यात एकमेकांना व्यक्त होण्याची संधी मिळते आणि दुसऱ्याचा मताचा आदर केला जातो अशा वातावरणाची आपण सगळेचजण  खूप वाट पहात आहोत.अर्थात असा समाज  आपल्या वागणुकीतून आणि दुसऱ्याला व्यक्त होण्यास किती संधी देतो यावर अवलंबून आहे.त्यासाठी आपल्याला सगळ्यांनाच प्रयत्न करायची गरज आहे. पण मुलांचे हे चित्र मात्र माझ्या मनात खूप आशा निर्माण करत आहे.

Friday, March 27, 2015

“आला वसंत आला “




“अग आज आता  पहाटे मी मिस्टर कोकीळ यांचा आवाज ऐकला “पहाटेच चार वाजता फोनवरच हा आवाज ऐकून माझ्या लक्षात आले की ,कालच मी दिलेल्या माहितीचा कोण कसा वापर करेल हे मला सांगता येणार नाही. वसंतातील कविता वाचनासाठी आम्ही जमलो होतो.मी सहज सांगतिले की खूप कवींनी कोकिळा  वसंतात गाते असे वर्णन केले आहे पण खरं म्हणजे कोकीळ गात असतो. कोकिळेचा आवाज हा अत्यंत कर्कश असतो.तिला गाता येत नाही. काहीजणांसाठी ही माहिती नवीन होती. त्यांनीच मला मिस्टर कोकीळ गात आहे हे आनंदाने सांगितले . त्याच वेळी माझ्या डोळ्यासमोर सुटाबुटातला आणि त्याला अनुरूप असा टाय घातलेला कोकीळ आला. तो बाजूच्या शांततेचा अदमास घेत ,कोणाची झोपमोड होणार नाही ना असा नवीन जगाचा कानोसा घेत गात आहे. भरीला त्याने काळ्या फ्रेमचा चष्मा घातला आहे हे ही दिसले.
   तर मि.कोकीळ यांचा आवाज जेव्हा मी ऐकला तेव्हाच  माझ्या मनाने  मान्य केले की ,आला वसंत आला.” एवढ्या शांततेत तुझा मधुर  आवाज वसंताची चाहूल देतो तेव्हा आपल्यालाच नवीन पालवी फुटत आहे असा भास व्हायला लागतो.खरंतर बागेतला आंबा कधीच मोहरला होता पण तुझ्या सादे शिवाय त्या मोहराच्या सुवासाला सुद्धा मी नकार देत होते.तुझी ती गोड साद ऐकून आंब्याला  आपण मोहरलो याचे सार्थक झाले असे वाटले असेल. हो तसा सार्थकतेचा श्वास सोडल्याचे मी ऐकले. पहाटेच्या अशा आपणच आपल्या बरोबर असण्याच्या वेळीच श्वास निःश्वासचा हळूवार नाद ऐकू येतो.कधी कधी आपलाही श्वास त्या बरोबर जोडला जातो आणि एका अवर्णनीय मैफिलीला सुरुवात होते. पहाटेच असे सूर जुळल्यावर मग दिवसभराच्या ओरखडे सुद्धा सुरात येतात.

 कोकीळ असा जेव्हा स्वतःच्या गळ्यातून वसंताच्या आगमनाची बातमी चहूकडे देतो आणि स्वतः बरोबर सर्व सृष्टीला नादावतो.तेव्हा आणि तेव्हाच चैतन्याची पालवी सगळीकडे फुटू लागते.वसंतातले दिवस हे चैतन्याचे दिवस आहेत. पानगळ झालेल्या शिशिरा नंतर तो येतो तेव्हा नवे जीवन घेऊन येतो. बागेतला गुलमोहर, बहावा, जकरांडा,आपल्या फुलांच्या रंगाने सृष्टीला नटवतात.आधीच ती सुंदर आहे या रंगांनी तिची शोभा अधिक वाढते.रानात पळसही आपले लालचुटूक अस्तित्व मिरवत असतो.

सृष्टी जशी कोकीळ च्या गाण्याने नादावते तसेच कवी सुद्धा या पक्षाच्या आवाजाने बहरतात. हा पक्षी वसंतातला आनंद घेवून येतो.तो झाडांच्या पालवी बरोबर आपल्याही आशा पल्लवित करतो. हा ऋतू, हे विविध रंग आणि कोकीळचा सूर आपल्या आयुष्याला एक वेगळीच गोडी देतात.आंब्याच्या मोहराचा गंध,मोगऱ्याचा सुगंध आपल्या मनाचा ठाव घेतात. साऱ्या इंद्रियांसकट हा ऋतू अनुभवावा असाच असतो. यावेळी मला कवी ए.पा.रेंदाळकर यांच्या काव्याची आठवण येते. ते म्हणतात,
 फुलास हसवित,तरूस डुलवित   
कुरवाळीत वेलिंना
वायुलहरिवर बसून आला
वसंत ऋतू आज ना?
भालदार नव पिकराजा हा
ललकारित चालला
थरारवी नीज गानरवाने
ह्या दुर्भग सृष्टिला !

  आहे की नाही या वसंतात मजा.  त्याचं नातं सृष्टीशी, सृजनाशी आहे.म्हणूनच तो चैतन्य घेऊन येतो असं मला वाटतं.ते कसं हे आपल्याला मि.कोकीळ सांगतातच ना?

Tuesday, February 10, 2015

तुमच्या बारीकसारीक गोष्टींमध्ये दिसते तिला गुणवत्ता म्हणतात.


         ती ऑफिस मधून बाहेर पडली तरी तिचं टेबल तसंच अस्तावस्त पडलेले होतं. मोकळे पडलेले कागद,उघडे कपाट, त्यात कशातरी कोंबलेल्या फाईल.तिला कोणी याबद्दल बोलले तर ती म्हणायची, माझ्यात गुणवत्ता आहे ना? मग माझे काम पहा. म्हणजे?
    एक व्यक्ती भेटली आणि कोणीतरी ओळख करून दिली. तिच्या कामाचे कौतुक केले., आणि त्या व्यक्तीने सांगितले की तिची आई नुकतीच हॉस्पिटल मधून घरी आली आहे, ती आजारी होती.म्हणून मी विचारले,मग तू आईला मदत करते की नाही? तर ती लगेच म्हणाली,’ का? दुसरं काही करण्यासारखे नाही का? घरात काम करण्याइतका वेळच नाही मला. माझ्यात गुणवत्ता आहे, ती मला दाखवण्याची संधी असतांना मी मदत वगैरे कशाला करू?
मग आजारी आईसाठी डबा लावला का?
नाही. ती maggy करून खाते. हलकी असते ती पचायला.
मी तर आजपर्यंत समजत होते की, गुणवत्ता ही मार्कां मध्ये  नसते.ती जीवनातल्या बारीक बारीक गोष्टी मध्ये असते.असायला हवी.
   आमच्या ऑफिस मध्ये एक व्यक्ती आली होती. त्यांचे  शिक्षण चांगल्या विद्यापीठात झाले होते. ते आमच्या कामातली गुणवत्ता कशी वाढवायची यावर व्याख्यान देणार होते. ते त्यांच्या कार मधून आले होते.सगळा कार्यक्रम आटोपून आम्ही त्यांना निरोप द्यायला कार पर्यंत गेलो तर मला धक्का बसला.कारण मी हातात मोजे घालून सुद्धा त्याच्या कारला हात लावू शकत नव्हते.कारच्या जवळ जावून आत डोकावून पहिले तर कारमध्ये कचरा साठलेला होता,कागदाचे तुकडे इतस्ततः पडलेले होते.हा माणूस लेक्चर देणार होता आणि ते ही गुणवत्ते वर हं.      
  मी पाहिलेलं आहे ,तुम्ही सुद्धा पाहिलेलं असेल सत्संग साठी हजारो लोक जातात,त्यांना त्यांच्या डोळ्यातील कचरा काढायचा  असतो.ज्यांनी स्वतःचे शरीर स्वच्छ केलेले नसते ते त्यांना त्यांचा  आत्मा स्वच्छ करायचा असतो.काय हे अज्ञान आहे?त्यांनी कधी नीट आंघोळ केलेली नसते,पण त्यांना त्यांचे जीवन गुरूच्या आशीर्वादाने धुवून टाकायचे असते.मी दाढी न केलेले,पॉलिश न केलेले बूट घातलेले,टाय नीट न बांधलेले सेल्समन पाहिलेले आहेत.ते लोकांकडे जावून जागतिक गुणवत्तेचे त्यांचे उत्पादन दाखवीत असतात.उत्पादनाचा दर्जा जरी चांगला असला तरी या माणसाची गुणवत्ता त्या उत्पादनावर ओरखडे मारणार नाही का?
     एका समाजसुधारक जोडप्याने आम्हांला त्यांच्या घरी बोलावले होते. सहज गप्पा मारायला म्हणून. ते पर्यावरणावर काम करत होते.आम्ही काही पत्रकार तिथे गेलो. तेव्हा त्यांच्या घरात कुबट वास येत होता. काहींनी नाकाला रुमाल लावला तर बाई म्हणाल्या, अहो दोन चार दिवसाचे कपडे भिजत पडले आहेत त्याचा वास येत आहे. आता त्या गिळगिळीत झालेल्या कपड्यांसाठी जादा पाणी नाही का लागणार? तिथेच बाजूला खरकटी भांडी ठेवलेली होती, त्यातील अन्न निगुतीने काढलेले नव्हते. ते तसेच भांड्याला चिकटलेले होते. दुधाच्या पातेल्याला साय तशीच चिकटून होती. हे अन्न सुद्धा पर्यावरणासाठी योग्य असेल का? आम्ही जागतिक दर्जाच्या गप्पा मारल्या पण कोणीच त्यांच्याबद्दल लिहायला तयार झाले नाही. असं का? घरातलं पर्यावरण बिघडले तरी चालणार होतं का? माहित नाही.
  मला असं वाटतं की आपल्याला हे माहित पाहिजे की गुणवत्ता ही आतूनच सुरु होते आणि मग ती बाहेर दिसते.आपण कोणता दर्जा देतो हे आपण कोणत्या दर्जाचे आहोत यावर अवलंबून असते,आणि त्यावरच आपण काय करत आहोत याची गुणवत्ता ठरते,आणि आपण काय करत आहोत हेच आपण काय आहोत यावर अवलंबून असते.
  गुणवत्ते बद्दलची स्वतःची जाणीव हीच तुमच्याकडून इतर कोणापेक्षा अधिक अपेक्षा करत असते.तुमच्या  दर्जाबाबतची तुमची  जाणीवच जगाने ठरवलेल्या प्रमाणापेक्षा उच्च असायला हवी..गुणवत्तेची जाणीव म्हणजे एक प्रकारचा असा विश्वास असतो की ,त्यामुळे आपल्याला  वाटते की सगळ्या गोष्टीत सुधारणा होवू शकते.
   गुणवत्ता   तुमच्या मोज्याला छिद्र नसणे,तुमच्या घराची दारं करकरत नसणे,घरातील सगळी घड्याळे एकच वेळ दाखवत असणे,घरातील गाद्यामधून कापूस बाहेर डोकावत नसणे,घाणेरडे पंखे,भिंतीवर जाळी नसणे,गळणारे नळ नसणे,फोन पटकन उचलला जाणे,भिंतीवरचा रंग उडून पापुद्रे निघालेले नसणे, वाशरूम स्वच्छ असणे आणि तुमच्या घराची latches काम करत असणे. या सगळ्या गोष्टी सुद्धा गुणवत्तेत मोडतात.हे सगळं मी एका मध्यमवर्गीय माणसाच्या घराबद्दल बोलते आहे हे मला माहित आहे. कारण वस्तीतली सामान कमी असणारी नीटनेटकी घरं मी महाराष्ट्रभर पाहिली आहेत.

   गुणवत्तेच्या  उपस्थितीची क्वचितच नोंद घेतली जाते पण तिच्या अनुपस्थितीची मात्र जोरदार दखल घेतली जाते.संपूर्ण क्षेत्रातील बारीकसारीक गोष्टीमधील गुणवत्तेची नोंद काहीवेळेस घेतली जातही नसेल,पण ती असणं गरजेचे आहे.फुल हे फुल असते पण त्याचा सुवास मात्र त्याला इतरांपेक्षा वेगळा करतो.गुणवत्ता ही अशी अदृश्य ताकद आहे जिच्या उपस्थितीमुळे गोष्टी वेगळ्याच दिसू लागतात.

Friday, January 23, 2015

शेवटचा शब्द

    माझी एक मैत्रीण मला सांगत होती की,तू चुकीची आहे,आणि ती तसा का विचार करते याचे स्पष्टीकरणही तिच्याकडे होते.मी असं का करते आहे हेही मी तिला स्वच्छ शब्दात स्पष्ट सांगितले आणि मी का चुकीची नाही हे ही सांगितले.मी माझा मुद्दा कसा योग्य नाही याचेही तिच्याकडे स्पष्टीकरण  होते. अजूनही ती मी कशी चुकीची आहे हेच सांगत होती.माझे म्हणणे होते की तीच अजूनही माझे स्पष्टीकरण योग्य पद्धतीने कशी घेत नाही.मी बऱ्याच वेळ तिला मीच कशी बरोबर हे सांगत राहिले आणि ती ती कशी बरोबर हे सांगत राहिली.आमच्या दोघींकडे त्या मुद्दाला धरून पुरेशी स्प्ष्टीकरणे होती.
    नंतर तिने मला टीकात्मक इमेल केले आणि मी तिचे आरोप नाकारले.मग मी ते का नाकारत आहे म्हणून तिने परत स्पष्टीकरण दिले.
  माझ्या लक्षात आले की प्रत्येकाकडे प्रत्येक गोष्टी साठी स्पष्टीकरण आहे.सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रत्येकाला आपलाच शब्द शेवटचा वाटतो.
   नथुराम गोडसे कडे सुद्धा गांधीना मारण्याचे योग्य स्पष्टीकरण असेल,ओसामा बिन लादेन कडे वर्ल्ड ट्रेड सेंटर का पाडले आणि तो दहशतवादी संघटना का चालवत होता याचे स्पष्टीकरण असेल.अभिनेत्री-अभिनेते स्क्रीन वर सिगारेट का ओढतात याचे स्पष्टीकरण त्यांच्या कडे असेल.मी भाजीत मीठ जास्त का घालते याचे स्पष्टीकरण माझ्याकडे असेल आणि प्रत्येक पुरुषाचा राग हा कसा योग्य आहे याचे स्पष्टीकरण प्रत्येक नवऱ्याकडे असेल.
  प्रत्येकाकडे स्प्ष्टीकरण आहे आणि प्रत्येकाला स्वतःचा शब्द शेवटचा असावा असे वाटते.वस्तुस्थिती अशी आहे आणि ती आपल्या लक्षात आली पाहिजे की मी प्रत्येक गोष्टी साठी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करते  आणि माझा शब्द हा शेवटचा असायला हवा असं मला वाटत आहे ही गोष्ट खरोखरच लाजिरवाणी आहे,आणि हे तरी किमान तुम्ही म्हणा.
       मी मला सांगितलं आहे की, माझ्या जीवनातील क्षुल्लक गोष्टीसाठी मी जाणीवपूर्वक इतरांना त्यांचा शेवटचा शब्द सांगू द्यायला पाहिजे म्हणजे त्यामुळे मी माझा वेळ,उर्जा,मेहनत आणि माझी स्पेस वाचवू शकेन.यामुळे मला अनेक क्षुल्लक गोष्टींचा विचार करण्यापासून प्रचंड स्वांतत्र्य मिळाले आहे.सुदैवाने ९०% गोष्टी ह्या अशा क्षुल्लकच असतात.

  याबाबत तुमचे दुसरे काही मत आहे का?तुम्ही त्याला काहीही म्हणा.मला काही म्हणायचे नाही.तुमचा शब्द हा शेवटचा असू द्या.