#व्यंग5
झुरळ आणि झुरळीण
🤪 शाळा सुरु होणार ही बातमी ऐकल्यापासून झुरळ आणि झुरळीण विशेष आनंदात होते.ते कसे हे समजून घेण्यासाठी थोडेसे मागे जाऊ या.शाळेच्या मागे नाही हो,काळाच्या मागे.तर त्याचं काय झालं.
गावातल्या एका शाळेत झुरळ,झुरळीण आणि त्यांचा परिवार अनेक वर्षांपासून राहत होता. ही त्यांची कितवी पिढी आहे हे कोणालाच माहित नव्हते.अगदी त्या परिवाराला सुद्धा.कारण झुरळाला आपणहून /नैसर्गिक मरण नसते यावर त्यांचाही विश्वास आहे. त्यांच्याबरोबर मोठ्या संख्येने पालीची छोटी छोटी पिल्लं सुद्धा राहत होती.पाल गावभर बुरकाळायची तेव्हा ही झुरळाची पिल्ल आणि पालीची पिल्लं एकमेकांशी खूप खेळत.त्यामुळे मात्र कोळ्यांना त्रास होई.कारण ते जेव्हा जेव्हा जाळं विणत तेव्हा तेव्हा ही झुरळाची पिल्लं मध्ये मध्ये येत आणि ते मोडत. पण सगळ्यांनी बरोबर गुण्यागोविंदाने एकत्र राहण्याचे ठरवल्याने ते एकमेकांना त्रास देत नसत.किंबहुना कोणाच्या डोळ्यात येईल असा त्रास देत नसत.😁😁
दिवसभर झुरळ आणि झुरळीण शाळेच्या कपाटेमागे,भिंतीच्या पोपड्यामध्ये दडून बसत.आणि संध्याकाळी बाहेर पडत.त्यावेळी त्यांच्याकडे कोणाचे लक्ष जात नसे.शाळा रिकामी झालेली असे.त्यामुळे आवाज करायला कोणी उरत नसे.मग कॉलनीतली मुलं आपली बॅट घेवून चेंडू उडवत येत.येतांना ते काहीतरी खायला घेवून येत. त्यामुळे शाळेतल्या मुलांच्या डब्यातले खरकटे आणि या मुलांच्या पुड्यामधला खाऊ खाण्यासाठी भरपूर होई.म्हणून झुरळ आणि झुरळीण खुश होते शाळेवर.आता जन्मभर इथून ह्लावं लागणार नाही म्हणून ते निश्चिंत झाले होते.
शाळेच्या कपाटामध्ये थोडेफार सामान होते, फाईली होत्या. त्याच्या आसपास लपण्याची कला झुरळाच्या कुटुंबाने शिकली होती.त्यामुळे कोणतीही फाईल काढली,किंवा सामान हलवलं तर एखादा झुरळाचा वंश इकडेतिकडे धावे आणि काढणारा जोरजोरात ओरडे.पण एवढ्या तेवढ्या वरून माणसं का ओरडतात हे कोळ्याला अजिबात कळत नव्हते.त्याला कोणी झटकत नव्हतं.जैवविविधता मुलांना दाखवता यावी म्हणून तो तिथं होता असं त्याचं म्हणणं होतं.शाळेत मुलांनी वाचावी म्हणून जी पुस्तके होती त्यात झुरळ आणि झुरळीणचा परिवार फक्त प्रवेश करू शकत होता.त्यांनाच ती पुस्तके वाचण्याची मुभा होती. कारण कपाटाचे कुलूप न उघडता ते पुस्तकं वाचू शकत होते.मुलांना ती कला नव्हती.
असं सगळं आलबेल चाललं असतांना अचानक शाळा बंद होण्याची घोषणा झाली.अनेक दिवस मुलं शाळेत येणार नाही आणि तिथं काहीही खरकटे सांडणार नाही.स्टाफ रूम मध्ये वडे मागवले जाणार नाही.डबे खाल्ले जाणार नाही.तसेच संडास बाथरूम कोरडे राहतील.अशावेळी आपलं काय होईल.आपल्या सात पिढ्या या शाळेत गेल्या,आणि अजून कितीही जाऊ शकतील याची खात्री होती.पण अचानक एक रोग आला आणि त्याने मुलं घरी बसली.आता आपण काय करावं हे झुरळ आणि झुरळीणला कळेना.तेवढ्यात कोळी म्हणाला की,आता लोक शाळेची स्वच्छता करायला येणार आहेत.त्यामुळे मलाही इथून जावं लागेल.
झुरळ आणि झुरळीण घाबरले,कारण स्वच्छता करणारे लोक आले तर प्रथम आपणच मारले जाऊ याची त्यांना खात्री वाटली.कारण चपलेचा एक वार, त्यात मरतील हजार.काय करावं त्यांना सुचेना.म्हणून त्यांनी शाळा सोडून आसपासच्या घरात जाण्याचा विचार केला.पण कोळ्याच्या म्हणण्यानुसार तिथं तर साफसफाई अजूनच जोरात चालू झाली आहे.कारण लोक घराच्या बाहेर पडत नाही.मग अशावेळी काय करावं कळेना.तेवढ्यात भिंतीवरून एक उंदीर येतांना दिसला.तो फारच घाईत होता.त्याला बळेबळे थांबवून विचारले,की तू इकडे का आलास?तर म्हणाला घरात सगळीकडे पिंजरे टांगत आहेत.मी म्हटलं शाळा बरी.
“पण इथं सफाईला कोणी येणार नाही का?” झुरळीणीने विचारलं.
“येतील,पण घरच्या सारखी होणार नाही.”
तेवढ्यात कोणीतरी अधिकारी शाळेत आला आणि त्याने तिथं पानाची पिचकारी मारली.हे बघून झुरळ आणि झुरळीणीने श्वास सोडला.चला फार काही मनावर घ्यायची गरज नाही. असं त्यांना वाटलं.उंदीर आणि पालही हे लांबून पाहत होते.त्यांनी पण आपआपल्या जागा घेतल्या.सरकारचे म्हणणे तसे फारसे मनावर घ्यायचे नसते,हे जसे माणसाला कळले तसे माणसांचे वागणे फारसे मनावर घ्यायचे नसते हे झुरळाच्या परिवाराला कळले.त्यामुळे त्यांनी एकमेकांना प्रेरणा देण्यासाठी झुरी नाच केला.त्यांचा तो नाच बघून कोळ्याने आपले पाय हलवले पण स्वतःच्या जाळ्यात तोच अडकला.म्हणून पालीची पिल्ले आली आणि त्यांनी त्याला बाहेर काढले.एवढ्या भयानक परिस्थितीत ,म्हणजे स्थलांतराची वेळ आली असतांनाही त्यांनी एकमेकांना आधार दिला. हे बघून उंदीर भारावून गेला आणि त्यानेही तिथंच बस्तान बसवायचे ठरवले.🥰🥰