Tuesday, February 10, 2015

तुमच्या बारीकसारीक गोष्टींमध्ये दिसते तिला गुणवत्ता म्हणतात.


         ती ऑफिस मधून बाहेर पडली तरी तिचं टेबल तसंच अस्तावस्त पडलेले होतं. मोकळे पडलेले कागद,उघडे कपाट, त्यात कशातरी कोंबलेल्या फाईल.तिला कोणी याबद्दल बोलले तर ती म्हणायची, माझ्यात गुणवत्ता आहे ना? मग माझे काम पहा. म्हणजे?
    एक व्यक्ती भेटली आणि कोणीतरी ओळख करून दिली. तिच्या कामाचे कौतुक केले., आणि त्या व्यक्तीने सांगितले की तिची आई नुकतीच हॉस्पिटल मधून घरी आली आहे, ती आजारी होती.म्हणून मी विचारले,मग तू आईला मदत करते की नाही? तर ती लगेच म्हणाली,’ का? दुसरं काही करण्यासारखे नाही का? घरात काम करण्याइतका वेळच नाही मला. माझ्यात गुणवत्ता आहे, ती मला दाखवण्याची संधी असतांना मी मदत वगैरे कशाला करू?
मग आजारी आईसाठी डबा लावला का?
नाही. ती maggy करून खाते. हलकी असते ती पचायला.
मी तर आजपर्यंत समजत होते की, गुणवत्ता ही मार्कां मध्ये  नसते.ती जीवनातल्या बारीक बारीक गोष्टी मध्ये असते.असायला हवी.
   आमच्या ऑफिस मध्ये एक व्यक्ती आली होती. त्यांचे  शिक्षण चांगल्या विद्यापीठात झाले होते. ते आमच्या कामातली गुणवत्ता कशी वाढवायची यावर व्याख्यान देणार होते. ते त्यांच्या कार मधून आले होते.सगळा कार्यक्रम आटोपून आम्ही त्यांना निरोप द्यायला कार पर्यंत गेलो तर मला धक्का बसला.कारण मी हातात मोजे घालून सुद्धा त्याच्या कारला हात लावू शकत नव्हते.कारच्या जवळ जावून आत डोकावून पहिले तर कारमध्ये कचरा साठलेला होता,कागदाचे तुकडे इतस्ततः पडलेले होते.हा माणूस लेक्चर देणार होता आणि ते ही गुणवत्ते वर हं.      
  मी पाहिलेलं आहे ,तुम्ही सुद्धा पाहिलेलं असेल सत्संग साठी हजारो लोक जातात,त्यांना त्यांच्या डोळ्यातील कचरा काढायचा  असतो.ज्यांनी स्वतःचे शरीर स्वच्छ केलेले नसते ते त्यांना त्यांचा  आत्मा स्वच्छ करायचा असतो.काय हे अज्ञान आहे?त्यांनी कधी नीट आंघोळ केलेली नसते,पण त्यांना त्यांचे जीवन गुरूच्या आशीर्वादाने धुवून टाकायचे असते.मी दाढी न केलेले,पॉलिश न केलेले बूट घातलेले,टाय नीट न बांधलेले सेल्समन पाहिलेले आहेत.ते लोकांकडे जावून जागतिक गुणवत्तेचे त्यांचे उत्पादन दाखवीत असतात.उत्पादनाचा दर्जा जरी चांगला असला तरी या माणसाची गुणवत्ता त्या उत्पादनावर ओरखडे मारणार नाही का?
     एका समाजसुधारक जोडप्याने आम्हांला त्यांच्या घरी बोलावले होते. सहज गप्पा मारायला म्हणून. ते पर्यावरणावर काम करत होते.आम्ही काही पत्रकार तिथे गेलो. तेव्हा त्यांच्या घरात कुबट वास येत होता. काहींनी नाकाला रुमाल लावला तर बाई म्हणाल्या, अहो दोन चार दिवसाचे कपडे भिजत पडले आहेत त्याचा वास येत आहे. आता त्या गिळगिळीत झालेल्या कपड्यांसाठी जादा पाणी नाही का लागणार? तिथेच बाजूला खरकटी भांडी ठेवलेली होती, त्यातील अन्न निगुतीने काढलेले नव्हते. ते तसेच भांड्याला चिकटलेले होते. दुधाच्या पातेल्याला साय तशीच चिकटून होती. हे अन्न सुद्धा पर्यावरणासाठी योग्य असेल का? आम्ही जागतिक दर्जाच्या गप्पा मारल्या पण कोणीच त्यांच्याबद्दल लिहायला तयार झाले नाही. असं का? घरातलं पर्यावरण बिघडले तरी चालणार होतं का? माहित नाही.
  मला असं वाटतं की आपल्याला हे माहित पाहिजे की गुणवत्ता ही आतूनच सुरु होते आणि मग ती बाहेर दिसते.आपण कोणता दर्जा देतो हे आपण कोणत्या दर्जाचे आहोत यावर अवलंबून असते,आणि त्यावरच आपण काय करत आहोत याची गुणवत्ता ठरते,आणि आपण काय करत आहोत हेच आपण काय आहोत यावर अवलंबून असते.
  गुणवत्ते बद्दलची स्वतःची जाणीव हीच तुमच्याकडून इतर कोणापेक्षा अधिक अपेक्षा करत असते.तुमच्या  दर्जाबाबतची तुमची  जाणीवच जगाने ठरवलेल्या प्रमाणापेक्षा उच्च असायला हवी..गुणवत्तेची जाणीव म्हणजे एक प्रकारचा असा विश्वास असतो की ,त्यामुळे आपल्याला  वाटते की सगळ्या गोष्टीत सुधारणा होवू शकते.
   गुणवत्ता   तुमच्या मोज्याला छिद्र नसणे,तुमच्या घराची दारं करकरत नसणे,घरातील सगळी घड्याळे एकच वेळ दाखवत असणे,घरातील गाद्यामधून कापूस बाहेर डोकावत नसणे,घाणेरडे पंखे,भिंतीवर जाळी नसणे,गळणारे नळ नसणे,फोन पटकन उचलला जाणे,भिंतीवरचा रंग उडून पापुद्रे निघालेले नसणे, वाशरूम स्वच्छ असणे आणि तुमच्या घराची latches काम करत असणे. या सगळ्या गोष्टी सुद्धा गुणवत्तेत मोडतात.हे सगळं मी एका मध्यमवर्गीय माणसाच्या घराबद्दल बोलते आहे हे मला माहित आहे. कारण वस्तीतली सामान कमी असणारी नीटनेटकी घरं मी महाराष्ट्रभर पाहिली आहेत.

   गुणवत्तेच्या  उपस्थितीची क्वचितच नोंद घेतली जाते पण तिच्या अनुपस्थितीची मात्र जोरदार दखल घेतली जाते.संपूर्ण क्षेत्रातील बारीकसारीक गोष्टीमधील गुणवत्तेची नोंद काहीवेळेस घेतली जातही नसेल,पण ती असणं गरजेचे आहे.फुल हे फुल असते पण त्याचा सुवास मात्र त्याला इतरांपेक्षा वेगळा करतो.गुणवत्ता ही अशी अदृश्य ताकद आहे जिच्या उपस्थितीमुळे गोष्टी वेगळ्याच दिसू लागतात.

Friday, January 23, 2015

शेवटचा शब्द

    माझी एक मैत्रीण मला सांगत होती की,तू चुकीची आहे,आणि ती तसा का विचार करते याचे स्पष्टीकरणही तिच्याकडे होते.मी असं का करते आहे हेही मी तिला स्वच्छ शब्दात स्पष्ट सांगितले आणि मी का चुकीची नाही हे ही सांगितले.मी माझा मुद्दा कसा योग्य नाही याचेही तिच्याकडे स्पष्टीकरण  होते. अजूनही ती मी कशी चुकीची आहे हेच सांगत होती.माझे म्हणणे होते की तीच अजूनही माझे स्पष्टीकरण योग्य पद्धतीने कशी घेत नाही.मी बऱ्याच वेळ तिला मीच कशी बरोबर हे सांगत राहिले आणि ती ती कशी बरोबर हे सांगत राहिली.आमच्या दोघींकडे त्या मुद्दाला धरून पुरेशी स्प्ष्टीकरणे होती.
    नंतर तिने मला टीकात्मक इमेल केले आणि मी तिचे आरोप नाकारले.मग मी ते का नाकारत आहे म्हणून तिने परत स्पष्टीकरण दिले.
  माझ्या लक्षात आले की प्रत्येकाकडे प्रत्येक गोष्टी साठी स्पष्टीकरण आहे.सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रत्येकाला आपलाच शब्द शेवटचा वाटतो.
   नथुराम गोडसे कडे सुद्धा गांधीना मारण्याचे योग्य स्पष्टीकरण असेल,ओसामा बिन लादेन कडे वर्ल्ड ट्रेड सेंटर का पाडले आणि तो दहशतवादी संघटना का चालवत होता याचे स्पष्टीकरण असेल.अभिनेत्री-अभिनेते स्क्रीन वर सिगारेट का ओढतात याचे स्पष्टीकरण त्यांच्या कडे असेल.मी भाजीत मीठ जास्त का घालते याचे स्पष्टीकरण माझ्याकडे असेल आणि प्रत्येक पुरुषाचा राग हा कसा योग्य आहे याचे स्पष्टीकरण प्रत्येक नवऱ्याकडे असेल.
  प्रत्येकाकडे स्प्ष्टीकरण आहे आणि प्रत्येकाला स्वतःचा शब्द शेवटचा असावा असे वाटते.वस्तुस्थिती अशी आहे आणि ती आपल्या लक्षात आली पाहिजे की मी प्रत्येक गोष्टी साठी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करते  आणि माझा शब्द हा शेवटचा असायला हवा असं मला वाटत आहे ही गोष्ट खरोखरच लाजिरवाणी आहे,आणि हे तरी किमान तुम्ही म्हणा.
       मी मला सांगितलं आहे की, माझ्या जीवनातील क्षुल्लक गोष्टीसाठी मी जाणीवपूर्वक इतरांना त्यांचा शेवटचा शब्द सांगू द्यायला पाहिजे म्हणजे त्यामुळे मी माझा वेळ,उर्जा,मेहनत आणि माझी स्पेस वाचवू शकेन.यामुळे मला अनेक क्षुल्लक गोष्टींचा विचार करण्यापासून प्रचंड स्वांतत्र्य मिळाले आहे.सुदैवाने ९०% गोष्टी ह्या अशा क्षुल्लकच असतात.

  याबाबत तुमचे दुसरे काही मत आहे का?तुम्ही त्याला काहीही म्हणा.मला काही म्हणायचे नाही.तुमचा शब्द हा शेवटचा असू द्या.    

Tuesday, January 6, 2015

सुवासाचा राजा














एखादी गोष्ट म्हणजे एखादे झाड,फुल,एखादी व्यक्ती,प्रसंग,सिनेमा,नाटक,पुस्तक हे आपल्याला रोज दिसत असते,भेटत असते,आपल्या मनात ते अखंड सुमधुर असा नादही निर्माण करत असते,रुंजी घालत असते.पण तरीही आपण त्यावर लिहायला तयार होत नसतो. काय कारण असावं बरं याचं. आपल्याला त्याबद्दल काही वाटत नाही,किंवा त्या गोष्टीचे अस्तित्व आपल्या मनात काही तरंग उमटवत नाही असं तर मुळीच नसतं.उलट ते सदा सर्वकाळ आपल्याल जवळ आपल्या अगदी नकळत असतं. काही अध्यात्मिक लोकांच्या मन जसं सजग असते. तसं आपलं मन जरी वरील गोष्टी भौतिक असतील तरी त्याबाबत सजग असतं. त्याची जाणीव असते.कधी कधी मला वाटतं ,आपलं लहान मुलासारखं होत असेल म्हणजे त्याबद्दल बोललं,लिहलं तर ते आपलं अस्तित्वच आपल्यातून नष्ट करेल की काय ही भीती असते.माहित नाही .पण सोनचाफ्याच्या फुलाबद्दल मात्र मला असच काहीसं वाटत होतं.
    कधी भेटलं हे फुल मला? आठवत नाही.पण लहानपणी असेल. नंतर आम्ही ठाण्याला राहायला गेलो तेव्हा मात्र आम्ही रोज ती फुलं विकत घेत असू. त्याचवेळी मी मनाशी ठरवलं होतं की एक दिवस मी याचं झाड लावेन आणि रोज किमान एक तरी फुल मला मिळेल. आज मला माझ्या त्या निर्णयाची खूप मजा वाटते.कारण त्यावेळी आम्ही घर बांधू वगैरे असं काही डोक्यात सुद्धा नव्हतं.
        आज माझं सोनचाफ्याचे झाड दोन वर्षाचे झालं आहे. त्याचे रोप मिळावे म्हणून आम्ही खूप प्रयत्न केला . त्या रोप वाल्याला प्रश्न विचारून भंडावून सोडलं आहे. कारण आपण जे रोप घरी नेत आहोत ते सोनचाफ्याचेच असेल  याची आम्हांला खात्री वाटत नसे. मग झाड लावतांना ते कुठे लावायचं यावर चर्चा.मला आपलं वाटायचं ते अशा ठिकाणी लावावं की मला लगेच फुलं काढता यायला हवी. म्हणून त्याला पहिलं पान आलं तेव्हापासून माझं त्याकडे बारीक लक्ष होतं. उन्हाळ्यात त्याला फार जपावं लागतं असं आम्हांला कळलं.मग मी त्यावर बारदान ओलं करून टाकलं ते जरा कोरडं पडलं की त्यावर पाणी शिंपडल आहे.कारण खूपजणांनी मला सांगितलं होतं की ,त्यांचे एक-दोन वर्षाचे झाड उन्हाने जळून गेले होते.’त्यामुळे मी त्याची खूप काळजी करत होते.अर्थात मला मी लावलेल्या प्रत्येक झाडाची काळजी असते. पण हे माझं विशेष लाडकं होतं.
  त्याचा सुवास मी फुल आलं नसतांनाही अनुभवला आहे.एखाद्या गोष्टीचे वेड लागणे म्हणजे काय याचा अनुभव मी घेतला आहे.कधी कधी त्या झाडाच्या जवळ आमची जी खिडकी आहे तिथे जवळ जावून मी म्हणायचे,अरे मला फुलाचा सुगंध येत आहे,फुल फुललं वाटतं. जावून बघायला पाहिजे’माझ्या या वाक्याकडे कोणी फार लक्ष देत नव्हते.कारण रोप घरी आणल्यापासून मी असं काही काही बडबडत आहे ,त्यामुळे फारसं लक्ष कोणी दिले नाही. झाड छान वाढले.मुख्य म्हणजे उन्हाला त्याने ताकदीने तोंड दिले. याबद्दल मी खरोखरच कौतुक केले.मग त्याला सांगितले की आता पाऊस येणार आहे,कदाचित वारं येईल,वादळ येईल.तू जपून रहा हं.हा माझा वेडेपणा होता असं मला आज वाटतं आहे.कारण हे झाड निसर्गाचा भाग आहे,त्याला हे उपजतच माहित असणार. कोणत्याही गोष्टीला तोंड कसे द्यायचे,ताणाचे व्यवस्थापन कसे करायचे हे त्याला शिकण्याची गरज नव्हती.पण मी त्याचे मातृत्व घेतले होत ना?मग मी सावध करायचे.झाडाला सुंदर अशी हिरवी पाने आली.ते डेरेदार होत होतं आणि त्याबरोबरच माझा आनंदही डेरेदार होत होता.पण फुल कुठे आहे? तो सुवास मी झोपेतही घेत आहे,ज्या सुवासाने मला जाग  येत होती. मनात सारखं येत होतं की आता फुल यायला पाहिजे.हवंच आहे. मग मी रोज झाडाला सांगितलं ,मला फुलं हवी आहेत, खूप फुलं हवी आहेत.ये ना लवकर.
  एक दिवस मी रात्री गच्चीवर फेऱ्या मारत होते.वरून झाड सुंदर दिसत होतं.मी रोज निरखून पाहायचे.अगदी बारीक नजरेने आणि त्या नजरेत मला दोन कळ्या दिसल्या. आधी माझ्या चेहऱ्यावर स्मित आलं ,नंतर मी खरोखरच मोठ्याने हसू लागले. माझा आनंद मनात,स्मितात मावत नव्हता.मी दोन्ही हात पसरले आणि त्या झाडाला कवेत घेत म्हटलं thank you .मग ती कळी किती मोठी झाली याचं निरीक्षण सुरु झालं. ती तिचा रंग कसा बदलते.हे ही पाहत होते आणि एक दिवस त्या झाडाखाली उभी राहिले असतांना तो मला वेडावणारा सुगंध आला आणि मी वर पाहिलं. हो ते तिथं होतं .पूर्ण फुललं होतं. मी हलकेच ते फुल ओंजळीत घेतलं,आणि प्रत्यक्षात स्वप्नात नव्हे मी त्याचा सुवास घेतला.एखाद्या गोष्टीची आपल्याला तहान लागते ना तशी माझी तहान या फुलाने शांत केली. थंड केली.माझं स्वप्नं पूर्ण  झालं.

  मला वाटलं की आता फुल आल्यावर मी त्या झाडापासून आपोआप लांब होईल.पण तसं घडत नाही. मी अजूनही फुल काढतांना तेवढीच वेडावते.एखाद्या दिवशी फुल आलं नाही की लगेच नाराज होवून झाडाला म्हणते,’बघ ना मला फुल नाही मिळालं आज” झाडत कुठेतरी लपलेली कळी असते.ती वाऱ्याच्या सहाय्याने मला दिसते आणि मला मजा वाटते की माझी इच्छा पूर्ण झाली. आता तर फुल उंच असेल तर ते काढण्यासाठी मला प्रचंड कसरत करावी लागते.पण मी तो माझा रोजचा व्यायाम समजून आनंदाने करते.या कसरती नंतर मिळालेल्या फुलाचा तर मला विशेष आनंद होतो. ते सोनेरी,पिवळं,नाजुक दिसणारं पण सुवासाने बळकट असणारं फुल माझ्या हातात असतं तेव्हा वाटतं ,आता खरा दिवस सुरु झाला कारण तो सुवासाचा राजा माझ्याजवळ असतो ना.

Saturday, December 20, 2014

आपलं जीवन


    निर्मात्याने स्त्री आणि पुरुषाला हेतुपूर्वक थोडेसे अपूर्ण बनवले असावे ,त्यामुळे ते एकमेकांना स्वीकारतील आणि पूर्ण करतील.असं मला वाटते.आताही विचार करतांना मला असेही वाटते आहे की,अनेक शतकांपासून पती आणि पत्नी अशा परिभाषेत त्यांना अडकवले गेले आहे,ज्यातून खूप संकुचित अर्थ ध्वनित होतो.त्यामुळे नात्याची व्याप्ती कमी होते. समजा आपल्या  शब्दकोशातून पती-पत्नी हे शब्द काढून टाकले  आणि त्या जागी “जीवनभराचे मित्र” हे शब्द टाकले तर ?.आपण आपापल्या भूमिका जशा कधी आईची ,वडिलांची ,तर कधी छोट्या मुलाची ,शिक्षकाची ,सल्लागाराची भूमिका करत असतोच ना.,आणि अर्थात आपण    पती –पत्नी सुद्धा असतोच. .ह्या नात्याची व्याप्ती जर वाढवली  आणि ती वाढविण्यास मोकळीक दिली तर ?
    वैवाहिक नात्याची प्रतिष्ठा ही यातच असेल ,जेव्हा आपण आपल्या  जोडीदाराला केवळ शरीर न मानता एक पूर्ण,स्वतंत्र्य व्यक्ती मानली. एकमेकांची विचार करण्याच्या पद्धतीचे निरीक्षण केले ,वैयक्तिक मुल्यांवर ,दृष्टीकोनांवर ,श्रद्धावर चर्चा केली , आणि एकमेकांच्या भावनाविषयी संवेदनशील झालो ,सुसंगत भावना विकसित केल्या ,आणि एकमेकांबरोबर शांततेने बसून अध्यात्मिक बैठक विकसित केली .व्यक्तीच्या पूर्णतेचा आदर केला  आणि त्या व्यक्तीच्या गौण बाजू,त्याचे शरीर याचा विचार न करता त्या संपूर्ण व्यक्तीला जोडून घेतले तर नक्कीच सकारात्मक सुंदर नातं निर्माण होईल.
   हे सगळे जे दहा वर्षात करायचे आहे ते सगळे एका वर्षात करण्याचा प्रयत्न करून चालणार नाही ,तसेच जे एका वर्षात करायचे आहे ते एका महिन्यात करण्याचा प्रयत्न करून चालणार नाही .खुपजण  या गोष्टी सुरुवातीला काही महिन्यात करतात आणि नंतरच्या जीवनात ह्या गोष्टी सोडून दिल्या जातात.ते मेलेल्या नात्या बरोबर रहातात.जर रोपटे लहान असतानाच मेले तर झाडाचे काय होईल.म्हणून या गोष्टी हळूहळू करायला हव्या  आणि अधिक काळ टिकतील.
     जीवनात आणि चांगल्या नात्यात भूतकाळ हा अप्रासंगिक असतो.वर्तमान हा इमारत उभी करतो. भविष्य काळ हा खूप महत्वाचा असतो,ज्यात तुम्ही दोघं प्रवास करणार आहात.दैनदिन क्षुल्लक गोष्टीवर चर्चा केली तर तुम्ही प्रेमात पडाल. भविष्यावर बोला,स्वप्नांवर बोला,महत्वकांक्षे वर बोला. एकेमेकांच्या वाढीत वस्तुनिष्ठ पणे आणि आतून सहभागी व्हा.हा प्रेम वाढण्याचा मार्ग आहे.
   वैश्विक संकल्पना अशी आहे की लग्नानंतर दोन जीव एकमेकात मिसळून जातात आणि त्यांचा एक जीव होतो.याचा परिणाम असा असतो की स्त्री ला लग्नाच्या नांवाखाली  नेहमी पुरुषाची सावली बनून रहावे लागते. त्यांना त्याग करावा  लागतो  मग त्या व्यक्ती  निराश होतात ,स्वतः वर द्या करतात.  अशी  स्थिती  ही “तुझे”जीवन आणि “माझे”जीवन असे वेगवेगळे असते तेव्हा अधिक होतांना दिसते.” अर्थात काही ठिकाणी नात्यात तशी सकारात्मकता येणं काही कारणांमुळे फार अवघड होवून बसते.पण   “आपले जीवन” हे त्या अवकाशाला छेद्णारी गोष्ट आहे ज्याला लग्न म्हणतात. वैवाहिक जीवनातला आनंद हा दोघे “आपल्या” अवकाशाशी कसे संबधित आहेत आणि तो अवकाश जाणाऱ्या वर्षाबरोबर कसा वृद्धींगत  होतो यावर अवलंबून असतो.नाहीतर तो त्याचे जीवन जगेल आणि ती त्याचे जीवन जगेल.वस्तुस्थिती अशी असेल की ती तिच्या उत्तम “आपल्या” अवकाशात असेल जेव्हा तो ही त्याच्या  स्वतःच्या अवकाशात जाईल. यातून हा विश्वास मिळेल की तुम्ही एकमेकांच्या अवकाशाचा आदर करतात. तसेच एकमेकांच्या आवडी-निवडी,प्राथमिकता यांचा तुम्ही आदर करतात ,सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रेमाच्या नावाखाली तुमची घुसमट होणार नाही.
   विवाहाचा खरा अर्थ असा होतो की ज्या जीवनात तुम्ही दोघं गुंतले आहात त्याची गुणवत्ता वाढवणे होय.विवाह जीवनभर सातत्याने राहू शकेल,आणि दोघां साठी चांगल्या शक्यता निर्माण करेल.

  चांगला विवाहाचे नीट संगोपन करावे लागते, तो विकसित करावा लागतो.वैवाहिक नातेसंबंध हे सुंदररीतीने गुंफणे ही एक कला आहे,म्हणून आपण  कलाकार होवू या.

Tuesday, November 25, 2014

वाट पहाणे


    वाट पहाणे आणि च्या साठी वाट  पहाणे यामध्ये सूक्ष्म फरक आहे,जसा शांततापूर्ण प्रगती आणि तणावपूर्ण यश यात जसा फरक आहे.
    शेतकरी नांगरणी करतो आणि बीज पेरतो  ...नंतर त्याला थांबावं लागतं..तिथे त्याची पेरण्याची  जबाबदारी संपते. आता जर त्याला  वाट पहाण्याची कला माहित असेल  तर तो शांततेने वाट बघेल.त्याऐवजी जर तो” आता  मोड कधी येतील काय माहित? या विचाराने  वाट पहात  राहील तर तो अस्वस्थ होईल आणि त्याच्यावर ताण येईल. त्याचे मन सतत म्हणत राहील –“असे का घडले नाही?अजून का घडले नाही.अखेरीस मोड आलेच तरी त्याने त्याची शांतता त्या यशासाठी खर्च केलेली असते. बिघाड होवून गेलेला असतो.
       जर आपण  लिफ्टचे बटण दाबले तर आपल्याला ती येण्याची  वाट पहावी लागेल. आपण शांत राहू .पण ”ची वाट पहाणे” आपल्याला जमिनीवर ठेवेल पण आपले  डोळे सारखे  वर आणि खाली करतील ,आपण पन्नास वेळा त्याची बटण दाबत राहू,बरोबरच्या व्यक्तीला आपली कृती कशी बरोबर आहे हे पटवत राहू,मागच्या वेळी असं केल्याने लिप्ट कशी पटकन आली हे ही जोडीला सांगत राहू ...आपल्याला  वाटेल जर तिचा वेग वाढवता आला  तर ती आपल्यापर्यंत  लवकर येईल.तसेच आपण वेटरला ऑर्डर दिल्यांनतर आपल्याला काही वेळ  थांबावं लागते.हे आपल्यालातल्या काही जणांना माहित नसते. त्यांना वाटते की वेटरने  ते हॉटेलात शिरल्या बरोबर त्यांचे मन वाचावे  आणि पटकन त्यांना हवे ते आणून द्यावे . ..वेटर “ची वाट बघणे” याचा त्यांना संतापजनक अनुभव येतो
  .आपल्याला हवा तसा निर्णय आपण घेतो  ....आपल्याला  जशी कृती करायची तशी करत आहोत .तर मग ..आता थांबा...त्या “च्या वाट पहाणे” यासाठी नाही तर फक्त थांबा....यात आपल्याला  शांततेची किल्ली सापडेल,”ची वाट पहाणे” सुद्धा आपल्याला  यश देईल,पण ते यश  तणाव सुद्धा देईल.जर  यशासाठी शांततेचा मार्ग आहे तर मग तणावाचा मार्ग कशाला घ्यायचा? नाही का?
     अध्यात्मिक प्रगती करण्यासाठी एक आवश्यक गुण लागतो आणि तो म्हणजे आपली भूमिका करायची आणि थांबण्याची क्षमता होय.अनेक लोक अध्यात्मिक अनुभवासाठी  लोक रडत असतात,त्यांच्या हातून शांतता निसटून जाते,आणि खरं तर ते त्यांच्या “ची वाट पहाणे” या  दृष्टिकोनामुळे दुःखी असतात. “ची वाट पहाणे” मुळे अनुभवा ऐवजी  आपण आपल्या  विरूद्धच उभे राहतो , खर तर आपल्याला  “ज्या  अनुभवाचा”साक्षीदार व्हायचे असते.तो  अनुभव हा नुसता  थांबण्याचा साक्षीदार आहे.

  “ची वाट पहाणे “ सोडून देवू या  म्हणजे आपण  तणावपूर्ण  यशही आपोआप येणार नाही. आपले  काम/भूमिका आणि आपली कार हे सर्व  थांबा आणि हे शिकून घ्या या मंत्राने केले तर आपल्या प्रगतीचा मार्ग हा शांततेचा असेल. अर्थात हे सर्वच मला एका काकडीच्या बी ने शिकवलं.

Saturday, November 15, 2014

सूर्योदय आणि सूर्यास्त


  एका लहान मुलीला चित्रं काढण्याचे अतोनात वेड होते.तिला चित्रं काढण्यासाठी कोणतीही जागा चालत असे किंवा कुठे,कधी,केव्हाही हातात येणाऱ्या कोणत्याही साधनाने ती चित्रं काढत असे आणि स्वतः काढलेल्या त्या रेषांकडे ,आकृत्यांकडे मग्न होवून बघत  बसे.जर तिची तंद्री कोणी मोडली तर बाईसाहेब मोठ्याने भोकाड पसरत असत.लहान होती तोपर्यंत सगळ्यांनाच तिचं हे चित्रकार असणं फार आवडत होते. कारण त्यामुळे त्यांना तिच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तरे द्यावी लागत नसत . पण जसजशी ती मोठी होवू लागली,शाळेत जावू लागली तसतशा तिच्याकडच्या अपेक्षा वाढल्या. तिचं असं तंद्रीत बसणं खटकायला लागलं. विशेषतः तिच्या पालकांना तिच्यात  वेडेपणाच्या छटा दिसायला लागल्या.म्हणून त्यांनी तिला कोंडून ठेवलं.तिच्याजवळ कोणतीही अशी वस्तू राहणार नाही,ज्यापासून ती चित्रं काढेल.याची त्यांनी नीट काळजी घेतली.मुलीला खूप राग आला.आदळआपट आरडाओरड ,किंचाळणे,दारावर धाड धाड आवाज करणे. हे सगळं करून ती थकली.शेवटी नीट वागण्याचा म्हणजे घरातली,शाळेतली सगळी कामं नीट करण्याचा वायदा झाला.( पण चित्र काढणार नाही’ हे मात्र तिने कबूल केले नाही.)तरीही कोणीच दार उघडले नाही.मनात संताप होताच.लहानच होती.चित्र न काढू देण्याच्या अनेक उपायांनी ती सतत ग्रासलेली होती. रागारागाने ती सगळीकडे थुंकली,शु केली आणि त्यातच काहीतरी गिरगटाला लागली,मनातलं अपार दुःख ती अशी व्यक्ती करायला लागली आणि हळूहळू शांत झाली. पहिल्या १-२ तासानंतर आवाज नाही.म्हणून संध्याकाळी पालकांनी दार उघडून पाहिलं तर पोर शांत होऊन  पडली होती. तिने तिच्या डोळ्यात कोणतीही ओळख नव्हती. ते घाबरले .आई रडायला लागली.मुलीची सूर्योदयाची,सूर्यास्ताची चित्रं गोळा करून दाखवली पण तिच्या डोळ्यात ओळखच नव्हती.सूर्याच्या प्रखर प्रतिष्ठेच्या आगीने तिला एवढे तप्त केले की तिच्यातली ती जळून खाक झाली.
  सूर्योदय आणि सूर्यास्त बघतांना ही गोष्ट मला नेहमी आठवते. त्या पोरीच्या डोळ्यांनी कितीतरी वेळा मी तो पाह्यचा प्रयत्न करते.अद्भुत वाटते.खरतर आपल्यातल्या खूपजणांना हिलस्टेशनला किंवा एखाद्या पर्यटनस्थळी जावून सूर्यास्त बघण्याची हौस असते. रोज आपल्या गावात होणारा  सूर्योदय,सूर्यास्त पाहण्याचे अप्रूप वाटत नाही.मला मात्र त्याचे नेहमीच अप्रूप आहे.आपण जर सूर्योदय आणि सूर्यास्त रोज पाहत असलो तर त्याच्या वेळा ऋतू प्रमाणे  बदलत जातात हे लगेच कळते.त्याचे  दक्षिणायन,उतरायण कधी सुरु झाले हे लगेच कळते आणि त्यातली गंमत अनुभवता येते.मग कॅलेंडर ,पंचांग बघण्याची जरूर भासत नाही. शिवाय सूर्योदयाच्या वेळा शांत असतात.त्या एक अख्खा दिवस तो तुमच्या स्वप्नासह तुमच्या ओटीत टाकतो,ते ही त्याच्या तेजसाहित.हा विचारच मला फार आकर्षित करतो. दिवसाची उमेद बाळगावी असा वाटणारा हा विचार असतो.कधी कधी तर सकाळी मी खिडकी उघडून त्याला बघते तेव्हा म्हणते सुद्धा,अरे बरं झालं तू वेळेत आलास ते.नाहीतर आज तुझ्याकडे मला बघायला वेळ झाला नसता. मग त्याची सोबत घेवून सकाळच्या कामांना छान सुरुवात करते. मला माहित आहे,’आज’ या दिवसांत तो जेवढा छान आणि  सुखावह वाटतो आहे तो पुढे कधीतरी वाटणार नाही. पण म्हणून ‘आज’ ला झाकोळून कसं चालेल.?

     सूर्यास्ताचे सुद्धा गणित आपण रोज तो बघत असू तर आपल्याला कळते.ऋतू प्रमाणे झालेला बदल लगेच लक्षात येतो.मग सूर्यास्ताच्या आधी दोन-पाच मिनिटे आधी जावून उभे राहता येते. आपल्या घरातूनच तो दिसत असेल तर मात्र सहज डोकावता डोकावता ही त्या वेळा आपल्याला साजऱ्या करता येतात. सूर्य स्वतःचा तेजस्वी साज हळूहळू काढून घेतो आणि ढगात लुप्त होतो किंवा डोंगराआड जातो किंवा समुद्रात बुडतो.तेव्हा तो पसरवत असलेल्या रंगछटा आपल्याला मोहून टाकतात. सहजपणे सभोवताली आपण पाहतो तेव्हा रंगाची मंद उधळण दिसते.खूप प्रसन्न,शांत,निवांत वाटते. एक प्रसन्न हास्य आपल्या चेहऱ्यावर विलसत राहते.कितीतरी वेळ तो गेला त्या जागेकडे आपण पाहत राहतो.जणू तो परत पटकन “भो”करणार आहे. एकमात्र खरं रोज रोज सूर्यास्त पाहयची सवय लागली तर आपण त्यात खूप अडकून जातो. मला जर कधी गच्चीवर जायला उशीर झाला तर मी सरळ म्हणतेच,’अरे हे काय थांबायचं ना थोडे,मी येतच होते. एक माणूसपण त्याला देवून टाकते आणि त्याने पसरवलेल्या मनोहारी छटावर लुब्ध होते. त्याच वेळी आकाशात एखादा पक्षांचा थवा जेव्हा त्याच्या समोरून जातो तेव्हा वाटते,अरे चित्रकार काढतात ती चित्रं त्यांनी खरोखरीच अनुभवलेली असतात.तुम्हांला आठवत असतील अशी अनेक चित्रं,ज्यात संध्याप्रकाशात तळ्याचं,समुद्राचं पाणी चमचमते आहे किंवा प्रत्यक्ष आणि पाण्यात बुडणारा सूर्य,सूर्यास्त होतांना सुर्याजवळून जाणारा लहान पक्ष्यांचा थवा,संधीप्रकाशात तळ्याशी बसलेली तरुणी,,चिंताक्रांत म्हातारा,खेळणारी मुलं,आणि आपली छोटी मैत्रीण जी प्रतिष्ठेच्या दाहाने आपली निर्मितीच मूक करून बसली.खरतर तिचे हे मौन सुटावे म्हणूनच मी सूर्योदय आणि सूर्यास्त पाहते.वाटते ती माझ्याबरोबरच आहे हे सगळं चित्र पाहत आणि भरेल कधीतरी ती रंग तिच्या स्वप्नांमध्ये.   

Sunday, October 19, 2014

कभी अलविदा ना कहना


   सीमा आणि अतार्किक यांचं काल जोरदार भांडण झालं .सगळ्या कॉलनीने ते ऐकलं.पण रात्रीची वेळ असल्याने सगळ्याच बायकांना शांत बसावं लागलं.फोन करूनही उपयोग नव्हता.कारण सीमा बाई फोनवर खेकसायला कमी करणार नाही.शिवाय म्हणतील तुम्हांला एवढा दम निघत नाही का? उद्या दुपारी मी शिपाया बरोबर निरोप पाठवून बोलवून घेतले असतेच ना? खर आहे तिचं.तिने आम्हांला बोलावून सगळं सांगितलं असतं.कारण भांडण रात्री झालं होतं आणि तिच्याकडे रात्रीच्या वेळी शिपाई नसतो नाहीतर तिचं काम शिपाईच करतो. आम्ही आमच्या शिपाया पासून सगळं लपवायला पाहतो तर हिचं आपलं तिसरच.
   सकाळी पाहिलं तर बाईसाहेब व्यवस्थित आवरून फुलं तोडत होत्या आणि चक्क गाणं गुणगुणत होत्या. हटकलं असतं तर म्हटलं असतं माझ्या नावातच सीमा आहे,मी सगळं मर्यादा सांभाळून करते,काय लढाई करायची असेल ती सीमेवरून करते आणि लगेच समेवर येते.तिची समेवर येण्याचे गुपित जाणून घेण्यासाठी आम्ही दुपारी आपापला नाश्ता घेवून तिच्याकडे जमलो तेव्हा मादाम फार जुन्या काळात गेल्या.आणि कहाणीची सुरुवात करत म्हणाल्या.आटपाट नगर होतं आणि तिथे

  सीमा आणि अतार्किक यांच लग्न नुकतेच ठरलं होतं दोघं मिळून फिरायला वगैरे जात,आणि भरपूर गप्पा मारत.शिवाय इतरांपेक्षा आपलं कसं वेगळं आहे आणि कसे युनिक जोडीदार आहोत आपण हे ही त्यांचं खूप चाले.आठवड्यातून एकदा भेट होत असे त्यामुळे सांगण्यासारखं ही भरपूर असे.एकमेकांचे आई-वडिल,भाऊ-बहीण ,मित्र-मैत्रिणी असं भरपूर गबाळ गोळा करून ते त्यात रमत.स्वतः बद्दल ही ते थोडं बोलत नाही असं नाही.त्यात आवडता सिनेमा,नट-नट्या,आधुनिक आहोत असं दाखविण्यासाठी जे बोलावं लागतं ते सगळं ते बोलत.त्यामुळे भेटीचा शेवट होई तेव्हा विरहाच्या विचाराने त्यांना दुःख होई.मग ते हिंदी सिनेमाच्या गाण्याने “कभी अलविदा ना कहना “ असं म्हणत कसा बसा निरोप घेत असत.
  तिला कालच्या तिच्या भांडणापर्यंत आणण्यासाठी एकजण म्हणाली,म्हणजे आता तुम्ही एकमेकांना अलविदा म्हणणार तर.जणू ती त्यांच्या अलविदा म्हणण्याची वाटच पाहत होती.ती तरी बिचारी काय करणार,रोज तिच्या नवऱ्याकडून ऐकून घ्यावे लागे,सीमा वहिनी बघ,कशा नेहमी हसतमुख असतात ते.सीमानेच अलविदा म्हटलं म्हणजे आपोआपच ती कॉलनी सोडेल आणि ही मग नवऱ्याच्या टोमण्यातून मोकळी होईल.
पण सीमेबाहेर जाईल ती सीमा कसली आणि तार्किकतेने बोलेल तो अतार्किक कसला? सीमा यावर म्हणाली नाही ग बाई,आता कसलं आम्ही अलविदा म्हणतो आहे?
  का ग पोरी मध्ये जीव अडकला आहे का?की नवराच सोडवत नाही.आमच्या प्रश्नाने ती गंभीर होईल आणि रडत रडत काही सांगेन असं वाटलं.पण ती सीमेच्या बाहेर येईच ना.
  ती म्हणाली अग मी अलविदा म्हणायचं तर मला एक घर पाहिजे,नोकरी पाहिजे,घरात चीड चीड करायला माणूस पाहिजे.आणि त्याला सुद्धा स्वयंपाक यायला पाहिजे,बाई ठेवली तरी तिच्यावर चिडता येत नाही,शिवाय उरलेल्या स्वयंपाकाची विल्हेवाट लावायला एक माणूस घरात हजर पाहिजे.म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं की,कभी अलविदा ना कहना.आम्ही जगाला अलविदा म्हणू तेव्हाच एकमेकांना अलविदा म्हणू.
  अग अलविदाची गोष्ट नको सांगू.तुझं भांडणाबद्दल सांग,त्याचे कारण सांग.
काही नाही ग ,नेहमीचच.
म्हणजे?तू कशाला नाही म्हटलं का?
  हो.
कशाला?
अलविदा ना कहना “हे गाणं कोणी म्हटलं आहे हे ओळखायला मी नकार दिला.

  आम्ही सगळ्यांनी डोक्यावर हात मारत आणि आमचेच दात आमच्यावर खात आणि आमच्या नाश्तातला थोडा भाग सीमाला खाऊ घालून आम्ही सीमाला अलविदा म्हटलं.