Friday, November 29, 2024

झुरळ आणि झुरळीण

 #व्यंग5

                                              झुरळ आणि झुरळीण 

                            🤪 शाळा सुरु होणार ही बातमी ऐकल्यापासून झुरळ आणि झुरळीण विशेष आनंदात होते.ते कसे हे समजून घेण्यासाठी थोडेसे मागे जाऊ या.शाळेच्या मागे नाही हो,काळाच्या मागे.तर त्याचं काय झालं.

          गावातल्या एका शाळेत झुरळ,झुरळीण आणि त्यांचा परिवार अनेक वर्षांपासून राहत होता. ही त्यांची कितवी पिढी आहे हे कोणालाच माहित नव्हते.अगदी त्या परिवाराला सुद्धा.कारण झुरळाला आपणहून /नैसर्गिक मरण नसते यावर त्यांचाही विश्वास आहे. त्यांच्याबरोबर मोठ्या संख्येने पालीची छोटी छोटी पिल्लं सुद्धा राहत होती.पाल गावभर बुरकाळायची तेव्हा ही झुरळाची पिल्ल आणि पालीची पिल्लं एकमेकांशी खूप खेळत.त्यामुळे मात्र कोळ्यांना त्रास होई.कारण ते जेव्हा जेव्हा जाळं विणत तेव्हा तेव्हा ही झुरळाची पिल्लं मध्ये मध्ये येत आणि ते मोडत. पण सगळ्यांनी बरोबर गुण्यागोविंदाने एकत्र राहण्याचे ठरवल्याने ते एकमेकांना त्रास देत नसत.किंबहुना कोणाच्या डोळ्यात येईल असा त्रास देत नसत.😁😁

  दिवसभर झुरळ आणि झुरळीण शाळेच्या कपाटेमागे,भिंतीच्या पोपड्यामध्ये दडून बसत.आणि संध्याकाळी बाहेर पडत.त्यावेळी त्यांच्याकडे कोणाचे लक्ष जात नसे.शाळा रिकामी झालेली असे.त्यामुळे आवाज करायला कोणी उरत नसे.मग कॉलनीतली मुलं आपली बॅट घेवून चेंडू उडवत येत.येतांना ते काहीतरी खायला घेवून येत. त्यामुळे शाळेतल्या मुलांच्या डब्यातले खरकटे आणि या मुलांच्या पुड्यामधला खाऊ खाण्यासाठी भरपूर होई.म्हणून झुरळ आणि झुरळीण खुश होते शाळेवर.आता जन्मभर इथून ह्लावं लागणार नाही म्हणून ते निश्चिंत झाले होते.

  शाळेच्या कपाटामध्ये थोडेफार सामान होते, फाईली होत्या. त्याच्या आसपास लपण्याची कला झुरळाच्या कुटुंबाने शिकली होती.त्यामुळे कोणतीही फाईल काढली,किंवा सामान हलवलं तर एखादा झुरळाचा वंश इकडेतिकडे धावे आणि काढणारा जोरजोरात ओरडे.पण एवढ्या तेवढ्या वरून माणसं का ओरडतात हे कोळ्याला अजिबात कळत नव्हते.त्याला कोणी झटकत नव्हतं.जैवविविधता मुलांना दाखवता यावी म्हणून तो तिथं होता असं त्याचं म्हणणं होतं.शाळेत मुलांनी वाचावी म्हणून जी पुस्तके होती त्यात झुरळ आणि झुरळीणचा परिवार फक्त प्रवेश करू शकत होता.त्यांनाच ती पुस्तके वाचण्याची मुभा होती. कारण कपाटाचे कुलूप न उघडता ते पुस्तकं वाचू शकत होते.मुलांना ती कला नव्हती.

 असं सगळं आलबेल चाललं असतांना अचानक शाळा बंद होण्याची घोषणा झाली.अनेक दिवस मुलं शाळेत येणार नाही आणि तिथं काहीही खरकटे सांडणार नाही.स्टाफ रूम मध्ये वडे मागवले जाणार नाही.डबे खाल्ले जाणार नाही.तसेच संडास बाथरूम कोरडे राहतील.अशावेळी आपलं काय होईल.आपल्या सात पिढ्या या शाळेत गेल्या,आणि अजून कितीही जाऊ शकतील याची खात्री होती.पण अचानक एक रोग आला आणि त्याने मुलं घरी बसली.आता आपण काय करावं हे झुरळ आणि झुरळीणला कळेना.तेवढ्यात कोळी म्हणाला की,आता लोक शाळेची स्वच्छता करायला येणार आहेत.त्यामुळे मलाही इथून जावं लागेल.

   झुरळ आणि झुरळीण घाबरले,कारण स्वच्छता करणारे लोक आले तर प्रथम आपणच मारले जाऊ याची त्यांना खात्री वाटली.कारण चपलेचा एक वार, त्यात मरतील हजार.काय करावं त्यांना सुचेना.म्हणून त्यांनी शाळा सोडून आसपासच्या घरात जाण्याचा विचार केला.पण कोळ्याच्या म्हणण्यानुसार तिथं तर साफसफाई अजूनच जोरात चालू झाली आहे.कारण लोक घराच्या बाहेर पडत नाही.मग अशावेळी काय करावं कळेना.तेवढ्यात भिंतीवरून एक उंदीर येतांना दिसला.तो फारच घाईत होता.त्याला बळेबळे थांबवून विचारले,की तू इकडे का आलास?तर म्हणाला घरात सगळीकडे पिंजरे टांगत आहेत.मी म्हटलं शाळा बरी.

 “पण इथं सफाईला कोणी येणार नाही का?” झुरळीणीने विचारलं.

“येतील,पण घरच्या सारखी होणार नाही.”

तेवढ्यात कोणीतरी अधिकारी शाळेत आला आणि त्याने तिथं पानाची पिचकारी मारली.हे बघून झुरळ आणि झुरळीणीने श्वास सोडला.चला फार काही मनावर घ्यायची गरज नाही. असं त्यांना वाटलं.उंदीर आणि पालही हे लांबून पाहत होते.त्यांनी पण आपआपल्या जागा घेतल्या.सरकारचे म्हणणे तसे फारसे मनावर घ्यायचे नसते,हे जसे माणसाला कळले तसे माणसांचे वागणे फारसे मनावर घ्यायचे नसते हे झुरळाच्या परिवाराला कळले.त्यामुळे त्यांनी एकमेकांना प्रेरणा देण्यासाठी झुरी नाच केला.त्यांचा तो नाच बघून कोळ्याने आपले पाय हलवले पण स्वतःच्या जाळ्यात तोच अडकला.म्हणून पालीची पिल्ले आली आणि त्यांनी त्याला बाहेर काढले.एवढ्या भयानक परिस्थितीत ,म्हणजे स्थलांतराची वेळ आली असतांनाही त्यांनी एकमेकांना आधार दिला. हे बघून उंदीर भारावून गेला आणि त्यानेही तिथंच बस्तान बसवायचे ठरवले.🥰🥰

Friday, November 22, 2024

 

#व्यंग4

             काटकसर 

      🥰🥰  “सुनो जी,अजी सुनते हो जी”   अशी हाक मारत नाही तोच, 

“हिंदी मालिका बघणं बंद कर,मी काहीही आणून देणार नाही आधीच सांगतो.” मिस्टर आपल्या मातृभाषेत कडाडले.☹️☹️

मी भाषे भाषेत फरक करत नाही,माझं सगळ्या भाषेवर सारखंच प्रेम आहे.”

“प्रेम आहे ना मग ती नीट शिकून घे.”

“प्रेम करायला कशाला शिकायला लागतं? ते असतंच.”😘😘

“मी भाषेबद्दल बोलतोय.ते सोड तू कशाला एवढ्या गोड आवाजात हाक मारत होती.

 पटकन मुद्दावर आलो तर बाकीचा भाषेचा अन्याय वाचेल याचे शहाणपण आल्याने मिस्टरांनी track ताबडतोब बदलला.

“मला गेहू की आटे की bag  पाहिजे.”🙃🙃

“कशाला? आपल्या घरी गहू आहेत त्याचं पीठ करून आण.”

“तुम्हांला बायकोच्या सर्जनशीलतेचे बिलकुल कौतुक नाही.

 माझ्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया नाही,हे बघून मुद्दा नीट समजवून सांगावा म्हणून पुढे म्हटलं,

 “अहो कालपासून  सरला भाभी  युट्युबवर गेहू की आटे की bag है ना उसका एक फडका शिकवत आहे.”

   😍😍भाभीनी सांगितलेलं मी नीट ऐकलं.आणि तसं केलं.गेहूचा आटा एका डब्यात काढला.ते तिनं सांगितलं नव्हतं.पण स्वतःची अक्कल वापरली की येतं सगळं. मग ती पिशवी स्वच्छ धुतली,नीट मधोमध कापून तिचा लांब तुकडा केला.तिला नवीन कॉटनचा ब्लाउज पिस लावला आणि चारी बाजूला शिवण्यासाठी मशीनवर घेतलं तर सुईच तुटली. 🤓🤓घरच्या माणसांसारखे आमच्या मशिनलासुद्धा आमचं कौतुक नाही.घराचे पैसे वाचवण्यासाठी हे सगळे उद्योग मला करावे लागत आहेत.पण कोणाला आहे का काही त्याचं? मग घाईघाईने शेजारी २० रुपये देवून ते गेहू की आटे की bag का टेबल top शिवून आणला.आणि तो मायक्रोवेव्ह जवळ ठेवला.आता भांडी विसळून झाली की लगेच त्यावर ठेवता येतात. कुठेही पाणी नाही की चिकचिकाट नाही.घरच्या घरी किचन ओट्यावर लागणारा कॉटन top तय्यार.😍😍

 संसार करायचा म्हणजे एवढ्या बारीकसारीक गोष्टींकडे किती निगुतीने मी बघते हे तुमच्या लक्षात आलंच असेल.  😇😇हो हो आमच्या घरचे गहू आहेत,पीठही शेजारीच दळून मिळतं.पण किचन ओट्यावरचा कॉटन top असा सहज कोणीही करू शकत नाही.त्यासाठी मेहनत आणि निर्मितीक्षम मन लागतं.पण कोणाला काय त्याचं? काटकसर हा स्वभावाचा भाग असावा लागतो.तो शिकून थोडाच येतो.😉😉


Thursday, March 28, 2024

भटक भवानी

 कोणाला भटकायला आवडत नाही, असं विचारलं की अनेकजण ताबडतोब हो म्हणतात,पण दुसऱ्या क्षणाला ते कसे आणि किती कामात व्यग्र आहेत हे सांगतात आणि भली मोठी कामाची यादी देतात. जणू फिरणारी माणसं काहीच काम करत नाही.असे अनेक लोकांचे घर सुटत नाही तर काहींना घरी राहणे नको वाटते.एकाच घरात वर्षानुवर्षे राहणे मला नकोस होते.पण कुठेही राहिले तरी ज्या गावात आपले घर आहे तिथे जावेच वाटते,परत बाहेर पडण्यासाठी. तसेही आपला जवळचा आनंदच आपल्या मनाला सुखावतो.

    प्रत्येक गावात मला ओळखीच्या खुणा दिसतात, त्या गावातल्या प्रत्येक वळणावर माझे काहीतरी सुटले आहे,त्याला काहीसा प्राचीन इतिहास वगैरे असण्याची शक्यता आहे असे मला वाटत राहते. तिथल्या मातीत माझ्या गावाची माती असणार असे मला उगाच वाटत राहते.खरेतर मी कोणत्या एका गावाची नाही हे माझ्या इतके कोणाला माहित असणार आहे. मला वाटते मी ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणच्या खुणा दुसऱ्याच ठिकाणी शोधत राहते.ती गावं माझ्या बरोबर सगळीकडे फिरत असतात आणि तिथली माणसं तर माझ्यातच राहतात आणि येतात माझ्या बरोबर. त्या लोकांच्या गोष्टी,त्यांनी सांगितलेले सुख आणि दुःख माझ्या बरोबर चालत राहते.ते कधी मला धैर्य देते तर कधी उणीवा दाखवते.

🚴🚴🚴🚴🚴🚴🚴🚴🚴🚴🚴🚴

Wednesday, March 27, 2024

Happy' day

 आज माझ्या एका मैत्रिणीला ब्लॉग कसा असतो आणि लिहायचं कसं हे सांगत असताना सहज माझ्या जुन्या पोस्ट बघितल्या आणि लक्षात आलं की कितीतरी दिवसात मी पोस्ट केली नाही. याचा अर्थ लिहण्यासारखे आणि सांगण्यासारखे काहीच नव्हते असे नाही.पण लिहिले नाही. आज परत टाईप करताना मन उगाच हलके झाले आहे. हे आपण प्रकाशित करण्यासाठी लिहित आहोत की नाही याचा विचार अजिबात मनात आला नाही.हे एकप्रकारे बरे झाले.

  अनेक दिवसांपासून मन वेगवेगळ्या.विषयांचा ध्यास घेत आहे.पण म्हणतात ना एक ना धड. भाराभर चिंध्या.तसे काहीसे कडे आहे.प्रत्येक गोष्टी विषयी कुतूहल वाटत राहते. आणि जगण्याला मजा येते.ही मजाच तर आपल्याला सतत उत्साही आणि आनंदी ठेवत असते. So आपला आनंद कशात आहे तो शोधू या. Happy day.