Showing posts with label प्रकाशित साहित्य. Show all posts
Showing posts with label प्रकाशित साहित्य. Show all posts

Friday, February 19, 2021

 

ओढ गावाकडची – १३ एप्रिल-२००७ लोकसत्ता

‘गावाकडची ओढ’ असं कुणी म्हटलं की फार हसू यायचं, वाटायचं उगीच मनाचे चाळे  आहेत, बाकी काही नाही.पण नंतर त्याच अवस्थेचा मलाही अनुभव येवू लागला.म्हणजे अगदी रुढार्थाने नाही म्हणता येणार.कारण बऱ्याच जणांना आपलं बालपण ज्या गावात गेलं किंवा पूर्वज ज्या गावात राहत होते, त्या गावाची विलक्षण ओढ वाटतं. तसं काही माझ्या बाबतीत होत नव्हतं.

     एखाद्या गावात आपण किती दिवस राहतो, याला माझ्या दृष्टीने फारसे महत्व नाही. तिथं आपण राहतो, दैनंदिन जीवनात समरसून जातो आणि तिथलेच होऊन जातो.तिथं अनुभवलेली सकाळ, सुपर, संध्याकाळ,दिवस-रात्रीतील कोणतीही वेळ..आता मी नसतांना तिथं काय चालू असेल? गावात प्रवेश करतांना प्रथम ज्या झाडांवर दृष्टी गेली ती झाडं माझ्याशिवाय कशी जगत असतील? अशा नॉस्टलॉजिक मूडमध्ये परत त्या गावी जावं असं फार वाटतं.ती वेळ, ते क्षण परत हवेहवेसे वाटतात.

  गावात जाणाऱ्या वळणावळणाच्या वाटा,जंगलात दूरवर जाणाऱ्या लहानखुऱ्या लाल पाऊलवाट,उन्हाळ्यात पानांचा होणारा करकर आवाज,पानगळीचे वृक्ष,फुललेला पळस,लांबवरून पाणी घेवून येणाऱ्या बायका,अंगावर धडकं नाही म्हणून लपून बसणाऱ्या तरुण पोरी...या सगळ्यांसाठी मी तिथं जायलाच हवं का? याचं कारण जाहीरपणे सांगता येणार आहे? खरं तर मनालाही ते समजावून सांगता याचं नाही.

    एखाद्या गावात अनेक गोष्टीची कमतरता असते. बरेचजण त्याची लांबलचक यादीही करतात. पाणी चांगलं नाही,शिक्षणाच्या सोयी नाहीत वगैरे वगैरे...पण गाव म्हटलं की असं होणारच. त्यात दुःख करण्यासारखं, उदास वाटण्यासारखं काय आहे? त्याशिवायही माणसांना त्या गावात राहता येतंच की!

   निश्चिंत असं एखादं गाव आपलं असतं,असं मला मनापासून अजिबात पटत नाही.वेगवेगळ्या गावात फिरतांना ती गावं मला माझीच वाटतात.मग माझं गाव कोणतं?कशाची ओढ?प्रत्येक गावात मला ती थोडी थोडी सापडते आणि ते गाव मला माझंच वाटतं.

    काय मिळवत असतो आपण एखाद्याला त्याचं गाव विचारून, जे तो मागे ठेवून आलेला असतो. त्याला त्या गावच्या सर्वच आठवणी हव्या वाटत असतील का? कितीतरी नकोशा वाटणाऱ्या आठवणीही त्या गावाशी जोडल्या गेल्या असतील. ते संदर्भ पुसण्यासाठी कितीतरी पल्ला ती व्यक्ती शरीराने आणि मनानेही पार करते. तरीही आपल्याला त्याच्या पार्श्वभूमीवरचं गाव मात्र हवं असतं. असं का होतं? काय असतं तिथं त्याचं?

     त्या व्यक्तीने जोडलेल्या छोट्या छोट्या गावांनी,त्यातील छोट्या छोट्या प्रसंगांनी,त्यांनं त्यःच्म जीवन समृद्ध केलेलं असतं. त्याची कृतज्ञतापूर्वक जाणीव ठेवून व्यक्ती  पुढची पाउलं टाकते. आपण मात्र त्या व्यक्तीला चौकटीत बांधायला पाहतो.ती या गावातून , राज्यातून आली म्हणजे ही ही वैशिष्ट्ये तिच्याकडे असणारच असं आपल्याला वाटतं.म्हणून वाटतं आपण आपल्यासारखं असण्याची ओढ असली की एखाद्या गावाने असा काय फरक पडणार आहे?

  ...शिक्षण,नोकरी बदलीच्या निमित्ताने कितीतरी गावं पाहिली.आधीचं गाव सोडतांना मन उदास व्हायचं,पण नव्या गावाची ओढही लागलेली असायची.नव्या गावात रुळेपर्यंत, माणसं ओळखीची होईपर्यंत जुनं गाव आठवत राहतं. नंतर हळूहळू नवं गावच आपलं होऊन जातं.










 

 

गौरीचं झाड -४ मार्च २००७,लोकसत्ता

 ‘मावशी, दोन दिवस  आला नाहीत? बरं नव्हतं का? मी आमच्याकडे काम करणाऱ्या बाईंना विचारलं. त्यांचा चेहरा आधीच खूप सुकला होता. मनामध्ये चिंतेचे ढग कधीचेच जमा झाले होते. फक्त कोणी हात लावायचा अवकाश, लगेच ते बरसायला लागले.

‘काय झालं? नीट सांगा बरं, रडू नका’

माझी केविलवाणी धडपड.

‘माझ्या भाच्चीनं औषध घेल्म आणि ती गेली’ मावशी रडतच म्हणाल्या.

‘गेली’ अहो, दोन महिन्यांपूर्वीच तर लग्न झालं ना तिचं,मग? माझ्या या प्रश्नाला आणि त्यानंतर त्यांच्या येणाऱ्या उत्तराला खरंतर काहीच अर्थ नव्हता.आम्ही या आदिवासी भागात राह्यला आल्यापासून अशा ‘औष’ घेऊन आत्महत्या करण्याचे प्रकार खूप ऐकले होते. तरुण मुला-मुलींचा  त्यात अधिक भरणा होता. खरंतर ही सर्व आदिवासी मंडळी दवाखाना,औषधाचं दुकान यापासून शंभर हात दूरच राहण्याचा प्रयत्न करणारी.मग ते हे ‘मरायचं औषध कुठून मिळवतात?चौकशी केली तर कळलं.ते औषध म्हणजे एक प्रकारचं झाड असतं. त्याचं नाव ‘गौरीचं झाड!’

‘गौरीचं झाड’ हे लांब जंगलात वाढतं. पावसाळ्याच्या मध्यावर त्याची रोपं फोफावतात.गणपतीबरोबर गौरी आल्या की गावातील आदिवासी मंडळी वाजतगाजत जंगलात जातात आणि गौरीचं झाड मुळासकट घेवून येतात. त्याला कळ्याही आलेल्या असतात. या झाडाला केशरी रंगाची तजेलदार फुलं येतात. हे झाड घरी आणून पितळी भांड्यात,नाहीतर मातीच्या मडक्यात ठेवायचं.त्याला विविध प्रकारे सजवायचं. पानाफुलांची तोरणं बांधायची, रूढीनुसार पूजा करायची, तांदळ्याच्या पिठीचे गोड पदार्थ करून नैवेद्य दाखवायचा. असं सगळं या झाडाचं कौतुक करून त्याची ‘गौरी’म्हणून पूजा केली जाते. म्हणून ते ‘गौरीचं झाड’. दुसऱ्या दिवशी रात्री अंगणात वाद्यांच्या तालावर नाच करायचा आणि सकाळी ते झाड आपापल्या शेतात, नाहीतर घराच्या मागे आशीर्वादासाठी लावून द्यायचं.

   या झाडामुळे जितका आनंद मिळतो तितकंच दुःखही!....गौइक्य झाडाची मूळं विषारी असतात. जगणं नकोसं झालं, तर जंगलात जाऊन गौरीचं झाड शोधायचं आणि आपल्या आयुष्याला तिलांजली द्यायची. इथे हे सर्रास चालतं.नंतर जंगलाच्या वाटेवर पडलेला मृतदेह कोणीतरी पाहतं.मृतदेहावर गावकरी अंत्यसंस्कार करतात.पोलिसांकडे तक्रार नाही की पंचनामा नाही. या आत्महत्येची नोंद कुठेही होत नाही. तो केवळ एक अपघात असतो. कारण या विषारी औषधाची कुठे नोंदच नसते. वयाने मोठ्या असणाऱ्या मुलाशी लग्न लावून दिले म्हणून,वेगळी झोपडी नाही म्हणून, दुसराच यार आवडला म्हणून, सावकाराचे कर्ज फेडता आले नाही म्हणून.... अशा कितीतरी कार्न्न्णाई ही तरुण मुलंमुली,प्रौढ माणसं आत्महत्या करतात. एकत्र इतकं कष्टाचं जीवन ते जगत असतात की,आपण त्यांच्या दुःखाची कल्पनाच करू शकत नाही. कितीतरी पाड्यांवर वीज,पाणी,वाहन, गिरणी यांची काहीच सोय नसते. सावकारापासून वाचवलेल्या तांदळाची दोन्ही वेळेला ‘आमली’ करायची आणि खायची.पुन्हा गरज लागली की त्यातच सावकारापुढे हात पसरायचा.त्यःची कर्जफेड करतच जगायचं. तेही अशक्य झालं की जीव संपवायचा.विदर्भ,मराठवाड्यातले शेतकरी आत्महत्या करू लागल्यावर त्यांच्या प्रश्नांकडे सरकार लक्ष द्यायला लागलं.आदिवासीच्या मरण्याची आणि त्यांच्या जिवंतपणीच्या  मरणासन्न जगण्याची दखल कोण आणि कधी घेणार?तोपर्यंत ‘गौरीचं झाड’ जवळ करण्यावाचून त्यांना पर्याय नाही. 

   


 

 

अवघाचि संसार -१३ ऑक्टोबर २००६

पहाट रोजच होते,पण प्रत्येक वेळी नवीन नवीन गोष्टी दाखवून देते. आजही भल्या पहाटे उघ्ले.तोंडावर गार पाण्याचा हबका मारला. बरं वाटलं. लक्षात आलं की, आज बाहेर नेहमीच्या आवाजांबरोबरच दुसराच एक मंजुळ आवाज येतो आहे. कोणाच बरं आहा आवाज? पक्ष्यांचा? छे, घनतेचा वाटतो आहे. बैलाच्या गळ्यात अडकवलेल्या घनतेचा मंजुळ आवाज होता तो. खरं तर आमचं घर गावाबाहेर,महामार्गाच्या शेजारी. त्यामुळे गावात सहजपणे ऐकू येणारे आवाज कधीमधीच ऐकू येतात. घाई घाईने पायऱ्या उतरून अंगणात आले, तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक बैलगाड्या एकामागोमाग उभ्या होत्या. ऊसतोडणी मजूर मोठ्या संख्येने कारखान्याकडे निघाले होते. रस्त्यात एक एक दिवस विसावा घेत आणि बैलांना विसावा देत ही मंडळी गाव सोडून चालली होती. महामार्ग खरोखरच जिवंत झाला होता. प्रत्येक बैलगाडीत तीन-चारजण होते. काहींमध्ये नवरा-बायको,मुलं असं सगळं कुटुंबच होतं. एवढ्याशा छोट्या गाडीत त्यांच्यासह त्यांचा संसार मावत होता.माझ्यासाठी हे जरा नवलाचच होतं. एक हंडा,पातेलं, ताट कं परात,बाज, सायकल, गोधडी. बास. एवढंच सामान त्यांच्याजवळ होतं. ज्या ठिकाणी थांबायचं, तिथं तीन दगडांची चूल करून ते स्वयंपाक करतात. बायका चूल पेटवतात. तोपर्यंत पुरुष पाणी आणायला धावतात. हे त्यांचं नेहमीचं ठिकाण असावं. कारण कोणालाही न विचारता ते पाण्याच्या टाकीजवळ गेले आणि त्यांनी पाणी भरून आणलं. ज्या गाडीबरोबर फक्त पुरुषच होते, ते स्वतःच भाकरी टाकत होते. छान,मोठ-मोठ्या गोलाकार भाकरी. आमच्या घरापर्यंत भाकरी भाजल्याचा खरपूस वास येत होता. मूलं हुंदडत होती. शाळा,अभ्यास या कटकटीतून सुटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. आता पुढचे काही महिने आई-वडीलांसमवेत मजुरीच्या कामातच जाणार. तरीपण त्यांनी शिक्षण घ्यायलाच हवं, असं मनात वाटत होतं.मी त्यांचे रोजचे व्यवहार बघत होते. त्यांच्या हालचालीतली सहजता, मुलांचा रस्त्यावरचा वावर निर्भयपणे होत होता. अज्ञानात सुख असतं का?

‘वहिनी, माणसं पाणी भरत्यात बघा’ दुधवाला म्हणाला. ‘तुम्ही नळ झाकून टाका म्हणजे येणार नाहीत कोणी...’ त्याने सल्ला दिला.

‘भरू द्यात,टाकी खाली होणार नाही एवढ्याने....’मला पाणी, चोरी,भांडी,लबाडी यातलं काहीच दिसत नव्हतं. फक्त पलीकडच्या रस्त्यावरचा निखळ संसार दिसत होता.अनेक अडचणीतून चालणारा.....

 


 

बगळ्याचं घर -२३ सप्टेंबर २००६

 ग्रीष्मात येणाऱ्या मोगऱ्याच्या सुगंधाने माणूस कितीही उल्हासित झाला, तरी त्याला वर्षा ऋतूत येणाऱ्या मृद्गंधाची ओढ असतेच नाही का? यात काही चाकोरीबद्धता आहे, असे आपल्याला कधीच वाटत नाही किंवा मुद्दामहून त्यातील सौंदर्य शोधण्याचा आपण प्रयत्न करतो असेही नाही. कशाचीही तुलना न करता आपण तो मृद्गंध स्वतःत  सामावून घेत असतो. या वर्षी मात्र मी या दोन्ही सुगंधाबरोबर एका दुर्गंधीची वाट पाहत होते. ग्रीष्म संपण्यापूर्वी बगळे परत आपापल्या झाडांकडे परत यायला लागतात. वर्षभर तलावाकाठी,शेतात राहणारे बगळे पावसापासून सरंक्षण  मिळावे म्हणून दाट झाडांच्या छायेत परत येतांना दिसतात. बारीक बारीक काटक्या जमवून पसरट टोपलीसारखे घरटं बनविण्याचं त्यांचं काम सुरु होतं. हिरव्या पाना-पानांमध्ये पांढऱ्या शुभ्र बगळ्यांची हालचाल दिसायला लागते. साळूक्यांना वर्षभर वापरलेलं ते झाड सोडून द्यावं लागतं. त्या भरपूर आरडाओरडा करतात.पण बगळे ढिम्म. अजिबातच हलत नाहीत. दिवसागणिक बगळ्यांचा कलकलाट वाढत जातो.त्यांचा विणीचा हंगाम सुरु झालेला असतो. न उडता येणारी काही लहान पिल्लही दिसतात. म्हणजे आधीच क्ध्त्री ते अंडी घालत असावेत. कधी कधी मारामारीत एखादं अंडं खाली पडतं, तर कधी बगळ्याचं पिल्लू. एकदा पडलं की जिवंत राहत नाही. पहाटे माणसांना जाग येनाय्च्या आधी हे बगळे खाली उतरून भरपूर नाष्टा करतांना दिसतात. दिवसभर झाडावर बसूनही काहीबाही खात असावेत. कारण सगळं अंगण ते रात्रीतून पांढरं करून टाकतात. त्याची खूप घाण येते. मनून आजूबाजूचे लोक त्यांना जोरजोरात हाकलून लावण्याचा प्रयत्न करतात. कोणी फटाके वाजवतात. बगळे क्षणभर उडून जातात आणि परत झाडावर येऊन बसतात.कधी कधी पाथरवटाची पोरं एखादा बला खाली पाडतात आणि भाजून खातात.पण हे क्वचितच. मुसळधार पाउस पडत असतो. सोसाट्याचा वारा वाहत असतो. अशा वेळी झाड तुटून पडेल की काय, याची भीती वाटते.पण बगळे ते झाड सोडून जातांना दिसत नाहीत. बांधलेल्या घरट्याला पानांच्या आड ते घट्ट पकडून बसतात. ओलेचिंब होतात, तरीही माणसांनी बांधलेल्या घराच्या आडोशाला ते येत नाहीत. नवल वाटतं ते त्यांच्या चिवटपणाचं... हळूहळू पाऊस ओसरतो. वाराही हळुवारपणे यायला लागतो. बगळ्यांची पिल्लं केवढी झाली हे मात्र आपल्याला समजत नाही.पण ती नक्कीच वाढली असणार. कारण कलकलाट वाढलेला असतो. शिकाऊ उमेदवार आजूबाजूला दिसतात. झाडाच्या खाली कुत्री जमायला लागतात. त्यावरून वर पिल्लं आहेत हे कळतं.पाऊस थांबल्यावर बगळे आपल्या रस्त्याने परत जायला निघतात. शेतात पेरणी सुरु झालेली असते. काही झाडांना मोहर आलेला असतो.पिवळ्या चोची आता त्यावर तुटून पडतील.नाही तर तलावातील मासे खातील. माहित नाही.पण ते जातात. मागे उरतात फक्त त्यांनी बांधलेली रिकामी घरटी. 




Friday, December 18, 2020

 

दिवस उगवतांना – लोकसत्ता १६ सप्टेंबर २००६

  जाग आली तेव्हा टेबलावरचं घड्याळ बंद पडलेलं दिसलं. घड्याळाचं बरं असतं, मनात आलं की थांबायचं,पुढेही जायचं नाही आणि मागेही. मग कोणाची कितीही फजिती होवो. ते आपलं मनासारखंच वागणार! बाहेर अंगणात पक्ष्यांचा आवाज येत होता. म्हणजे नक्कीच पहाट झाली असणार. पहाटेचा नाद मनामध्ये हळूवार येतो आणि जग येते. बाहेरची हिरवी झाडं मूक नादानं जणू आपल्याला बोलावत असतात. घरात कोचीही जग नाही, म्हणून आवाज न करता पायऱ्या उतरून अंगणात आले. आजूबाजूला दिवस उजाडत असल्याच्या अस्पष्ट खुणा दिसत होत्या. रात्री पावसाची सर येऊन गेली असणार. पाण्याचे थेंब झाडांच्या पानांवर अजून झुलत आहेत. समोरच्या फाटकाच्या कमानीवर जाईचा वेळ विसावलेला. त्यावरच्या कळ्या उमलू पाहत आहेत. निरव शांततेत माझा पायरव पक्ष्यांना कळला असावा. अंगणात सकाळच्या वेळी पाणी पिणाऱ्या भारद्वाजाने मान कलती करून पाहिलं. मिटल्या चोचीने आवाज करत परत तो आपल्या कामात गर्क झाला. त्याचा जोडीदारही लगेच आला.

 हळूहळू सगळेच उठू लागले. साळुंक्या,बगळे, लहानखुरे शिंपी, धोबी,कोकिला यांचा एकत्रित आवाज यायला लागला. पहाटेच्या वेळी त्यांचा हा लहानसा आवाज शांततेचा भंग न करता येत राहतो. मीही माझ्या पावलांचा आवाज होणार नाही याची पुरेपूर काळजी घेत होते. पण वाळलेली पानं, काटक्यांवरून चालतांना आवाज होतोच.पण त्याची सवय पाखरांना झाली असावी. रात्रीतून लिंबाऱ्याने बरीच पानं खाली आणून टाकलेली होती. हा सोन्याचा पाला खराट्याने एकसारखा ढकलून एका ठिकाणी गोळा करतांना फार मजा येते. अंगणभर साचलेले हे पिवळ्या पानांचे छोटे छोटे ढीग सकाळचं सौंदर्य अधिकच खुलवतात. या कचऱ्यातच कधी कधी झाडावरून पडलेलं बगळ्याचं पिल्लू दिसतं. मग एकदम उदास वाटू लागतं. त्याची आई मात्र इतर पिल्लांची काळजी घेण्यात गढलेली असते. Life is beautiful…

मग मीही फुलझाडांच्या आल्यात पाणी सोडू लागते.जमीन ओली होतांना एक मंद सुवास येतो आणि सुगंधित सकाळची सुरुवात होते. जाई-जुई,मदनबाण,सोनचाफा,सोनटक्का,जास्वंद,मधुमालती पाण्याने तृप्त होतात. पानापानांतून आंबा,गुलमोहर शहारतात आणि खट्याळपणे मीही पाणी उडवत राहते.. आता महामार्गावरील गाड्यांचा आवाज यायला सुरुवात होते. भाजीवाले बाजारातील जागेच्या ओढीने भराभर पावलं टाकत असतात. दहीवालीचे हाकारे सुरु होतात आणि दिवस आपल्याला त्याच्या ताब्यात घेतो.





Thursday, December 10, 2020

 

जुन्या सोन आठवणी –

कवडसे ५ ऑगस्ट २००६

नगर लोकसत्ता

 १)डायरी

 डायरीतील काही पाने ...... 

  रोज संध्याकाळी मी ढगाकडे बघून म्हणायचे- ‘अरे बाबा, किती वाट पाहायला लावतोस? ये न एकदा, दे न भरभरून. तुझा तो वेड लावणारा मृद्गंध येऊ दे, अंगप्रत्यंगात मिसळू दे... जणू माझं त्याला भेटण्याचं वेड त्याला समजलं आणि तो आला. अगदी हळूहळू आणि नंतर सगळीकडेच भरून गेला. मृद्गंध लुटून झाला, पानांना लकाकी आली. रस्ते, नाले भरून गेले, तरीही थांबायचं तो नाव घेईना. येतच राहिला. मग मी त्याला म्हटलं, ‘ ए थांब ना, मला थोडं फिरून येऊ दे, तू पसरवलेलं सौदर्य डोळ्यात साठवू दे’. पण तो ऐकेना.मग त्याला अंगावर घेत मी चालू लागले. आता मला पावसाळा काही सांगायचं नसतं, काही मागायचंही नसतं.

  पावसाची आपण आत पाहतो,पण तो आला की मग मिटून का ठेवतो स्वतःला?

  ***

 सोसाट्याचा वारा वाहत होता. वाऱ्याबरोबर पानंही वेगानं पळत होती. अंधारून आलं होतं. आतल्या आत मिटून घ्यावं असं वाटत होतं. अंगाला गारवा जाणवत होता. हवाहवासा वाटणारा गारवा शब्दांना मात्र नाकारत होता. काय करावं ते कळत नव्हतं. तेवढ्यात कुठून तरी बेगम अख्तरचे सूर कानी आले. तिचा दुःखभरला आवाज माझाच होता का? आता हे तपासतच बसावं लागणार.....

आज तू आलास. अगदी नकळत.मला चाहूल लागू न देता यायचा तुझा विचार होता.पण ती कशी अशक्य गोष्ट आहे हे तुला चांगलंच माहित आहे. तू यायच्या आधी येणारा गारवा मनाला मोहित करतो आणि मन मग वाऱ्यावर भिरभिरत राहतं. पावलं जागीच नाचायला लागतात. कोणी काय म्हणेल याची चिंता कशाला? मीही आज तसंच केलं. डोळे मिटले आणि हात पसरून तुला पार आतपर्यंत नेलं.परत कधीही तू बाहेर येवू नयेस म्हणून भरपूर काळजी घेणार असं म्हणतेय,पण ते खूप अवघड आहे. माझी मीच कोरडी होत जाते आणि तू दिलेला ओलावा कसा संपतो कळतच नाही.  

 झाडाची पिवळी झालेली पानं सहज गळून पडतात. त्यांच्या वागण्यात किती सहजता असते. जीवनचा स्वीकार ते किती सहजपणे करतात. आपणही तसं वागायला हवं. झाडांकडूनच काय, निसर्गाच्या प्रत्येक घटकाकडून घेता येईल तितके गुण घ्यायला हवेत. पान पिवळं झालं म्हणजे गळणारच हे माणसांच्या बाबतीत स्वीकारता येईल? काही माणसं तर पिवळेपणात नाही तर हिरवाईतच गळतात. अशा वेळी सहजता कोठून आणायची? आणि ही गलती कशी थांबवायची?

**

आठवणी आपल्याभोवती फेर धरून नाचू लागल्या की सारखं म्हणावसं वाटतं – ‘ चला,पुढे चला. असं कोठपर्यंत त्यांना रोखून धरायचं? पण तसं नाही केलं, तर वर्तमानात त्या मला डोकावूसुद्धा देणार नाहीत. त्यांच्यासाठी कितीवेळा मी दुःखी व्हायचं कळतच नाही. काय हवं असतं त्यांना?आठवणी एका कोपऱ्यात बसून राहतील का? त्यांच्यासाठी सुरेखशी पेटी तयार करू?

 माझी स्वप्नांची ओंजळ रीतीच होत नाही. काय करू? कितीतरी वेळा मी एक एक स्वप्न बाजूला करून रिकामं करण्याचा प्रयत्न करते.पण काहीच उपयोग होत नाही. मी स्वप्नवेडी कधी झाले? की आधीपासूनच होते? ओंजळीतल्या स्वप्नांना जागं करत त्यांना वास्तव दाखवते.पण ती इतकी लबाड असतात की पुढचा रस्ता दाखवतात. मग मी तरी काय करणार?जाते त्या रस्त्याने. वाटते आता सापडेल परीस. सगळ्या वस्तू सोन्याच्या करायच्या आहेत मला.माणसातल्या माणूसपणाचं सोनं!

**

 स्प्व्नं अशी पाठीमागे लागतात. पाठलाग करतात. तेव्हा कुठे लपून बसावं कळत नाही.भान विसरून त्यांना ओंजळीत घ्यावं म्हणते,पण दारावरची नक्षीदार चौकट ते करू देत नाही. वाटतं रोज रोज या स्वप्नांचा चुराडा झाल्यानंतर तरी ते हवं तसं जगू देतील? झोपेत पडलेली स्वप्नं विसरता येतात,पण जागेपणी दिसणाऱ्या स्वप्नांचं काय? त्यांना मागे-मागे ओढून बंद करतांना दमायला होतं, थकायला होतं. कधी ती स्वप्नं वस्तुस्थितीची जाणीव करून देतात, पंखातील अपुरं बळ दाखवतात. फार स्वप्न पाहणारी माणसं वेडी होतात का?

**

लिहू म्हटलं तरी काही गोष्टी नाहीच लिहिता येत. बऱ्याच वेळा हातून निसटूनच जातं वाळूसारखं. असं का व्हावं? काल  आमच्या अंगणातल्या वठलेल्या झाडाला बारीक हिरवा लोंब फुटला. मला आश्चर्य वाटलं अन खूप आनंदही झाला.त्या झाडाला तर किती छान वाटलं असेल! त्या कोंबाला पाहून माझ्यातूनही शब्द झरू लागले.